Wednesday, December 31, 2014

लग्न




लग्न

आयुष्याचे वेग-वेगळे वळणं बालपण, तारुण्य, गृहस्थ जीवन आणि म्हातारपण. मी जेव्हां आयुष्याच्या एका वेगळया अर्थात लग्न या टप्प्यावर येऊन पोचलो आणि या टप्प्याला जाणीवपूर्वक सामोरे गेलो तेव्हा स्वानुभवाने लग्न या शब्दाची उकल करावी असा विचार झाला, तेव्हा हा लेखन प्रपंच. काय लिहायचयं हे मला माहित नाही पण, घेतलेल्या अनुभवातून काही तरी छान लिहीलं जाईल हा विश्वास.
    जन्मगांव अचलपूर येथे आई- बाबा, दादा- स्वर्गवासी ताई, मोठी आई- मोठे वडिल आणि त्यांचे मूल-मुली, आजोबा-आजी अशा संयुक्त कुटुंब पध्दतीत गेलेलं बालपण रमनीयचं. बाबांना लग्नात आजोबांनी(आईचे वडिल) दिलेली राजदूत गाडी त्याहून मनसोक्त केलेला प्रवास, आईने सकाळी उठल्या पासून ते झोपेपर्यंत अगदी शिस्तबध्द  व संस्कारी आयुष्याचा घालून दिलेला वस्तूपाठ, आजोबांचा मस्त मिजास स्वभाव आणि त्यातून आपसूक मिळतगेलेलं सामाजिक भानाचे धडे अधून-मधून आजीच्या मायेची पाखर अन यात स्वगृही व स्वग्रामी निघून गेलेलं ५ वी पर्यंतच शालेय शिक्षण. एका अर्थाने सतत घरी वास्तव्य करण्याचा हाच काळ (एका अर्थाने सुवर्णकाळ) परत माझ्या आयुष्यात आजपर्यंत आलाच नाही म्हणून हा उल्लेख आवर्जून करावासा वाटला.
    ५ वी नंतरच शालेय शिक्षण आजोळी विहीगांवला. येथून बालपणाच्या दुसर्‍या टप्प्याला सुरुवात. स्वत:च्या घरापासून लांब राहण्याची ही आयुष्यातील पहिलीच वेळ अन त्या अर्थाने आयुष्यात नात्यांच  महत्व, तडजोडी, जीवन शिक्षण समजून घेण्याचा महत्वाचा टप्पाही म्हणेन मी याला. एक सुंदर घर, आपली माणसं त्यांनी दिलेले संस्कार, प्रेम अन शिस्त आयुष्याची मोठी शिदोरी ठरली. विहीगांव या खेडेगांवाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील सामाजिक, आर्थिक, राजकीय असे बरेच पैलू समजून घेण्यास येथील वास्तव्यात मदत झाली.
    महाविद्यालयीन जीवन हा ही उल्लेखनीय टप्पा म्हणावा लागेल. अंजनगांवसुर्जी येथील राधाबाई सारडा महाविद्यालयाचा बीए द्वितीय व तृतीय वर्षाचा विद्यार्थी म्हणून राष्ट्रीय सेवा योजना, युवा महोत्सव, विविध क्रिडा व वक्तृत्व स्पर्धांतील सहभाग आणि त्यातून माझी निर्माण झालेली स्वतंत्र ओळख. अन सोबत-सोबत रितसर धार्मीक शिक्षण घेऊन किर्तणकार म्हणून मिळवलेली पदवी आणि कार्यक्रम करण्यास केलेली सुरुवात, तदनंतर रस्त्याच्याकडेला पालात, आदीवासी वसतीगृहात अन झोपडपट्टीत राहणारे मुल-मुली यांना मोफत शिकविण्याचे कार्य, वयाच्या १८ व्या वर्षांपासून  जन्मदिन आणि गुरुपोर्णिमा हे सामाजिकभान राखत आजतागायत रक्तदानाने साजरा करण्याचा जाणीवपूर्वक राबविलेला उपक्रम हे ही महत्वाचे टप्पे. अमरावती , पुणे येथे पत्रकारितेचे शिक्षणपूर्ण करीत असतांना आलेले बरेवाईट अनुभव. अन २००८ मधे दिल्लीत पत्रकारिता क्षेत्रात करीअर करण्यासाठी सुरु झालेली लढाई. अखेर २०१३ मधे महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क विभागाच्या परिक्षेत दुसराक्रमांक पटकवून शासकीय नोकरी मिळवत दिल्लीतच नोकरीचा श्रीगणेशा करणारा मी. एकेकाळी वयाच्या २८ व्या वर्षी लग्न करण्याची योजना आखणारा मी. वयाच्या एकतीशीनंतर लग्न या आयुष्याच्या महत्वाच्या टप्प्याला सामोरे जाण्याचं धाडस करून या प्रसंगाला सामोरे जातो.
    आतापर्यंत जगलेलं आयुष्य आता पुढे काय होणार?, आजपर्यंत जपलेल्या आपल्या आवडी-निवडी, विचार, मित्र त्यांच पुढे काय?, दोनाचे चार हात झाल्यानंतर येणार्‍या कौटुंबिक, सामाजिक अशा असंख्य जबाबदार्‍या पेलवता येतील का?, जीवनसाथी म्हणून आयुष्यात येणारी मुलगी कशी असेल?  टयूनींग जूळेल का? असे एकानेक प्रश्न. अन समर्पक उत्तर शोधून अन मिळवून घेत हे आयुष्य पूर्वीसारखच सुंदर, सुबक अन व्यवस्थीत असावं हा माझा मानस पूर्ण होण्यासाठीच्या मी ठरवलेल्या योजना पूर्ण होतील का? यापैकी काही प्रश्नांची उत्तरे माझ्याकडे आहेत इतर प्रश्नांची उत्तर मिळवू, तूर्तास घडयाळीत पाच वाजत आलेत. लग्न झाल्यानंतर झालेला एक महत्वाचा बदल म्हणजे ऑफीस सूटलं की घरी बायको वाट बघत असेल आता घरी जायला पाहिजे अस वाटनं अन माझी बायको माझी मैत्रीण वाटणं हा होय. बाकीच नंतर लिहीन वेळ मिळेल तसं So its time to say good bye……….
    आज यावर्षीच्या शेवटच्या दिवशी परत हा लेखन प्रपंच पुढे नेतो. मूळ मुदृा लग्न. लग्न जरी एका मुलाचं वा मुलीच होत असलं तरी कुटुंब ,नातेवाईक अन समाज अशा सर्व मान्यता या प्रसंगाला लागतात. मग या मान्यता पूर्ण करण्याकरिता करावयाचे सोपस्कार जसे मुलगा-मुलगी यांच्याकडून पाहणीचा कार्यक्रम ते साखरपुडा अन लग्नापर्यंतची प्रक्रीया ही रुढी, मान्यता(काही अंशी परंपरावदी अन रटाळ)याला चिटकूनच चालते. तिथे मुलगा किती सुशिक्षीत आहे वा नोकरीवर आहे असचं मुलीच्याही बाबतीत सारख्या परिस्थितीत किती काळजी घेतली जातं असावी हे मला अजूनपर्यंत न सुटलेलं कोड आहे जे मी अतिशय जाणीव पूर्वक उदधृत करतोय. दोन अनोळखी व्यक्ती काही पारंपरिक सोपस्कार आटोपून आयुष्याचा नवा डाव मांडतात. ती आणि तो ज्या कौटुंबिक व सामाजिक वातावरणात वाढले, त्यांचे भावविश्व हे पूर्णपणे भिन्न मग अशात लग्नकरून स्वीकारलेली जबाबदारी पेलताना सर्व गोष्टी सुरळीत व्हायला वेळ लागणार हे निश्चित.पण लग्नाआधीच या अनोळखी व्यक्तींनी उपलब्ध संवाद साधणांद्वारे एकमेकांना समजून घेतल तर निश्चितच सुरुवातीचा एकमेकांना जाणून घेण्याचा काळ तेवढा सुलभ होतो हे मी अनुभवांती सांगू शकतो.
    लग्नावर मोठया प्रमाणात खर्च होणारा पैसा अन झगमगाट याला फाटा देण्याचाच माझ्यासह माझ्या कुटुंबिंयाचाही विचार. त्यानुसार आम्हाला हे साधता आल. तूमच्यावर प्रेम करणारे सच्चे नातेवाईक अन मित्र या नाजूक प्रसंगी तूमच्या जवळ असावे अस वाटण सहाजिक आहे अन ते मला मिळाल याबाबत मी स्वत: खूप आनंदी आहे. आपल चांगल होत हे तुमच्या हितशत्रुंच्या डोळयात खूपत असेल ही शक्यताही नाकारता येत नाही तसं काहीस चित्र आढळून आलं. पण आपल्याला त्याच काय? लोक आपल्याशी कसेही वागूदेत पण आपण आपली माणुसकी सोडायची नाही हा आजपर्यंतचा माझा फॉर्मुलाच यावर रामबाण उपाय ठरला. एकंदरीतच लग्नाच्या प्रसंगाला सामोरे जाताना आई-वडिल व आपल्यावर खर प्रेम करणारे नातेवाईक अन मित्र यांच्या साक्षीने जीवनाच्या नवीन टप्प्याला सामोरे जाताना तेवढं टेंशन नाही वाटतं. आपल चांगल होण्यासाठी त्यांना सतत असणारी तळमळ एक सुखद आंनद अन आत्मविश्वास देवून जाते. तुमचा जोडीदार सुशिक्षीत अन समुजदार असेल तर लग्नानंतरच नवरा बायकोच नात जगण्याचं आलेल अप्रत्यक्ष टेंशन आणखी हलकं होतं हाही माझा अनुभव.
    लग्न या विधिच्या पुढे अन मागे अस सर्व गोष्टींना वेळ देण्यासाठी लागणारा कालावधी हा १ महिन्याचा असणे अतिशय योग्य होत पण १८ दिवस सुटी उपभोगून १३ दिवस आधिच ऑफीस जॉईन करण्याचा मधेच आलेला क्रायसीसही उल्लेखनीय. एरवी महाविद्यालयीन जीवनापासूनच क्रायसीसमधे योग्यरितेने जबाबदारया पार पाडणारा मी यावेळीही विचलीत न होता सर्व गोष्टींना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करत होतो. मात्र बायकोला तिच्या अन मला माझ्या आई वडिलांना पुरेसा वेळ न देण्याचं शल्य आहेच. पण नोकरी अन त्याला जोडून आलेल्या शक्य शक्यता सांभाळून आम्हा उभयतांच्या कुटुंबियांनी आम्हाला समजून घेण्याच दाखवलेल धाडसही आमचा आत्मविश्वास वाढवून गेला.

    सुंदर आयुष्य जगायला लागत तरी काय. सुंदर मन, एकमेकांना समजून घेण, अन एकमेकांचा आदर करण त्यातूनच आपल जीवन सुंदर होत जात अन आयुष्यातील लग्न हा टप्पाही सुरळीत पार पडून त्यानंतर येणार आयुष्य सुखर होत असा माझा समज यापुढे तो प्रत्यक्ष अनुभवताना काय होत ते बघुया तुर्तास येथे लिखानास विराम देतो.