जन्मानंतर बाळाचा पहिला संपर्क
मातेशी येतो आणि माता ज्या भाषेत मुलासोबत संवाद साधते त्याच भाषेचे संस्कार घेत तो
मोठा होतो व तिच आपली मातृभाषा ठरते. म्हणून पंजाब मध्ये राहणा-या व्यक्तींची भाषा
पंजाबी ठरते, गुजरातमध्ये राहणा-या व्यक्तींची गुजराती तर महाराष्ट्रातील जनतेची मराठी
ही मातृभाषा ठरते. जगाच्यापाठीवर सर्वच ठिकाणी हे तत्व लागू पडते. म्हणूनच मातृभाषेतून
घेतलेल शिक्षणही उत्तम मानल जाते किंवा जी
भाषा आपल्या दैनंदिन जीवनात उपयोगात येते त्याच भाषेतून आपण शिक्षण दिल तर ते विद्यार्थी
लवकर ग्रहण करतात. पर्यायाने मातृभाषेतून शिक्षण हे प्रभावी ठरते. मात्र, भारतासारख्या
खंडप्राय देशात डोंगर -द-यात राहणा-या जमातीतील मुलांची स्थानिक भाषेतून जडणघडण होते
त्यामुळे त्या-त्या राज्यांच्या मातृभाषेतून शिक्षण देताना भाषिक अडचण मोठया प्रमाणात
जाणवते.
स्थानिक भाषेतील जडण घडणीमुळे विद्यार्थ्यांना मातृभाषेतून शिक्षण घेताना
येणारी अडचण समजून घेण्याकरिता माझे स्वत:चे निरीक्षण व अनुभव येथे मांडणे संयुक्तीक
समजतो. आपल्या राज्याची मराठी ही मातृभाषा म्हणून अभ्याससाहित्य हे प्रमाण मराठी भाषेत
तयार होते मात्र, सामाजिक परिवेशातील वैविद्यामुळे स्थानिक भाषेसोबत जुडवून घेताना
उच्चारण व शब्दबोध या अडचणी प्रकर्शाने जाणवतात. उदा. विदर्भातील विद्यार्थ्यांची जडण-घडण
होताना या भागातील उच्चार हे प्रमाण मराठी बोलणा-या पुणे किंवा मुंबईतील विद्यार्थी
किंवा शिक्षकांपेक्षा वेगळी असते. त्यामुळे एकाच राज्यात राहून विदर्भातील विद्यार्थी
किंवा शिक्षक पुणे,मुंबई व राज्याच्या अन्य भागात गेल्यास त्यास भाषेची अडचण निर्माण
होते तशी ती पुणे,मुंबई येथील विद्यार्थी किंवा शिक्षक विदर्भात आल्यानंतर होते.
भाषा ही त्यात्या परिसराच्या भौगोलिक, सांस्कृतिक व सामाजिक घटकांचेही
प्रतिनिधीत्व करीत असते त्यामुळे मातृभाषेतून शिक्षण देताना ही अडचणही प्रकर्शाने जाणवते.
अमरावती जिल्हयातील मेळघाट परिसरातील तालुक्यांच्या ठिकाणच्या शाळांमध्ये शिक्षण घेणारी
बहुतांश विद्यार्थी -विद्यार्थीनी आदिवासी जमातीची आहेत. या मुलांची जडणघडण आदिवासी
भाषेतून झाली असल्याने त्यांना मराठीतून शिक्षण घेताना अनंत अडचणी येतात. मी, मुलत:
आकलणाची अडचण अधोरेखीत करतो. मुख्य प्रवाहातील समाजाशी कमीत कमी संपर्क असणा-या आदिवासी
जमातीतील मुलांचा मराठी भाषेशी संबंधच येत नाही.
शाळेत शिक्षकांनी शिकवलेला मराठी शब्दच त्यांनी पहिल्यांदा ऐकलेला असतो त्यामुळे
त्यांना आकलण होत नाही. आकलण न झाल्याने विद्यार्थ्यांच्या लेखनीतूनही ते उतरत नाही परिणामी वेगाने पुढे जाण्याच्या शिक्षणाच्या शर्यतीत
ही मुल कोसो दूर राहतात.
आदिवासी मुलांची जडणघडण ही त्यांच्या कोरकु वा अन्य स्थानिय भाषेत होत
असल्याने मराठी या राज्याच्या मातृभाषेतून शिक्षण घेताना महत्वाची अडचण जाणवून येते.
महाराष्ट्रात अन्य राज्यातून येणा-या प्रशासकीय
अधिका-यांना (जिल्हाधिकारी) यांना जसे स्थानिक भाषा शिकावी लागते त्यामुळे ते स्थानिक
लोकांचे प्रश्न अधिक चांगल्यारितीने समजू शकतात व स्थानिक जनतेलाही आपल्या मातृभाषेतून
अधिकारी संवाद साधतो याचे समाधान लाभते. तसेच, सामाजिक वैविद्यामुळे मातृभाषेतून शिक्षण
घेताना स्थानिक भाषेतील विद्यार्थ्यांची जडण-घडण हीच मोठी अडचण असते.
*****
रितेश मोतीरामजी भुयार,
नवी दिल्ली.
