Friday, February 24, 2023

नागपुरी बोलीचा प्रत्यक्ष परिचय होताना


 

शनिवारी सकाळी माझी ऑफिसकडे जायची वेळ. रस्त्याने दोन कामकरी महिलांचा संवाद कानावर पडला. ‘लय बुव्हारा हा बई शनिवार,सामोरच्या आफिसात एक माणूस भी नाई रात ना जी’. पुढे सिटीबस मधील प्रवासात महिला कंटक्टरचा एका मुलीवर शब्दप्रहार ‘भयताळवाणाची पोट्टी, जराय नय समजत इले’. ऑटोने प्रवास करताना एका  महिलेचा मोबाईलवर  सुरू असलेला संवाद व त्यातील कानावर पडलेले काही अनकट शब्द असे, "लता मंगेशकरात  गेलतो(बर्डी येथे स्थित लता मंगेशकर चॅरिटेबल ट्रस्टचे इस्पीतळ)(पुरुष वाचक संबोधन, गेलतो)).....कास्ट काढाची हाय (कास्ट सर्टिफिकेट काढायचे आहे).... २ हजार रूपये पाटविन (पाठविन एवजी)...फोन काटून लाव.... सुंतीचा हात कसा हाय , आता?... टाके तोडलेन का ?.... माई पोट्टी बडी हुशार हाय .... सोड मनल १७ काम अन चल मनल त्याले" ही तीन केवळ प्रातिनिधीक उदाहरण दिली. या शहरातील वास्तव्यात दररोज कानावर पडणाऱ्या शब्दांमध्ये च्यलनबे,च्यालाका,होना जी,सामोर, म्हणल व्हत ना ...... हे शब्द थोडयाफार फरकाने नित्याचेच.

 

     हे सर्व शब्‍द म्हणजे येथील नागपुरी बोलीचा ठेवा म्हणता येईल. या निमित्ताने नुकतेच वर्धा येथे पार पडलेल्या ९६व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात ‘विदर्भातील बोली भाषा’ विषयावरील परिसंवादातील तज्ज्ञांनी मांडेल्या विचारांचा झिस्ट देणारी माझी बातमी शेअर करीत आहे. या परिसंवादात प्रकाश एदलाबादकर यांनी बोली हीच भाषेची आई असल्याचे निरीक्षण मांडले.त्यांनी नागपुरी बोलीचे विविधांगी रूप उलगडून सांगितले. नागपूरमध्ये बोलली जाणारी ही भाषा समाजातील उच्च ते निम्न अशा सर्वच वर्गात बोलली जाते. ग. त्र्य. माडखोलकर, दोडके यांनी नागपुरी भाषेत केलेल्या संशोधन कार्याचाही त्यांनी आढावा घेतला.

 वऱ्हाडी , झाडी व नागपुरी आदि विदर्भातील बोलींनी मराठी भाषेच्या सौदर्यांत भर घातली व भाषा विज्ञानात मोलाचे योगदान दिले आहे. मात्र, न्यूनगंडापोटी  या  बोलींचा वापर कमी झाला आहे. विदर्भातील कोरकू बोली तर विलुप्त होण्याच्या मार्गावर आहे, असे निरिक्षण ३ फेब्रुवारी २०२३ रोजी साहित्य संमेलनात साहित्यिकांनी मांडले. तर प्रमाण भाषेचा आग्रह सोडून स्वत:च्या बोलीचा न्यूनगंड न बाळगता प्रभावी वापर व्हावा. 'बोली अकादमी' स्थापन व्हावी ,'आदिवासी बोलींचे कोश' निर्माण  व्हावे, असा आश्वासक सूर ‘विदर्भातील बोली-भाषा विषयावरिल परिसंवादात निघाला.

 

                 ९६ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या पहिल्याचं दिवशी आयोजित या परिसंवादाचे अध्यक्षस्थान प्रसिद्ध साहित्यिक डॉ.सतीश तराळ यांनी भूषविले. डॉ. मनोहर नरांजे, डॉ.श्याम मोहकर,डॉ. पुरुषोत्तम माळोदे आणि प्रकाश एदलाबादकर या भाषा अभ्यासकांनी परिसंवादात सहभाग घेतला.

 

          डॉ. तराळ यांनी  परिसंवादातील सहभागी वक्त्यांच्या विचारांचा सार काढून विचार मांडले. विदर्भातील वऱ्हाडी ,झाडी या प्रमुख बोली असून नागपुरी,गोंडी,कोरकु,माडिया आदि बोलीही या भागात बोलल्या जातात. प्रमाण भाषेच्या अवाजवी आग्रहामुळे आणि न्यूनगंडामुळे या बोलींसमोर मोठे आवाहन उभे राहिले आहे.विदर्भातील कोरकू बोली सद्या विलुप्त होण्याच्या मार्गावर असल्याचे निरीक्षण त्यांनी मांडले. स्वत:च्या बोलीचा न्यूनगंड न बाळगता या बोलींचा प्रभावी वापर व्हावा.तसेच, बोलींच्या विकासासाठी व त्यांच्या साहित्यिक समृद्धतेसाठी  बोली अकादमी स्थापन व्हावी  आणि आदिवासी बोलींचे कोश निर्माण व्हावे अशा सूचनाही त्यांनी केल्या.

 

      डॉ.तराळ म्हणाले, जॉर्ज गियर्सन यांच्या ‘लिंग्वेस्टीक सर्व्हे ऑफ इंडिया’ या ग्रंथात भारतात १७९ भाषा आणि ५४४ बोली आहेत असे म्हटले होते. पण, २००१ मध्ये झालेल्या भाषिक पाहणीत २२२ भाषा आणि २३४ बोली आहेत असे म्हटले होते.म्हणजे दरम्यानच्या काळात ५७ भाषा आणि ३१० बोली लुप्त झाल्या.संपूर्ण जगातच भाषा लुप्त होत आहेत मात्र, भाषा लुप्त होण्याचा वेग भारतात जास्त आहे. जागतिकीकरणाचा भाषेवर खूप जास्त परिणाम होत असतो.जागतिकीकरणाची भाषा हीच जगाची भाषा होते सद्या इंग्रजी ही जागतिकीकरणाची भाषा आहे. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने नेमलेल्या रंगनाथ पठारे समितीच्या अहवालात मराठीला २३०० वर्षाचा जुना इतिहास असल्याचे आणि या भाषेत ५२ बोली असल्याचे नमूद केले आहे.प्रत्यक्षात भाषा अभ्यासक मराठीच्या १५० बोली असल्याचे मानतात याचाच अर्थ मराठीतील १०० बोली लुप्त झाल्याचेही डॉ.तराळ यांनी सांगितले.

    

     डॉ. मनोहर नरांजे यांनी आपल्या संबोधनात वेण्णा आणि वर्धा या दोन नद्यांनी व्यापलेला पूर्व आणि पश्चिम विदर्भातील भूभाग आणि येथील मानव समुहांनी समृद्ध केलेल्या बोलीभाषांच्या भाषिक व्यवहारावर प्रकाश टाकला. विदर्भातील बोली या मराठी भाषेचा निर्झर झरा आहेत. वऱ्हाडी आणि झाडी बोलींनी विदर्भातील भाषिक व्यवहरात दिलेले योगदान महत्वाचे आहे. मराठी भाषेतील आद्य ग्रंथ 'लीळाचरित्र' आणि मराठीतील आद्य काव्यसंग्रह 'विवेक सिंधू' मध्ये वऱ्हाडी आणि झाडी बोली दिसून येतात असे निरीक्षण त्यांनी मांडले. चंद्रपूरचा राजा रामसिंह याने मराठी भाषेला राजभाषेचा दर्जा दिला होता, असेही त्यांनी सांगितले.

 

   डॉ. श्याम मोहरकर यांनी विदर्भातील बोरी, नागपुरी या बोलीभाषेतील स्वनिम, रुपिम या तांत्रिक भाषा परिमानांचा अन्य भाषांशी तुलनात्मक संबंध उलगडून दाखवला. या बोलिंमध्ये प्रामुख्याने प्रमाण भाषेतील वर्णांच्या उच्चाराशी आढळणारी भिन्नता त्यांनी 'च', 'ज' आणि 'झ' या वर्णांची उदाहरणे देवून पटवून दिली.

 

    डॉ. पुरुषोत्तम माळोदे यांनी विदर्भातील बोली भाषांनी या भागाला सांस्कृतिक पुढारलेपण मिळवून दिल्याचे सांगितले. डॉ. ना. गो. कालेलकर लिखित 'बोली आणि भाषा' या ग्रंथातील दाखले देत त्यांनी बोली विषयीचे गैर समज आणि वास्तव याबाबत भाष्य केले. भूप्रदेश व जाती नुसार विदर्भात बोलिंची निर्मिती झाल्याचे सांगत त्यांनी कोष्टी,हळबी, गोंडी, माडिया या बोलिंवर प्रकाश टाकला.

    

                                ०००००

नागपुराच्या वैभवातील कोंदण ‘जीपीओ’



 

नागपूर शहराच्या सिव्हिल लाईन्स परिसरात डौलान उभी असलेली ही मुख्य टपाल कार्यालयाची अर्थात जीपिओची ऐतिहासिक इमारत.१९२१ मध्ये बांधून पूर्ण झालेली ही इमारत आज त्याच दिमाखात उभी आहे.वैशिष्ट्यपूर्ण वास्तूशैलीमुळ या इमारतीच्या सौंदर्यात भर पडली आहे.

 

नागपूर शहरातील ४० टपाल कार्यालयांच नियंत्रण या ठिकाणाहून होतं.

 

या इमारतीवरील घड्याळ हे इथल वैशिष्ट्य.तुम्हाला ऐकून आश्चर्य होईल गेल्या १०२  वर्षांपासून हे घड्याळ सुरूय.दर दोन वर्षातून एकदा घड्याळाला चावी भरली जाते. आणि चावी भरणारा माणूसही नागपुरात एकमेव.

 

येथील फीलाटली विभागात विशिष्ट प्रकारचं कार्य चालत.इथ नियमित आणि कोमोमॉरेटिव्ह अशी दोन टपाल तिकिटे विक्रीसाठी उपलब्ध आहेत. एवढंच काय तर सर्वसामान्य माणसाला आपलं टपाल तिकीट काढण्याची सोयही या विभागान करून दिलीय.

 

जुन्याकाळी टपाल सेवा देताना पोस्टमनच्या संरक्षणासाठी वापरण्यात येणारी शस्त्रही इथ बघायला मिळतात.

 

टपालसेवे व्यतिरिक्त या कार्यालयात केंद्र व राज्य शासनाच्या विविध बचत योजनाही चालविल्या जातात.  ऑनलाइन बँकिंग तसेच एटीएम ची सुविधाही इथ उपलब्ध आहे.

 

सकाळी १० वाजता कामाला सुरूवात होण्याआधी सामूहिक राष्ट्रगीत म्हणण्याची प्रथाही इथल वैशिष्ट्य.

 

नऊ एकर परिसरात डौलान उभी असलेली ही इमारत आजही सर्वसामान्यांच्या सेवेत कार्यरत आहे आणि नागपूरच भूषण वाढवीत आहे .

                                                0000


 

मौल्यवान ठेवा जपणारे नागपूरचे मध्यवर्ती संग्रहालय



 

                              

 

नागपूरच्या वैभवात भर टाकणारी महत्त्वाची वास्तू म्हणजे मध्यवर्ती संग्रहालय.ब्रिटिश काळात मध्यभारतात निर्माण झालेल्या संग्रहालयापैकी सर्वात जुन व अग्रणी संग्रहालय म्हणून याचा लौकिक आहे.

 

नागपूरचे ब्रिटिशकालीन मुख्य आयुक्त सर रिचर्ड टेम्पल आणि शिक्षणतज्ज्ञ फादर रेव्हरंड हिस्लॉफ यांच्या पुढाकारान १८६३मध्ये हे संग्रहालय स्थापन झालं. स्वातंत्र्यपूर्व काळात ब्रिटिश शासनाच्या विविध विभागांतर्गत हे संग्रहालय नियंत्रित होत असे. स्वातंत्र्य प्राप्तीनंतर मध्यप्रांत शासनाच्या शिक्षण विभागाकड हे नियंत्रण गेलं.तर महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेनंतर राज्याच्या पुरातत्व विभागाकड ही जबाबदारी आली.

 

   या संग्रहालयात एकूण १० दालनांमध्ये दुर्मिळ ठेवा प्रदर्शित व संरक्षित करण्यात आला आहे. ब्रिटिश काळातच या संग्रहालयात  वस्तू संकलित करण्यात आल्या. ब्रिटिश अधिकारी,स्थानिक व्यक्ती आणि जमीनदार यांच्याकडून या वस्तू संग्रहालयास प्राप्त झाल्या.

 

    संग्रहालयात प्रवेश करताच निसर्ग इतिहास दालन इथ येणाऱ्यांचं डोलान स्वागत करत. इथ दुर्मिळ डायनासोरची हाड, भूगर्भीय प्रारुपातील खनिज, जीवाश्म प्रदर्शित करण्यात आली आहेत.

 

प्राणी,पक्षी व सरीसृप दालन या संग्रहालयाच खास आकर्षण आहे. इथ जलजिवही प्रदर्शित करण्यात आली आहेत.

 

चित्रकला दालनात व्यक्तिचित्र,रचनाचित्र,अमूर्तचित्र, निसर्गचित्र बघायला मिळतात. पुरातत्वदालनात विदर्भातील निवडक पुरातत्वीय उत्खननात प्राप्त वस्तू प्रदर्शित करण्यात आल्या आहेत. शस्त्र दालनात शस्त्रांचे विविध प्रकार बघायला  मिळतात. शिलालेख दालनात मौर्य ते मराठा कालखंडातील शिलालेख प्रदर्शित करण्यात आले आहेत. हस्तशिल्प दालनात भारताच्या वेगवेगळ्या भागातील हस्तशिल्प दिसून येते. सर्वार्थान सर्वांग सुंदर अस आदिवासी कला व संस्कृती दालना इथ भेट देणाऱ्यास आदिवासिंच्या समृद्धतेची ग्वाही पटवून देत. या संग्रहालयाला २०१३मध्ये दीडशे वर्ष पूर्ण झाली. या निमित्ताने उभारण्यात आलेल नागपूर वारसा दालन हे या संग्रहालयातील खास कोंदणच ठरलय.

 

 

                                                 0000

Wednesday, February 8, 2023

सर्वसामान्यांचा लाडका ‘मुगल गार्डन’ ते ‘अमृत उद्यान’

            ‘नावात काय ठेवले आहे!’, ‘नामही काफी है !’ या उक्तींमध्ये ‘नावातच सर्वकाही’ हे ॲडीशन करण्याचा मोह काही आवरला नाही. गेल्या काही वर्षात देशाची राजधानी दिल्लीत महत्वाच्या वास्तू व संस्थांच्या नावात झालेल्या बदलांचा मी साक्षीदार आहे. या बदलांमध्ये प्रातिनिधीकपणे सांगायचे तर प्रधानमंत्री महोदयांचे निवासस्थान ‘७, रेस कोर्स’चे नाव झाले ‘लोककल्याण मार्ग’,‘योजना आयोगा’चे ‘निती आयोग’, संसदेची नवी इमारत झाली ‘सेंटर व्हिस्टा’, राष्ट्रपती भवनासमोरील विजयचौक ते इंडियागेट हा जवळपास ३ कि.मी.चा मार्ग ‘राजपथ’हून ‘कर्तव्यपथ’ झाला. याच ओळीत आता राष्ट्रपती भवनाचे ‘मुगल गार्डन’ हे ‘अमृत उद्यान’ झाले. पूर्वाश्रमीच्या मुगल गार्डनला सहपरिवार, मित्र, विभागाचे अधिकारी आणि आप्तेष्टांसह भेट देण्याचा व तिथली भव्यता,सौंदर्य डोळयात साठवण्याचा अनुभव आला. म्हणूनच या उद्यानाविषयी लिहावं असं मनापासून वाटलं, तोच हा लिखानाचा घाटही घातला. 

                        दिल्लीतील वास्तव्यात फेब्रुवारी महिन्याची चाहूल लागताच दोन महत्वाचे आयोजन डोळयासमोर येत असतं. हरियाणातील फरिदाबाद जिल्ह्यात आयोजित होणारा ‘सुरजकुंड इंटरनॅशनल क्राफ्ट मेला’ आणि सर्वसामान्यांसाठी जवळपास महिना-दीड महिना खुला राहणारा राष्ट्रपती भवनाच्या १५ एकर परिसरातील मुगल गार्डनचा ‘उद्यानउत्सव’.भारतदेशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधत २८ जानेवारी २०२३ रोजी मुगल गार्डनचे नाव बदलून ‘अमृत उद्यान’ करण्यात आले. आणि नाव बदलानंतर आपल्या कार्यकाळातील पहिल्या-वहिल्या उद्यानउत्सवाचे उद्घाटन करण्याचा मान राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू यांना मिळाला हेही खास आहे. राष्ट्रपती भवन एस्टेट हे ३३० एकरावर वसलेले एक छोटेगावचं असून येथे ५ एकरावर राष्ट्रपती भवनाची इमारत तर याच इमारतीच्या मागच्या भागात १५ एकर विस्तीर्ण परिसरात उद्यान आहे. 

                 राष्ट्रपती भवन बांधणारे वास्तुविशारद ‘सर एडविन लुटियन्स’ यांनी १९१७ मध्ये या उद्यानाचा आराखडा तयार केला. जम्मू आणि काश्मीरमधील मुगल उद्यान,आग्र्याच्या ताजमहाल परिसरातील उद्यान आणि भारत आणि फारशीमधील लघू चित्रांपासून प्रेरीत होवून उद्यान तयार करण्यात आले आहे. उद्यानातील वास्तु उभारणीसाठी भारतीय आणि पाश्चिमात्य वास्तुशैलीचा तर बागकामासाठी मोगल शैली आणि ब्रिटिश पुष्पउद्यान शैलीचा वापर करण्यात आला आहे. बागकाम विभागाचे संचालक विल्यम मस्टो यांच्या मार्गदर्शनात १९२८-२९ दरम्यान या उद्यानात प्रत्यक्षपणे वृक्षारोपण करण्यात आले. आयाताकार, लंबाकृती आणि वृत्ताकार अशा एकूण तीन आकारात हे उद्यान विभागले आहे.या उद्यानात ठिक-ठिकाणी वास्तु शिल्पाचे उत्तम नमुने आढळतात. विशेषत: मोगलकालीन नाल्या, छोटे-छोटे ओटे, पुष्पाकृती झाड, युरोपियन क्यारियो,लॉन यांचे प्रतिबिंब दिसून येते.

 ‘गुलाब पुष्प’ ; उद्यानाचे खास आकर्षण 

                     या उद्यानात १५९ प्रजातींचे गुलाब पुष्प बघायला मिळतात. हे गुलाब मुख्यत्वे फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात उमलतात. या गुलाबांमध्ये अडोरा,मृणालीनी,ताजमहल,आयफेल टॉवर, मॉर्डन आर्ट, सेंटीमेंटल, ओक्लाहोमा(काळा गुलाब),बेलामी, ब्लॅक लेडी, पॅराडाइज,ब्लुमून, लेडी एक्स या प्रजातींचा समावेश होतो. उद्यानातील गुलाबांना प्रसिद्ध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय व्यक्तींचे नाव देण्यात आले आहेत.मदर टेरेसा, राजा राम मोहन रॉय, मि.लिंकन, जॉन एफ केनडी,जवाहर,क्वीन एलिजाबेथ,क्रिश्चियन डियोर या नावांचे गुलाब पुष्प या ठिकाणी बघायला मिळतात. महाभारतातील अर्जुन आणि भिम या पात्रांचीही नावे गुलाबांना देण्यात आली आहेत.

 अशी आहे अन्य पुष्प संपत्ती 

             यासोबतच टयूलिप्स, एशियाटिक लिली, डेफोडिल,ह्यासिंथ आणि इतर ऋतुमानानुसार पुष्प या उद्यानाचे सौंदर्य आणि वैभव वाढवत आहेत.आकर्षक कंदीय पुष्पझाडे आणि शीत ऋतुमध्ये उमलणाऱ्या पुष्पांच्या ७० पेक्षा अधिक प्रजाती या उद्यानात आहेत. कागते (बोगेनविला) पुष्पांच्या १०१ जाती पैकी ६० जाती येथे दिसून येतात. एलिसम,डेजी आणि फँसी आदी पुष्पलताही येथे दिसून येतात. या उद्यानाच्या निर्मितीवेळी कोलकत्ता येथून दूब गवत आणून लावण्यात आले. मोलश्री,गोल्डन रेन, टॉर्च या पुष्प वृक्षांसह पुष्प लतांच्या ५० प्रजाती आहेत. 

राष्ट्रपती महोदयांच्या सूचनांनी उद्यानाच्या सौदर्यांत भर  

                स्वतंत्रभारताचे गव्हर्नर जनरल सी. राजगोपालाचारी हे राष्ट्रपतीभवनात वास्तव्य करणारे पहिले भारतीय होते. भारतदेश अन्नधान्यानात स्वयंपूर्ण नसल्याचे पाहून या समस्येतून मुक्ती मिळविण्याची सांकेतिक बाब म्हणून उद्यानात सी. राजगोपालाचारी यांच्या सूचनेनुसार गव्हाची शेती होत असे. राष्ट्रपती के.आर.नारायण यांच्या सूचनेद्वारे भूजल आणि वर्षा जलसंचयाचे कार्य या उद्यानात करण्यात आले. डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या सूचनेनुसार या उद्यानात औषधी उद्यान,दृष्टीबाधितांसाठी स्पर्श आणि सुंगधीय उद्यान, संगीतमय उद्यान,जैव उर्जा उद्यान, आध्यात्मिक तथा पोषण उद्यानांचा समावेश करण्यात आला.नवीकरणीय उर्जेच्या माध्यमातून उद्यानात वीजेची उपलब्धता ,बोन्साय उद्यान हे राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या सूचनेनुसार सुरु झाले. राष्ट्रपती भवानाचे हे सुंदर व भव्य उद्यान सर्वसामान्य जनतेला पाहण्यासाठी खुले करण्यात आले आहे. आतापर्यंत फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात राष्ट्रपतीभवनाचा उद्यानउत्सव सर्व सामान्यांसाठी खुला करून देण्यात येत असे. तसेच, राष्ट्रपती भवनाला भेट देण्यासाठी तयार करण्यात आलेल्या एकूण तीन सर्कीटमध्ये तिसरे सर्कीट हे पूर्वाश्रमीच्या मुगल व आताच्या अमृतउद्यानाचे आहे. दरवर्षी ऑक्टोबर महिन्यापासून पुढील सहा महिन्यांपर्यंत हे सर्कीट जनतेसाठी खुले असते. यावर्षी ३१ जानेवारी रोजी राष्ट्रपतींच्या हस्ते आणि सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधिश व अन्य न्यायाधिशांच्या उपस्थितीत या उद्यानउत्सवाचे उद्घाटन झाले. २६ मार्च २०२३ पर्यंत देशभरातील सर्वसामान्य जनतेस या उद्यानाला भेट देता येणार आहे. 
                                                                  ००००

Monday, February 6, 2023

पद्म पुरस्काराविषयी

                    नुकतीच म्हणजे प्रजासत्ताकदिनाच्या पूर्व संध्येला पद्मपुरस्कार या मानाच्या नागरी पुरस्कारांची घोषणा झाली आहे. कला, उद्योग, क्रीडा, वैद्यकीय आदि क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तीस या सन्मानाने गौरविण्यात येते. यावर्षी देशातील १०६ मान्यवरांना हे मानाचे पुरस्कार जाहीर झाले आहेत. यापैकी महाराष्ट्रातील ११ मान्यवरांना हे पुरस्कार जाहीर झाले आहेत.यात १ पद्मविभूषण,३ पद्मभूषण आणि ७ पद्मश्री पुरस्कारांचा समावेश आहे. या पुरस्काराच्या निमित्ताने पद्मपुरस्कारा विषयी माहिती देण्याचा प्रयत्न. (दिल्लीतील पत्रकारिता आणि शासनसेवेतील नोकरीत बहुतेकवेळा माझ्याकडे पद्मपुरस्काराच्या बातमीची जबाबदारी आल्याने या अनुभवातून हा लेखनप्रपंच करीत आहे ) 

             दरवर्षी प्रजासत्ताक दिनाच्या पूर्व संध्येला म्हणजे २५ जानेवारी रोजी जाहीर होणाऱ्या पद्म पुरस्कारांसाठी प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी तातकडीने वाट पाहत असतात. त्याप्रमाणे आपआपल्या दैनिकात,वृत्तसंस्था, वृत्त वाहिन्या आदिंमध्ये जागा आरक्षित केली जाते. पद्मपुरस्कारासाठी निवड झालेल्या मान्यवरांची नावे साधापणे रात्री ९ वाजता नंतर जाहीर होतात आणि अधिकृतरित्या केंद्रीय गृहमंत्रालयाच्या https://www.mha.gov.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध करू देण्यात येते. शेवटपर्यंत या पुरस्कार विजेत्यांच्या यादिची गुप्तता पाळण्यात येत असल्याने ब्रेकींग न्यूजला इथे पूर्णपणे ब्रेक बसतो. एकदा यादी जाहीर झाली की, माध्यम प्रतिनिधी संबंधित माध्यमांच्या बातमीमुल्यानुसार बातमी लेखन,सादरीकरण करतात. त्याबरहुकूम प्रसारमाध्यम,सोशल मिडीयावर पोस्ट पडणे सुरु होते. देशातील मानाचा पुरस्कार असल्याने याकडे सर्वांच्या नजरा लागून असतात. तेव्हा जाणून घेवूया पद्मपुरस्कारा विषयी..... 

                                                                       अशी झाली सुरुवात 

         सर्वप्रथम १९५४ मध्ये देशात ‘भारतरत्न’ आणि ‘पद्मविभूषण’ पुरस्काराच्या निमित्ताने पद्मपुरस्काराची सुरुवात झाली. ८ जानेवारी १९५५ रोजीच्या राष्ट्रपतींच्या अधिसूचनेनुसार या पुरस्कारात ‘पद्मभूषण’ आणि ‘पद्मश्री’ या पुरस्कारांची भर पडली. भारतरत्न पुरस्काराची शिफारस आणि आतापर्यंतचे पुरस्कार प्राप्त मान्यवर प्रधानमंत्री हे देशातील सर्वोच्च नागरी सन्मान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘भारतरत्न’ पुरस्काराची शिफारस राष्ट्रपतींना करतात. त्यानंतर भारतरत्न पुरस्कारांची घोषणा राष्ट्रपतींच्या मान्यतेने केंद्रीय गृह मंत्रालय करते. एका वर्षी जास्तीत-जास्त तीन व्यक्तींना हा पुरस्कार घोषित करण्याची अट आहे. आतापर्यंत एकूण ४८ मान्यवरांना ‘भारतरत्न’ पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. 

                                                                 २०१९ ला शेवटचा भारतरत्न 

         वर्ष २०१९ पर्यंत भारतरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आले आहेत. त्यानंर गेल्या चार वर्षांपासून हा पुरस्कार प्रदान करण्यात आलेला नाही. २०१९ मध्ये नानाजी देशमुख (महाराष्ट्र) आणि डॉ.भूपेण हजारिका (आसाम) यांना मरणोत्तर आणि माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर झाला होता. आतापर्यंत सहा वेळा म्हणजेच १९५४,१९५५,१९९१,१९९२,१९९७ आणि २०१९ या एकाच वर्षी तीन भारतरत्न पुरस्कार जाहीर झाले आहेत. या नियमाला अपवाद म्हणून १९९९ मध्ये एकाच वर्षी चार मान्यवरांना भारतरत्न पुरस्कार घोषित करण्यात आला. १९९९मध्ये पंडित रवि शंकर (यु.एस.ए.),प्रा.अमर्त्य सेन (यु.के.), गोपिनाथ बोर्डिलोई (आसाम) आणि जयप्रकाश नारायण (बिहार) यांना हा मानाचा पुरस्कार जाहीर झाला होता. १९५४ मध्ये पहिला भारतरत्न पुरस्कार तामीळनाडूतील तीन मान्यवरांना सर्वश्री डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन, चक्रवर्ती राजगोपालाचारी आणि चंद्रशेखर व्यंकट रमण यांना जाहीर झाला होता. 

 सर्वाधिक ९ भारतरत्न पुरस्कार महाराष्ट्राला 

                 धोंडो केशव कर्वे (१९५८), डॉ. पांडुरंग वामन काणे (१९६३), आचार्य विनोबा भावे (१९८३), डॉ. बाबासाहेब आंबेडकर (1990), जहांगीर रतनजी दादाभाई टाटा (१९९२),लता मंगेशकर (2001), पं.भिमसेन जोशी (2009), सचिन तेंडुलकर(2014) आणि नानाजी देशमुख (२०१९) या महाराष्ट्रातील ९ मान्यवारांना भारतरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. 

                 महाराष्ट्रानंतर उत्तर प्रदेशला ८, तामीळनाडूला ७, दिल्लीला ५,पश्चिम बंगालला ४, गुजरातला ३, कर्नाटक,आसाम आणि बिहारला प्रत्येकी २ तर तेलंगणा आणि ओडिशाला प्रत्येकी १ भारतरत्न पुरस्कार प्रदा करण्यात आला. परदेशातील चौघांना भारतरत्न दक्षिण आफ्रिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष नेल्सन मंडेला (1990) आणि भारतीय स्वातंत्र्य लढयात मोलाचे योगदान देणारे पाकिस्तानी नागरीक (फाळणी नंतर) खान अब्दुल गफ्फार खान(1987) यांना प्रदान करण्यात आला.भारतीय वंशाचे शास्त्रीय संगीतातील विख्यात कलाकार पं.रविशंकर (युएसए) आणि भारतीय वंशाचे थोर अर्थतज्ज्ञ अमर्त्य सेन (युके) यांना वर्ष १९९९ मध्ये भारतरत्न पुरस्काराने गौरविण्यात आले.

         पद्म पुरस्काराची शिफारस 

     भारतरत्न व्यतीरिक्त पद्मविभूषण,पद्मभूषण आणि पद्मश्री या पुरस्कारांची शिफारस पद्मपुरस्कार समिती करते. प्रधानमंत्री दरवर्षी ही समिती स्थापन करतात. या समितीचे अध्यक्ष कॅबीनेट सचिव असतात तर प्रधानमंत्र्यांचे प्रधान सचिव,गृह सचिव आणि राष्ट्रपतींचे सचिव हे या समितीचे पदसिद्ध सदस्य असतात.याबरोबरच कला,क्रीडा,अर्थ अशा विविध क्षेत्रातील मान्यवरांचाही या समितीत समावेश असतो. पद्मविभूषणाच्या जोडीला 1955 पासून पद्मभूषण आणि पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यास सुरुवात झाली. आतापर्यंत ३३१ पद्मविभूषण,१३०३ पद्मभूषण आणि ३४२१ पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आले. 

     सात वर्ष पद्मपुरस्कार प्रदान करण्यात आले नाहीत १९७८ आणि १९७९ ही दोन वर्षे तसेच १९९३ ते १९९७ पर्यंत सलग पाच वर्ष पद्मपुरस्कारांची घोषणा करण्यात आली नव्हती. 

 पद्म पुरस्काराबाबत महत्वाच्या तारखा 

 #पद्मपुरस्कारासाठी अर्ज करण्याची किंवा प्रस्ताव पाठविण्याची तारिख: दरवर्षी १ मे ते १५ सप्टेंबर

 #पद्मपुरस्कारांची घोषणा : दरवर्षी २५ जानेवारी रोजी #पद्म पुरस्काराचे वितरण : दरवर्षी दोन ते तीन टप्प्यात मार्च ते एप्रिल महिन्यादरम्यान पार पडते 

# राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रपती भवनात पद्मपुरस्कार प्रदान करण्यात येतात. 
                                                ०००००