नवी दिल्ली : “भारत पर्व” मध्ये दिल्लीतील मराठी भाषिकांनी महाराष्ट्र दालनाला भेट देण्यासाठी आज एकच गर्दी केली. दालनातील विविध प्रदर्शनाच्या माध्यमातून ते आपल्या मुलांना महाराष्ट्राची ओळख करून देत असल्याचे चित्र आज दिसून आले.
स्वातंत्र्य दिनानिमित्त केंद्रीय पर्यटन मंत्रालयाच्यावतीने येथील राजपथावरील लॉन वर देशाचा गौरपूर्ण इतिहास व वैविद्यपूर्ण संस्कृती दर्शविणाऱ्या ‘भारत पर्व’ प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. विविध राज्यांनी या प्रदर्शनात आपला सहभाग नोंदविला आहे. प्रदर्शनाचा आजचा दुसरा दिवस असून महाराष्ट्राच्या दालनांना प्रेक्षकांचा उंदड प्रतिसाद मिळाला. महाराष्ट्राचे तीन दालने या ठिकाणी आहेत. महाराष्ट्रापासून दूर दिल्लीत नौकरी, व्यवसायानिमित्त स्थायिक झालेल्या दिल्लीकरांसाठी महाराष्ट्र दालन आकर्षण ठरत आहे. आपल्या मुलांना महाराष्ट्राचे दर्शन घडविण्यासाठी त्यांची एकच गर्दी येथे बघायला मिळाली.
महाराष्ट्र दालनात ताडोबा जंगलात फिरणारा वाघ एल.ए.डी वॉलवर बघून हितेश राजपाल हे रिध्दीमा या आपल्या मुलीला व त्रिशय या मुलाला सांगतात, “हा ताडेाबा जंगलातील वाघ आहे. या सोबतच ते ताडोबा जंगलाविषयी माहिती देतात. दालनात पुढे, ‘फेस रिकगनेशन स्क्रीन’समोर आल्यावर या मुलांना मराठमोळा फेटा, पुणेरी पगडी तंत्रज्ञानाच्या माध्यमातून परिधान करून देतात आणि त्याचे महत्त्व समजावून सांगतात. पुढे येथे ठेवण्यात आलेल्या “पझल गेम” द्वारे लोकमान्य टिळक, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले यांची चित्र जोडून या महापुरुषांची माहिती देतात तसेच, येथे लावण्यात आलेल्या दुसऱ्या एका स्क्रीनसमोर उभे राहून “व्हर्च्युयल टुरिझम”च्या माध्यमातून शिर्डीच्या साईबाबांचे दर्शन, गणपती पुळे व तारकर्ली समुद्र किनाऱ्यावरील सफर घडवतात आणि आपल्या मुलांना महाराष्ट्राची माहिती देतात.
हितेश राजपाल हे मुळचे अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर येथील रहिवासी असून सध्या दिल्लीत विदेश मंत्रालयात उपसचिव या पदावर कार्यरत आहेत. “महाराष्ट्र दालनाला भेट दिल्यानंतर महाराष्ट्रात आल्याचा अनुभव मिळत असल्याचे” ते सांगतात. या दालनात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन घडविण्यात आलेले महाराष्ट्राचे दर्शन आमच्या मुलांसाठी दिल्लीत महाराष्ट्र बघण्याची मोठी पर्वणी असल्याचे त्यांनी सांगितले.
महेश पाटील हे मुळचे औरंगाबादचे रहिवासी असून सध्या दिल्ली पोलीसच्या विशेष तपास शाखेत कार्यरत आहेत. त्यांनी आपली मुलगी आकृती आणि मुलगा ऋषी यांना महाराष्ट्र दालन दाखवायला आणले आणि महाराष्ट्राचे दर्शन घडवीले. महाराष्ट्राबद्दल मुलांना जास्तीत-जास्त माहिती देऊन महाराष्ट्राविषयीची जिज्ञासा पूर्ण करण्याची संधीच मला या माध्यमातून मिळाली असल्याचे त्यांनी सांगितले. मुलांना महाराष्ट्रीयन व्यजंनाची चवही चाखायला देणार असल्याचे त्यांनी सांगितले.
नागपूरचे निलेश देशमुख हे सध्या दिल्ली स्थित महाराष्ट्र शासनाच्या प्रसिध्दी विभागात कार्यरत आहेत. त्यांनी आपला मुलगा कार्तिक याला महाराष्ट्र दालन दाखवून त्याचा आवडता प्राणी वाघ दाखवला. निलेश देशमुख सांगतात,“कार्तिकला ताडोबा जंगल बघण्याची आंतरिक इच्छा होती आणि आज त्याला इथे प्रत्यक्ष ताडोबातील वाघासोबत खेळाता आले. महाराष्ट्रापासून लांब असलो तरी “भारत पर्व” तील महाराष्ट्र दालनात प्रदर्शीत करण्यात आलेल्या विविध उप्रकमाद्वारे माझ्या प्रमाणेच इतर पालकांना आपल्या मुलांना महाराष्ट्राची सैर घडविण्याचा आनंद मिळत असल्याची भावना श्री देशमुख व्यक्त करतात.
No comments:
Post a Comment