(छायाचित्रे : श्री. राकेश वाटेकर,नागपूर)
निरक्षरता,दारीद्रय,पायाभूत सुविधांसह साधनसुविधांचा पूर्ण अभाव असताना उदात्त ध्येयाने सातत्यपूर्ण कार्य करून १५२ वाणांचा संग्रह करणारी बीजमाता राहिबाई पोपेरे या जेव्हा ‘पद्मश्री’ आणि ‘नारीशक्ती’ पुरस्काराला गौण मानून आपली इच्छा प्रगट करतात आणि त्या क्षणाचा मी साक्षीदार होतो. त्यांचा मनोदय, ‘घराघरात राहिबाई निर्माण व्हावी’ ; ‘गावोगावी बीज बँक’. प्रसंग, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात आयोजित १०८व्या भारतीय विज्ञान काँग्रेसमधील(३ ते ७ जानेवारी २०२३) महिला विज्ञान काँग्रेसच्या उद्घाटन (५ जानेवारी २०२३) समारंभातील राहिबाईंचे मनोगत.
अंगात लाल भरजरी लुगड,नाकात मोठीजात नथ,कपाळावर त्याचं नथीला शोभावं आणि सभागृहात बसलेल्या शेवटच्या व्यक्तीलाही दिसेल एवढया आकाराच कुंकु लेलेली, काळया-सावळया रंगाची मध्यम शरीर यष्टीची कराऱ्याबाण्याची व्यक्ती सभागृहातील पोडियमवर येते (पायातील चप्पल मंचावरच काढून) बीजमाता म्हणून महाराष्ट्रासह भारत व जगाला ओळख झालेलं हे व्यक्तीमत्व म्हणजे पद्मश्री राहीबाई पोपेरे.
राहिबाई , आपल्या संघर्षाचा पट उलगडत होत्या. वडिलांना आपल्या संघार्षाचा नायक म्हणून अभिमानाने उल्लेख करणाऱ्या राहिबाई आपल्या एकूण ८ भावंडांचा उल्लेख करतात. लहानपणीच मातृछत्र हरवल्याची दु:खद बाब मांडतांना वडिलांनी दिलेल्या संस्कारी शिकवणुकीचाही त्या अभिमान बाळगतात. दुर्गम भागात असलेले गाव आणि कमालीचे दारिद्रय यामुळे अशिक्षीतपणाचा शिक्का माथी बसल्याचा उल्लेखही त्या करतात. लहानवयात लग्न होवून त्या सासरी आल्या. पण, आयुष्यातील संघर्ष थांबतच नव्हता.
रात्री बाळंतपणे ; सकाळी घरातील कामे
राहिबाईंच्या संसारवेलीवर चार फुल फुलली. बाळंतपणासाठी आजच्या काळाप्रमाणे गरोदरपणाच्या सातव्या महिन्यापासूनच दगदग टाळण्यापासून सुरु होणारी काळजी ते बाळंतपणानंतर सक्तीची दोन महिन्यांची विश्रांती याला राहिबाई तद्दन अपवाद. ‘माझी एकूण चार बाळंतपण झाली, रात्री बाळ जन्माला यायचं अण दुसऱ्या दिवशी मी सार्वजनिक पाणवठयावर पाण्याची घागर भरायला जायची’ हे राहिबाईंचे वक्तव्य त्यांच्याबद्दलचा आदर अजूनच वाढवून जाते.
असा सुरु झाला बीजमातेचा प्रवास....
घरात मुलगा आजारी पडला. अगदी मरणाच्या दारात पोचला. त्याला कारण ठरले विषयुक्त अन्नधान्यातून झालेली बाधा. आणि याच प्रसंगातून राहिबाई यांनी ‘जुन्या गावराण बी-बियाण्यांचा शोध व संग्रह आणि विषमुक्त अन्न’ हे जीवनाचे ध्येय बनवले. लहानपणापासूनच काळया आईच्या अंगाखांद्यावर बाळगणारी राहीबाई आता याच काळया आईने दिलेल्या मौल्यवान अन्नाचा ठेवा शोधू लागली. आपल्या घरातील गोठयातच बीजबँक तयार केली. आजुबाजुच्या परिसरातील वेगवेगळया भाज्या,फळांची बी मिळवण व त्याला स्वत:च निर्माण केलेल्या संरक्षक पध्दतीने साठवून ठेवणं हा प्रवास सुरु झाला. म्हणता म्हणता या बीजबँकेत बी -बियाण्यांचे १५२ अस्सल देशी वाण संग्रही झाले. एव्हाना प्रसारमाध्यमांची नजरही राहिबाईंच्या कामावर गेली. त्याची दखल सरकारनेही घेतली.केंद्रशासनाच्या मानाच्या ‘पद्मश्री’ या नागरी पुरस्काराने आणि केंद्राच्याच महिला व बाल कल्याण मंत्रालयाच्या ‘नारीशक्ती’ राष्ट्रीय पुरस्काराने राहिबाईंचा गौरव झाला. एका राजकीय पुढाऱ्याने तर राहिबाईंना घरही बांधून दिल आणि राहिबाईंच्या आग्रहाने त्या नेत्याने हेलिकॉप्टरद्वारे गावात प्रवास केला व गावात हेलिकॉप्टर आणण्याचा आपला मनोदय पूर्ण केल्याचा किस्सा सांगतांना त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद दिसून आला.
तथाकथीत आधुनिक जीवनशैलीच्या नावावर मानसाच्या जीवनपद्धतीत झालेला बदल आणि त्यामुळे त्याच्या जेवणाच्या ताटात आलेले विषयुक्त अन्न हे चित्र राहिबाईंना बदलायचे आहे. नवीन बी-बियाण्यांच्या नावाने आवई पेटवत आपण जुन्या पारंपरिक देशी वाणाचाच करीत असलेलो नायनाट थांबवण्यासाठी व ही वाण टिकवून ठेवण्यासाठी बीजबँकेची निर्मिती करण्यासोबतच हे ज्ञान सर्वसमान्यांपर्यंत पोहचवण्याचे कार्यही राहिबाई करीत आाहेत. त्यांच्या या कार्यात शेकडो हात जुळले आहेत. या कार्यासाठी त्यांनी एक संस्था स्थापन केली आहे. देशी वाणाचा शोध व त्याचे संवर्धन करण्याबरोबरच जीवामृत निर्मिती , सेंद्रीय शेती व रसायणे मुक्त शेतीसाठी ही संस्था कार्यरत आहे. आपल्या कार्याची फलशृती होत असल्याचा व हे कार्य पुढे नेण्याचा विश्वासही राहिबाई बोलून दाखवतात.
पुरस्कार नको, माझं काम पुढे घेवून जा बस्स....
मनोगताच्या शेवटाकडे येताना राहिबाई स्तब्ध झाल्या. सभागृहात उपस्थित देशभरातील विविध क्षेत्रात कार्यरत महिलांची नरज आणि कानही पुन्हा पोडियमकडे केंद्रीत झाले. मला राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडून पद्मश्री पुरस्कार प्रदान झाला. तेथून काही महिन्यांनी त्यांच्याच हस्ते नारीशक्ती पुरस्कारही मिळाला. यावेळी मात्र राष्ट्रपतींनी न राहवून मला बोलवले आणि गप्पा मारत त्यांनी माझ्या कामाची प्रशंसा केली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनीही पद्मश्री पुरस्कर वितरण कार्यक्रमाच्यावेळी मला बीजबॅकेची संकल्पना कशी सुचली आणि यासाठी प्रशिक्षण घेतले होते का?असे प्रश्न केल्याचा अनुभव कथन करतांनाच त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद फार काळ दिसला नाही. राहिबाईंनी दीर्घ श्वास घेतला आणि सांगत्या झाल्या, मी भारतीय विज्ञान काँग्रेसच्या या आयोजनात तीन वेगवेगळया मंचाहून मनोगत मांडले .पण, मला एकाही पत्रकाराने भविष्यातील योजनांबद्दल विचारले नाही ! म्हणूनच मी आपणा सर्वांसमोर माझी इच्छा प्रगट करते. ‘मला असे पुरस्कार नकोत ! त्या परिस माझे काम पुढे जावे, घराघरात राहिबाई निर्माण व्हावी आणि गावोगावी बीज बँक तयार व्हावी.’
या वाक्यानंतर सभागृहात टाळयांचा कडकडाट आणि उपस्थितांकडून स्टँडिंग ओव्हेशन हे चित्र पाहून एक हृद्य आठवण माझ्या स्मृतीपटलावर कोरून घेतली व धन्य झालो.
०००००


No comments:
Post a Comment