करीअर घडविण्याच्या
ध्येयाने दिल्ली शहरात पाय ठेवला आणि बघता-बघता ते ध्येय साध्यही झाले. याच शहरात
शासकीय नोकरीचा श्रीगणेशा आणि वैवाहिक जीवनाची सुरुवातही झाली. पाहता-पाहता
घटनाक्रम मागे पडला आणि आठ वर्ष निघून गेले. यासर्वांमध्ये या शहारातील काही गोष्टी
ज्या मला प्रकर्षाने आवडल्या त्याचा एक वेध ‘ये दिल्ली है मेरे
यार ’.
उत्तम वाहतूक व्यवस्था –
डीटीसी अर्थात दिल्ली ट्रान्सपोर्ट सीस्टीमच्या दोन गाडया या शहरात धावतात आणि आता त्यांच्या
दिमतीला ऑरेंजबस या नारंगी रंगाच्या गाडया आल्या आहेत. या गाडयांचे वैशिष्टय
म्हणजे ग्रीन आणि ऑरेंज बसेस यांचा कमीत कमी प्रवास खर्च आकार अर्थात कमीत कमी
तिकीट ५ रूपये आणि जास्तीत जास्त २० रूपये आहे. तर रेड बस जी एसी अर्थात
वातानुकुलीत आहे तिची किमान तिकीट १० रूपये तर कमाल २५ रूपये आहे. याला अपवाद फक्त
विमानतळ ते कश्मीरीगेट बसस्थानक हा वातानुकुलीत बसचा प्रवास ज्यात मुख्यत्वे विमान
प्रवास करून आलेले प्रवासी असतात त्याची तिकीट ८० रूपये आहे. तिकीट दर कमी
असल्याने शक्यतो कोणीच विना तिकीट प्रवास करीत नाहीत. आणि तिकीट कंडक्टर जवळ जाऊनच
तिकीट घेण्याची पध्दत इथे कसोशीने पाळली जाते. रात्रभरही डीटीसी बसेसची सेवा उपलब्ध आहे व महिलांच्या
सुरक्षेसाठी यात पोलिस रक्षक उपस्थित असतो.
या बसेस ‘सीएनजी’ अर्थात ‘कम्प्रेस नॅचरल गॅस’
या धूर विरहीत इंधनावर चालत असल्याने शहरा प्रदुषीत होण्याचा धोकाही टळतो.
मेट्रो ट्रेन डीएमआरसी
अर्थात दिल्ली मेट्रो रेल कार्पोरेशनने वर्ष २००२ मध्ये दिल्ली शहरात मेट्रो ट्रेन
सुरु केली. जनसामान्यांना परवडेल असा प्रवास खर्च आणि नीटनेटकी, सुरक्षीत व
वातानुकुलीत प्रवास व्यवस्था असे वर्णन करता येईल मेट्रोचे. कमीत कमी तिकीट ८
रूपये तर जास्तीत जास्त ४० रूपये प्रवासासाठी आकारला जातो. सुरक्षेच्यादृष्टीने
अत्यंत चोख व्यवस्था आहे. केंद्रीय सुरक्षा दलाची सुरक्षा येथे देण्यात आली आहे.
स्त्री – पुरुषांना विशेष तपासणीतून जावे लागते तर त्यांच्याकडे असणारे बॅगेजही
स्कॅनर मशीन मधून जाते. इथले सुरक्षा प्रहरी प्रंचड प्रामाणिक आणि कामाप्रती
डेडीकेटेड असल्याचे पदोपदी जाणवते ते आपल्या कामाच्या वेळेत कुणाही प्रवाश्यांशी
गप्पा मारत नाहीत किंवा त्यांनी काही खाण्यास दिले तर ते स्वीकारत नाहीत (मकरसंक्रातीला एका सुरक्षा रक्षकास प्रांजळमनाने तिळगुळ देण्याचा प्रयत्न
केला होता पण त्याने स्वीकारण्यास मना करून मी डयुटी अवर मधे काहीही स्वीकारू शकत
नाही असे सांगितले यातून मला ही माहिती कळली) मद्यपानाच्या
वस्तू, ज्वालाग्रही पदार्थ, शस्त्रास्त्र यांची कसून तपासणी केली जाते. आणि अशा
रितीने हा प्रवास सुरक्षित होण्याची खात्री पटल्या नंतर पुढे स्वच्छतेची घेण्यात
येणारी काळजी आपल्या नजरेस पडते. कुणाही प्रवाशाला मेट्रोमध्ये खाने पिने
निर्बंधीत करण्यात आाले आहे त्यामुळे इथे स्वच्छता राखण्यात मदत झाली आहे मात्र
मेट्रोस्टेशलाच काही खान्याच आउटलेट देण्यात आल्याने इथे आपली भूकही क्षमते.
कधीकाळी आपण आपल्याकडील चिज वस्तू विसरलात तर मेट्रोट्रेन मधीत सुरक्षा विभाग
त्याचीही काळजी घेते. माझे एका मेट्रोस्टेशनवर हरवलेले जॉकेट, वॉलेट आणि मोबाईल
फोन मला तातडीने आणि योग्य उलट तपासणी करून परत देण्यात आलाचा अनुभव मी घेतला आहे.(या तीनही वेगवेगळया घटना होत्या.). प्रवाशाला
काऊंरवरून टोकन घ्यावे लागते तर कस्टमर केअरबुथहून आपणास मेट्रो कार्ड काढून
सवलतीच्या दरात व टोकन काढण्यासाठी रांगेत
न लागता प्रवास करणे सोयीचे होते. असे मेट्रोकार्ड चार्ज करण्यासाठी बहुतांश मेट्रो स्टेशनवर वेंडींग
मशीनची व्यवस्था करून देण्यात आली आहे. मेट्रो कार्ड घेताना तुमचे पैसे जमा केले
जातात कार्ड वापरून झाल्यास ते पैसे परत मिळतात.
मेट्रो कार्डचे मशीन वरील कमीत कमी रिचार्ज १०० रूपयांचे तर कस्टमर केअरहून कमीत कमी २०० रूपयांचे
रिचार्ज केले जाते.
या दोनही मेट्रो विद्युत इंधनावर चालत असल्याने प्रदूषण विरहीत
वाहतूक व्यवस्था उपलब्ध होते.
एक्सप्रेस ट्रेन – ही
मेट्रोट्रेन दिल्लीत आयोजित करण्यात आलेल्या २०११ च्या कॉमनवेल्थ गेमच्या
पार्श्वभूमीवर सुरु करण्यात आली. विमानतळाहून येणा-या प्रवाशांना थेट शहरात पोहचता
यावे आणि विशेषत्वे त्यावेळी या
स्पर्धेसाठी येणारे परदेशी खेडाळू आणि दर्शकांना प्रवासाची सोय व्हावी हा उद्देश
होता. या स्पर्धा आटोपल्या नंतर विमानतळाहून येणारे देशी –विदेशी प्रवाशांसाठी ही
सेवा उपलब्ध करून देण्यात आली. सुरुवातीला रिलायन्स कंपनीने ही मेट्रेा चालविण्यास
घेतली होती. ही मेट्रो दिल्लीतील सामान्य मेट्रोट्रेन पेक्षा वेगवान आहे आणि यात
प्रवाशांचा सामान ठेवण्याची व त्यांला बसण्यास उत्तम व्यवस्था करण्यात आली आहे.
रिलायंसकडे असताना या मेट्रोप्रवासासाठी जास्त तिकीट आकारण्यात येत होती म्हणून
लोकांनी याकडे पाठ फिरवली. मात्र डीएमआरसीने ही मेट्रो चालवायला घेतली तिकीट दर
कमी केले परिणामी या मेट्रोमध्येही पुरेशी गर्दी असते. अल्पदरात जलदगती, सुरक्षीत
प्रवास करण्याची उत्तम सोय असेच वर्णन या एक्सप्रेस मेट्रो ट्रेनचे करावे लागेल.
ऑटो -
ऑटो चालकाला फक्त कुठे जायचे
ते सांगून मीटर डालना भैय्या म्हटल की तुमचा ऑटो प्रवास सुरु होतो. रस्त्याच्याकडेला
कुठेही उभे राहिल्यास चटकन ऑटो उपलब्ध होतो. ऑटोचे पहिले मिटर २५ रूपये आहे जे २
कि.मी अंतरापर्यत चालते . नंतर प्रती किमीला ७ रूपये दर आकारला जातो. शहरात
रात्रीही ऑटो चालतात मात्र नाईट चार्ज हा त्यासाठी अतिरीक्त अधिभार आकारण्यात
येतो. बरेचदा ऑटोवाल्यांशी खटके उडण्याचे चान्स असतात. तुलनेने महाग असला तरी
ऑटोचा प्रवासही या शहरात सुकर असाच आहे.
हात रिक्षा : अकुशल लोकांचा
मुख्यत्वे व्यवसाय हात रिक्षा चालविणे आहे. ही लोक हात रिक्षा दिवसभरासाठी भाडयाने
घेतात. दिवसाला १०० ते २०० रूपये भाडे आकारण्यात येते. यात हात रिक्षा चालवणारा
त्याच्या परिनी होईल तेवढया खेपा करून भाडे वजा करता आपल्या उदर निर्वाहासाठी हात
रिक्षा चालकाची भूमिका वठवून शहराच्या वाहतूक व्यवस्थेत महत्वाची भूमिका बजावतो.
मुख्यत्वे मेट्रो स्टेशन पासून आत वस्तीमध्ये जाण्यासाठी या हात रिक्षांचा खूप
उपयोग होतो यासाठी कमीकमी प्रती मानसी १० रूपये प्रवास खर्च आकारला जातो. हात
रिक्षा चालक हे बहुतांश उत्तर प्रदेश व बिहार मधले असून शारिरीक अक्षमता आणि
पोटाची खडगी या झुंजीत ते मद्यपान करण्यास मजबूर होतानाचेही चिन्ह दिसते .
त्यामुळे त्यांच्या सोबत प्रवासखर्चाबाबत बार्गेनींग न करता मुकाटयाने प्रवास करने मला मानुसकीचे
वाटते.
बॅटरी रिक्षा : वर उल्लेखीत
प्रमाणेच हा प्रवास मेट्रो स्टेशन ते नागरी वस्ती मध्ये जाण्यासाठी उपलब्ध आहे.
बॅटरी रिक्षाची तिकीट प्रती मानशी १० रूपये असून एका बॅटरी रिक्षात नियमाने ४
प्रवासी बसतात पण अवैधपणे ५ ते ६ प्रवासी बसविण्याची प्रथा रूढ आहे. बॅटरी
रिक्षाला रात्रभर चार्ज करावे लागते व दिवसभर त्याच्या बॅटरी क्षमते नुसार तो
चालवावा लागतो. काही वेळा भाडयानेही लोक बॅटरी रिक्षा चालवतात. हात रिक्षा
चालकांच्या पोटावर काही प्रमाणात बॅटरी रिक्षाने पाय दिला असला तरी दोनही रिक्षा
चालक आपआपल्या परीने अर्थार्जन करतात व शहराच्या वाहतूक व्यवस्थेचा भार उचलतात.
टॅक्सी सेवा : मुख्यत्वे
शहरातील महत्वाचे आंतरराज्यीय बस स्थानके, विमानतळ आणि रेल्वे स्थानकारवर टॅक्सी
सेवा उपलब्ध आहे. बॅगेज जास्त असेल तर ही सेवा उपयुक्त ठरते. सध्या ओला आणि उबर या
कार सुविधा आल्याने स्वस्त दरात ऑन मोबाईल कॉल अशी कार सेवा शहरातील प्रवाशांसाठी उपलब्ध आहे.
चलन – फाटक्या
मळकट कागदी नोटा इथे हदृपार आहेत. चलन व्यवहारात कोणीही फाटक्या अन मळकट नोटा देत
नहीत किंवा स्वीकारतही नाहीत. कोण्याही दुकानदाराला ५०० ची नोट दिली आणि फक्त १०
ते २० रूपये किमतीची वस्तू घेतली तरी कुरकुर न करता तो आपणास उर्वरीत पैसे परत
करतो. हा एक उत्तम गुण येथे प्रत्येकच व्यावसायीक पाळतो त्यामुळे ग्राहकांची
गैरसोय टाळली जाते.
लहानग्यांचा शिष्टाचार- कितीही टुकरट मुलगा असला तरी
आपल्या नातेवाईंकासमोर झुकुन त्याला नमस्कार करण्याची या शहरातील पध्दत मला फारच
भावली. लहान मुलां मुलींपासून ते मध्यमवयीन लोक आपल्यापेक्षा जेष्ठांना मान देतात
हा शिष्टाचार सदैव स्मरणात रहावा असाच आहे जो आपल्याकडे सध्या धूसर होत चालला आहे.
स्वस्त आणि मस्त
वैद्यकीय तपासणी – इथे
सरकारी दवाखाने उत्तम व सुसज्ज आहेत. विनामुल्य वा अत्यल्प दरात औषधोपचार पुरविले
जातात त्यामुळे लोकांची गर्दी असते. डॉग बाईट झाल्यानंतर विनामुल्य
प्रथमोपचारापासून या काळात घेतलेल्या सर्व सुया असोत किंवा अन्य एका सरकारी दवाखान्यात माझा खोकल्यावर विनामुल्य समुळ उपचार करणा-या एमडी आयुर्वेद
डॉक्टर श्रीमती अहुजा. या व्यतीरीक्त आम्ही वास्तव्यास आहे त्या भागात अगदी आरोग्य
सेवा ही इश्वर सेवा या भावनेनी आपली आरौग्य सेवा देणारी डॉ. पुरण प्रकाश त्यांची
श्नुषा डॉ. दिपीका मुलगा डॉ. गौरव आणि डेंटिस्ट मुलगा हे अत्यल्पदरात रोग्यांना
सेवा देतात. दवाखान्यात कुणालाच होईस्तोवर सुई लावली जात नही, इथे तपासणी फी आणि
त्यातच एका दिवसाचे औषधीचे ४ डोज केवळ १०० रूपयांना दिले जातात. हे डॉक्टर कुणाही
पॅथलॉजीची जाहीरात वा त्यांच्याशी व्यवसायीक संबंध ठेवत नाहीत. कमीत कमी खर्चात
लोकांना उत्तम आरोग्य सेवा देणारे हे डॉक्टर कुटुंबिया व त्यांचे समविचारी या
शहरात चालणा-या वैद्यकीय व्यवसायातील काळया बाजारात प्रामाणीक सेवेच मोठ उदाहरण
आहे.
इतरांना देण्यात येणारी स्पेस – आपल्याकडे
इतरांच्या आयुष्यात डोकवण्याची सवय मोठया प्रमाणात आढळून येते मात्र हे शहर यास
पूर्ण पणे अपवाद आहे. प्रत्येक जन आपआपल आयुष्य जगतो एकमेकांना मदत करतात मात्र,
कोणाच्याही आयुष्यात डोकावत नाहीत. त्यामुळे सार्वजनिक स्थळी व रस्त्यावर आपल्या
प्रिय लोकांसोबत वा कुटुंबियांसोत आत्मविश्वासाने व निडरपणे वागण्याची मुभा मिळते
जे सामाजिक वातावरण निर्मळ व स्वच्छ राखण्यास मदत होते. मात्र आपल्या देशात काही
ठिकाणी तरूण तरूणी एकमेकांशी बोलत असतील तर त्यांच्याकडे संशयांच्या नजरेतून बघून
होणारे अन्य प्रकार टाळण्यासाठी इतरांना जगण्याची स्पेस देणारी दिल्लीकर सदैव
स्मरणात रहावे असेच आहेत. ही स्पेस मिळन ही तुमच्या व्यक्तीमत्व विकासासाठी उत्तम
संधी असते असा माझा अनुभव आहे.
००००००

No comments:
Post a Comment