Thursday, April 23, 2015

मरण स्वस्त झालय, अन मानवी भावना ?











मराठी साहित्यात आपल्या लेखनातून मानवी भाव-भावनांचे कंगोरे उलगडून दाखवत साहित्य प्रांतात वेगळी छाप सोडणारे  लेखक आबा बागूल यांच्या 'मरण स्वस्त होत आहे' या साहित्यकृतीची आठवण व्हावी अशीच घटना काल दिनांक २२ एप्रिल २०१५ रोजी  दिल्लीतील जंतरमंतर येथे घडली. राजस्थान राज्यातील दौसा येथील शेतकरी गजेंद्र सिंह याने भर दूपारी येथील भल्या मोठया निंबाच्या झाडावर चढून आपल्याच दुपटटयाने गळफास लाऊन घेतला. हे घडत असताना त्या ठिकाणी एका राजकीय पक्षाची सभा सुरु होती. सभेसाठी आलेले लोक, सतत इथे बंदोबस्तासाठी राहणारे जवळ पास २० ते २५ पुरूष व महिला पोलीस अन वार्तांकन करायला येणारे प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी अशा जवळपास १० हजार लोकांसमोर हा आत्महत्येचा थरार घडला. पण एकालाही आपल्या कर्तव्याची  अन माणुसकीची जाणीव  होऊ नये?  म्हणूनच वाटतय मरण स्वस्त झालय अन मानवी भावनांवरही आता  प्रश्न चिन्ह उभं राहिलं आहे.

                     दिल्लीत पत्रकारीतेसाठी आलो तेव्हाच जंतर मंतर येथे होणारे धरणे आंदोलन बघने, त्याची व्याप्ती समजून घेणे अन वार्तांकन करने हा नित्यक्रम असायचा. आज माझं ऑफीस जंतर मंतरच्याच परिसरात आहे. हा भाग संसद, राष्ट्रपती भवन, आकाशवाणी, पीटीआय, युएनआय, जनतादल (सं.) चे मुख्यालय, केरळ भवन यांना हाकेच्या अंतरावर आणि कॅनॉटप्लेस या दिल्लीच्या मध्यवर्ती ठिकाणी आहे. संसदेच्या अधिवेशनाच्यावेळी देशाच्या विविध भागातील लोकं आपल्या मागण्या सरकार दरबारी  पोचविण्यासाठी इथे धरणे आंदोलन देतात. यावेळी त्या-त्या भागातील नेते मंडळी संसदेच्या कामकाजा निमित्त दिल्लीत  उपलब्ध असल्याने धरणे आंदोलनात भाषणबाजी ही करतात. धरणे संपले की मग संबंधीत मंत्रालयाच्या मंत्र्याला किंवा सचिवाला भेटून धरणेकरी निवेदन सोपवतात. अन मग त्या निवेदनाचा पाठपुरावा करतात. धरणे आंदोलनासाठी रितसर परवानगी घ्यावी लागते. अन त्यानंतर त्यांना  इथे पोलिस संरक्षणही मिळते. दिल्लीतील  माझ्या वास्तव्यात  जंतर मंतर वरील समाजसेवक अन्ना हजारे यांचे लोकपाल विधेयकासाठीचे  आणि निर्भयासाठी झालेले धरणे आंदोलन हे देश-विदेशात पोचल्या‍चे मी बघीतले. यावरून जंतर मंतरचा अन धरणे आंदोलनाचा सहसंबंध आपणास लक्षात आला असावा.
                        माझ्या दिल्लीतील ७ वर्षांच्या वास्तव्यात पहिल्यांदाच जंतरमंतर वर आत्महत्येची घटना घडल्याचे बघीतले. पण, ही आत्महत्या एका गरीब शेतक-याची आहे. जी देशातील प्रत्येक मानसाला अंतर्मुख होऊन विचार करण्यास भाग पाडणारी आहे.
                         या घटनेच्या ठिकाणच्या परिस्थितीवर प्रकाश टाकता ते अधिक स्पष्‍ट होईल. याठिकाणी आम आदमी पक्षाची भूसंपादन विषयावरील रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. त्यासाठी मोठया संख्येने लोक इथे एकत्र झाले होते. कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये म्हणून सुरक्षेसाठी  इथे नेहमी प्रमाणे मोठया प्रमाणात पोलिस उपस्थित होते. तसेच, आम आदमी पक्षाच्या रॅलीेचे वार्तांकन करण्यासाठी आलेले प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी विशेषकरून इलेक्ट्रॉनीक मिडियाचे कॅमेरामन आणि प्रिंट मिडीयाचे फोटोग्राफर इथे उपस्थित होते अन त्यांच्या देखत राजस्थानातील शेतकरी गजेंद्र सिंह याने गळफास लाऊन आपला जीवन प्रवास संपवला.  इथे अधोरेखीत करावसं वाटतं हा प्रकार घडत असताना ज्या पोलिसांनी खाकी वर्दी  परिधान करताना आपल्या विभागाच्या "शांती सेवा न्याय" या ब्रीदाला जागून कर्तव्य करण्याची शपथ घेतली होती ती पूर्ण न करता   त्यांनी नाकर्तेपणा दाखवला. ज्या 'आम आदमी पक्षाने' आपल्या पक्षाचे नावच सर्व सामान्य माणसाच्या  हितासाठी लढा देऊ या सदहेतुने देत हा पक्ष उभा केला त्याच्या एकाही सदस्याला आम आदमीचा कळवळा आला नाही . शोकांतीका तर त्याही पलीकडे आहे ही रॅली मुळात शेतक-यांच्या मागण्यासंबंधात होती. म्हणजे मुख्यमंत्र्यासहीत अन्य मंत्री व पक्षाचे पदाधिकारी इथे उपस्थित  होते पण एकालाही आपल्या कर्तव्याची जाणीव झाली नाही . सर्वांनी हा आत्महत्येचा थरार घडत असताना भाषणबाजी करण्यात धन्यता मानली. इथे शेतक-यांच्या प्रश्नांची फार कमी जान असलेल्या शहरी तरूण पिढीला आत्महत्या करणारा शेतकरी दिसत असताना हा प्रसंग रोखता आला नाही. प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी या आत्महत्येच्या प्रत्येक क्षणाचे चित्र टिपत होते. राष्ट्रीय वृत्तपत्र पंजाब केसरी अन दैनिक जागरण चे छायाचित्रकार अनुक्रमे हरी प्रकाश आणि ध्रुव कुमार यांनीही पत्रकारीतेतील नैतिकतेला बगल देत आपल्या बेगडी कर्तव्याला प्राधान्य दिेले. ( Photo & Photo Caption in Punjab Kesari :  पहले पेड पर चढकर किया ऐलान, मोबाइल पर की किसी से बात, लिखा अंतीम पत्र, लगाई फाँसी और फंदे पर झूल गया गजेंद्र)
               हा सर्व वृत्तांत आपल्यापुढे ठेवला त्याच विश्लेषण आपणच करा. अन " मरण स्वस्त झालय अन मानवी भावना ?" या ओळीचाही अंतर्मूख होऊन विचार करा.