महाराष्ट्राच्या हस्तकलेला पर्यटक व ग्राहकांचा उदंड प्रतिसाद
सोमवार, १५ ऑगस्ट, २०१६
नवी दिल्ली : ‘भारत पर्व’ मध्ये महाराष्ट्र दालनास पर्यटक व ग्राहकांचा उदंड प्रतिसाद मिळत असून तीन दिवसात महाराष्ट्राच्या दालनास 15 हजाराहून अधिक पर्यटकांनी भेटी दिल्या. कोल्हापुरी चप्पल, वारली पेंटीग, पुणेरी कॉटन साडी, लाखेच्या बांगड्या आदी महाराष्ट्रातील हस्तकलांना दिल्लीत येणारे पर्यटक व दिल्लीकर ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे.
केंद्रीय पर्यटन मंत्रालयाच्यावतीने देशाचा गौरवपूर्ण इतिहास व वैविद्यपूर्ण संस्कृती दर्शविणाऱ्या ‘भारत पर्व’ प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. स्वातंत्र्यदिनामुळे शाळा, महाविद्यालय, खाजगी व सरकारी कार्यालयांना सुट्टी असल्यामुळे दिल्लीकर आणि दिल्लीस येणाऱ्या पर्यटकांची मोठी गर्दी ‘भारत पर्व’ प्रदर्शनास बघायला मिळाली. विविध राज्यांनी या प्रदर्शनात आपला सहभाग नोंदविला आहे. प्रदर्शनाचा आजचा तिसरा दिवस असून प्रदर्शनास भेट देणाऱ्यांनी महाराष्ट्राच्या हस्तकला दालनास गर्दी केली. इथे महाराष्ट्र लघु उद्योग विकास महामंडळाच्यावतीने राज्यातील लघुउद्योजक व हस्तकलाकारांच्या कामांचे प्रदर्शन व विक्री सुरु आहे. पुणेरी कॉटन साडी, लाखेच्या बांगड्या, वारली पेंटीग आणि कोल्हापुरी चप्पल स्टॉलवर मोठ्या प्रमाणात खरेदी होत असल्याचे चित्र होते.
केरळ राज्यातील त्रिवेंद्रम जिल्ह्याच्या दूरस्थ शिक्षण समन्वयक डॉ.रेणू सांगतात, त्यांना पुणेरी पॅटर्नची कॉटन साडी फार आवडली. त्या सध्या दिल्लीत फिरायला आल्या असून भारत पर्व प्रदर्शनीत त्यांनी महाराष्ट्राच्या हस्तकला दालनास भेट दिली. या दालनात महाराष्ट्र लघु उद्योग विकास महामंडळाच्यावतीने उभारण्यात आलेल्या पैठणीसह राज्यातील साड्यांचे प्रदर्शन व विक्री सुरु आहे. डॉ.रेणु सांगतात, ‘पुणेरी पॅटर्न कॉटन साडीची रंग संगती आणि रचना उत्तम असल्याने ही साडी आवडली म्हणूनच मी ही साडी खरेदी केली. महाराष्ट्राच्या साड्यांबद्दल नेहमीच आकर्षण वाटत असून महाराष्ट्र दालनात प्रत्यक्ष खरेदीची संधी मिळाल्याचा आनंद त्यांनी व्यक्त केला.
दिल्लीतील आर.के.पुरम भागातील रहिवाशी लता पाराशर यांनी मोठ्या प्रमाणात लाखेच्या बांगड्या खरेदी केल्या. त्यांच्या सोबत त्यांच्या अन्य तीन मैत्रिणींनीही बांगड्या घेतल्या. श्रीमती पाराशर म्हणाल्या, लाखाच्या बांगड्यांची गुणवत्ता भावली. उत्तम रंग, कलाकुसर आणि परवडणारी किंमत यामुळे या बांगड्या आम्ही सर्व मैत्रिनींनी विकत घेतल्या आणि आमच्या नातेवाईकांना भेट म्हणून देण्यासाठीही या बांगड्यांची विशेष खरेदी करुन घेतली. भारत पर्वच्या निमित्ताने विविध राज्यांच्या कलावस्तु खरेदी करायला मिळत आहे त्यात महाराष्ट्रातील हस्तकला आम्हाला विशेष भावल्याचे त्यांनी सांगितले.
दिल्लीतील उत्तमनगर येथे राहणारे अमरप्रकाश जोशी यांनी कोल्हापूरी चप्पल खेरदी केली. हिंदी चित्रपटामधून मला कोल्हापूरी चप्पलची माहिती मिळाली आणि महाराष्ट्रातील कोल्हापूरी चप्पलबाबत माझ्या वाचनातही आले होते. आज महाराष्ट्र दालनात कोल्हापूरी चप्पल खरेदी करण्याची संधी मिळाली त्याचा आनंद असल्याचे ओमप्रकाश सांगतात.
No comments:
Post a Comment