पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यासाठी
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सक्रीय पुढाकाराने राज्यात राबविल्या जात
असलेल्या जलशिवार योजनेचे सुपरिणाम दिसत असतानाच राज्यातील जलसिंचन प्रकल्पांना
गती देण्यासाठी त्यांनी केंद्र सरकारकडे महत्वाच्या वाटाघाटी केल्या. केंद्रीय जलसंसाधन
मंत्री उमा भारती यांची भेट घेऊन मुख्यमंत्री फडणवीस यांनी कृष्णा खोरे पाणी
वाटपासह मराठवाडा व विदर्भातील सिंचनाच्या समस्यांबाबत सकारात्मक चर्चा केली.
कृष्णा पाणी वाटप लवादानुसार महाराष्ट्राला मिळालेल्या पाण्याचे फेरवाटप करण्यात
येऊ नये अशी भूमिका मांडतानाच मराठवाडयाला त्याच्या हिश्श्याचे पाणी मिळावे आणि
विदर्भातील गोसीखुर्द प्रकल्पासाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी
मुख्यमंत्र्यांनी या बैठकीत केली.त्यास केंद्राकडून मिळालेला सकारात्मक प्रतिसाद
राज्याच्यादृष्टीने महत्वाचा ठरला.ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या अमृतमहोत्सवी
सोहळयास मुख्यमंत्री फडणवीस यांनी उपस्थिती लावत त्यांना शुभेच्छा दिल्या.यासोबतच राज्यातील
प्रशासकीय अधिका-यांचा व राज्यशासनाच्या माहिती व तंत्रज्ञान विभागाच्या
वेबपोर्टलचा राजधानीत झालेल्या राष्ट्रीय सन्मानाने यात भर पडली.
राज्याच्या दृष्टीने कृष्णा खोरे प्रकल्प अत्यंत महत्वाचा आहे.
महाराष्ट्रात उगम पावणारी कृष्णा नदी जवळपास दोन हजाराहून अधिक किलो मीटरचे अंतर
कापून कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि तेलंगनातून वाहत जावून बंगालच्या उपसागरात मिळते.
या राज्यांदरम्यान कृष्णा नदीच्या पाणी वाटपावरून निर्माण झालेल्या कृष्णा पाणी वाटप लवादातील राज्याची भूमिका मुख्यमंत्री
फडणवीस यांनी केंद्रीय मंत्री उमा भारती यांच्या निवासस्थानी आयोजित बैठकीत स्पष्ट
केली. कृष्णा खोरे लवादानुसार महाराष्ट्राला मिळालेल्या पाण्याचे फेरवाटप करण्यात
येऊ नये असे त्यांनी स्पष्ट केले. कृष्णा खो-याचा लवाद हा आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि
महाराष्ट्र या तीन राज्यांमध्ये आहे. आंध्र प्रदेश राज्यातून तेलंगना राज्य वेगळे
झाल्यामुळे आंध्रप्रदेश ने याचिका दाखल करून नव्याने पाणी वाटपाचा निर्णय दयावा
असे म्हटले आहे. कृष्णा पाणी वाटप लवाद पुन्हा सुरू करावा ही आंध्र प्रदेशाची
मागणी आहे. कृष्णा खोरे लवादाचा निर्णय झाला त्यावेळी तेलंगाणा हे राज्य
अस्तित्वात नव्हते त्यामुळे पाण्याचे फेरवाटप व्हावे अशी मागणी आंध्र प्रदेशने
केली आहे. पंरतु लवादाच्या निर्णयानुसार महाराष्ट्राच्या वाटयाला आलेल्या
पाण्याच्या उपलब्धतेवर राज्याने काही प्रकल्प हाती घेतले आहेत व त्यासंदर्भात
नियोजन केले आहे. त्यामुळे महाराष्ट्र आपल्या हिश्श्याचे पाणी आंध्र प्रदेशला
देणार नसल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी याबैठकीत सांगितले. आंध्रप्रदेशला जे
पाणी मिळाले आहे ते पाणी आंध्र आणि तेलगंणा या दोन राज्यांनी वाटून घ्यावे असे
स्पष्ट मत मुख्यमंत्री फडणवीस यांनी बैठकीत मांडले.
मराठवाडयाला
21 टिएमसी पाणी मिळावे
उजनी
धरणाविषयी बैठकीत चर्चा झाली. या धरणातील पाणी भीमा खो-यातून येते. यासंदर्भात
दूस-या अंतरीम लवादाने उजनी धरणात पाणी न सोडण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे
मराठवाडयात पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. आधीच दुष्काळाने होरपडून निघालेल्या
मराठवाडयाची स्थिती बीकट असल्याने मराठवाडयाला त्याच्या हिश्श्याचे 21 टिएमसी पाणी
मिळावे, अशी मागणी मुख्यमंत्र्यांनी बैठकीत
केली .
गोसी खुर्द प्रकल्पास निधी
उपलब्ध व्हावा
विदर्भातील गोसीखुर्द हा राष्ट्रीय प्रकल्प ब-याच
वर्षांपासून रखडलेला आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यास विदर्भातील सिंचन क्षमता वाढेल. मात्र हा
प्रकल्प पूर्ण होण्याकरिता ब-याच अडचणी येत आहेत. सध्या या प्रकल्पाला केंद्र
सरकारकडून निधी उपलब्ध होत नाही. ही बाब लक्षात घेता प्रकल्प पूर्ण करण्याकरिता
केंद्राकडून निधी उपलब्ध व्हावा अशी मागणी
मुख्यमंत्री फडणवीस यांनी बैठकीत केली. या
सर्व मागण्यांबाबत उमा भारती यांनी सकारात्मकरित्या मार्ग
काढण्याचे आश्वासन दिले. राज्याचे जलसंपदा
मंत्री गिरीश महाजन, आमदार मंगल प्रभात लोढा, आशीष शेलार, जल व्यवस्थापन विभागाचे
सचिव एस.एम. उपासे, लवादासमोर राज्याची बाजू मांडणारे ऍ. दिपक नाडगोरकर यावेळी
उपस्थित होते.
शरद पवार यांचा दिमाखदार ‘अमृतमहोत्सवी सोहळा’
महाराष्ट्राचे चार वेळा मुख्यमंत्री राहीलेले ,
केंद्रात सलग १० वर्ष कृषीमंत्री पदाचा पदभार सांभाळणारे व भारतीय राजकारणात ५ दशक
यशस्वी कारकीर्द गाजविणारे राज्याचे
ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा दिमाखदार अमृतमहोत्सवी सोहळा येथील विज्ञानभवनात पार
पडला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या सोहळयास उपस्थिती लावून शरद पवार
यांना शुभेच्छा दिल्या. राष्ट्रपती प्रणब मुखर्जी, उपराष्ट्रपती हमीद अन्सारी, लोकसभा अध्यक्षा सुमीत्रा महाजन, पंतप्रधान
नरेंद्र मोदी, माजी पंत प्रधान डॉ. मनमोहन सिंग,कॉग्रेस अध्यक्षा
सोनिया गांधी, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, पंजाबचे मुख्यमंत्री प्रकाशसिंग
बादल, भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, समाजावादी पक्षाचे अध्यक्ष मुलायम
सिंग यादव, राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालु प्रसाद यादव, कम्युनीस्ट पक्षाचे ज्येष्ठ
नेते सीताराम येचुरी, माजी केंद्रीय मंत्री फारूख अब्दुला, श्रीमती प्रतिभा शरद पवार आणि खासदार
प्रफुल्ल पटेल यांच्यासह
मान्यवर मंचावर उपस्थित होते. याशिवाय राजस्थानच्या मुख्यमंत्री
वसुंधरा राजे सिंधीया, विविध केंद्रीय मंत्री, खासदार, आमदार तसेच देशातील व
महाराष्ट्रातील विविध मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमात मान्यवरांची उदबोधक भाषणे झाली. ‘भारताला जागतिकस्तरावर अन्न-धान्यात निर्यातदार देश बनविण्यात शरद पवारांचे मोलाचे
योगदान आहे.’ अशा
शब्दात राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांनी पवारांचा गौरव
केला. केंद्रीय कृषीमंत्री म्हणून सलग १० वर्ष काम करताना त्यांनी देशाच्या
शेती विकासासाठी रचनात्मक कार्य केले.९० च्या दशकात महाराष्ट्राची राजधानी व
देशाची आर्थिक राजधानी मुंबईवर अंडरवर्ल्डचे सावट होते याच काळात या शहरात बॉम्ब
स्फोट झाले. अशा वाईट अवस्थेत पवारांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून सक्षम
नेतृत्च दिले. कठोर व अचूक निर्णय घेत मुंबईतून अंडरवर्ल्डचा नि:पात केला.
त्यांच्या या कामगिरीबद्दल त्यांना ‘सलाम बॉम्बे आणि सलाम पवार म्हणने’ औचित्याचे ठरेल, अशा शब्दात त्यांनी शरद पवार यांचा गौरव करत त्यांना
दिर्घ आयुष्याच्या शुभेच्छा दिल्या.
पंतप्रधान
नरेंद्र मोदी आपल्या
भाषणात म्हणाले, शरद पवार यांचा मूळ पिंड हा रचनात्मक आहे. त्यामुळेच ते
राजकारणातही रचनात्मक काम करू शकले. देशाच्या राजकारणात सतत ५ दशक वावर
असणारे पवारांचे आयुष्य देशसेवेसाठी
पूर्णपणे समर्पित राहीले आहे. त्यांनी आपल्या कारकिर्दीत सहकार आणि राजकारणात
संतुलन राखले आहे. पवारांबरोबरील इस्त्राईल देशाच्या दौ-यातील काही प्रसंग आणि
गुजरातचे मुख्यमंत्री असताना पवारांनी राज्यातील शेतीच्या विकासाची पाहणी करून
कपासी सोबतच गहू उत्पादनाचा दिलेला सल्ला आदी आठवणींना पंतप्रधानांनी उजाळा दिला.
उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांनी, ‘शरद पवार हे एक अष्टपैलू राजकारणी आहेत’अशा शब्दात पवरांचा गौरव केला. कृषीमंत्री म्हणून पवारांना राज्यसभेत
सदस्यांनी विचारलेल्या विविध प्रश्नांना उत्तर देताना पवारांनी नेहमी संयत भूमिका
घेल्याचेही त्यांनी सांगितले.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह म्हणाले,
‘शरद पवारांनी देशाला
सृजनात्मक योगदान दिले.’ महाराष्ट्रासह देशाच्या सहकार,
कृषी, उद्योग व सामाजिक क्षेत्रात पवारांनी महत्वपूर्ण कार्यकेल्याचे त्यांनी
सांगितले. ७० च्या दशकात यशवंतराव चव्हाण देशाचे वित्तमंत्री असताना त्यांच्या
आर्थिक सल्लागारपदी आपण होतो तेव्हा शरद पवारांशी पहिली भेट झाल्याचे ते म्हणाले. त्यानंतर
८० च्या दशकात आपण आरबीआयच्या गव्हर्नर पदी नियुक्त झाल्यापासून ते माझ्या
पंतप्रधानपदाच्या कारकिर्दीपर्यंत पवारांचा सहवास लाभल्याचेही त्यांनी सांगितले. ‘तूम जिओ हजारो साल, साल के दिन हो पचास हजार’ अशा
शब्दात त्यांनी पवारांना शुभेच्छा दिल्या.
काँग्रेस
अध्यक्षा सोनिया गांधी म्हणाल्या, ‘शरद पवारांच्या अमृतमहोत्सवी सोहळयात विविध पक्षांचे नेते एका मंचावर उपस्थित
असल्याचे चित्रच त्यांच्या अजातशत्रु व्यक्तीमत्वाचा परिचय देणारी आहे.’ पवारांशी माझा स्नेह गेल्या दोन दशकांपासून असल्याचे सांगत, देशातील
तांदूळ आणि गव्हाचे उत्पादन वाढवून त्यांची निर्यात करण्याच्याकामी पवारांनी
मोलाचे योगदान दिल्याचे त्या म्हणाल्या.महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, देशाचे संरक्षणमंत्री
आणि कृषीमंत्री म्हणून त्यांनी दिलेले योगदान अनन्यसाधारण आहे असेही त्यांनी
सांगितले.
याप्रसंगी
शरद पवार आपल्या मनोगतात म्हणाले, ‘मी वयाच्या अठराव्या वर्षी राजकारणात प्रवेश केला. वयाची पंचाहत्तरी, राजकीय जीवनाचे पच्चावन वर्ष
आणि संसदिय जीवनाचे ४९ वर्ष अशा सर्व प्रवासात जनतेने दिलेल्या सकारात्मक
प्रतिसादाबद्दल आभार व्यक्त करतो.’ महाराष्ट्राचे पहीले
मुख्यमंत्री व आपले राजकीय गुरू यशवंतराव चव्हाण यांच्याकडून संसदीय कामकाज व
राजकीय शिष्टाचाराचे धडे मिळाल्याचे त्यांनी सांगितले. आजच्याप्रसंगी आई-वडीलांची
आठवण होत असल्याचा उल्लेख करीत त्यांच्याकडून शिक्षण प्रसार, सहकार आणि राजकीय
क्षेत्राचे बाळकडू मिळाले असे ते म्हणाले. त्यांनी यावेळी विविध आठवणींना उजाळा
दिला.
या कार्यक्रमात शरद पवार यांच्या कार्याचा वेध घेणारी
लघु चित्रफित दाखविण्यात आली. तसेच शरद पवार यांच्या जीवनावर आधारीत ‘गौरव ग्रंथ’,‘ ऑन माय टर्म’
आणि ‘लोक माझे सांगाती’ या
पुस्तकांचे राष्ट्रपतींच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रस्ताविक खासदार प्रफुल्ल पटेल यांनी केले तर
आभार खासदार सुप्रिया सूळे यांनी मानले.
राज्यातील प्रशासकीय अधिका-यांची छाप
महाराष्ट्रातील
तीन अधिका-यांचा ‘जी फाईल्स’
पुरस्काराने दिल्लीत गौरव करण्यात आला. संस्थेने २०१५ च्या वार्षिक पुरस्कारासाठी
देशभरातील १० प्रशासकीय अधिका-यांची निवड केली त्यात महाराष्ट्रातील ३ अधिका-यांचा
समावेश असने ही गौरवाची बाबआहे. पुरस्कार वितरणसमारंभात महाराष्ट्राचा गौरव आणखी
वाढविणारा क्षण ठरला तो, या संस्थेने राज्याचे सुपूत्र ज्येष्ठ वैज्ञानिक डॉ.अनिल
काकोडकर यांना ‘जीवन गौरव पुरस्कार’
देऊन सन्मानित करण्याचा. सरकारचे कायदे, नियम व योजनांची चोख अंमलबजावणी करून
कल्याणकारी समाजव्यवस्था निर्माण करण्यात मोलाची भूमिका वठवत इतरांसाठी पथदर्शी
काम करणा-या अधिका-यांचा गौरव ‘जी फाईल्स’ ही संस्था करते.
केंद्रीय खान व स्टील
मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांच्या हस्ते प्रसिध्द वैज्ञानिक डॉ.अनिल काकोडकर यांना
संस्थेचा जीवन गौरव पुरस्कार प्रदान
करण्यात आला. महाराष्ट्र शासनाच्या जालना येथील आंतरराष्ट्रीय उपग्रह देखरेख
कक्षाचे प्रभारी अभियंता अजय सिंघल यांना‘असाधारण योगदान
पुरस्कार’,जलसंपदा आणि रोजगार हमी योजना विभागाचे सचिव
प्रभाकर देशमुख आणि विधी व तांत्रिक विभागाच्या महासंचालक मीरा बोरवणकर यांना ‘उत्कृष्ट योगदान पुरस्कार’ प्रदान करण्यात आले.
रेल्वे मंत्री सुरेश प्रभु, हरियाणा राज्याचे अर्थमंत्री कॅप्टन अभिमन्यू यावेळी
उपस्थित होते.
डॉ. अनिल काकोडकर यांनी भारताच्या वैज्ञानिक क्षेत्रात
आणि विशेषत: आण्वीक संशोधन कार्यात दिलेल्या योगदानासाठी त्यांना हा पुरस्कार
प्रदान करण्यात आला. अजय सिंघल यांनी
उत्तम स्पेक्ट्रम नियंत्रण आणि परवान्यांसाठी पारदर्शी पध्दतीचा अवलंबकरून
नियम उल्लंघ नकरता राबविलेल्या उपग्रह स्पेक्ट्रम यंत्रणेसाठी गौरविण्यात आले.
शेती पिक किटक नियंत्रण यंत्रणेचा प्रभावीपणे अवलंब करून शेती व ई- प्रशासन
व्यवस्थेत दिलेल्या अमुल्य योगदानासाठी प्रभाकर देशमुख यांचा सन्मान करण्यात
आला. मुंबई शहरातून अंडरवर्ल्डच्या
कारवायांना चाप बसविणे आणि या शहरातील स्कँडल उघड करण्याच्या महत्वपूर्ण
योगदानासाठी मीरा बोरवणकर यांना गौरविण्यात आले.
माहिती तंत्रज्ञान विभागाच्या
संकेतस्थळाला राष्ट्रीय पुरस्कार
काळाचे पाऊले ओळखत
महाराष्ट्र शासनाने नेहमीच आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार केला आहे. राज्य शासनाचा माहिती
व तंत्रज्ञान विभाग यात अग्रेसर आहे. विभागाने शारीरिक असक्षम व्यक्तींना
हाताळण्यास सोयीचे असे वेब पोर्टल तयार केले असून यास राजधानीत सर्वोत्तम सरकारी
संकेतस्थळाचा राष्ट्रीय पुरस्कार देवून सन्मान करण्यात आला.
केंद्रीय सामाजिक न्याय व सक्षमीकरण
मंत्रालयाच्यावतीने राष्ट्रीय शारीरिक असक्षमीकरण दिनाचे औचित्य साधून शारीरिक
असक्षम राष्ट्रीय पुरस्कार वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात केंद्रीय
अर्थमंत्री अरूण जेटली यांच्या हस्ते विविध क्षेत्रात उत्तम कामगिरी करणा-या व्यक्ती
व संस्थांचा राष्ट्रीय पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. केंद्रीय सामाजिक न्याय
व सक्षमीकरण मंत्री थावरचंद गहलोत,
राज्यमंत्री द्वय कृष्णपाल सिंह आणि विजय
सांपला उपस्थित होते.
महाराष्ट्र शासनाच्या माहिती व
तंत्रज्ञान विभागाचे प्रधान सचिव विजय कुमार गौतम यांनी राज्य शासनाला मिळालेला सर्वोत्तम संकेतस्थळाचा
पुरस्कार स्वीकारला. माहिती व तंत्रज्ञान विभागाचे संचालक एम संकर नारायणन यांच्या
मार्गदर्शनाखाली हे संकेतस्थळ तयार करण्यात आले. सावित्रीबाई फुले पुणे
विद्यापीठात कार्यरत प्राध्यापक व स्वत: शारीरिक असक्षम असलेले धंनजय भोये यांचा
संकेतस्थळ निर्मिती कार्यात सहभाग होता. शारीरिकदृष्टया असक्षम व्यक्तींनाही शासन
निर्णय व संकेतस्थळावरील महत्वाची माहिती सुगम रित्या कळावी यासाठी ब्रेल लिपीसह
ऑडीओ –व्हीडीओ क्लीप देण्याची व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आली आहे. मार्ग
निर्देर्शीत करण्याची व्यवस्थाही या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिली आहे. संकेतस्थळ
बहुभाषी सुविधांसहीत स्मार्ट फोन व संगणकावर सहजगत्या वापरता येऊ शकते.याच
कार्यक्रमात कर्ण बधिरांच्या स्वयंरोजगार गटात वैयक्तीक पुरस्कार पुण्याच्या नेहा
कुलकर्णीला प्रदान करण्यात आला. मंतीमंदाच्या गटात मुंबईच्या समीर दार्जी यांना
सन्मानीत करण्यात आले. अपंगाच्या आदर्श व्यक्ती गटाच्या कर्णबधीर या उपगटात पुण्याच्या
प्रेरणा सहाणे यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला.
परिचय केंद्राच्या
प्रदर्शनाला उदंड प्रतिसाद
येथील
प्रगती मैदानावर आयोजित ३५ व्या भारतीय अंतरराष्ट्रीय उद्योग मेळाव्यात महाराष्ट्र
परिचय केंद्राने महाराष्ट्र दालनात राज्य शासनाच्या गेल्या एक वर्षाच्या काळातील
विकास कामांची माहिती देणारे प्रदर्शन आयोजित केले. या प्रदर्शनाचे उदघाटन उद्योग
राज्यमंत्री प्रवीण पोटे-पाटील यांनी केले. उद्योग मंत्री सुभाष देसाई, उद्योग
विभागाचे प्रधान सचिव अपूर्व चंद्रा आदी मान्यवर उपस्थित होते. आशियाखंडातील
महत्वाचा व्यापार मेळावा म्हणून ओळख असणा-या या व्यापार मेळाव्यात व्यापारी,
गुंतवणूकदार, ग्राहक मोठया प्रमाणात भेटी देतात. देशातील प्रत्येक राज्यांकडून
आपल्या राज्यातील लघू व मध्यम उद्योगांसह राज्यसरकारच्या सहाय्याने होत असलेल्या
प्रगतीची झलक येथे मांडण्यात येत असते. महाराष्ट्र दालन या मेळाव्यास भेट देणा-या
प्रत्येक व्यक्तीच्या आकर्षणाचे केंद्र असते.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सक्षम
नेतृत्वात राज्याने विविध क्षेत्रात केलेल्या प्रगतीची माहिती महाराष्ट्र दालनास
भेट देणा-या प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहचविण्यासाठी मराठी व इंग्रजी भाषेत
आकर्षकपणे ही प्रदर्शनी लावण्यात आली. महाराष्ट्र दालनाच्या दर्शनी भागात आकर्षक
पध्दतीने मांडण्यात आलेल्या प्रदर्शनीस भेट देणा-या प्रत्येकांची पावल स्थिरावत
होती. राज्याच्या प्रगतीचा आलेख एकाच ठिकाणी बघायला मिळत असल्याने प्रदर्शनीस भेट
देणारा प्रत्येक व्यक्ती भरपूर माहितीचा ठेवा मिळविल्याच्या भावनेने पुढे जात होता.
जवळपास दोन आठवडे लावण्यात आलेल्या या
प्रदर्शनीच्या माध्यमातून महाराष्ट्र दालनास भेट देणारे देश-विदेशातील व्यापारी,
गुंतवणुकदार, ग्राहक व सर्वसामान्य जनतेपर्यंत राज्य शासनाच्या महत्वाकांक्षी
निर्णयाची व योजनांची माहिती पोहचविण्यात आली. प्रदर्शनीस थायलंडच्या शिष्टमंडळाने
भेट दिली. यासोबतच महाराष्ट्रातील खासदार सर्वश्री विनायक राऊत, आनंदराव अडसूळ,
अरविंद सावंत, रक्षा खडसे यांनी भेट दिली व प्रदर्शनाचे कौतुक केले.
********
No comments:
Post a Comment