घडयाळीत सायंकाळचे ६.३० वाजले की आपसूक पायांना चाहूल लागायची एका ठिकाणाची. मग, कार्यालयाचा जिना उतरुन नजिकच्या गिरीपेठ किंवा लॉ कॉलेज रोडच्या बस थांब्याकडे (नागपूर) मार्गस्थ होणे, मग दाभा किंवा मारुती सेवा थांब्यापर्यंत मिळणारी सीटीबस किंवा ऑटो घेणे, वेळ झाला तर मारुती सेवा थांब्यापासून घ्यायला जिवाभावाचा व्यक्ती येणे नाही तर पायी चालण्याचा आनंद घेत पुढे जाणे, मग एकदाचा गंतव्यस्थानावर पोहचून 'त्या वास्तूत' प्रवेश केला की खूप बर वाटणे असं सर्व घडत होतं गेल्या पावने तीन वर्षांपासून आज त्याला पूर्ण विराम लागत असल्याने हुरहूरपणाची ही भावना काही तरी हरवल्याचं आतून सांगतीये.
आयुष्याचे विविध टप्पे ओलांडतांना पदोपदी अडचणी मग प्राप्त अनुभवाच्या जोरावर व कमवलेल्या आत्मविश्वासाच्या एकमेव शस्त्राने या लढाया जिकंतही आलो. मग हा प्रवास शालेय, महाविद्यालयीन किंवा उच्च शिक्षण आणि नोकरी मिळविण्याचा असो त्यात गाव,निमशहर,शहर,महानगर,पर राज्य अशा ठिकाणी वास्तव्य व त्याच्याशी लळाही ओघानेच आला.पण, यावेळी त्या पलीकडे जावून हुरहूर वाटण्याचा अनुभव हा काही वेगळाच आहे. याला कारणीभूत आहेत स्वच्छ व निर्मळ मनाची माणसं व त्यांच्या गोतावळयाची सवय आणि त्यातून आलेला आपलेपणाचा ओलावा, जो अन्य ठिकाणांहून निघतांनापेक्षा यावेळी सरस आहे म्हणूनच प्रभावीही आहे.
घरापासून दीड शेकडा कि.मी. दूर अंतरावर नियमित अंतराने सतत पावने तीन वर्ष जाणे, मग तिथल्या वातावरणाशी जुळवून घेणे व मग त्या वातावरणाचाच एक भाग होणे म्हणता म्हणता त्यात समरस होवून जाणे हा या सर्वांचाच तर परिपाक नाही ना !. हा गोतावळा मिळण्याचे कारण ठरते नोकरी निमित्ताचे वास्तव्य व आपल्या वाटणाऱ्या उदार मनाच्या माणसांचा मदतीचा हात. आणि सुरु झाला हा प्रवास. या वास्तूत आपली समस्या घेवून आले आणि तीचं समाधान शोधून जीवनात योग्य मार्गाला लागलेले हजारो लोक यात मिळाले. त्यांचे भावविश्व व ‘स्व’ सोबतच्या त्यांच्या लढाईत या वास्तूने दिलेला आधार आजपर्यंत अगदी ठळकपणे जाणवत होता. तसाच तो काही व्यक्ती ही लढाई हारत पुन्हा या वास्तुचा आसरा घेताणाही आढळले.
पण अप्रूप वाटत होतं या वास्तुची शान वाढविणाऱ्या त्या प्रामाणिक हातांचे, त्यांच्या त्यागाचे व इथे बरे होण्याकरिता आलेल्यांना २४x७ तास सांभाळण्याचे.या हातांचे स्वत:चे प्रश्न आहेत पण त्याला मुरड घालत इतरांना सुखावह वाटाव म्हणून सदैव हास्य वदनी ही मंडळी बरच मोठ अनुभवाच गाठोड देवून गेली. यांची खरी कसरत ही आर्थिक परिस्थितीपासून सुरु होवून त्याभोवतीच्या असंख्य बारीक-बारीक कंगोऱ्यांशी जुळलेली आढळतात. पण त्यांच्यासोबतचा सहवास सदैव भारी वाटायचा.मला वेळ होत असल्याचे पाहून काळजीपोटी येणारा फोन दरम्यान तुम्ही केंव्हा येणार पासून सुरु होणारा संवाद माझ्या जेवणाची व्यवस्थाही लावून जायचा. आस्थेने विचारपूस अन् सुख दु:ख वाटणारी मंडळी कधी मधी माझ्या गायनाचीही साथीदार व्हायची तर मारुती सेवा थांब्यापर्यंत नेण्यासाठी आनंदी चेहऱ्याने सारथ्यपण करायची. गेल्या पावने तीन वर्षात यातील कित्तेक गेलेत नव्याने आलेत जुने गेले अन् पुन्हा आले अस हे सत्र सुरुच राहिल. पण दु:खीतांचे अश्रू पुसणारी ही वास्तू त्यांना आश्रय देत राहिल हेही तेवढेच खरे.
हा हा करता हा प्रवास बऱ्याचदा अनपेक्षित घटना घडण्याचे अनुभवही देत गेला. पण, ही घटना आपल्यासोबत घडावी हा योगही जुडवून गेला. जेवणासाठी हाक मारणारा आवाज आता घरातील वासे फिरताच आपसूक फिरला आणि वाटलं आता हीच वेळ आहे थांबण्याची.
जीवन हा एक निरंतर प्रवास आहे.यात अनेक लोक भेटतात बरेच थांबेही येतात. मात्र पावने तीन वर्षांचा हा थांबा काही ओरच होता कायम स्मरणातला व कृतज्ञभावही व्यक्त करणारा. तसेच लळा लागण्याची सवय बदलविण्यास लावणारा आणि संत वचनातून संदेश देणारा की, "पक्षी अंगणी उतरती ते का गुंतुनिया राहती,तैसे असावे संसारी , जोवरी प्राचीनाचीदोरी..."
००००००



