Friday, October 28, 2016

मातीशी जुळलेली भूमिका करण्याची इच्छा : वृषाली हटाळकर

                                                                  
नवी दिल्ली दि. 21 : ग्रामीण माती-संस्कृतीशी जुळलेली भूमिका करण्याची भावना अभिनेत्री वृषाली हटाळकर यांनी आज महाराष्ट्र परिचय केंद्रात व्यक्त केली .   
         केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाच्यावतीने दिल्लीत आयोजित कार्यक्रमात सादरीकरणासाठी आलेल्या वृषाली हटाळकर यांनी आज परिचय केंद्राला भेट दिली. यावेळी झालेल्या अनौपचारीक चर्चेत त्यांनी या भावना व्यक्त केल्या. परिचय केंद्राचे उपसंचालक दयानंद कांबळे यांनी वृषाली हटाळकर यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. तसेच, नृत्यांगना रोशनी उर्फ सविता म्हात्रे, लावणी सम्राट ग्रुपचे प्रमुख प्रमोद कोंदळकर यांचेही पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. माहिती अधिकारी अंजू निमसरकर-कांबळे, उपसंपादक रितेश भुयार, दैनिक सामनाचे दिल्ली प्रतिनिधी निलेश कुलकर्णी, वरिष्ठ पत्रकार विनीत वाही  यावेळी उपस्थित होते.   
              वृषाली हटाळकर यांनी दूरशर्नच्या सहयाद्री वाहीनीवरील दामीनी या नाटकातून अभिनयाला सुरुवात झाली. त्यानंतर मी माझ्या मुलांचा, वाटा-पळवाटा आणि बरसात या नाटकात प्रमुख भूमिका केल्या. तो येतो, अब्राहम, लग्नाची वरात लंडणच्या घरात, डम-डम डिगा डिगा अशा नऊ मराठी चित्रपटात काम केले असून सहा चित्रपट प्रदर्शनाच्या वाटेवर असल्याचे त्यांनी सांगितले. मराठी शिवाय तेलगू, पंजाबी, भोजपूरीसह दक्षिणेतील  चित्रपटांमध्ये भूमिका केल्याचे त्यांनी सांगितले. व्हिडीयो अल्बम आणि जाहीरातीही केल्या. ग्रामीण भागातून संघर्ष करून आपण अभिनय क्षेत्रात पुढे आलो असल्याने ग्रामीण माती-संस्कृती यांच्याशी जुळलेली भूमिका करण्याची इच्छा असल्याचे वृषाली हटाळकर म्हणाल्या. 
            जीवन हेच एक पुस्तक असून माणस वाचनातून मी घडत गेल्याचे हटाळकर सांगतात.  हाच, अनुभव गाठीशी घेऊन अभिनयालाही धार आली. लग्नानंतर आपली कारकीर्द बहरल्याचे त्या अभिमानाने सांगतात.  लग्नानंतर तेलगू, पंजाबी, भोजपुरी, शिंदी आणि मराठी अशा भाषांमधे नामवंत कलाकारांसोबत अभिनय करण्याची संधी मिळाल्याचे त्यांनी सांगितले. नृत्य आणि गायनातही हटाळकर प्रवीण आहेत. अभिनयाच्या विविध प्रातांमध्ये अजून मोठी भरारी घ्यायची आहे त्यासाठी नवनवीन गोष्टी शिकतेय असेही वृषाली हटाळकर म्हणाल्या.  

                                                   0000000 

आदिवासी भागांच्या विकासासाठी‘श्यामा प्रसाद मुखर्जी नॅशनल रूर्बन मिशन’


देशातील आदिवासी भागांमध्ये उत्तम पायाभूत सुविधा उपलब्ध  करून देत आदिवासी बांधवांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी केंद्र शासनाच्या ग्रामीण विकास विभागाअंतर्गत श्यामा प्रसाद मुखर्जी नॅशनल रूर्बन मिशनही योजना आखण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत देशात येत्या तीन वर्षात ३०० क्लस्टर उभारण्याचे ध्येय ठेवण्यात आले आहे पैकी  विविध राज्यांमध्ये १०० क्लस्टर उभारण्यात येणार आहे.योजनेच्या पहिल्या टप्यात विविध चाचण्यांनंतर  ८ राज्यातील १२ आदिवासी क्लस्टर विकसीत करण्याची अंमलबजावणी सूरू झाली आहे. महाराष्ट्रातून जळगाव जिल्हयातील मुक्ताईनगरची निवड या क्लस्टरसाठी करण्यात आली आहे. 
आदिवासीबांधव हे मुळात उत्तम कलागुणी असतात त्यांच्यातील कला विकसीत करण्यासाठी कौशल्य वृध्दी कार्यक्रमाची अंमलबजावणी करणे, प्रत्येक घरात स्वयंपाकाच्या गॅसची जोडणी देणे, २४ तास स्वच्छ पाणी पुरवठा उपलब्ध करून देणे, प्रत्येक घरात स्वच्छतागृह उपलब्ध करून देणे, शाळांच्या उत्तम इमारतींचे बांधकाम करणे, आदिवासी गावांमध्ये दुग्धव्यवसायांप्रमाणे अन्य शेतीपूरक व्यवसाय विकसीत करणे, या भागात मोबाईल आरोग्य सेवा उपलब्ध करून देणे, आदिवासी भागांतील गावांना एकमेकांशी जोडण्यासाठी सडकांचे जाळे उभारणे , आदिवासी गांवाना शासन व जगाशी जोडण्यासाठी येथे ई ग्राम केंद्र उभारणे आदिंची अंमलबजावणी या कार्यक्रमांतर्गंत करण्यात येणार आहे. यावर्षी फेब्रुवारी महिन्यात छत्तीसगढ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते श्यामा प्रसाद मुखर्जी नॅशनल रूरर्बन मिशनची सुरुवात झाली.
  २०११ च्या जनगनणेनुसार देशात एकूण ६६१ जिल्हे असून या योजनेसाठी यातील आदिवासीबहूल लोकसंख्येच्या १०० जिल्हयांची निवड करण्यात आली. आदिवासी बहूल १६ राज्यांतील या १०० जिल्हयांमधे उप विभाग करण्यात आले असून आदिवासी गावांची निवड करण्यासाठीएकात्मीक क्लस्टर कृती आराखडाआखण्यात आला आहे. या कार्यक्रमासाठी तीन स्तरांवर मुल्यांकन करण्यात येऊन आदिवासी गावांची निवड करण्यात येते. थोडयाफार फरकाने इतर आदिवासीगावांपेक्षा पुढारलेल्या आदिवासी गावांची निवड या कार्यक्रमासाठी करण्यात येत आहे. या कार्यक्रमासाठी राज्यांचे मुख्य सचिव हे संबंधित राज्यातील मुख्य  निरीक्षक आहेत. जिल्हयाच्या ठिकाणी जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्र शासनाच्यावतीने  २ वरिष्ठ अधिका-यांच्या देखरेखीत या कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्यात येत आहे.
या कार्यक्रमासाठी १५ कोटींचा निधी देण्यात येत आहे. एकुणातील ७० टक्के निधी हा केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध कार्यक्रमांतून उभारण्यात येत आहे.तर उर्वरित ३० टक्के निधी हा केंद्र शासनाच्या ग्रामीण विकास विभागाच्या क्रिटीकल गॅप फंडींगमधून देण्यात येत आहेत. आतापर्यंत केंद्राने या योजनेसाठी २०६ कोटींचा निधी वितरीत केला आहे. या कार्यक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी त्या-त्या राज्यांनी निधी उभारण्यासाठी पुढाकार घेण्यासाठी केंद्र शासनाने राज्यांकडे आग्रह केला आहे. तसेच विविध उद्योग समुहांनीही सीएसआरच्या माध्यमातून या कार्यक्रमासाठी निधी उपलब्ध करून देण्याचे आवाहन शासनाने केले आहे.
(दिल्ली येथील प्रगती मैदानमध्ये केंद्रीय आदिवासी व्यवहार मंत्रालयाच्यावतीने दिनांक २६ते२८ ऑक्टोबर २०१६ या कालावधीत आयोजित राष्ट्रीय आदिवासी कार्निव्हलमध्ये वार्तांकनासाठी गेलो असता, नॅशनल रुर्बन मिशन आणि आदिवासी विकास या विषयावर केंद्रीय ग्रामीण विकास मंत्रालयाच्या उपसचिव रेखा चौहान यांचे सादरीकरण आवडले त्यातील काही मुद्दे टिपले होते त्यावर आधारीत हा लेख.)

                                                ००००००



Friday, October 7, 2016

यश मिळविण्यासाठी सातत्यपूर्ण मेहनत, जिद्द आणि संयम या त्रिसुत्रीवर भर द्या- कलावंत मनोज जोशी

नाट्य क्षेत्रातील सर्वोच्च सन्मान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या संगीत नाटक अकादमी पुरस्कार सोहळ्याचे राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांचे हस्ते राष्ट्रपती भवनात नुकतेच एका देखण्या सोहळ्यात वितरण झाले. रायगड जिल्ह्यातील मानगाव तालुक्यातील गोरेगाव येथे जन्मलेले आणि मराठी, गुजराती व हिंदी रंगभूमीवर अभिनय, दिग्दर्शन व लेखनाने आपली अमीट छाप सोडून नाट्य क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कारावर नाव कोरणारे प्रसिद्ध कलावंत मनोज जोशी यांना संगीत नाटक अकादमीच्या पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले. मनोज जोशी यांच्या मुलाखतीच्या माध्यमातून जाणून घेतलेला नाट्य, चित्रपट व दूरचित्रवाणी मालिकांवरील प्रवास. खास नेट भेटच्या वाचकांसाठी. 

प्रश्न : नाट्य क्षेत्रातील देशात सर्वोच्च पुरस्कार म्हणून गणला जाणारा संगीत नाटक अकादमी पुरस्कार मिळाल्याबद्दल सर्वप्रथम आपले अभिनंदन ! त्याला जोडूनच प्रश्न, हा पुरस्कार मिळाल्यावर आपल्या काय भावना आहेत?उत्तर : मी ज्या क्षेत्रात कामाचा पाया घातला त्याच क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार मिळाल्याचा अतीव आनंद आहे. हा पुरस्कार रंगदेवतेचा प्रसाद असून मी यास रंगभूमीवरील माझ्या कामाची खऱ्या अर्थाने सुरुवात मानतो. नाटक ही साधना आहे, त्याला अंत नाही. मला अजून रंगभूमीवर खूप काम करायचे आहे. मला नाट्य क्षेत्रातील कामासाठी सदैव प्रोत्साहन देणारे माझे आई–वडिल आणि अगदी पहिल्या नाटका पासून आतापर्यंत मला साथ देणारे बॅक स्टेज आर्टीस्ट, सहकलाकार, वेळोवेळी मार्गदर्शन करणारे ज्येष्ठ कलाकार आणि माझ्यावर प्रेम करणारे दर्शक अशा सर्वांचा हा पुरस्कार असल्याचे मला वाटते त्यांच्या सहकार्याने आणि माझ्या प्रामाणीक प्रयत्नांमुळेच मी हे यश संपादन करू शकलो.

प्रश्न : आपण अभिनयाकडे कसे वळलात? आणि आपल्या पहिल्या नाटका विषयी जाणून घ्यायला आवडेल ! 
उत्तर : माझे कला क्षेत्रातील शिक्षण कोठे झाले हा तुमच्याकडून प्रश्न येण्याआधीच सांगतो की, मी NSD अर्थात ‘नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा’ चा विद्यार्थी आहे. म्हणजे मी नैसर्गीक रित्या अभिनय शिकलो. नाट्य क्षेत्रात देशातील सर्वोच्च प्रशिक्षण संस्था म्हणून ख्याती असणारी दिल्लीतील एनएसडी म्हणजेच राष्ट्रीय नाट्य विद्यालयात मी प्रशिक्षण घेतलेले नाही. माझे वडील ह.भ.प. नवनीत महाराज जोशी हे प्रसिद्ध राष्ट्रीय किर्तनकार आहेत. नारदीय किर्तनाच्या माध्यमातून त्यांनी महाराष्ट्र आणि गुजरात या राज्यांत सांस्कृतिक पूल बांधण्याचे काम केले. वडीलांच्या किर्तनाला जायचो. किर्तन म्हणजे अभिनय, गायन आणि वक्तृत्व यांचा संगम. वडीलांच्या किर्तन सादरीकरणातूनच मला अभिनयाचे धडे मिळाले. वयाच्या ५ व्या वर्षी मी सर्वप्रथम शाळेत अभिनय केला तोच अभिनयाचा श्री गणेशा. गुजराती नाटक ‘ताक धिना धिन’(१९८६) हे माझ पहीलं नाटक. तर विवेक लागू दिग्दर्शीत ‘सर्वस्वी तूझीच’ (१९९५) हे माझ मराठीतील पहिल नाटक.

प्रश्न : ‘चाणक्य’ ही चरित्रभूमिका तुमच्या नावाला जुडली आहे. चाणक्य आणि मनोज जोशी हे रंगभूमीवरील समीकरण या विषयी काय सांगाल ?उत्तर : ‘चाणक्य’ या नाटकाची मध्यवर्ती भूमिका चाणक्याची असून मी ही भूमिका साकारली आहे. दर्शक, समीक्षक यांनी या भूमिकेसाठी माझे तोंडभरून कौतुक केले. वर्ष १९८६ मध्ये चाणक्य नाटक लिहायला घेतलं. त्यातील विविध साजेशे बदल त्याला जोडून अन्य बाबी अशी सर्व तयारी करून १९९० मध्ये ‘चाणक्य’ हे नाटक आम्ही गुजरातीत सुरु केलं. १९९६ पासून या नाटकांचे हिंदीत प्रयोग सुरु झाले. नाटकाचे दिग्दर्शन मी स्वत: केले आहे. आजपर्यंत या नाटकाचे ९९६ प्रयोग झाले आहेत. संगीत नाटक अकादमीच्या पुरस्कारानंतर अकादमीच्यावतीने ललीत कला महोत्सवाचे आयोजन करण्यात येते व पुरस्कार प्राप्त कलाकार यात आपले सादरीकरण करतात. दिनांक ७ ऑक्टोबर २०१६ रोजी दिल्लीतील राष्ट्रीय नाटय विद्यालयात या नाटकाचा ९९७ वा प्रयोग असणार आहे. लवकरच आम्ही या नाटकाचा हजारावा प्रयोग करणार आहोत याचा अत्यंत आनंद आहे. 

प्रश्न : मराठी, गुजराती आणि हिंदी रंगभूमी, चित्रपट व दूरचित्रवाणी वरील मालिकांमधील आपल्या योगदानाबद्दल जाणून घ्यायला आवडेल !उत्तर : मराठी, हिंदी आणि गुजराती रंगभूमीवर मी १७ नाटकांमध्ये भूमीका साकारल्या आहेत. मराठी नाटकांमध्ये ‘सर्वस्वी तूझी’, गुजरातीमध्ये ‘सुर्यवंशी’, ‘गांधी विरूध्द गांधी’ आणि हिंदी मध्ये ‘गोल माल प्यार’, ‘रंगीला’ ही नाटक सांगता येतील. माझ्या चित्रपट कारकिर्दीला १९९० पासून सुरूवात झाली असून हिंदी, मराठी, गुजराती आणि पंजाबी अशा एकूण १०२ चित्रपटांमध्ये मी भूमीका साकारल्या आहेत. हिंदी चित्रपटांमध्ये ‘सरफरोश’, ‘देवदास’, ‘हंगामा’, ‘गोलमाल’, ‘भागमभाग’ ‘‘फिर हेरा फेरी’, ‘चूप चूपके’ तर मराठीमध्ये ‘बालगंधर्व’ , ‘नारबाची वाडी’, ‘यलो’ असे चित्रपट सांगता येतील. माझी पहिली दूरचित्रवाणीवरील मालिका ही मराठी आहे. ‘राऊ’ या मालीकेतून माझे पदार्पण झाले. त्यानंतर ‘आभाळमाया’, ‘बंदीनी’, ‘दामीनी’, ‘आकाश पेलताना’, ‘झुंज’, ‘होणार सून मी या घरची’ अशा मराठी मालींकामध्ये काम केले. ‘माँ’, ‘एक महल हो संपनों का’, ‘जानेमन जानेमन’ आदी हिंदी दूरचित्रवाणीवरील मालीका सांगता येतील. 

प्रश्न: हल्ली सारखी एक ओरड असते की, नाटकाला वाईट दिवस आलेत. यावर आपलं मत काय ?
उत्तर : नाही, मी याच्याशी पूर्णपणे असहमत आहे. भारतातील जनतेच्या धमण्यांमध्ये कला भिनली आहे. त्यांना उत्तम नाटक हवे आहेत. नाटक करण्याची प्रवृत्ती आणि ती स्वीकारण्याची वृत्ती वाढण्याची गरज असल्याचे मला प्राणाणीकपणे वाटते. भारताच्या कोणत्याही राज्यात गेलात तर तेथील मंदीरांमध्ये चितारण्यात आलेल्या चित्रांमध्ये आपल्याला कलेचा उत्तम नमूना सापडतो. तर माणसाच्या दैनंदिन जगण्यात नाटक असते त्यामुळे नाटकाला मरण नाही. नाटकाचे प्रयोग सादर करण्याची प्रवृत्ती मात्र वाढली पाहीजे त्याने हे क्षेत्र आणखी विकसीत होईल. यापुढे जावून मी सांगेन की, प्रत्येक राज्यांनी आपल्या शालेय अभ्यासक्रमात नाटक हा विषय समाविष्ट करावा.प्रत्येक राज्याची लोककला जीवंत राहण्यास याची मदत होईल. काही प्रसंगी शालेय अभ्यासक्रमातील इतिहासासारखा विषय नाटकाच्या आधारे शिकवल्यास विद्यार्थ्यांना हा विषय रोचक वाटेल आणि चटकन समजेल. 

प्रश्न : भारतीय रंगभूमीवर गाजलेले स्वर्गीय विजय तेंडूलकर लिखीत ‘घाशीराम कोतवाल’ हे नाटक आपण हिंदीत अनुवादीत करून गुजराती रंगभूमीवर आणलं. या प्रयोगाबद्दल काय सांगाल ?उत्तर : स्वर्गीय विजय तेंडूलकर यांच्या लेखनीतून साकारलेले आणि श्रध्देय भास्कर चंदावरकर यांच्या दिग्दर्शनाने मराठीसह भारतीय रंगभूमीवर गाजलेलं घाशीराम केातवाल हे नाटक गुजराती रंगभूमीवर आणण्याचा अवघड प्रयोग मी यशस्वीपणे करू शकलो. याचं सर्वस्तरातून कौतुक झाल. मी स्वत: या नाटकाचा गुजराती अनुवाद केला. हे नाटक प्रत्यक्ष रंगमंचावर सादर करताना मराठी कलाकार आणि त्यांच्या तोंडी गुजराती संवाद असल्याने नाटक उत्तम झाले. भास्कर चंदावरकरांनी या नाटकासाठी वापरलेले मीटर मी गुजरातीमध्येही तंतोतंत वापरले त्यामुळे ही उत्तम कलाकृती ठरली. 

प्रश्न : ‘राऊ’ ही मराठीतील मालीका, दूरचित्रवाणीवरील तूमची पहिली मालिका ठरली त्या विषयी काय आठवणी आहेत?
उत्तर : त्यावेळी मी रंगभूमीवर नाटकांमध्ये काम करायचो. एक दिवस अचानक स्मिता तळवलकर आणि संजय सुरकर हे दिग्दर्शक निर्माते द्वय माझ्याकडे आले आणि त्यांनी सांगितले की या नाटकातील बाजीराव पेशवेंच्या मुख्य पात्रसाठी आम्ही तुझी निवड केली आहे. हा माझ्यासाठी सुखद धक्का होता. या दोघांनी मला ‘राऊ’ कांदबरीचे लेखक ना.स.इनामदार यांच्याकडे नेलं. ते म्हणाले अरे हा तर हुबेहूब बाजीराव शोभतो. आणि इथूनच नाटकाच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली. या नाटकाच्या माध्यमातून मी पहील्यांदा कॅमेरा फेस केला. सतत २६ दिवस चित्रीकरण चाललं या दरम्यान संजय सुरकर मला सारखे सीन समजून सांगत असत. मी अभिमानाने सांगतो की, स्मीता तळवलकर आणि संजय सूरकर यांच्या मुळेच दूरचित्रवाणी वरील मालीका आणि चित्रपटाचां माझा पाया रचला गेला.

प्रश्न : सध्या कोणकोणती नाटक, चित्रपट व मालिकांवर काम सुरु आहे ?
उत्तर : मी सध्या रंगभूमीवर चाणक्य या नाटकांच्या प्रयोगात व्यस्त आहे. ‘१५ ऑगस्ट भागीले २६ जानेवारी’ आणि आणखी एका मराठी चित्रपटात मी भूमिका करीत आहे त्याच्या चित्रीकरणात व्यस्त आहे. यासोबतच एका हिंदी आणि गुजराती चित्रपटाचेही चित्रीकरण सुरु आहे, येत्या डिसेंबर महिन्याअखेर या सर्व प्रकल्पांवरील काम संपेल अशी अपेक्षा आहे. 

प्रश्न : नाट्य क्षेत्रात येऊ इच्छिणाऱ्या नवोदितांना आपण काय संदेश द्याल?
उत्तर : सातत्यपूर्ण मेहनत, जिद्द आणि संयम या त्रिसुत्रीवर मी या क्षेत्रात आपली वेगळी छाप उमटवू शकलो. नवोदितांनीही याचं त्रिसुत्रीचा अवलंब करून पुढे जावे असा सल्ला देईन व या कामी त्यांना मनापासून शुभेच्छा देईन. 

आपण अतिशय व्यग्रतेतून बहुमोल वेळ दिला त्यासाठी धन्यवाद ! आपल्याकडून रंगभूमीची अशीच सेवा घडत राहो व या क्षेत्रात आपण आणखी उत्तमोत्तम काम करीत राहोत या सदिच्छा. 

-रितेश मोतीरामजी भुयार,
उपसंपादक, 
महाराष्ट्र परिचय केंद्र, नवी दिल्ली.