Monday, May 29, 2023

संसदेची ऐतिहासिक इमारत आणि तिचे पालटलेले रुपडे







       

जेथून भारतीय देशाचा गाडा हाकला जातो, देशासाठी  कायदे  तयार होतात आणि देश  वासियांच्या  प्रश्नांना वाचा फोडून त्यांच्या कल्याणाचे निर्णय घेतले जातात अशी इमारत म्हणजे संसद इमारत. देशाची  राजधानी दिल्लीत स्थित असलेल्या या इमारतीचा कार्यकाळ संपुष्टात आल्याने नव्याने उभ्या राहिलेल्या संसद इमारतीचे २८ में २०२३ रोजी मोठया थाटात उद्घाटन झाले. संसदेच्या जुन्या इमारतीच्याच परिसरात केवळ अडिच वर्षाच्या कालावधित (१० डिसेंबर २०२० ते २८ में २०२३)  आणि भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात बांधून तयार झालेली ही इमारत.

जुन्या इमारतीने ब्रिटीश शासन आणि भारतीय स्वातंत्र्य व त्यानंतर स्थापन झालेली पहिली लोकसभा निवडणूक व राज्यसभा सभागृहांची पहिली बैठक हे ऐतिहासिक क्षण अनुभवले. पारतंत्र्यातील भारतदेश आणि स्वातंत्र्योत्तर भारत देशाची प्रगती बघतानाच चीन आणि बांग्लादेश युद्ध प्रसंगी या सभागृहात घेतले गेलेले महत्वाचे निर्णय, देशाला विविध क्षेत्रात अग्रेसर करण्यासाठी घेतलेल्या निर्णयाचीही ही इमारत साक्षीदार होती. कटू आठवण म्हणून या इमारतीने 13 डिसेंबर २००१ रोजी दहशतवादी  हल्लाही अनुभवला. म्हणता म्हणता ही इमारत वयाच्या शतकपूर्तीकडे असताना देशातील धोरणी राजकारण्यांनी या इमारतीची अनुपयुक्तता व भविष्यातील गरजा पाहता संसदेच्या नवीन इमारतीची योजना  आखली  आणि १७ व्या लोकसभेच्या कार्यकाळाच्या अंतिम टप्प्यावर आणि  पुढील वर्षी १८ व्या लोकसभेच्या मुहूर्तावर या इमारतीचा लोकार्पण सोहळाही पार पडला.

ब्रिटीशांनी  कोलकत्त्याहून  १९११ मध्ये  दिल्ली  येथे आपली  राजधानी  स्थलांतरीत केली. आणि  राजधानीचा  विचार करता येथे देशाचा  राजकारभार हाकण्यासाठी आवश्यक वास्तू निर्माणाचे कार्यही  हाती घेतले. यातूनच  राष्ट्रपती भवन, इंडियागेट, संसद भवन आदी इमारती उभारल्या गेल्या .एडवीन ल्युटन या वास्तुविशारदाने हा सर्व परिसर बांधून तयार केल्याने  या सर्व परिसराला ल्युटीएन झोन असे नामाभिदान झाले. ल्युटीएन झोनमधील प्रमुख इमारतीत संसदेच्या इमारतीचा समावेश होतो. संक्षेपात जाणून घेवूया या इमारतीच्या इतिहासाविषयी. 

१२ फेब्रुवारी १९२१ रोजी जुन्या संसदेच्या इमारतीची अर्थात कंसिल हाऊसची कोनशिला डयुक ऑफ कॅनॉट यांनी ठेवली. या इमारतीच्या बांधकामास ६ वर्ष लागले आणि १८ जानेवारी १९२७ रोजी भारताचे तत्कालीन गव्हर्नर जनरल लॉर्ड इर्विन यांच्या हस्ते संसदेच्या इमारतीचे उद्घाटन झाले. उद्घाटनाच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजे १९ जानेवारी १९२७ ला या इमारतीत केंद्रीय विधानसभेच्या तिसऱ्या बैठकीचे आयोजन करण्यात आले,हीच या इमारतीतील पहिली वहिली बैठक ठरली.  स्वातंत्र्याच्या उंबरठयावर ९ डिसेंबर १९४६ रोजी संसदेच्या इमारतीत संविधान सभेची पहिली बैठक पार पडली. भारतीय स्वांतत्र्याची  साक्षीदार  ठरलेल्या या इमारतीत १४ आणि १५ ऑगस्ट १९४७ रोजी ब्रिटीशांकडून भारतीयांकडे सत्तेचे हस्तांतरण झाले व संविधान सभेची  मध्यरात्रीची ऐतिहासिक बैठक पार पडली.

भारतीय राज्यघटनेची निर्मिती होत असतानाच देशात पहिल्या वहिल्या लोकसभा निवडणुकीची तयारीही होत होती आणि ही इमारत स्वतंत्र भारतातील पहिल्या लोकसभेच्या निर्वाचीत सदस्यांच्या आगमनासाठी आसुसली होती. निवडणुका पार पडल्या आणि १३ मे १९५२ रोजी जनतेतून निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींचे अर्थात संसदेचे कनिष्ठ सभागृह लोकसभा आणि जनतेतून अप्रत्यक्ष्‍ निवडून आलेल्या प्रतिनिधींचे वरिष्ठ सभागृह अर्थात राज्यसभेची  पहिली बैठक झाली.

3 ऑगस्ट १९७० रोजी तत्कालीन राष्ट्रपती व्ही.व्ही. गिरी यांनी संसदेच्या ॲनेक्सची कोनशिला ठेवली तर २४ ऑक्टोबर १९७५ मध्ये तत्कालीन प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांनी या ॲनेक्स इमारतीचे उद्घाटन केले. १५ ऑगस्ट १९८७ रोजी तत्कालिन प्रधानमंत्री राजीव गांधी यांनी संसद ग्रंथालयाची कोनशिला ठेवली आणि ७ मे २००२ रोजी तत्कालीन राष्ट्रपती के.आर. नारायणन या ग्रंथालय इमारतीचे उद्घाटन केले.

५ मे  २००९ रोजी उपराष्ट्रपती मोहम्मद हामिद अन्सारी आणि लोकसभा अध्यक्ष सोमनाथ चॅटर्जी  यांनी संसदेच्या ॲनेक्सच्या विस्तारीत इमारतीची कोनशिला  ठेवली. तर ३१ जुलै २०१७ रोजी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी  यांनी संसदेच्या ॲनेक्सच्या विस्तारीत इमारतीचे उद्घाटन केले हीच  संसदेच्या जुन्या इमारतीच्या संबंधातील अखेरची घटना घडली.

भाजपा प्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळाची सुरुवात झाली होती  तेथून काही दिवसांनी ५ ऑगस्ट २०१९ ही तारिख संसदेच्या नव्या इमारतीच्या जन्माचे मुळ ठरले. याच दिवशी उपराष्ट्रपती तथा राज्यसभेचे सभापती एम.व्यैकय्या नायडू आणि लोकसभा अध्यक्ष ओम बिरला यांनी नवीन,आधुनिक संसद इमारतीचा प्रस्ताव उभय सभागृहामध्ये ठेवला.  मंजुरीनंतर या प्रस्तावा बरहूकुम सर्व कार्यवाहीसही सुरुवात झाली. १० डिसेंबर २०२० रोजी  प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी संसदेच्या नवीन इमारतीची कोनशिला ठेवली व अडिच वर्षांच्या अल्पावधित निर्मित या इमारतीचे २८ में २०२३ रोजी स्वातंत्र्यवीर  विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंती दिनी श्री मोदी यांच्याच हस्ते उद्घाटन झाले.

              संसदेच्या नवीन इमारतीविषयी

          नवीन संसदेची इमारत 64,500 चौरस मिटरवर स्थित असून त्रिकोणी आकाराची आणि चार मजली आहे. या इमारतीच्या बांधकामासाठी जवळपास १२०० कोटी रुपयांचा खर्च आला आहे. येथील लोकसभा सभागृहात ८८८ आसन क्षमता असून राज्यसभेत ३३६ आसन क्षमता आहे. येत्या काळात परिसीमनामुळे सदस्य संख्या वाढण्याची शक्यता लक्षात घेता ही आसन क्षमता वाढविण्यात आली आहे. सद्या लोकसभेची सदस्य संख्या ५५२ तर राज्यसभेची सदस्य संख्या  २५० (238 + राष्ट्रपतींद्वारा निवडण्यात येणारे १२ सदस्य) आहे. नवीन संसदेला ज्ञानद्वार,शक्ती द्वार आणि कर्मद्वार असे मुख्य तीन द्वार आहेत. ही इमारत भूकंप रोधी असून संसद सदस्यांना अत्याधुनिक तंत्रज्ञानआधारीत सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

     या वास्तूमध्ये वारसा तसेच स्थापत्य, कला, कौशल्य, संस्कृती तसेच संविधानाचे स्वरही आहेत. लोकसभेत राष्ट्रीय पक्षी ‘मोर’ तर राज्यसभेत राष्ट्रीय फूल ‘कमळा’वर आधारित संकल्पनेवर अंतर्गत सजावट केली आहे. संसदेच्या आवारात ‘वटवृक्ष’ हा आपला राष्ट्रीय वृक्ष आहे. नवीन इमारतीमध्ये देशाच्या विविध भागांतील वैशिष्ट्यांचा अंतर्भाव केला आहे. राजस्थानमधील ग्रॅनाइट, महाराष्ट्रातील लाकूड आणि भधोई कारागिरांनी तयार केलेल्या गालिच्याचा वापर सजावटीसाठी करण्यात आला आहे.

ही वास्तू उभारताना 60,000 श्रमिकांना रोजगार मिळाला. त्यांनी दिलेल्या योगदानावर प्रकाश टाकणारी नवीन गॅलरी या सभागृहात उभारण्यात आली आहे. टाटा उद्योग समुहातील टाटा प्रोजेक्ट लिमिटेड कंपनीने संसदेची नवीन इमारत बांधली आहे. गुजरातमधील ऑर्कीटेक्चर फर्म ‘एचसीपी’ ने  या इमारतीचे डिजाईन केले आहे. बिमल पटेल हे या इमारतीचे मुख्य वास्तुविशारद आहेत.

एकंदरितच देशाच्या संसदेची नवीन इमारत उभारली गेली  आहे. १७ व्या लोकसभेचे या वास्तुतीतील पहिले वहिले पावसाळी/ हिवाळी अधिवेशन आणि अर्ध अर्थसंकल्पीय अधिवेशन पार पडेल. १८व्या लोकसभेच्या सदस्यांसाठी व राज्यसभेच्या नव्या अधिवेशनासाठी २०२४ मध्ये ही वास्तू वाट पाहणार आहे. नव्या भारताच्या नव्या अपेक्षांचीपूर्ती या वास्तुतून पूर्ण व्हावी एवढीच अपेक्षा देशातील १४२ कोटी जनतेची असणार आहे.

                                           00000 

Wednesday, May 17, 2023

असा हा बृहन्महाराष्ट्र माझा



जुना लेख (वर्ष अंदाजे २०१४-१५)

महाराष्ट्र राज्य विविध क्षेत्रांमध्ये देशात अग्रगण्य मान मिळवीत आहे. महाराष्ट्राबाहेर देशभरातील विविध राज्यांमध्ये वास्तव्यास असणारे मराठी माणस राज्याचा हा मान सन्मानाने उंचवीत आहेत. महाराष्ट्राबाहेरील महाराष्ट्र अर्थात बृहन्महाराष्ट्र ही त्याची ओळख. नोकरी, व्यवसाय, उद्योग आदींसाठी देशातील अन्य राज्यांमध्ये महाराष्ट्रीयन जनता स्थायीक झाली. मराठी कला, संस्कृती जपण्यासाठी त्यांनी त्या-त्या राज्यांमध्ये मराठी संस्था स्थापन केल्या. आपला मराठी बाणा, मायबोली आणि सांस्कृतिक वारसा परप्रांतात टिकवून ठेवणा-या या संस्थांनी महाराष्ट्रातून येणा-या जनतेसाठी राहण्याची सोयही उपलब्ध करून दिली. बृहन्महाराष्ट्र मंडळ ही  देशभरांत कार्यरत सुमारे एकहजरांहून अधिक बृहन्महाराष्ट्र संस्थांची शिखर संस्था. मराठी सण, उत्सव साजरे करत राज्याची कला, संस्कृती व पंरपरा जपण्याचे  व  तिचा विस्तार करण्याचे महनीय काम  या संस्थांनी समर्थपणे केले आहे. या संस्थाच्या कामांची दखल घेत महाराष्ट्र शासनाच्या वतीने या संस्थाना वेळोवेळी आर्थिक मदत देण्यात आली आहे.

        देशभरात जवळपास प्रत्येक राज्यांमध्येच अशी मराठी मंडळ असून त्यांची वार्षीक अधिवेशनही होतात. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे या बृहन्महाराष्ट्र मंडळांचे पदसिध्द अध्यक्ष असतात त्यामुळे या अधिवेशनाला बहुतेक वेळा राज्याच्या मुख्यमंत्री महोदयांनी उपस्थितीती लावली आहे. महाराष्ट्रा बाहेर अन्य राज्यांमध्ये आयोजित करण्यात येणा-या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, नाटय संमेलन यांच्यासह अन्य महत्वपूर्ण आयोजनातही या संस्थांचा मोलाचा सहभाग असतो .

                                       एक नजर इतिहासावर

सतराव्या-अठराव्या शतकात मराठयांचे राज्य संपूर्ण भारत भर परसले होते. श्री. शहाजी महाराजांनी दक्षिणेकडे चढाई केली आजचे म्हैसूर त्यावेळी मराठयांनी जिंकले होते. त्यामुळे या संस्थानचे बरेच दिवाण मराठी भाषिक होते. राघोबा दादांनी उत्तरेकडे अटकेपार मराठी सत्तेचा झेंडा रोवला तर नागपूरच्या भोसल्यांनी बिहार, ओरिसा, बंगालकडे स्वा-या करून मराठी राज्याच्या कक्षा रूंदावल्या. त्यामुळे ग्वाल्हेर, बडोदे, इंदूर, देवास, धार इ. त्यावेळच्या मराठी राज्यांत मराठी माणसे मोठया प्रमाणावर स्थायिक झाले. पानीपतच्या दुस-या युध्दात मराठयांचा झालेला निसटता पराभाव आणि दिल्लीवर तख्त राखन्याची हुकलेली संधी ही सर्वज्ञात आहे. त्यावेळी महाराष्ट्रातून आलेले  आणि युध्दात वाचलेले मराठी सैन्यातील लोक याच भागात (हरियाणा) स्थायिक झाले. नंतरच्या शतकात ब्रिटीशांचे राज्य आले व उद्योग धंघ्यासाठी, नोकरी निमित्ताने मराठी माणसे पर प्रांतात जाऊ लागली. बघता बघता त्यांच्या कित्येक पिढयांचा जीवन काल तेथेच लोटला.  

महाराष्ट्राबाहेर  वास्तव्यास असणा-या या मराठी बांधवांनी संघटनेच्या माध्यमातून एकत्र येऊन काम करण्याचा निर्णय घेतला. त्यातून महाराष्ट्र समाज, महाराष्ट्र मंडळ अशा संस्था स्थापन झाल्या. १९ व्या शतकाच्या सुरूवातीला  टिमरनी, झाशी, ग्वाल्हेर, उज्जैयिनी,पाटण, इंदूर, बडौदे, अजमेर,रतलाम,सागर आदी ठिकाणी या संस्था स्थापन झाल्या होत्या. मराठी शाळा, ग्रंथालये, व्यायामशाळा सुरु करून तसेच मंदिरांची स्थापना करून भजन, किर्तन आणि प्रवचन यामाध्यमातून प्रबोधकार्य  सुरु झाले  व राज्याबाहेर मराठी बाणा जपण्याचे कार्य या संस्थानी जोमाने सुरु ठेवले. १९२६ पर्यंत बृहन्महाराष्ट्रात जवळपास ५० संस्था सुरू झाल्या होत्या.     

                         बृहन्महाराष्ट्र मंडळाची स्थापना

कानपूर येथे १९२५ मध्ये आयोजित काँग्रेस आणि हिंदुसभा यांच्या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर तात्यासाहेब केळकर यांनी  देशभरात कार्यरत तत्कालीन बृहन्महाराष्ट्रातील संस्थांना एकत्रित करून बृहन्महाराष्ट्र मंडळ ही  मध्यवर्ती केंद्रीय संस्था स्थापन केली. राजधानी दिल्ली मध्ये बृहन्महाराष्ट्र मंडळ कार्यरत आहे.

                   बृहन्महाराष्ट्र परिषदेचे अधिवेशन

बृहन्महाराष्ट्रात कार्यरत या संस्थाच्या कामात सूत्रबध्दता आणण्यासाठी बृहन्महाराष्ट्र मंडळाने अधिवेश भरविण्याचे ठरविले. बृहन्महाराष्ट्रातील संस्थांच्या समान उद्देशाबाबत चर्चा घडवून आणने, मराठी भाषा व संस्कृतीचे संवर्धन व विस्तार करणे आदी उद्देशाने १९२६ मध्ये झांशी(उत्तरप्रदेश) येथे बृहन्महाराष्ट्र परिषदेचे पहिले अधिवेशन भरले. तात्यासाहेब करंदीकर त्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते. येथूनच बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या कार्यास ख-या अर्थाने सुरुवात झाली. तात्यासाहेब करंदीकर यांनी  १९२५ ते १९४५ या कालावधित मंडळाचे अध्यक्षपद भुषविले. त्यानंतर १९४८ ते १९६५ पर्यंत काकासाहेब गाडगीळ यांनी मंडळाला नेतृत्व दिले. यानंतर महाराष्ट्राचे प्रथम मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी १९८० पर्यंत मंडळाचे अध्यक्षपद भुषविले. श्री. वसंत साठे यांनी १९८० ते १९९१ पर्यंत अध्यक्षपदाची जबाबदारी पार पाडली. मध्यंतरीच्या दोन वर्षाच्या काळात श्री. शरद पवार यांनी मंडळाच्या अध्यक्षपद सांभाळले. १९९३ ते १९९६ या कालावधित श्री. वसंत साठे पुन्हा मंडळाचे अध्यक्ष झाले.

        महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे बृहन्महाराष्ट्र मंडळाचे अध्यक्ष राहतील असा मंडळाच्या घटनेत बदल करण्यात आला. त्यानुसार श्री. मनोहर जोशी, श्री. विलासराव देशमुख,श्री. अशोकराव चव्हाण, श्री.पृथ्वीराज चव्हाण यांनी मंडळाचे अध्यक्षपद स्वीकारले. विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सध्या मंडळाचे अध्यक्ष आहेत.

        मंडळाची आतापर्यंत ६५  हून  अधिक  अखिल भारतीय स्वरूपाची अधिवेशने झाली आहेत. भारत देश पारतंत्र्यात असताना देशप्रेम जागविण्याचे कामही या अधिवेशनांनी केले. १९४० मध्ये कराची येथे अधिवेशन आयोजित करण्यात आले होते. देशातील विविध शहरांमध्ये ही अधिवेशने आयोजित करण्यात आली. महाराष्ट्रातील शहरांमध्येही अधिवेशन घेण्यात आली. थोर विचारवंत, शिक्षणतज्ज्ञ,समाजिक कार्यकर्ते, राजकीय नेते यांनी  अधिवेशनाची अध्यक्षता स्वीकारून मार्गदर्शन केले आहे.

                                                   प्रकाशने

विविध प्रकाशनांच्या माध्यमातून बृहन्महाराष्ट्रातील मराठी बांधवांना जोडण्याचे काम बृहन्महाराष्ट्र मंडळाने केले. सुरुवातीच्या काळात बृहन्महाराष्ट्र मासिक या नावाने नियतकालिक प्रकाशीत करण्यात येत असे. १९३५ पासून या नियतकालिकाचे नाव महाराष्ट्र विस्तारअसे करण्यात आले. १९६७ मध्ये रतलाम (मध्यप्रदेश)येथे आयोजित अधिवेशनात हे नाव बदलून मायमराठीकरण्यात आले. इंदूर येथील बृहन्महाराष्ट्र संस्थांनी या नियतकालिकाची व्यवस्थापकीय जबाबदारी स्वीकारली असून अश्विन खरे ये हा नियतकालीकाचे संपादक आहेत. बृहन्महाराष्ट्र मंडळाच्यावतीने बृहन्महाराष्ट्र संस्था परिचय सूची हे महत्वाचे प्रकाशन करण्यात येते. यात देशभरातील मराठी संस्थांची माहिती देण्यात आली असून आतापर्यंत या पुस्तिकेच्या ४ आवृत्या प्रकाशित झाल्या आहेत. सूर्यकांत कुळकर्णी यांनी पुस्तिका संपादित केल्या आहेत.

  

                                                 दिल्लीतील महाराष्ट्र

राजधानी दिल्लीत विविध मराठी संस्था आणि महाराष्ट्र शासनाच्या विभागांच्यावतीने राज्याची संस्कृती जपण्याचे काम प्रभावीपणे सुरु आहे.

        पहाडगंज स्थित दिल्ली महाराष्ट्रीय शैक्षणिक व सांस्कृतिक संस्थेला १९९२ पासून महाराष्ट्र राज्य नाटय स्पर्धेचे प्रादेशिक केंद्र म्हणून मान्यता देण्यात आली आहे. संस्थेच्या आरामबाग येथील नूतन मराठी शाळेतील सभागृहात या नाटय स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. बृहन्महाराष्ट्रातील विविध राज्यातील नाटय संस्था या स्पर्धेत सहभाग घेतात. स्पर्धेत निवड झालेल्या पहिल्या तिन नाटकांना महाराष्ट्र राज्य नाट स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश मिळतो. महाराष्ट्रीय शैक्षणिक व सांस्कृतिक संस्था ही १९७२ पासून नाटय व सुगम संगीत स्पर्धा, अखिल भारतीय गद्य व संगीत नाटय स्पर्धेचे आयोजन करीत आहे. या संस्थेच्यावतीने नूतन मराठी शाळा चालविण्यात येते. ५ वी ते १२ वी पर्यंत या शाळेत शिक्षण दिले जाते या शाळेत मराठी विषय अनिवार्य आहे.

        महाराष्ट्र स्नेह-संवर्धक समाज संस्थेच्या माध्यमातून गणेशोत्सव, दासनवमी, स्वातंत्र्यदिन कोजागिरी, संक्रांत आदी कार्यक्रम साजरे केले जातात. लोधी रोड स्थित वनिता समाजाच्या वतीने वर्ष भर विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. संस्थेच्यावतीने समाजातील गरीब मुलांसाठी ज्युनीअर व सिनीअर किंडर शाळा चालविण्यात येते. करोलबाग येथील फैज रोड स्थित मराठा मित्र मंडळाच्यावतीने वर्ष भर विविध सण उत्सव साजरे करण्यात येतात. झंडेवालान भागात संस्थेच्या वतीने चौगुले पब्लिक स्कुल चालविण्यात येते. ही इंग्लीश मेडीयमची शाळा असून या शाळेत पहीली ते बारावी पर्यंत शिक्षण दिले जाते इथे मराठी विषय अनिवार्य आहे. सार्वजनिक उत्सव समिती विविध दर्जेदार सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करते. गणेशोत्सव काळात समितीच्या वतीने महाराष्ट्र महोत्सव साजरा करण्यात येतो. लोकमान्य टिळक पुण्यतिथी, यशवंतराव चव्हाण स्मृति सामारोह , कोजागिरी पोर्णिमा आदी कार्यक्रमाचे आयोजन समितीच्या वतीने दरवर्षी करण्यात येते. याशिवाय करोलबाग स्थित राणी लक्ष्मी भगिनी समाज, जनकपुरी आणि लाजपतनगर स्थित महाराष्ट्र मित्र मंडळ, पुर्वांचल मित्र मंडळांच्या माध्यमातून वर्ष भर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. तसेच गणेशोत्सव काळात दिल्ली  व परिसरात जवळपास ३५ मराठी मंडळाच्या माध्यमातून गणेशोत्सव साजरा करण्यात येतो.

        महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या महाराष्ट्र परिचय केंद्र या कार्यालयाच्यावतीनेही मराठी भाषा व संस्कृती जपण्याचे काम प्रभावीपणे केले जाते. पत्रकार दिन, मराठी भाषा दिन, ग्रंथोत्सव, महाराष्ट्र दिनाचे आयोजन परिचय केंद्राच्यावतीने करण्यात येते. महान व्यक्तींची जयंतीचे वर्षभर साजरी करण्यात येते. महाराष्ट्रातील विविध लेखक, साहित्यिक, प्रशासकीय अधिकारी, लोकप्रतिनिधी यांच्याशी जनतेचा थेट संवाद घडवून आणण्यासाठी परिचय केंद्राच्यावतीने आयोन करण्यात येते. जनसंपर्क, वृत्त व माहिती असा मोठा डोलारा कार्यालयाच्यावतीने सांभाळला जातो. पुस्तकांचे नैमित्तिक प्रकाशन करण्यात येते, दर दोन वर्षांनी कार्यालयाच्यावतीने प्रकाशित करण्यात येणारी दिल्ली डायरी ही विविध माहितींनी परिपूर्ण पुस्तिका विशेष प्रसिध्द आहे. परिचय केंद्राचे सुसज्ज असे ग्रंथालय असून दिल्लीतील मराठी जन तसेच स्पर्धा परिक्षेचा अभ्यास करणारे विद्यार्थी या ग्रंथालयाचा लाभ घेतात.

                          बृहन्महाराष्ट्रातील महात्वाच्या संस्थाचे पत्ते

 

बृहन्महाराष्ट्र भवन,

(दिल्ली महाराष्ट्रीय समाज बिल्डिंग ट्रस्ट) पहाडगंज पोलिस स्टेशन जवळ, नवी दिल्ली- ११००५५.

दूरघ्वनी : ०११-२३६७९००८/२३६७०५२०

वनिता समाज,

१३ इन्स्टिटयूशनल एरीया, लोदी रोड, साईबाबा मंदीर जवळ, नवी दिल्ली-११०००३.

दूरध्वनी :

सार्वजनिक उत्सव समिती,

यु-१७,ग्रीन पार्क एक्सटेंशन, नवी दिल्ली-११००१६

दूरध्वनी: ०११-२६१६७४०१, भ्रमणध्वनी ०९८९९८६२१११

महाराष्ट्र परिचय केंद्र,

ए-८, स्टेट एम्पोरिया बिल्डींग, बाबा खडक सिंह मार्ग,नवी दिल्ली-११०००१.

दूरध्वनी : ०११-२३३६३७७३/ २३३६७८३०

महाराष्ट्र मित्र मंडळ, जनकपुरी, शिवनगर परिसर,सी-२बी, पॉकेट १२, जनकपुरी, नवी दिल्ली-११००५८.

०११-६४६२२२८०

(हरियाणा)

महाराष्ट्र मंडळ,गीता मंदीर, १०७७, सेक्टर-२९, फरीदाबाद-१२१००१

भ्रमणध्वनी : ९९५८८७७६८८

(हिमाचल प्रदेश)

महाराष्ट्र मंडळ,

९१, पंथाघाटी देवांजलीआयुर्वेदिक डिसपेंसरी जवळ, कसम्पटी, शिमला-१७१००९.

दूरध्वनी : ०१७७-२६२०८०८

(पंजाब)

महाराष्ट्र मंडळ, प्लॉट नं.२४७ सेक्टर १९ डी, चंडीगढ-१६००११

 

(उत्तरप्रदेश)

महाराष्ट्र समाज ८४/१६६ कटरा मकबूलगंज, लखनऊ-२२६०१८.

दूरध्वनी -०५२२-६५३४९१९, भ्रमणध्वनी ०८००९०६७१७३ (व्यवस्थापक , सदानंद जोग)

(उत्तरप्रदेश)

काशी महाराष्ट्र सेवा समिती, सी.के. २/४८, नीळकंठ स्मृति भवन, वाराणसी-२२१००१.

भ्रमणध्वनी: ०९३३५६४१२६७(अध्यक्ष-माधव रटाटे)

(उत्तर प्रदेश)

टिळक स्मारक भवन, ऑफ जी.टी.रोड, अलोपीबाग, अलाहबाद-२११००६.

दूरध्वनी : ०५३२-२६६७४११

(उत्तराखंड)

महाराष्ट्र समाज कल्याण समिती, मंगलायतन, ४४/३, कनाल रोड, जाखन , डेहरादून-२४८००९.

भ्रमणध्वनी: ०९७५९३४८५६४

(मध्यप्रदेश)

श्री. समर्थ सेवा मंडळ, नरहरी छायाएल.आय.जी.१७७ कोटरा, सुल्तानाबाद, भोपाळ-४६२००३.

दूरध्वनी:०७५५-२७६२९५०

(मध्यप्रदेश)

गाडगीळ वाडी, मेन हिंदी शाळे समोर, हाटकेश्वर वार्ड, खंडवा-४५०००१.

दूरध्वनी:०७३३-२२४९१११

(मध्यप्रदेश)

लोहामंडी स्कूलच्या बाजूला, ३१, पंचशील नगर(स्नेहनगर), इंदौर-४५२००.

 

दूरघ्वनी: ०७३१-२४४६१३२

 

 

रितेश मोतीरामजी भुयार

उपसंपादक,

महाराष्ट्र परिचय केंद्र, नवी दिल्ली



 

Thursday, May 11, 2023

सर्वोच्च न्यायालयातील केस पेंडंसी कमी करणारे सरन्यायाधिश न्या.अहमदी


 



भारताचे २६ वे सरन्यायाधिश न्या. मु.अ.अहमदी यांचे २३ मार्च २०२३ रोजी निधन झाले. आज (11 मे २०२३ रोजी) सर्वोच्च न्यायालयात त्यांच्या स्मरणार्थ शोकसभा आयोजित करण्यात आली. या शोकसभेत सरन्यायाधिश डी.वाय.चंद्रचुड यांच्यासह सर्वोच्च न्यायालयाच्या  दोन न्यायाधिशांनी न्या.अहमदी यांच्या कतृत्वावर प्रकाश टाकला. त्यातील मला भावलेले व आकलन झालेले  मुद्दे येथे रेखाटत आहे.

गुजरातच्या अहमदाबाद शहरात दाऊदी बोहरा कुंटुबात अजिज मुस्सबर अहमदी यांचा जन्म झाला. वडीलही कायदेतज्ज्ञ असल्याने घरातूनच त्यांना  वारसा लाभला होता. न्या. मोहम्मद हिदायतुल्ला (भारताचे ११वे सरन्यारयाधिश) यांच्या नंतर 1994 मध्ये ते भारताचे दुसरे मुस्लीम सरन्यायानिध झाले. सर्वोच्च न्यायालयात केसेस पेंडंसी कमी करण्यासाठी  आणि येथील कामकाजात संगणकाचा पूरेपूर वापर करण्यासाठी त्यांची तीन वर्षांची प्रशासकीय कारकिर्द गाजली. भोपाळ गॅस दुर्घनेतील त्यांच्या निकालासह, संजय दत्त यांच्या टाडा कायद्याअंतर्गत खटल्यातील जामीनासह  अडिच  हजारांवर निर्णय त्यांनी दिले.

सर्वोच्च न्यायालयातील केस पेंडंसी कमी करण्यासाठी त्यांनी अवलंबलेली व यशस्वी करून दाखविलेल्या पद्धतीबाबत मार्गदर्शन करण्याकरिता त्यांना इंग्लडच्या सर्वोच्च न्यायालयात पाचरण करण्यात आले होते. हा भारतीय न्याय प्रणालीचा मोठा सन्मानच ठरला. सरन्यायाधिशपदाच्या कार्यकाळात त्यांची प्रशासकीय कारकिर्द ही न्याय प्रणालीत संगणकाच्या प्रयोगाच्या आग्रहामुळे मैलाचा दगळ ठरली. त्यांनी न्याय प्रणालीत संगणकाचा उपयोग केवळ ३ टक्केच होत असल्याचे दाखवून दिले व संगणक वापराचा टक्का मोठया प्रमाणात वाढवला.  

सरन्यायाधिशाव्यतिरीक्त न्या.अहमदी यांचं व्यक्तीमत्व कुटुंबवत्सल होत. महत्वाचे निर्णय देवून आपल्या कार्याचा ठसा उमटविणारे अहमदी यांना त्यांची पत्नी अमिना खूप प्रसंगात  महत्वाचा सल्ला देत असे व मार्गदर्शन करीत असे त्यांच्या चिरंजीवानेच अधोरेखित केले आहे. तर मुलीने सांगितले आहे की कामकाजाचा व्याप आटोपून रात्री ९ वाजता अहमदी हे आम्हा मुलांसोबत टेनिस खेळत आणि आयुष्य व कायदा याचेचे विविध बारकावे समजावून सांगत. व्यवसायाला सर्वोपरी माननारे अहमदी यांचे एकतत्व होते, वडिलांच्या कार्यकाळात मुलाने सर्वोच्च न्यायालयात कार्यभार सांभाळू नये . याचा त्यांनी अंगिकार केला व आपल्या मुलास त्यांच्या कार्यकाळात सर्वोच्च्‍ा न्यायालयात कार्यकरण्यास नाकारले.

राज्यघटना, कायदा यांचा सखोल अभ्यास असणारे न्या. अहमदी यांनी आपल्या नि:पक्षपाती  निर्णयाने भारतदेशाच्या न्याय प्रणालीत अभूतपूर्व योगदान दिले आहे. न्या.अहमदी यांच्या कार्याला मानाचा मुजरा.

                                                 ०००००

 


द केरला स्टोरी : स्वैर समीक्षण




 सिरीया, यमन, इराण आणि अफागाणिस्तानच्या युद्धजन्य भागात कार्यरत आंतरराष्ट्रीय शांतता समुहाच्या एका शिबिरात लष्कराचे अधिकारी एका महिला कैद्याची चौकशी करत असलेला पहिला-वहिला सिन पडद्यावर झळकतो. चौकशी  अधिकारी  नाव  विचारताच ती सांगते, ‘सर मेरा नाम शालिनी उन्नीकृष्णन, भारत के केरला राज्य से हू’. प्रतिप्रश्न येतो, ‘रेकॉर्ड के अनुसार आप  सिरीया  की  नागरिक  हो और आपका नाम  फातिमा है’ यह आपको  कबुल है?, त्यावर शालिनी सांगते, ‘नही  मुझे  फसां कर यहां लाया गया है।’.

 केरळमधील भारतीय नर्सिंग महाविद्यालयात शिक्षण घेण्याकरिता आलेल्या या राज्याच्या वेगवेगळया भागातील  शालीनी आणि तिच्या रूममेट ‘गितांजली’ आणि ‘निमा’ ला आयएसआएस या दहशतवादी संघटनेच्या स्थानिक गटाकडून जाळयात अडकवण्यापासून सिरीयापर्यंतचा शालिनीचा प्रवास चित्रपटात रेखाटण्यात आला आहे. वास्तवघटनेवर आधारित हा चित्रपट असून पिडीत महिलांची कहाणी  या चित्रपटात मांडण्यात आल्याचा दावा आहे. चित्रीकरण,संगीत, गिते(मल्याळम भाषेतील हिंदी सबटायटलसह) आणि दमदार अभिनयाने हा चित्रपट प्रेक्षकांना खिळवून ठेवतो व आपल्याच देशातील एक  सामाजिक समस्या  ठसठसितपणे  मांडतो. चित्रपटातील मल्याळम टोन मिश्रीत हिंदी भाषेतील संवाद ही एक जमेची बाब दिसून येते.

हा संपूर्ण चित्रपट म्हणजे शालीनीची फ्लॅशबॅक स्टोरी होय. एका केरळी  हिंदू परिवारात वाढलेल्या शालीनीचे पितृछत्र हरवले आहे. आजी आणि आईला शालीनी उच्च शिक्षणासाठी घर सोडून मोठया शहरात जात असल्याने काळजी वजा भिती आहे. भारतीय नर्सिंग महाविद्यालयात प्रवेश आणि येथील वसतीगृहात कॉम्रेड वडिलांची  ‘गितांजली’  ही  लेक आणि  ख्रिश्चन  परंपरा  ठासून  माननारी  ‘निमा’ ही शालीनीच्या रूम मेट आहेत. चौथी रूममेट ही  ‘असिफा बा’ इस्लाम धर्म माननारी आणि आयएसआयएसची भारतातील स्थानिक एंजटही. असिफाच या तिन्ही मैत्रिणींचा ब्रेनवॉश करून त्यांना इस्लाम धर्म चांगला व त्यांचे स्वत:चे धर्म, त्यांचे कुटुंबिय वाईट असल्याचे विचार मेंदूत ठसवते. चित्रपट पुढे सरकत जातो तसा असिफाच्या चालीचाच एक भाग म्हणून  शालीनी व गितांजलीच्या आयुष्यात बॉयफ्रेंड व कॅप्टेननावाचा झिंग आणणारा मादक पदार्थ प्रवेश करतो. शालीनीला अशातच बॉयफ्रेंडकडून गर्भधारणा होते. हिंदू धर्माच्या मुलीसोबत मुस्लिम मुलगा कसा लग्न करणार? हा शालीनीच्या बॉयफ्रेंडचा सुनियोजित प्रश्न व त्यास असिफाकडून तेवढाच धर्मपरिवर्तनाचा सुनियोजित सल्ला दिला जातो. आपल्या प्रेमाची निशानी म्हणून पोटातील बाळासाठी शालीनी धर्मपरिवर्तनास तयार होते व त्या विधीही पार पाडते. लग्नानंतर बॉयफ्रेंड सोडून जातो मग पोटातील मुलाला बाप कोण? हा यक्ष प्रश्न पुन्हा शालीनी समोर उभा राहतो. मौलवीचा त्यावर तोडगा असतो की, धर्मपरिवर्तन केल्यामुळे तू घरापासून मुकलीस आणि बॉयफ्रेंडही सोडून गेला तेव्हा दुसरे लग्न मुस्लीम मुलासोबतच करणे हा पर्याय पुढे येतो. कात्रित सापडलेली शालीनी म्हणजे धर्मपरिवर्तना नंतरची ‘फातिमा’ हा पर्याय स्वीकारून पुढे जायचा निर्णय घेते. तोपर्यंत तिची रूममेट गितांजलीला आपण आयएसआयएसच्या जाळयात फसत असल्याची प्रचिती येताच ती मुस्लिम बॉयफ्रेंडला लग्नास आणि सिरीयात जाण्यास नकार देते. तिचा नकार म्हणजे आयएसआयएसला चॅलेंज असल्याचे माणून तिचा माथेफेरु बॉयफ्रेंड तिचे अश्लिल व्हिडीयो व्हायरल करते.ही बदनामी सहन न करू शकलेली गितांजली घरातच गळफास लावून घेत आयुष्य संपवते. निमा तर इस्लामला मानण्यास नकार देते म्हणून तिला ड्रिंक्समध्ये औषध घालून तिच्यावर सातत्याने बलात्कार करून बदला घेण्याचा किळसवाणा प्रकारही आयएसआयएसच्या स्थानिक रॅकेटकडून घडतो.

तोपर्यंत शालिनीच्या आयुष्याचा गुंता अधिकच अवघड होवून बसतो. पोटातील बाळाला जन्‍म देवून आपला सुखी संसार  थाटण्यासाठी पर्यायाने इस्लामच्या मार्गावर चालण्यासाठी भारतसोडून शालीनी सिरीयामध्ये येते. इथे स्थिती अजूनही भयावह असते. आयएसआयएसची मंडळी या बायकांना घरात डांबून ठेवतात. घरी बायकांचा भोग घेवून जिहादची लढाई लढण्यासाठी बायकांना महिनोन महिने वाऱ्यावर सोडण्याचा हा हिडीस प्रकार शालीनीच्या आयुष्याचा भाग होतो. आणि येथूनच तिला आपल्या हातून घडलेली चूक लक्षात येते. आपल्या मायदेशी परत जाण्याची  ठिणगी  तिच्यात पेटते. पण , दहशतवादाच्या अड्डयात पदोपदी मरणाचा धोका असताना संघर्षाचे शिवधनुष्य पेलून शालीनी सिरीयाची सीमा ओलांडते. सिमेवर बेशुध्दावस्थेत पडलेल्या शालीनीला आंतरराष्ट्रीय शांतता समुहाच्या शिबिरात आणल जात आणि  तिला लष्कराच्या चौकशीस सामोर जाव लागत. या चौकशीतूनच केरला स्टोरी अख्ख्या जगासमोर येते.

 केरला स्टोरी हा विषय गुन्ह्याच्या परिभाषेत  हयुमन ट्राफिकींग ठरतो. केरळ मध्ये दरवर्षी ३० हजार मुली बेपत्ता होतात हा विषयही या चित्रपटात येतो. या समस्सेला आळा घालण्यासाठी देशात स्वतंत्र यंत्रणा कार्यरत आहे. हा चित्रपट यंत्रणांच्या अक्षमतेवर बोट ठेवतो. चित्रपटात आयएसआयएस या दहशतवादी संघटनेच्या कुकृत्याचा परदाफाश करताना संबंधित धर्माचा आधार घेतला आहे. आणि केरळमध्ये काही ठिकाणी शरीया कायदा अंमलात असल्याचेही मांडतो. चित्रपट या माध्यमाची मर्यादा आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्यानावार दिग्दर्शकाने साधलेला कमर्शीयल हेतूही नाकरता येत नाही. काही राज्यात या चित्रपटावर बंदी आणि काही राज्यात हा चित्रपट टॅक्स फ्री होतो, म्हणजे राजकीय फायदा तोटाही यात दडला आहे. चित्रपट निर्मितीच्यावेळी हा विषय डोळयासमोर ठेवूनही नियोजन झाल्याचे नाकारता येत नाही. यापूर्वीचा इतिहास बघता भारतात काही विषय घेवून प्रदर्शीत होणाऱ्या चित्रपटांचा टायमिंगही महत्वाचा ठरतो. या चित्रपटानेही हा टायमिंग तर नाहीना साधला ही शंकाही पुढे येते. 

सरतेशेवटी या चित्रपटाने भारतीय समाजातील बदलत्या काळानुसार समोर येत असलेली समस्या मांडण्याचा प्रयत्न केला आहे.पण, मनोरंजन आणि शिक्षण हाच या चित्रपटाचा उद्देश समजून धर्मिक तेढ निर्माण होणार नाही याची काळजीच प्रेक्षकांनी मोठया मनाने घेण्याची गरज असल्याचेही हा चित्रपट अधोरेखित करतो. 

                                          000000

 

 

 


 

Thursday, March 30, 2023

टाकरखेडा-संभू येथील राम नवमी उत्सव सुंदर आठवण





ज-काल आपल्या अवतीभवती लिहावं असं खूप आहे. मात्र, ते लिहिण्यासाठी आतून प्रेरित व्हावं असं फार कमी घडतं. ही बाब अधिक स्पष्ट करण्यासाठी रामनवमी निमित्त टाकरखेडा-संभू येथील राम मंदिराला दिलेली भेट हे ठसठशीत उदाहरणच ठरेल. अमरावती शहरापासून परतवाडा रस्त्यावर आष्टी फाट्याहून थोड पुढे ( आत जवळपास ४ कि.मी. अंतरावर) हे गाव आहे (अमरावती पासून २२ कि.मी. अंतर).आमचे सन्मित्र श्री. दिनेश बकाले यांच्यामुळे या मंदिराला भेट देण्याचा व दर्शनाचा योग आला. मंदिरात प्रवेश करताच येथील राम, लक्ष्मण आणि जानकी अर्थात सीता यांच्या  संगमरवरी दगडातील लोभस व सुंदर आखीव व रेखीव मुर्त्या बघून प्रथमतः चित्त प्रसन्न होत. मंदिराचा गाभारा सागवान लाकडाचा. अगदी सुंदर नक्षीकाम केलेला. त्यावर एक गच्चीसदृश्य माळा. हे सर्व बघून आमच्या अचलपूर शहरातील सुलतानपुरा येथील दत्त मंदिराची अर्थात चखाभूलीच्या मंदिराचीच आठवण झाली. चखाभुली मंदिराची डिट्टो कॉपी ठराव एवढं हे मंदिर सेम टू सेम. बरं, टाकरखेडा-संभू हे गाव म्हणजे आमचे प्रिय दादा श्री. संदीप गणगणे, श्री. सचिन गणगणे आणि सौ.वर्षाताई गणगणे-दहीकर यांचं आजोळ. याचंही लगेच स्मरण झालं. एकदम मनात विचार आला या भावंडही या मंदिरात आपल्या बालपणीचे सुंदर क्षण जगले असतील. म्हणून लगेच फोटो काढून ते आमच्या  ‘नातेसंबंध’ या व्हाट्सअप ग्रुप वरही शेअर केले. आणि यात तिघाही भावंडांना फोटोतील हे मंदिर ओळखण्याची विनंती केली. त्यांनीही तितक्याच  तत्परतेने सकारात्मक उत्तर दिले. तेव्हा या गोष्टीवरील विश्वास अधिक घट्ट झाला की, आपण ज्या वास्तू, शहर व गावात काही अनमोल क्षण घालवलेले असतात ते आपण आयुष्याच्या कुठल्याही वळणावर आठवणीच्या कुप्पीत जपून ठेवलेले असतात.

  गावातील तरुणांच ‘राममंदिर’ व ‘रामनवमीउत्सवाचं’ प्रेम

             मंदिरात निवांत बसलो असता चार तरुण मुलं तिथे आले. त्यांचा संवाद आपसूक कानावर पडत होता. त्यांनी या उत्सवासाठी नागपूर, पुणे, मुंबईतील शिक्षण व नौकरी निमित्ताने हलवलेला तळ आता टाकरखेडा-संभू या आपल्या गावी ठोकला होता. या मुला- मुलींनीनी मंदिरावरील रात्रीची विद्युत रोषणाई आणि उत्तम- उत्तम फोटो आणि व्हिडिओ यांची सोशल मीडियावर रील, स्टेटस व अन्य माध्यमातून केलेली प्रसिद्धी ते आपसात शेअर करत होते. आधुनिक काळातही तरुणांना आपलं गाव, आपले उत्सव, सण याविषयी असणारा जिव्हाळा पाहून एक सकारात्मक विश्वास दुणावला.


दानपेटी मुक्त आणि वाचनालय युक्त मंदिर

मंदिर परिसरातच भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. अब्दुल कलाम यांच्या नावाने वाचनालय आहे. वाचनालयाचा फलक बघून खरोखर मंदिरातून अशी वाचनालये निर्माण होत राहिल्यास या वास्तुंचा खरा सदुपयोग होईल हा कित्येक  वर्षांपासूनचा माझ्या मनातला विचार प्रत्यक्ष मूर्त स्वरूप घेतानाचं चित्र मनाला खूपच भावलं. इथेच दुसरं फलक होता 'मंदिरात दानपेटी नाही आणि ( between the line- कोणाला दान देण्याची बळजबरीही नाही) दान द्यावयाचे असल्यास स्वखुशीने पावती फाडावी' .मंदिरातील दानपेटी हा विषय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी आपल्या भजनातून जनतेच्या गळी उतरवण्याचा प्रयत्न केला 'मनी नाही भाव, म्हणे देवा मला पाव, देव बाजारचा भाजीपाला नाही रे....' या प्रसिद्ध भजनातच काय तो सार आपणा सर्वांना कळेल.  'देवाला पैसे दान करून, सोनं वाहून आपण मोठे होतो की देव!' हे एक मला नेहमीच पडलेल कोडं सुटायच्यादिशेने दानपेटी विरहित मंदिर हे एक आश्वासक पाऊल ठरेल.

सप्ताहानिमित्ताने स्तुत्य उपक्रमांचे आयोजन

 

गावोगावी हरिनामसप्ताह होतात. पण टाकरखेडा संभूचा रामनवमी सप्ताह काही औरच भासला. कार्यक्रम पत्रिकेत विषय होते 'शेतकऱ्यांना मार्गदर्शन, आदर्श गावच्या सरपंचाचे (जिल्हा संभाजीनगर ( जुने औरंगाबाद)) मार्गदर्शन, नेत्र तपासणी शिबिर. आणि या सप्ताहाचे काल्याचे किर्तन माझे सन्मित्र आणि एका शिबिरात आम्ही शिकलेले विद्यार्थी दर्यापूर येथील ह.भ.प. सागर महाराज परिहार यांचं नाव वाचून तर या सर्व सकारात्मक ऊर्जेचा कळसच गाठल्याचा सुखद अनुभव शिदोरी रुपात घेवून आम्ही या गावाचा निरोप घेला.

 

                                                                          ००००००




Friday, February 24, 2023

नागपुरी बोलीचा प्रत्यक्ष परिचय होताना


 

शनिवारी सकाळी माझी ऑफिसकडे जायची वेळ. रस्त्याने दोन कामकरी महिलांचा संवाद कानावर पडला. ‘लय बुव्हारा हा बई शनिवार,सामोरच्या आफिसात एक माणूस भी नाई रात ना जी’. पुढे सिटीबस मधील प्रवासात महिला कंटक्टरचा एका मुलीवर शब्दप्रहार ‘भयताळवाणाची पोट्टी, जराय नय समजत इले’. ऑटोने प्रवास करताना एका  महिलेचा मोबाईलवर  सुरू असलेला संवाद व त्यातील कानावर पडलेले काही अनकट शब्द असे, "लता मंगेशकरात  गेलतो(बर्डी येथे स्थित लता मंगेशकर चॅरिटेबल ट्रस्टचे इस्पीतळ)(पुरुष वाचक संबोधन, गेलतो)).....कास्ट काढाची हाय (कास्ट सर्टिफिकेट काढायचे आहे).... २ हजार रूपये पाटविन (पाठविन एवजी)...फोन काटून लाव.... सुंतीचा हात कसा हाय , आता?... टाके तोडलेन का ?.... माई पोट्टी बडी हुशार हाय .... सोड मनल १७ काम अन चल मनल त्याले" ही तीन केवळ प्रातिनिधीक उदाहरण दिली. या शहरातील वास्तव्यात दररोज कानावर पडणाऱ्या शब्दांमध्ये च्यलनबे,च्यालाका,होना जी,सामोर, म्हणल व्हत ना ...... हे शब्द थोडयाफार फरकाने नित्याचेच.

 

     हे सर्व शब्‍द म्हणजे येथील नागपुरी बोलीचा ठेवा म्हणता येईल. या निमित्ताने नुकतेच वर्धा येथे पार पडलेल्या ९६व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात ‘विदर्भातील बोली भाषा’ विषयावरील परिसंवादातील तज्ज्ञांनी मांडेल्या विचारांचा झिस्ट देणारी माझी बातमी शेअर करीत आहे. या परिसंवादात प्रकाश एदलाबादकर यांनी बोली हीच भाषेची आई असल्याचे निरीक्षण मांडले.त्यांनी नागपुरी बोलीचे विविधांगी रूप उलगडून सांगितले. नागपूरमध्ये बोलली जाणारी ही भाषा समाजातील उच्च ते निम्न अशा सर्वच वर्गात बोलली जाते. ग. त्र्य. माडखोलकर, दोडके यांनी नागपुरी भाषेत केलेल्या संशोधन कार्याचाही त्यांनी आढावा घेतला.

 वऱ्हाडी , झाडी व नागपुरी आदि विदर्भातील बोलींनी मराठी भाषेच्या सौदर्यांत भर घातली व भाषा विज्ञानात मोलाचे योगदान दिले आहे. मात्र, न्यूनगंडापोटी  या  बोलींचा वापर कमी झाला आहे. विदर्भातील कोरकू बोली तर विलुप्त होण्याच्या मार्गावर आहे, असे निरिक्षण ३ फेब्रुवारी २०२३ रोजी साहित्य संमेलनात साहित्यिकांनी मांडले. तर प्रमाण भाषेचा आग्रह सोडून स्वत:च्या बोलीचा न्यूनगंड न बाळगता प्रभावी वापर व्हावा. 'बोली अकादमी' स्थापन व्हावी ,'आदिवासी बोलींचे कोश' निर्माण  व्हावे, असा आश्वासक सूर ‘विदर्भातील बोली-भाषा विषयावरिल परिसंवादात निघाला.

 

                 ९६ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या पहिल्याचं दिवशी आयोजित या परिसंवादाचे अध्यक्षस्थान प्रसिद्ध साहित्यिक डॉ.सतीश तराळ यांनी भूषविले. डॉ. मनोहर नरांजे, डॉ.श्याम मोहकर,डॉ. पुरुषोत्तम माळोदे आणि प्रकाश एदलाबादकर या भाषा अभ्यासकांनी परिसंवादात सहभाग घेतला.

 

          डॉ. तराळ यांनी  परिसंवादातील सहभागी वक्त्यांच्या विचारांचा सार काढून विचार मांडले. विदर्भातील वऱ्हाडी ,झाडी या प्रमुख बोली असून नागपुरी,गोंडी,कोरकु,माडिया आदि बोलीही या भागात बोलल्या जातात. प्रमाण भाषेच्या अवाजवी आग्रहामुळे आणि न्यूनगंडामुळे या बोलींसमोर मोठे आवाहन उभे राहिले आहे.विदर्भातील कोरकू बोली सद्या विलुप्त होण्याच्या मार्गावर असल्याचे निरीक्षण त्यांनी मांडले. स्वत:च्या बोलीचा न्यूनगंड न बाळगता या बोलींचा प्रभावी वापर व्हावा.तसेच, बोलींच्या विकासासाठी व त्यांच्या साहित्यिक समृद्धतेसाठी  बोली अकादमी स्थापन व्हावी  आणि आदिवासी बोलींचे कोश निर्माण व्हावे अशा सूचनाही त्यांनी केल्या.

 

      डॉ.तराळ म्हणाले, जॉर्ज गियर्सन यांच्या ‘लिंग्वेस्टीक सर्व्हे ऑफ इंडिया’ या ग्रंथात भारतात १७९ भाषा आणि ५४४ बोली आहेत असे म्हटले होते. पण, २००१ मध्ये झालेल्या भाषिक पाहणीत २२२ भाषा आणि २३४ बोली आहेत असे म्हटले होते.म्हणजे दरम्यानच्या काळात ५७ भाषा आणि ३१० बोली लुप्त झाल्या.संपूर्ण जगातच भाषा लुप्त होत आहेत मात्र, भाषा लुप्त होण्याचा वेग भारतात जास्त आहे. जागतिकीकरणाचा भाषेवर खूप जास्त परिणाम होत असतो.जागतिकीकरणाची भाषा हीच जगाची भाषा होते सद्या इंग्रजी ही जागतिकीकरणाची भाषा आहे. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने नेमलेल्या रंगनाथ पठारे समितीच्या अहवालात मराठीला २३०० वर्षाचा जुना इतिहास असल्याचे आणि या भाषेत ५२ बोली असल्याचे नमूद केले आहे.प्रत्यक्षात भाषा अभ्यासक मराठीच्या १५० बोली असल्याचे मानतात याचाच अर्थ मराठीतील १०० बोली लुप्त झाल्याचेही डॉ.तराळ यांनी सांगितले.

    

     डॉ. मनोहर नरांजे यांनी आपल्या संबोधनात वेण्णा आणि वर्धा या दोन नद्यांनी व्यापलेला पूर्व आणि पश्चिम विदर्भातील भूभाग आणि येथील मानव समुहांनी समृद्ध केलेल्या बोलीभाषांच्या भाषिक व्यवहारावर प्रकाश टाकला. विदर्भातील बोली या मराठी भाषेचा निर्झर झरा आहेत. वऱ्हाडी आणि झाडी बोलींनी विदर्भातील भाषिक व्यवहरात दिलेले योगदान महत्वाचे आहे. मराठी भाषेतील आद्य ग्रंथ 'लीळाचरित्र' आणि मराठीतील आद्य काव्यसंग्रह 'विवेक सिंधू' मध्ये वऱ्हाडी आणि झाडी बोली दिसून येतात असे निरीक्षण त्यांनी मांडले. चंद्रपूरचा राजा रामसिंह याने मराठी भाषेला राजभाषेचा दर्जा दिला होता, असेही त्यांनी सांगितले.

 

   डॉ. श्याम मोहरकर यांनी विदर्भातील बोरी, नागपुरी या बोलीभाषेतील स्वनिम, रुपिम या तांत्रिक भाषा परिमानांचा अन्य भाषांशी तुलनात्मक संबंध उलगडून दाखवला. या बोलिंमध्ये प्रामुख्याने प्रमाण भाषेतील वर्णांच्या उच्चाराशी आढळणारी भिन्नता त्यांनी 'च', 'ज' आणि 'झ' या वर्णांची उदाहरणे देवून पटवून दिली.

 

    डॉ. पुरुषोत्तम माळोदे यांनी विदर्भातील बोली भाषांनी या भागाला सांस्कृतिक पुढारलेपण मिळवून दिल्याचे सांगितले. डॉ. ना. गो. कालेलकर लिखित 'बोली आणि भाषा' या ग्रंथातील दाखले देत त्यांनी बोली विषयीचे गैर समज आणि वास्तव याबाबत भाष्य केले. भूप्रदेश व जाती नुसार विदर्भात बोलिंची निर्मिती झाल्याचे सांगत त्यांनी कोष्टी,हळबी, गोंडी, माडिया या बोलिंवर प्रकाश टाकला.

    

                                ०००००