Thursday, May 11, 2023

द केरला स्टोरी : स्वैर समीक्षण




 सिरीया, यमन, इराण आणि अफागाणिस्तानच्या युद्धजन्य भागात कार्यरत आंतरराष्ट्रीय शांतता समुहाच्या एका शिबिरात लष्कराचे अधिकारी एका महिला कैद्याची चौकशी करत असलेला पहिला-वहिला सिन पडद्यावर झळकतो. चौकशी  अधिकारी  नाव  विचारताच ती सांगते, ‘सर मेरा नाम शालिनी उन्नीकृष्णन, भारत के केरला राज्य से हू’. प्रतिप्रश्न येतो, ‘रेकॉर्ड के अनुसार आप  सिरीया  की  नागरिक  हो और आपका नाम  फातिमा है’ यह आपको  कबुल है?, त्यावर शालिनी सांगते, ‘नही  मुझे  फसां कर यहां लाया गया है।’.

 केरळमधील भारतीय नर्सिंग महाविद्यालयात शिक्षण घेण्याकरिता आलेल्या या राज्याच्या वेगवेगळया भागातील  शालीनी आणि तिच्या रूममेट ‘गितांजली’ आणि ‘निमा’ ला आयएसआएस या दहशतवादी संघटनेच्या स्थानिक गटाकडून जाळयात अडकवण्यापासून सिरीयापर्यंतचा शालिनीचा प्रवास चित्रपटात रेखाटण्यात आला आहे. वास्तवघटनेवर आधारित हा चित्रपट असून पिडीत महिलांची कहाणी  या चित्रपटात मांडण्यात आल्याचा दावा आहे. चित्रीकरण,संगीत, गिते(मल्याळम भाषेतील हिंदी सबटायटलसह) आणि दमदार अभिनयाने हा चित्रपट प्रेक्षकांना खिळवून ठेवतो व आपल्याच देशातील एक  सामाजिक समस्या  ठसठसितपणे  मांडतो. चित्रपटातील मल्याळम टोन मिश्रीत हिंदी भाषेतील संवाद ही एक जमेची बाब दिसून येते.

हा संपूर्ण चित्रपट म्हणजे शालीनीची फ्लॅशबॅक स्टोरी होय. एका केरळी  हिंदू परिवारात वाढलेल्या शालीनीचे पितृछत्र हरवले आहे. आजी आणि आईला शालीनी उच्च शिक्षणासाठी घर सोडून मोठया शहरात जात असल्याने काळजी वजा भिती आहे. भारतीय नर्सिंग महाविद्यालयात प्रवेश आणि येथील वसतीगृहात कॉम्रेड वडिलांची  ‘गितांजली’  ही  लेक आणि  ख्रिश्चन  परंपरा  ठासून  माननारी  ‘निमा’ ही शालीनीच्या रूम मेट आहेत. चौथी रूममेट ही  ‘असिफा बा’ इस्लाम धर्म माननारी आणि आयएसआयएसची भारतातील स्थानिक एंजटही. असिफाच या तिन्ही मैत्रिणींचा ब्रेनवॉश करून त्यांना इस्लाम धर्म चांगला व त्यांचे स्वत:चे धर्म, त्यांचे कुटुंबिय वाईट असल्याचे विचार मेंदूत ठसवते. चित्रपट पुढे सरकत जातो तसा असिफाच्या चालीचाच एक भाग म्हणून  शालीनी व गितांजलीच्या आयुष्यात बॉयफ्रेंड व कॅप्टेननावाचा झिंग आणणारा मादक पदार्थ प्रवेश करतो. शालीनीला अशातच बॉयफ्रेंडकडून गर्भधारणा होते. हिंदू धर्माच्या मुलीसोबत मुस्लिम मुलगा कसा लग्न करणार? हा शालीनीच्या बॉयफ्रेंडचा सुनियोजित प्रश्न व त्यास असिफाकडून तेवढाच धर्मपरिवर्तनाचा सुनियोजित सल्ला दिला जातो. आपल्या प्रेमाची निशानी म्हणून पोटातील बाळासाठी शालीनी धर्मपरिवर्तनास तयार होते व त्या विधीही पार पाडते. लग्नानंतर बॉयफ्रेंड सोडून जातो मग पोटातील मुलाला बाप कोण? हा यक्ष प्रश्न पुन्हा शालीनी समोर उभा राहतो. मौलवीचा त्यावर तोडगा असतो की, धर्मपरिवर्तन केल्यामुळे तू घरापासून मुकलीस आणि बॉयफ्रेंडही सोडून गेला तेव्हा दुसरे लग्न मुस्लीम मुलासोबतच करणे हा पर्याय पुढे येतो. कात्रित सापडलेली शालीनी म्हणजे धर्मपरिवर्तना नंतरची ‘फातिमा’ हा पर्याय स्वीकारून पुढे जायचा निर्णय घेते. तोपर्यंत तिची रूममेट गितांजलीला आपण आयएसआयएसच्या जाळयात फसत असल्याची प्रचिती येताच ती मुस्लिम बॉयफ्रेंडला लग्नास आणि सिरीयात जाण्यास नकार देते. तिचा नकार म्हणजे आयएसआयएसला चॅलेंज असल्याचे माणून तिचा माथेफेरु बॉयफ्रेंड तिचे अश्लिल व्हिडीयो व्हायरल करते.ही बदनामी सहन न करू शकलेली गितांजली घरातच गळफास लावून घेत आयुष्य संपवते. निमा तर इस्लामला मानण्यास नकार देते म्हणून तिला ड्रिंक्समध्ये औषध घालून तिच्यावर सातत्याने बलात्कार करून बदला घेण्याचा किळसवाणा प्रकारही आयएसआयएसच्या स्थानिक रॅकेटकडून घडतो.

तोपर्यंत शालिनीच्या आयुष्याचा गुंता अधिकच अवघड होवून बसतो. पोटातील बाळाला जन्‍म देवून आपला सुखी संसार  थाटण्यासाठी पर्यायाने इस्लामच्या मार्गावर चालण्यासाठी भारतसोडून शालीनी सिरीयामध्ये येते. इथे स्थिती अजूनही भयावह असते. आयएसआयएसची मंडळी या बायकांना घरात डांबून ठेवतात. घरी बायकांचा भोग घेवून जिहादची लढाई लढण्यासाठी बायकांना महिनोन महिने वाऱ्यावर सोडण्याचा हा हिडीस प्रकार शालीनीच्या आयुष्याचा भाग होतो. आणि येथूनच तिला आपल्या हातून घडलेली चूक लक्षात येते. आपल्या मायदेशी परत जाण्याची  ठिणगी  तिच्यात पेटते. पण , दहशतवादाच्या अड्डयात पदोपदी मरणाचा धोका असताना संघर्षाचे शिवधनुष्य पेलून शालीनी सिरीयाची सीमा ओलांडते. सिमेवर बेशुध्दावस्थेत पडलेल्या शालीनीला आंतरराष्ट्रीय शांतता समुहाच्या शिबिरात आणल जात आणि  तिला लष्कराच्या चौकशीस सामोर जाव लागत. या चौकशीतूनच केरला स्टोरी अख्ख्या जगासमोर येते.

 केरला स्टोरी हा विषय गुन्ह्याच्या परिभाषेत  हयुमन ट्राफिकींग ठरतो. केरळ मध्ये दरवर्षी ३० हजार मुली बेपत्ता होतात हा विषयही या चित्रपटात येतो. या समस्सेला आळा घालण्यासाठी देशात स्वतंत्र यंत्रणा कार्यरत आहे. हा चित्रपट यंत्रणांच्या अक्षमतेवर बोट ठेवतो. चित्रपटात आयएसआयएस या दहशतवादी संघटनेच्या कुकृत्याचा परदाफाश करताना संबंधित धर्माचा आधार घेतला आहे. आणि केरळमध्ये काही ठिकाणी शरीया कायदा अंमलात असल्याचेही मांडतो. चित्रपट या माध्यमाची मर्यादा आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्यानावार दिग्दर्शकाने साधलेला कमर्शीयल हेतूही नाकरता येत नाही. काही राज्यात या चित्रपटावर बंदी आणि काही राज्यात हा चित्रपट टॅक्स फ्री होतो, म्हणजे राजकीय फायदा तोटाही यात दडला आहे. चित्रपट निर्मितीच्यावेळी हा विषय डोळयासमोर ठेवूनही नियोजन झाल्याचे नाकारता येत नाही. यापूर्वीचा इतिहास बघता भारतात काही विषय घेवून प्रदर्शीत होणाऱ्या चित्रपटांचा टायमिंगही महत्वाचा ठरतो. या चित्रपटानेही हा टायमिंग तर नाहीना साधला ही शंकाही पुढे येते. 

सरतेशेवटी या चित्रपटाने भारतीय समाजातील बदलत्या काळानुसार समोर येत असलेली समस्या मांडण्याचा प्रयत्न केला आहे.पण, मनोरंजन आणि शिक्षण हाच या चित्रपटाचा उद्देश समजून धर्मिक तेढ निर्माण होणार नाही याची काळजीच प्रेक्षकांनी मोठया मनाने घेण्याची गरज असल्याचेही हा चित्रपट अधोरेखित करतो. 

                                          000000

 

 

 


 

No comments:

Post a Comment