Tuesday, August 19, 2025

आजपासून सवय बदलणार ….. मनाला हुरहूर

 

       घडयाळीत सायंकाळचे ६.३० वाजले की आपसूक पायांना चाहूल लागायची एका ठिकाणाची. मग, कार्यालयाचा जिना उतरुन नजिकच्या गिरीपेठ किंवा लॉ कॉलेज रोडच्या बस थांब्याकडे (नागपूर) मार्गस्थ होणे, मग दाभा किंवा मारुती सेवा थांब्यापर्यंत मिळणारी सीटीबस किंवा ऑटो घेणे, वेळ झाला तर मारुती सेवा थांब्यापासून घ्यायला जिवाभावाचा व्यक्ती येणे नाही तर पायी चालण्याचा आनंद घेत पुढे जाणे, मग एकदाचा गंतव्यस्थानावर पोहचून 'त्या वास्तूत' प्रवेश केला की खूप बर वाटणे असं सर्व घडत होतं गेल्या पावने तीन वर्षांपासून आज त्याला पूर्ण विराम लागत असल्याने हुरहूरपणाची ही भावना काही तरी हरवल्याचं आतून सांगतीये. 

      आयुष्याचे विविध टप्पे ओलांडतांना पदोपदी अडचणी मग प्राप्त अनुभवाच्या जोरावर व कमवलेल्या आत्मविश्वासाच्या एकमेव शस्त्राने या लढाया जिकंतही आलो. मग हा प्रवास शालेय, महाविद्यालयीन किंवा उच्च शिक्षण आणि नोकरी मिळविण्याचा असो त्यात गाव,निमशहर,शहर,महानगर,पर राज्य अशा ठिकाणी वास्तव्य व त्याच्याशी लळाही ओघानेच आला.पण, यावेळी त्या पलीकडे जावून हुरहूर वाटण्याचा अनुभव हा काही वेगळाच आहे. याला कारणीभूत आहेत स्वच्छ व निर्मळ मनाची माणसं व त्यांच्या गोतावळयाची सवय आणि त्यातून आलेला आपलेपणाचा ओलावा, जो अन्य ठिकाणांहून निघतांनापेक्षा यावेळी सरस आहे म्हणूनच प्रभावीही आहे.

       घरापासून दीड शेकडा कि.मी. दूर अंतरावर नियमित अंतराने सतत पावने तीन वर्ष जाणे, मग तिथल्या वातावरणाशी जुळवून घेणे व मग त्या वातावरणाचाच एक भाग होणे म्हणता म्हणता त्यात समरस होवून जाणे हा या सर्वांचाच तर परिपाक नाही ना !. हा गोतावळा मिळण्याचे कारण ठरते नोकरी निमित्ताचे वास्तव्य व आपल्या वाटणाऱ्या उदार मनाच्या माणसांचा मदतीचा हात. आणि सुरु झाला हा प्रवास. या वास्तूत आपली समस्या घेवून आले आणि तीचं समाधान शोधून जीवनात योग्य मार्गाला लागलेले हजारो लोक यात मिळाले. त्यांचे भावविश्व व ‘स्व’ सोबतच्या त्यांच्या लढाईत या वास्तूने दिलेला आधार आजपर्यंत अगदी ठळकपणे जाणवत होता. तसाच तो काही व्यक्ती ही लढाई हारत पुन्हा या वास्तुचा आसरा घेताणाही आढळले.

       पण अप्रूप वाटत होतं या वास्तुची शान वाढविणाऱ्या त्या प्रामाणिक हातांचे, त्यांच्या त्यागाचे व इथे बरे होण्याकरिता आलेल्यांना २४x७ तास सांभाळण्याचे.या हातांचे स्वत:चे प्रश्न आहेत पण त्याला मुरड घालत इतरांना सुखावह वाटाव म्हणून सदैव हास्य वदनी ही मंडळी बरच मोठ अनुभवाच गाठोड देवून गेली. यांची खरी कसरत ही आर्थिक परिस्थितीपासून सुरु होवून त्याभोवतीच्या असंख्य बारीक-बारीक कंगोऱ्यांशी जुळलेली आढळतात. पण त्यांच्यासोबतचा सहवास सदैव भारी  वाटायचा.मला वेळ होत असल्याचे पाहून काळजीपोटी येणारा फोन दरम्यान तुम्ही केंव्हा येणार पासून सुरु होणारा संवाद माझ्या जेवणाची व्यवस्थाही लावून जायचा. आस्थेने विचारपूस अन् सुख दु:ख वाटणारी मंडळी कधी मधी माझ्या गायनाचीही साथीदार व्हायची तर मारुती सेवा थांब्यापर्यंत नेण्यासाठी आनंदी चेहऱ्याने सारथ्यपण करायची. गेल्या पावने तीन वर्षात यातील कित्तेक गेलेत नव्याने आलेत जुने गेले अन् पुन्हा आले अस हे सत्र सुरुच राहिल. पण दु:खीतांचे अश्रू पुसणारी ही वास्तू त्यांना आश्रय देत राहिल हेही तेवढेच खरे.

      हा हा करता हा प्रवास बऱ्याचदा अनपेक्षित घटना घडण्याचे अनुभवही देत गेला. पण, ही घटना आपल्यासोबत घडावी हा योगही जुडवून गेला. जेवणासाठी हाक मारणारा आवाज आता घरातील वासे फिरताच आपसूक फिरला आणि वाटलं आता हीच वेळ आहे थांबण्याची.

         जीवन हा एक निरंतर प्रवास आहे.यात अनेक लोक भेटतात बरेच थांबेही येतात. मात्र पावने तीन वर्षांचा हा थांबा काही ओरच होता कायम स्मरणातला व कृतज्ञभावही व्यक्त करणारा. तसेच लळा लागण्याची सवय बदलविण्यास लावणारा आणि संत वचनातून संदेश देणारा की, "पक्षी अंगणी उतरती ते का गुंतुनिया राहती,तैसे असावे संसारी , जोवरी प्राचीनाचीदोरी..."

                    ००००००

Thursday, August 7, 2025

कृतकृत्यतेची अनुभूति


  आपण करीत असलेल्या कामाची पावती देण्यासाठी प्रत्येक क्षेत्रात वेगवेगळया आखिव रेखिव पद्धती ठरलेल्या आहेत.शासकीय कामांची पावती म्हणून अधिकारी-कर्मचाऱ्यांना गोपनिय अहवालाद्वारे याची प्रचिती येते. बर्गर किंग,सीसीडी आदी फुड आऊटलेट मध्ये एम्पलॉयी ऑफ द डे, विक, मंथ हे संबंधितांचा फोटो चिटकवून दर्शनीभागात लावल्याचेही निदर्शनास येते. मात्र लौकिकापलीकडे जावून तुमच्या कामाची पावती जर प्रत्यक्ष बघायला अनुभवायला मिळाली तर ती कृतकृत्यतेची अनुभूति ठरते. आज हीच अनुभूति घेतली म्हणूनच लेखन प्रपंच.

     नियमितपणे काही प्रबोधनात्मक विषय घेवून मांडणी करण्याचा माझा नियमित सिरस्ता आजही तसाच होता. यानुसार संतश्रेष्ठ ज्ञानेश्वरांच्या ‘पसायदाना’वर मांडणी केली. समोर बसलेल्यांसोबत जे प्रकृती अस्वास्थ्यामुळे स्वत: उपस्थित राहू शकत नाही त्यांच्या पर्यंत माझा आवाज पोहचावा म्हणून ध्वनिक्षेपकाचा (माईक) उपयोग करतो तसा तो आजही केला. विषय मांडून झाला आणि आता निघणार तेवढ्यात वयाची पासष्टी ओलांडलेले (जे प्रकृती अस्वास्थ्यामुळे पहिल्या माळ्याहून श्रवण करीत होते.) अंगात पांढरा सदरा, पायजामा घातलेले एक निरागस गृहस्थ समोर उभे ठाकले आणि म्हणाले, “सरजी, पसायदानपर आपके विचार सुनकर बहुतही अच्छा लगा ! मै धन्य हो गयाहॅू आपको सूनकर, आपके प्रती आभार !” (त्यांच्या डोळयात आसवही तरळत होते) हे शब्द ऐकताच मी त्यांना चरणस्पर्श केला आणि नुसता अनुभव घेतला तो कृतकृत्यतेचा.

      ही अनुभूति ताजी असतानाच  कार्यालयाकडे जाण्यासाठी परम मित्राच्या गाडीवर बसलो तेव्हा कोणी समोरून येत असल्याचे बघून त्यांनी जागीच गाडी थांबवली.तेवढ्यात एका मुलीने समोर येत सदाफुलीचं फुलं दिलं ते फुल आनंदाने व आदराने स्वीकारुन मी भरुन पावलो व कृतकृत्यतेचा हा दुसार अनुभव लागोलग घेतला (पोस्ट सोबत इथं तेच फुल दिलं आहे.). मुळात त्या मुलीला मंचावर उभ राहण्यासाठी काही मार्गदर्शन करु शकलो आणि त्याप्रतीचा कृतज्ञभाव म्हणून हे सदाफुलीच फुल मी स्वीकारलं होत जे माझ्या कामाची पावती मी मानतो. खरे तर तुम्ही काम करत जायच असत फळाची अपेक्षा न ठेवता हे तेवढच खरं आहे. पण, कधीमधी असा अनुभवही You are on Correct Track सांगून जातो व नवी ऊर्जा देवून जातो हेही तितकच खरं.

                       ००००००

Wednesday, August 6, 2025

भाजी अंबाडीची अन् फोडणी सुरस आठवणींची…


 

 ‘श्रावण मासी हर्ष मानसी….’ या बालकवींच्या ओळी निश्चीतचं समर्पक असल्याची अनुभूती पदोपदी येते ती पावसाळा ऋतू व विशेष करून श्रावण महिन्यात. याच काळात निसर्गाने मानवाला भरभरून दिलेली रानभाज्यांच्या माध्यमातून आरोग्य संपदाही ठळकपणे अधोरेखित होते. चला.. आता मला जे सांगायचं आहे त्याकडे वळुया. 

   त्याच झालं अस ! आज जेवायला गेलो तेव्हा शेजारीच बसलेल्या वन विभागाच्या काही कर्मचाऱ्यांच्या गप्पा आपसूक काणावर आल्या. विषय अंबाडीच्या भाजीचा. त्यातला एकजण उच्चारला, ‘काल खेडे गावात जाणं झालं अन् अंबाडीची भाजी खरेदी केली. आणि आईला भाजी बनविण्याची विनंती केली त्याच भाजीचा आपण आस्वाद घेवूया.’ हा संवाद संपतो न संपतो तोच दुसरा उत्तराला, ‘हो, मी पण माझ्या आईलाच अंबाडीची भाजी बनवायला सांगितली काल-परवा.’ हा संवाद सुरू असतांना अंबाडी प्रेमी मी कसा मागे राहणार. मग मीही आपलं घोड दामटलं, आईच्या हातच्या अंबाडीच्या भाजीला निश्चितच चव आहे त्यात अजिबात दुमत नाही. पण, माझी बायको या अंबाडीच्या भाजीच्या पुऱ्याही छान बनवून खायला देते. म्हणजेच अंबाडीची भाजी आणि सासु-सुनेच्या खवय्येगीरीत सासुलाचं नुसतं झुकत माप नको बरं का !. आई ही अंबाडीच्या भाजीच्या रेसीपीची संवाहक ठरते तर पत्नी ही पीझ्झा, बर्गर, मॅगीच्या आधुनिक काळात अंबाडीची पुरी करून मुलांच्या गळी उतरवणारी स्मार्ट मम्मी ठरते. 

        आजच्या धकाधकीच्या काळात अशी अंबाडीच्या भाजीवर चर्चा होणेही थोड्या अर्थाने कौतुकाचीच बाब म्हणावी लागेल. या चर्चेतून अंबाडीच्या भाजीचे सुरस आठवणींनाही उजाळा मिळत होता. भुप्रदेशनिहाय अंबाडीची भाजी बनवीण्याची पद्धत आणि हंगामा शिवाय अन्य वेळी या भाजीची चव चाखयची असेल तर या भाजीला साठवून ठेवण्याच्या विविध तऱ्हा असे एकानेक विषय चर्चेत निघत गेले. जेवणाच्या मेजावरील या आगंतूक संवंगड्यांनी आपले टिफीन सदृष्य शिदोऱ्या सोडल्या आणि मी ही खाणावळीतील ताटावर ताव मारला. पण या चर्चेतून माझाच फायदा झाला. या संवंगड्यांनी आपल्याजवळचा अंबाडीचा ऐवज पुरता उघडून माझ्या ताटात दिला. आणि मी क्षणभर सुखावलो. जर अंबाडीच्या चर्चेत उडी घेतली नसती तर या ऐवजाला मुकलो असतो असा विचारही मनात आला. शेवटी बोलत राहिल्याने तोटे कमी आणि फायदे जास्त होतात असे म्हणायलाही हरकत नाही. ही भाजी वेगळ्या तऱ्हेची म्हणजे खास मुगाच्या डाळीत घोळलेली आंबटसर व स्वादिष्ट चवीची आणि पहिल्यांदाच या थाटातील अंबाडीचा आस्वाद घेण्याची वेळही पहिलीच. 

        गेल्या आठवड्यातच गावी जाणे झाले. आई-बाबांची भेट म्हणजे बॅटरी चार्ज आणि शरीरात ऊर्जेचा संचार.अर्धांगिनीची प्रकृती बरी नव्हती अशात मुलाला फक्त गावी चलतो! असं म्हणताच पठ्ठयाने तयारी केली आणि गाडीवरही बसला. माझं गाव जस माझ्या मनात तसंच मुलाच्या मनातही ते तेवढचं ठासून असल्याच अप्रुपही वाटते. घरून निघतांना आईने नेहमीप्रमाणे खुप सार साहित्य भरलेली भली मोठी पिशवी दिली. आणि पिशवी मला सुपुर्द करतांना सांगती झाली, सुनबाईच्या आवडीची अंबाडीची भाजी सोबत दिली आहे. भाजीत घालायला कण्याही दिमतीला आहेत ! यात भरून पावण्यासारखी बाब म्हणजे सासु बाईलाही अंबाडीच्या भाजीची आपली पुर्वा पार परंपरा सुनबाई पर्यंत पोचवायची आहे व सुनबाईच्या आवडही जपायची आहे. एक क्षणतर अंबाडीची भाजी मला सासु-सुनेतील मायेचा पुलही वाटतो. सरते शेवटी दुसऱ्या दिवशी ऑफीसची घाई असतांना नाष्ट्याच्या प्लेटमध्ये अंबाडीच्या पुऱ्या पडल्या आणि भरून पावलो.  

      चला, श्रावण महिन्यात इतर रानभाज्यांसह अंबाडीचाही आस्वाद घेवूया. बर्गर, मॅगी व पिझ्झा संस्कृतीत अंबाडीच्या आधुनिक रेसेपी बनवून आपल्यातील पाककौशल्याला झळाळी देवूया आणि अंबाडीची खाद्य संस्कृती येणाऱ्या पिढीपर्यंत पोचविण्याचा प्रणही घेवूया.

                              ००००