Thursday, October 10, 2024

असमर्थतेची कुजबुज


                                          

         स्थळ,नागपुरातील दाभा परिसरातील सुरेश लाँड्री.  दुकानाच्या काऊंटरवर उभा झालो आणि आत डोकावतो तर इस्त्रीच्या कपडयांचा भला मोठा ढीग दिसून आला. अशात मी इस्त्रीसाठी कपडयांची पिशवी सोपवताच या लाँड्रीचे मालक सांगते झाले, साहेब कपडे नाही मिळणार तुम्हाला उद्या इस्त्रीचे !, दोन तीन दिवस लागतील. हवं तर दुसऱ्या लाँड्रीत टाका कपडे. आता नियमीत ग्राहक असल्याने मी त्यांना विनवनीच्या स्वरात निदान उद्या एक तर ड्रेस इस्त्री करून द्या, अशी विनंती केली तेव्हा हो नाही करत ते राजी झाले. मग स्वत:हूनच आपली असर्मथता सांगते झाले, बघा साहेब दुकानात कपडयांचा ढीग लागला आहे आणि माझ्याकडील कारागीर कामावर येतनाहीये.थोडया विस्मयाने व आपसूकच  मी विचारलं, का नाही येत कारागीर? त्यावर ते  प्रश्नार्थक स्वरूपात उत्तर देताना म्हणाले, ‘साहेब, आता या लोकांना घरबसल्या अन्न धान्य, यांच्या बायकांना पैसे यांच्या मुलांना स्टायफेंड मिळते मग नियमित कष्टाच्या कामाला कसे बरे येणार हे कारागीर!’.

 

        मग त्यांनी एक एक कॅलक्युलेशन सांगायला सुरुवात केली. बघा एका कपडयाच्या इस्त्रीपोटी ( एक शर्ट किंवा पँट इस्त्री करण्यासाठी) ८ रुपये मिळतात. त्यातील ४ रुपये कारागिराला जातात. उर्वरित ४ रुपयांमध्ये दुकानच भाड आणि वीज बिल असा प्रत्येकी १ रुपया आणि एका कपडयामागे माझी मिळकत होते फक्त दोन रुपये. लाँड्री मालकाचं आर्थिक गणित समजून घेताना हे लक्षात आल की, हा प्रकार जणू  'मेहनत करे मुर्गी ओर अंडा खाये फकीर' या उक्तीला चपखल बसणारा आहे. म्हणूनच काकांना ग्राहक परत गेला तरी काही फरक पडत नसावा, असं मला वाटलं. त्यात भरीस भर म्हणजे काका सेवानिवृत्त कर्मचारी आहेत व त्यांना २० हजारांचे मासिक निवृत्तीवेतनही मिळते. मात्र, आयुष्यभर प्रामाणिकपणे नोकरी करणारे काका घरी बसून राहतील ते काका कसले !.या बद्दल लाँड्री मालकाचे कौतुकचं. प्रश्न आणि विषयाची मेख इथेच तर दिसून येते की, कारागिरासाठी नोकरी ही ऐच्छिक झाली आहे आणि हिच बाब मालकाची चिंता वाढवणारी ठरली आहे. हे चित्र शेतीतही दिसून येते. शेतकऱ्यांना मजूर मिळत नसल्याचे, शेतावर राखनदार मिळत नसल्याचे चित्र आहे. याही पुढेजात आस्थापणांवर कौशल्यपूर्ण मनुष्यबळ उपलब्ध होत नसल्याचे पदोपदी दिसून येते.

      किस्सा क्र. २ : स्थानिक सार्वजनिक वाहनाने कार्यालय गाठायचा माझा सिरस्ता आजही तसाच होता (त्याच्या मागचं लॉजिक असं की सर्व सामान्यांच्या आयुष्यात काय घडत आहे. पर्यायाने समाजात काय घडतं हे कळतं.).

सिटीबसच्या चालक व वाहकांचा संप सुरु असल्याने ऑटो घेतला. बसताच कानावर ऑटोचालक व प्रवासी महिलेचा संवाद ऐकू आला. आमच्याकडे तर कामगार किट वाटत आहे एक आमदार अन ते घ्यायला तर लोकांची भली मोठी रांग आहे. लोक रांगेतील आपला नंबर जावू नये म्हणून रात्रभर मुक्काम करतात. त्यात भर घालत ऑटोचालक म्हणाला, ताई आमच्या भागातही काही चित्र वेगळ नाही अन् या कामगार सुरक्षा व संसार किटसाठी कागदपत्र लागतात म्हणून झेरॉक्सचे दुकान लावलेत तिथे लोकांनी आणि चक्क एका पानाच्या झेरॉक्ससाठी २० रूपये आकारतायेत. एवढच काय लोकांनी अल्पोपहाराची दुकानही थाटली आहेत  या रांगांच्या आजुबाजुला. एवढयात ऑटोचालकाला घरून फोन आला तो त्याने ऑटोतील प्रवाशांच्या जीवावर उदार होवून रिसिव्ह केला अन् फोन झाल्यानंतर त्या महिला प्रवाशा सांगता झाला आमच्या हिचा फोन होता की, किटसाठी नंबर लागला अन आपल्याला बी किट मिळून रायली.

       दोन वेगवेळे प्रसंग आहेत मात्र,यात माणसांना काही गोष्टी/वस्तू/ निधी मिळत असल्याचे आणि यामुळे याच समाजातील अन्य व्यक्ती असमर्थ झाल्याचे चित्र आहे. राज्यात निवडणुकांचे वारे वाहत आहेत या पार्श्वभूमीवर समाजात घडत असणाऱ्या या बदलाचे निरीक्षण येथे चिंतन करायला लावणारे आहे (पण तेही ऐच्छिक आहे म्हणजे ज्यांना करायचे असेल त्यांना अन्यथा दररोज दिवस उगवतो व मावळतोच आहे).                                          

                                   ०००००


 

Friday, August 23, 2024

‘उन्हाळे-पावसाळे पाहिलेला जनसेवक’

 





‘उन्हाळे-पावसाळे पाहिलेला जनसेवक’

 मी, तसा खरा खुरा २४ तास जनसेवक. दररोज अगणीत वेगवेगळे चेहरे असलेले व चेहऱ्यावर मुखवटे म्हणजे हेलमेट पांघरलेले वाटसरू सतत मला भेटतात.आज यात आणखी भर पडली ती बॅनर,पोस्टर्स अन् झेंड्यांची. एका नेत्याच्या नागपुरातील आगमनासाठी हे शहर सज्ज असल्याचे लिहिलेले संदेश सर्वत्र झडकत आहेत. फ्लॅशबॅकमध्ये जाताना मला मागच्या वर्षी याच शहरात आयोजित सी-२० (जी -२०अंतर्गत) परिषदेसाठी माझ्या आजुबाजूला करण्यात आलेले सुशोभिकरण ठळकपणे आठवते.परदेशी पाहुण्यांना हे शहर आणि विशेषकरून आमचा परिसर सुंदर नेटका दिसावा म्हणून बऱ्याच गोष्टींची रेलचेल होती. महागडे सिंथेटिक पट्टे, हिरव्या लुसलुसीत गवताच्या चादरी पसरविण्यात आल्या, झाडांवरील खास रोषणाई , परबोला असे कितीतरी प्रकार मी नव्यानेच बघितले. शहरातील तरुणाई हे सुशोभिकरण आप-आपल्या मोबाईलमध्ये टिपून सोशल मिडीयाच्या माध्यमातून जगभर पोचवित होते आणि माझ्या अवतीभोवती माणसांचा पूर त्याकाळात मी बघितला.

यानंतर शहरात पार पडणारा हिवाळी अधिवेशनाचा वार्षिक उत्सव तर मला फारच प्रिय. या काळात माझ्या आजुबाजुला प्रशासकीय गाडयांचा ताफा,मंत्र्यांच्या गाडयांचे हॉर्न , शासकीय नस्त्यांनी लोडेड  वाहन असा हा काळ.त्याच काळात आपआपल्या नेत्यांचे होर्डिंग्ज,बॅनर ,झेंडे लावणारे सर्व राजकीय पक्ष याकाळात माझी जास्तच दखल घेतात. मग जत्रा उठल्यावर जसे पाल पांगतात. तसे सर्व आल्यामार्गी आपआपल्या गंतव्यस्थळी परतल्यानंतर मी आपला तोच पाढे पंधरा करत नित्यक्रमात गुंतून  जातो. निवडणुका,नेत्यांचे वाढदिवस,वेगवेगळे आयोजन असली की तेच रेलचेल मी अनुभवतो. आणि आता ते नित्याचेच झाले.

एरवी काही महनिय व्यक्तीमत्वांच्या धुळखात पडलेल्या व जयंतीच्या दिवशी तेवढे स्वच्छ होणाऱ्या पुतळयांखेरीज, राजा राणी आणि नागपूरचा स्थानिय पक्षी एवढाचा माझा गोतावळा आमच्यातच आम्ही मशगुल असतो. माझ्या जन्माचा शोध घेता एक गोष्ट लक्षात आली की, मी एक साधा जमिनीचा तुकडा. मग कुण्या नेत्या, अधिकाऱ्याच सुपिक डोक्यात आलेल्या कल्पनेतून कोण्या अभियंत्याने मला आकार देण्याचा प्रयत्न केला . आणि त्यावर रेती, माती, डांबर असे तत्सम जिन्नस वापरून मला तयार केला आणि असे तसे माझे बाडसे घातले, होय मी सिव्हील लाईन्स परिसरातील रस्ता बोलतोय.(बोले पेट्रोलपंप चौक ते उच्च न्यायालय चौक हा रस्ता).

                                          00000000

  

 

आपुले मरण पाहिले म्या डोळा……..

 




आपुले मरण पाहिले म्या डोळा……..

प्रसंग आहे नागपूर-अमरावती रोडवरील दाभा परिसरातील मारुती शो रुम अर्थात सेवा येथील. दाभ्यातून आलो व येथील टी पॉईंटवर सिटी बस किंवा ऑटो घेवून कार्यालय जवळ करण्याचा दररोजच्या शिरस्ता आजही काही वेगळा नव्हता. ऑटोला हात दिला तसा तो थांबलाही. ऑटोत आधिच डबल डेकरच्या व्यवस्थेमुळे सहा लोक कोंबली असल्याने माझ्या वाटयाला चालकाजवळ बसण्याचाच पर्याय होता. हे पाहून मी ही त्याच्या डाव्या बाजुने जावून बसण्याच्या बेतात होतो. पण चालक महाशय म्हणाले, त्या बाजुला या अर्थात त्यांच्या उजव्या बाजुला जावून बसायच होत. ऑटोला समोरुन वळसा घालून बसण्याच्या बेतात निघालो तोच  ऑटोमागून भरधाव वेगाने एक कार आली, थोडा टाईमींग जर का चुकला असता तर अनर्थ टळला नसताच. असा हा बाका प्रसंग स्वत:वर गुदरल्याने ‘आपुले मरण पाहिले म्या डोळा..’ असाच  हा काहीसा अनुभव आला. ऑटोत बसताना चालकाला ओरडलो तर तोच माझ्यावर डाफरत म्हणाला, तुम्हाला बघून बसता नाही येत का!

सहप्रवासी हेच या घटनेचे मुकदर्शक.ऑटोत बसलो आणि बर्डीकडे प्रवास सुरु झाला. या प्रवासात घडलेल्या प्रसंगाचे चिंतन करत राहिलो. त्यातून निष्कर्ष हाती आला की, ‘दुर्घटना घडली असती आणि याचे कारण ठरले असते तिघांचा बेजबाबदारपणा.’ त्याचे विश्लेषण करू जाता पहिली बेजबाबदार व्यक्ती ठरते ऑटोचालक. चरितार्थासाठी ऑटो चालविण्याचे कर्तव्य हे प्रवाशांची सुरक्षा आपल्यावर असल्याच्या जबाबदारीतूनच पूर्णत्वास जाते याचा बहुतांशवेळी विसर पडलेला जाणवतो. मग चालक कोणत्याही वाहनाचा असो नियम सारखाच. म्‍हणजे वाहतुकीच्या नियमानुसार ऑटो चालकाने प्रवाशाला आपल्या शेजारील जागा देताना सर्वप्रथम डाव्या बाजुच्या जागेवर प्रवाशास बसायला सांगावे. (कारण रस्त्याने येणारी वाहणेही उजव्याबाजुने येवून पुढे जात असतात आणि अशात काही अनुचीत घडल्यास प्रवाशाचे रक्षण होईल.)

मग तुम्हाला वाटेल की मुळात ऑटोचालकाने आपल्या सिटवर अन्य प्रवाशांना बसविणे हेच प्रथमत: वाहतूक नियमाचे उल्लंघन ठरते. मान्य. पण, वाढून ठेवलेल्या गरजा पूर्ण करण्यासाठी या पृथ्वीतलावर सर्वचजण अधिक मिळविण्याच्या शर्यतीत आपल्याला पुढे ठेवण्यात धन्यता मानतात, त्यामुळे चार-दोन प्रवासी जास्त बसवून त्याने आपली दिवसाची आमदनी वाढवणेही त्या अर्थाने गैर नसावी. पण अर्थारजनात जबाबदारीही  तर महत्वाची आहेच ना ! त्याच काय ? प्रवाशांची ने-आण करणे एवढेच काम नसून त्यांना सुरक्षित गंतव्यस्थळी पोचविणे या जबाबादारीतून आलेले ते कर्तव्य आहे. याचा बहुतेकांना विसर पडतो, तो मात्र पडालयला नको. तो जसा आज या ऑटो चालकाला पडला आणि त्यातून अनर्थ होताहोता टळला.  त्याची जाणीव मी त्याला ऑटोतून उतरताना सर्व सह प्रवशांसमोर करून देताना म्हटलेले वाक्य असे, ‘भाऊ पुढच्यावेळी प्रवाशाला उजव्या बाजुने बसण्याचा हट्ट टाळा आणि दुसऱ्यासह स्वत:चा जीव वाचवा, जबाबदार चालक व्हा.’ यावर तो काही उत्तरतो का याची वाट पाहत मी प्रवास भाडं दिलं मात्र, त्यावर चकार शद्ब न काढता त्याने मान डोलवली अन मी मार्गस्थ झालो.

दुसरा बेजबाबदार ,मी. ऑटोत बसण्यासाठी निघताना मागच्या बाजुने कोणते वाहन येत आहे किंवा नाही याची शाहनिशा करूनच मी ऑटोत बसायला हवे होते. अशात अनर्थ झाला असता तर मी एक जबाबदार नागरीक ,मुलगा, नवरा, बाप, भाऊ खचितच ठरलो असतो. आपणही कोणाचे कोणीतरी आहोत त्यामुळे आपल्या अशा बेजबाबदार वागण्याने आपण त्यांच्यापासून कायमचे दुरावू शकतो याची प्रकर्षाने जाणीव झाली. यापुढे काळजी घेण्याचा मनोमन निश्चय केला.

   तिसरी बेजबाबदार व्यक्ती म्हणजे, मागून भरधाव वेगाने येणारा कार चालक. आपण ज्या रस्त्याने जात आहोत. तिथे प्रत्येक चौक, टी पॉईंट व तत्सम थांबे लक्षात घेता गाडीचा वेग कमी ठेवणे ही प्रत्येक वाहन चालकाची जबाबदारी आहे. त्याचा विसर पडला की इतरांचा घात करून संबंधित व्यक्तींसह सर्वांच्या आयुष्यात कायम जिव्हारी बसणारा शद्ब ‘अपघात’ उच्चारणे व स्वीकारण्याची अपरिहार्यताच तेवढी उरते.

सरते शेवटी, आयुष्य सुंदर आहे तसेच ते पाण्याच्या बुडबुड्यासम आहे. याची प्रचिती आपल्याला कधिही येवू शकते . ते टाळण्यासाठी मात्र सर्वांनाच जबाबदार बणावे लागेल हा या प्रसंगातील धडा तेवढा शिल्लक राहतो.

                                             ००००००

Wednesday, August 21, 2024

हॅलो ब्रेव्ह गर्ल ………

 





हॅलो ब्रेव्ह गर्ल ………

            ऑफिसला पोचायची लगबग, अशात जीपीओ चौकात(नागपुरातील सिव्हील लाईन परिसर) आलो सिग्नल लागल्याने एकामागोमाग पाच स्कुल बस उभ्या होत्या. रसत्याच्याकडेला शिस्तीत पायी जाणारा मी एव्हाना कानावर पडलेल्या एका हाकेने स्तिमीत झालो , सांदिपनी शाळेच्या बसमधील जेमतेम पहिल्या दुसरीतील शाळकऱ्यांमधील निर्वाकार ,निरागस मुलींनी हात उंचावून ‘हाय अंकल,हाय अंकल…’ म्हणत साद दिली. त्याला हलके स्मीत करून प्रतिसाद देत ‘हॅलो ब्रेव्ह गर्ल्स’ म्हणत मी पुढे जात होतो. आता पाचही स्कुलबसमधून तीच हाक तोच उत्साह आणि त्याला माझा सारखा प्रतिसाद देण सुरु होतं. चिमुरडया मुलींना दिलेला आजचा प्रतिसाद हा माझ्यासाठी खास होता कारण, नुकतेच एक लेक्चर देवून आलो आणि त्यात मुली महिलांवरील अत्याचाराच्या घटना थांबवायच्या असतील तर आपल्याला त्यांच्यासोबत वागण्यात जाणीवपूर्वक बदल करावा लागेल असं मी म्हणालो. मुलींसाठी  इंटेलिजंट,ब्रेव्ह आदी शद्ब उच्चारणे हा माझ्या लेक्चरमधील एक भाग होता त्या स्कुलबस मधील मुलींच्या हाकेला ओ देतांना हॅलो ब्रेव्ह गर्ल म्हणून मी स्वत: पासून त्याची सुरुवात केल्याचं समाधान मला लाभलं.

            आपल्या दैनंदिन जीवनात मुली किंवा महिलांप्रतीच्या भावना वा वागणुकीतून बराच परिणाम घडतो असे मला वाटते. म्हणजे घरात अमक्या गोष्टी मुलींनीच करायच्या तमक्या गोष्टी फक्त मुलांनीच करायच्या असतात तो मुलींचा प्रांत नाही असे दंडक आपणच निर्माण करून माणूस म्हणून त्यांचं अस्तीत्व नाकारल असतं. आणि मुलगी म्हणून तिच्याकडून वागण्याच्या अपेक्षांचा डोंगर उभा करून ठेवलेला असतो. मग ती तशी वागली नाही तर मग ती वाईट किंवा उरमट असे सोयीचे शेरेही आपण चिटकवून मोकळे होतो. माझा तर एका गोष्टीवर ठाम विश्वास आहे की, ‘मुलगा- मुलगी ही निसर्गाने किंवा शरीर विज्ञानाने घडणारी गोष्ट आहे जी एक सुदृढ समाज निर्माण करण्यासाठीची व्यवस्था आहे.त्याचा जसा आदर होतो तसा तिचाही आदर व्हायला हवा आणि त्याची सुरुवातही स्वत:च्या घरातून व्हावी लागेल. सजग पालक म्हणून मुलगा मुलगी भेद न करता सर्व संधी सेवा समान उपलब्ध करून द्याव्या लागतील.’

 या सोबतच एक महत्वाची बाब निरीक्षणातून पुढे आली की, मुलींना सुंदर,सालस,निरागस आणि टोकाचं सागांयच झाल तर सेक्सी असे बिरुद लावली जातात. आणि ती ही त्या बिरुदाला साजेशी सुंदर,सालस,निरागस व सेक्सी दिसण्याकडे वागण्याकडे कसोसीने लक्ष देते.

            आता मुलींना मुलांच्या खांद्याला खांदा लावून चालण्यासाठी आपल्यालाही ही बिरुद बदलावी लागतील इंटेलिंजंट, ब्रेव्ह, शार्प, टॅलेंटेड असे बुरुद लावावी लागतील जेणे करून या बिरुदावल्या त्यांच्या जगण्याचा भाग होतील व त्या प्रत्यक्षात आणण्यासाठी त्याही धडपडतील. नाही तर देवत्व बहाल करून  तिची आराधना, पुजा करणारा समाज मंदिरातून आल्यावर तिलाच काय वागणूक देतो हेही सांगणे नलगे.

            माणूस म्हणून स्त्रिचा स्वीकार आणि तिच्या प्रती आदरातूनच हा प्रवास एका सकारात्मक दिशेने पुढे जाऊ शकतो. त्यासाठी स्वत:पासून व सजगतेने सुरुवात व्हावी लागेल. आजच्या ‘हॅलो ब्रेव्ह गर्ल’ या संबोंधनाने का होईना एक नवी सुरुवात झाली आहे. हा संदेश आता सर्वदूर पोचवून त्याला व्यापक स्वरुप द्यायचे आहे.

                                                         ००००००   

   


Friday, March 8, 2024

विदर्भाच्या गुणी कलाकारांनी 'तेरवं' चित्रपटातून मांडली एकल महिलांची संघर्ष गाथा






               कुटुंब,समाज आणि शासकीय यंत्रणा यांच्याशी निकराचा लढा देत कायमचा संघर्ष अनुभवणाऱ्या
आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या एकल महिलांचा यशस्वी संघर्ष  दिग्दर्शक हरिष इथापे यांनी 'तेरवं' या चित्रपटाद्वारे मांडला आहे. चित्रपटाच्या एकूण निर्मिती प्रक्रियेमध्ये प्रत्यक्ष एकल महिलांसह विदर्भातील जवळपास ९० टक्के कलाकारांचा सहभाग, चित्रपटातील लोकेशन्स, चित्रीकरण आणि खास वैदर्भीय भाषेतील श्याम पेठकर यांची पटकथा ही या चित्रपटाची बलस्थानं ठरली आहेत.

      विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यामध्ये शेतकरी आत्महत्यांचा प्रश्न उभा राहिला आणि हा सामाजिक प्रश्न कसा आहे, हे अधोरेखित करण्यासाठी मोठ्या प्रमाणात साहित्य,नाट्य निर्मिती आदी माध्यमातून भाष्य झाले आहे. मुळात ‘तेरवं’ या मूळ नाटकातून निर्माण झालेला ‘तेरवं’ हा चित्रपट एकल महिलांच्या प्रश्नांची महत्वाची व दुर्लक्षित बाजू अधोरेखित करतो. परिस्थितीला शरणांगती पत्करून शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यानंतर त्यांच्या विधवांना कुटुंबात मिळणारी कष्टप्रद वागणूक, समाजाचा त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टीकोन आणि सरकारी यंत्रणांमध्ये तिला हक्क मिळविण्यासाठी करावा लागणारा संघर्ष आजपर्यंत चित्रपटाच्या माध्यमातून पुढे आला नव्हता. हे शिव धनुष्य लिलया पेलण्याचं काम निर्माते  नरेंद्र जिचकार यांच्या पुढाकाराने उभ राहिलं.

       नाटक आणि चित्रपट या दोन्ही माध्यमांचे तंत्र वेग-वेगळे असल्याने बऱ्याच ठिकाणी या फॉरमॅटमध्ये येणाऱ्या अडचणी व काही ठिकाणी दिग्दर्शकाला घ्यावं लागलेलं स्वातंत्र्य अशी उत्तम सरमिसळ करत हा चित्रपट प्रेक्षकांना सुरुवातीपासून ते अगदी शेवटपर्यंत खिळवून ठेवतो.

    चित्रपटाची सुरुवातच गावाच्या वेशीवरील रोहित्रावर ( ट्रान्सफॉर्मर) चढून आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या दृष्याने होते.गावातील लोक त्या शेतकऱ्याला खाली काढतात आणि ही शेतकरी आत्महत्या नोंदवून घेण्यासाठी तथाकथित दलालाची व शेतकऱ्याच्या भावाची उठाठेव सुरू असते. पतीच्या आत्महत्येची बातमी शेतकऱ्याच्या पत्निला कळताच तिने फोडलेला हंबरडा असं कथानक पुढे सरकत जातं. दलालाने उसकवल्यामुळे तहसिल कार्यालयासमोर प्रेत ठेवून आंदोलन करणारे लोक अस दृष्य असताना चित्रपटाची नायिका जनाचा प्रवेश होतो आणि तहसिलदाराला भेटून ही मागणी चुकीची आहे आणि यासाठी शेतकऱ्याच्या भावाने दलाला किती पैसे दिले हे वास्तव ती पुढे आणते आणि हे प्रेत उचलून त्यावर अंत्यसंस्कार करण्याचे सांगते. इकडे विधवा झालेल्या महिलेला तेरव मंडळ तेरवीचं आमंत्रण देतात . 

                  तेरवीच्या दिवशी या विधवेला आपल्या तेरव मंडळात आणून  तिच्या आयुष्यात फार मोठे आभाळ कोसळल्याची तिच्या मनाची घालमेल दूर करून  साडी-चोळी देत तिच्या मनावरील ओझं कमी करण्याचं काम जनाच्या तेरव मंडळातील सर्व महिला करतात आणि त्या विधवेला बळ देतात.मात्र, नवऱ्याच्या  तेरवीचा कार्यक्रम आटोपल्यानंतर दीर आणि सासू शेतीच्या कागदपत्रावर बळजबरीने स्वाक्षरी घेऊन तिला घराबाहेर काढतात.हा विषय दाखवताना जनाचं पूर्व आयुष्यही या चित्रपटात डोकावत.जनाला मुळात दोन भावंड. एक बहीण एक भाऊ. आई सर्पदंशाने गेलेली. जनाला शिकायचं होतं, बिएड करायचं होतं.मात्र, शेतकरी व वयोवृध्द वडिलांची हलाखीची परिस्थिती असल्याने ते जनाला शिकवू शकत नाहीत आणि तिचं लग्न लावून देतात.

        सासरी जाऊन जनाच्या व्यक्तिमत्वातील करारी बाणा, तिचा संघर्ष यास पतीची साथ मिळते आणि ती व्यवस्थेसोबत संघर्ष करते. हे सर्व कथानक पुढ सरकत जातं.कथानकामध्ये दिग्दर्शकाने भुलाबाईची (भोंडल) गाणी, पाऊस पडवा  म्हणून  'धोंडी धोंडी पाणी दे' असं म्हणत गावोगावी निघणाऱ्या धोंड्या, अशा ग्रामीण परंपरा चित्रपटांमध्ये उत्तमरित्या पेरल्या आहेत.

     वडिलांची परिस्थिती बेताची असल्यामुळे बहिणीला शिक्षण न करता लग्न करावं लागल म्हणून 'ज्या घरात मला शिक्षण मिळत नाही, अशा गरीब शेतकऱ्याच्या घरात मला जन्माला घालू नको,देवा.' असं म्हणत आत्महत्या करणारी जनाची बहीण. आणि आपल्या नणंद  सोबत हा प्रकार घडू नये म्हणून तिला शिक्षणासाठी आपल्या सासू-सासऱ्याचा विरोध पत्करून बाहेरगावी पाठविणाऱ्या जनाचा करारी बाणा पटकथेतून आणि नायिकेच्या तोंडी आलेल्या समर्पक संवादातून अधिक प्रभावीपणे मांडण्यात आला आहे.

        स्व.राजा बढे ,श्याम पेठकर आणि ज्ञानेश वाकुडकर यांची गीते या चित्रपटातील आणखी एक बलस्थान असून ती समयोचितपणे मांडण्यात आली आहेत.आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांच्या विधवांना एकजुट करून बचतगट, दारूबंदी सारखे उपक्रम राबवत या एकल महिलांची पॉवर बॅंक म्हणून जना या चित्रपटात प्रेक्षकांच्या समोर येते. यवतमाळ येथे भरलेल्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या मंचाहून शेतकऱ्यांच्या प्रश्नावर शासन, प्रशासन आणि राजकारणी  यांच्याकडून अपेक्षित असलेली भूमिका परखडपणे मांडणारी जना या चित्रपटाच्या केंद्राभोवती आहे. या सर्व संघर्षात तिची  गांधीवादी विचारांवरील श्रद्धा या चित्रपटाच्या समारोपात दिसून येते.

     जनाची भूमिका वठवणाऱ्या किरण खोजे आणि तिच्या पतिच्या भूमिकेत संदीप पाठक व  भासऱ्याच्या भूमिकेत किरण माने या मराठी चित्रपट सृष्टीतील आघाडीचे कलाकार या चित्रपटात तेवढ्याच दमदारपणे अभिनय करताना दिसून येतात. संगीतकार वीरेंद्र लाटणकर यांनी सबंध चित्रपटात केलेले संगीत संयोजनही या चित्रपटाला साजेसं आहे.
     
    विदर्भात घडणाऱ्या शेतकरी आत्महत्येच्या बातम्या ,प्रत्यक्ष प्रसंग अशा घटना बघणारे, निरीक्षण करणारे आणि यातून अस्वस्थ होणारी अशी सर्व मंडळी चित्रपटाच्या पठकथेपासून तर निर्मिती प्रक्रियेमध्ये सहभागी असल्याने हा चित्रपट व यातील विषय आणखी जोरकसपणे व प्रभावीपणे मांडल्या गेल्याचेही निरीक्षण आपसूक नोंदवले जाते.

    एक सामाजिक प्रश्न समजून घेण्यासाठी प्रेक्षकांनी हा चित्रपट नक्की बघितला पाहिजे. नागपूरच्या बर्डी परिसरातील इंटरनेटि मॉलमध्ये 'तेरवं' चित्रपटाचा 6 मार्च रोजी प्रीमियर शो आयोजित करण्यात आला त्याला हजेरी लावली. यानिमित्ताने या चित्रपटाचे रसग्रहण केले आहे. 8 मार्च या जागतिक महिलादिनी हा चित्रपट राज्यातील संपूर्ण चित्रपटगृहांमध्ये रसिक प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

रितेश मो.भुयार
            ००००





 

Monday, February 5, 2024

सुर्योदय' योजनेतून घरावर होणार ऊर्जानिर्मिती ; ग्राहक होणार वीज निर्माता


 

स्वच्छ आणि प्रदुषण विरहीत ऊर्जेचा उत्तम स्त्रोत म्हणून सौर ऊर्जा सर्वज्ञात आहे. याचा सामान्य जनतेला उपयोग व्हावा म्हणून केंद्र शासनाने जानेवारी २०२४ मध्ये 'सुर्योदय' योजना जाहीर केली.या योजनेअंतर्गत घराच्या छतावर सौर पॅनलच्या माध्यमातून ऊर्जानिर्मिती करण्यात येणार आहे. केंद्राकडून सौर पॅनेलसाठी ४० टक्क्यापर्यंत अनुदान मिळणार असल्याने  वीज ग्राहकांसाठी ही फायदेशीर ठरू शकते.

  प्रायोगिक तत्त्वावर अंमलबजावणीसाठी देशात एक कोटी घराच्या छतावर सौर पॅनेलच्या माध्यमातून ऊर्जा निर्मिती करण्याच्या या योजनेचा उद्देश आहे.या योजनेत राज्यातील पुणे,नाशिक ,छत्रपती संभाजीनगर, नांदेड,लातूर,नागपूर आणि अकोला जिल्ह्याचा समावेश. सोलर पॅनल खरेदीसाठी ग्राहकांना ४० टक्के अनुदान सौरऊर्जा निर्मितीसाठी 'सुर्योदय' रूफ टॉप सोलर योजनेत ग्राहकांना केंद्र सरकारकडून ४० टक्के अनुदान मिळते. तीन किलोवॅट क्षमते पर्यंतचे पॅनेल बसविण्यासाठी सुमारे १ लाख ५७ हजार खर्च येतो व त्यामध्ये अंदाजे ५४,००० रुपये म्हणजे चाळीस टक्के अनुदान मिळते. त्यामुळे ग्राहकाला जवळपास १ लाख ३ हजार रुपये खर्च येतो.

         सौरऊर्जेतून निर्माण होणाऱ्या वीजेमुळे ग्राहकाला नेहमीचा वीजपुरवठा कमी वापरावा लागतो व वीजबिलात कपात होते. ग्राहकाच्या सौर पॅनेलमधून त्याच्या वापरापेक्षा जास्त वीज निर्माण झाली तर ती महावितरणच्या ग्रीडमध्ये पाठवली जाते व कंपनी त्या विजेच्या मोबदल्यात वीजबिलात सवलत देते. यातून कधी-कधी ग्राहकांना शून्य रकमेचे वीजबिलही येते. सोलर पॅनेल बसविण्याचा खर्च चार ते पाच वर्षांत भरून निघतो पण त्यांचा उपयोग पंचवीस वर्षे होत राहतो.

      सौर ऊर्जा निर्मितीसाठी ग्राहकांनी ३ किलोवॅट ते दहा किलोवॅट क्षमतेचे पॅनेल्स बसविले तर २० टक्के अनुदान मिळते. घरगुती ग्राहकांना सुविधा हे या योजनेचे मुख्य उद्दीष्ट आहे. तथापि औद्योगिक ग्राहकही रुफ टॉप सोलर पद्धतीने वीजनिर्मिती करीत आहेत. सौर ऊर्जानिर्मितीसाठी पॅनेल बसवू इच्छिणाऱ्या ग्राहकांना महावितरणच्या mahadiscom.in/ismart या वेबसाईटवर जाऊन अर्ज करायचा असतो. पॅनेल बसविणाऱ्या एजन्सीसह सर्व बाबतीत महावितरणची मदत मिळते. सौर ऊर्जेमुळे पर्यावरण रक्षणाला मदत होते तसेच ग्राहकांना आर्थिक लाभ होतो.

रूफ टॉप सोलरसाठी बँक कर्ज देते :-

      सुर्योदय योजनेत छतावर रूफ टॉप सोलर बसविण्यासाठी कोणत्याही बँकेकडून  हप्त्यावर (EMI) कर्ज उपलब्ध होऊ शकते. रूफ टॉप सोलर बसविल्यामुळे शुन्य होणारे वीज बिलाचे पैसे ग्राहक बँकेचे घेतलेले कर्ज फेडण्यासाठी वापरू शकते.त्यामुळे ग्राहकांना अधिक सुलभरीतने आर्थिक भुर्दंडाविना रूफ टॉप सोलर बसविता येऊ शकते.

योजनेची वैशिष्ट्ये

१. घरगुती बिलात मोठी बचत

२. घरगुती ग्राहक, गृहनिर्माण रहिवाशी संस्था व निवासी कल्याणकारी संघटनांना योजनेचा  लाभ

३. १ ते ३ किलोवॅट पर्यंत ४० टक्के अनुदान

४. ३ किलोवॅटपेक्षा अधिक ते १० किलोवॅट पर्यंत २० टक्के अनुदान

५. सामूहिक वापरासाठी ५०० किलोवॅट पर्यंत परंतु प्रत्येक घरासाठी १० किलोवॅट मर्यादेसह निवासी गृहनिर्माण संस्था या ग्राहकांना २० टक्के अनुदान.

६. शिल्लक वीज महावितरण प्रति युनिट प्रमाणे विकत घेणार.

००००

Wednesday, June 7, 2023

पुन्हा पहिले पाढे पंचावन्न …..


 


‘आई, बहीण आणि पत्नी  म्हणून  ‘स्त्री’ च असणं  स्वीकाहार्य  या व्यतिरीक्त ‘स्त्री’च अस्तीत्व हे पुरुषांच्या मनमानी विचारांवर अवलंबून अर्थात पराबलंबी आहे. समाजाची ही मानसिकता जोवर कृतीशीलरित्या बदलणार नाही तोवर  महिला अत्याचाराच्या घटनांना पूर्ण विराम लागणार नाही. आणि त्याची सुरुवात आपल्यापासून, आपल्या घरातून व्हावी लागेल’,असं माझं प्राजंळ व सुस्पष्ट मत (तेच फक्त मी व्यक्त करू शकतो आणि कृती करू शकतो).

हा विषय आज खरडायला तशा दोन प्रातिनिधिक घटना कारणीभूत ठरल्या. केरळ उच्च न्यायालयाने  ‘रेहाना फातिमा केस’ मध्ये ‘महिलांचे शरीर हे त्यांची स्वायत्त मालकी’ असल्याची बाब नोंदवत तथाकथित संस्कृती रक्षकांना चपराक लगावली आहे. तर दुसरी मनाला हेलावून टाकणारी घटना आहे अकोल्याच्या पत्रकाराची मुंबईत शिकणारी  मुलगी वसतीगृहात मृतावस्थेत आढळल्याची . 

केरळ राज्याच्या एर्नाकुलम जिल्ह्यातील रेहाना फातिमा या महिलांच्या हक्कांसाठी लढणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या आणि मॉडेलही आहेत. त्यांनी २०२०मध्ये सोशल मिडीयावर एक पोस्ट शेअर केली होती. फातिमा यांच्या शरीराच्या वरील निर्वस्त्र भागावर त्यांच्या मुला-मुलींनी पेंटींग केल्याची ही पोस्ट. या कृत्याविरोधात तथाकथीत संस्कृतिरक्षकांनी कोर्टात केस केली. जिल्हा सत्र न्यायालयाने पॉस्को कायद्याअंतर्गत रेहाना फातिमा यांना दोषी ठरवल. रेहाना यांनी उच्च न्यायालयाचे दरवाजे खटकवले. आणि सरतेशेवटी  6 जून 2023 रोजी न्या. कौसर इडप्पागाथ यांच्या खंडपिठाने निर्णय दिला,‘  आईच्या शरीराच्या वरच्याभागावर तिच्या स्वत:च्या मुलांनी केलेले पेंटींग हा एक कला प्रकल्प असून यास वास्तव किंवा लैंगिंक भावना उद्दीप्त करणारी कृती समजू नये. स्वत:च्या शरीराबद्दल निर्णय घेण्यासाठी महिला स्वायत्त असून हा मूलभूत अधिकाराचा  गाभा आहे जो लैंगिक समानता आणि  गोपनियता प्रदान करतो. ’  

मुंबईत शिक्षणासाठी गेलेली अकोल्याच्या एका पत्रकाराची मुलगी शासकीय वसतीगृहात वास्तव्यास होती. नामांकित संस्थेतून ती पॉलिटेक्नीकचे शिक्षण पूर्ण करीत होती. अचानक 6 जून 2023 रोजी वसतीगृहात त्या मुलीचा विवस्त्र मृतदेह आढळला.आणि त्याच वसतीगृहातील सुरक्षारक्षकाने आत्महत्या केल्याची बाबही पुढे आली आहे.  

या दोन्ही घटनांमध्ये महिलांकडे समाजाचा बघण्याचा व त्यांच्यासोबतच्या वागणुकीचा किडसवाना परिचय येतो. पहिल्या घटनेत रेहाना फातिमा यांची कृती  संस्कृतीला मारक असल्याचा टेंभा मिरवून संस्कृतीरक्षणासाठी कोर्टात जाण्याचा घाट घालणारा समाज आपणास ठसठसीतपणे दिसून येतो. रेहाना यांनी केलेली कृती ही त्यांची वैयक्तिक  बाब  म्हणून  न स्वीकारता संस्कृतीवरील संकट समजणारा समाज जेव्हा ही कृती सार्वजनिक करतो तेव्हा त्यास जबाबदार समाज म्हणावे का? असा प्रश्न निर्माण होतोच.पण अशा शक्तींना अडवून धरण्यासाठी न्यायव्यवस्थेने या मनोवृत्तीला वेळीच घातलेली वेसण महत्वपूर्ण ठरते.

दुसऱ्या घटनेची पूर्ण माहिती अजून पुढे आलेली नाही. पण वृत्तपत्रात प्रकाशित झालेल्या वृत्तावरून ही बाब स्पष्ट आहे की वसतीगृहात मुलीवर बलात्कार झाला व त्यानंतर तिची हत्या करण्यात आली. आता ही कृती किती भयानक आहे याचा विचार करूया.आपल्या मुलीला शिक्षण व नोकरीसाठी  अन्य शहरात पाठविणाऱ्या पालकांच्या पायाखालची जमीन खसकवणारीही आहे. मुलींच्या वसतीगृहात मुलीवरच बलात्कार आणि हत्या होत असेल तर वसतीगृह प्रशासनावर आणि इथे नोकरीवर असणाऱ्या पुरुषांवर तरी विश्वास ठेवावा का?. मग असा विचार करता समाजात प्रत्येक ठिकाणी स्त्रिया व पुरुष असणारच  तर पुरुषांकडून अशी वागणूक मिळण ही सुद्धा एक सामाजिक समस्या म्हणून जन्माला येत असल्याचेही प्रतित होते.

          या विषयाच्या अनुषंगाणे काही संदर्भही देणे उचित ठरेल. त्यासाठी दोन दशके मागे जावूया देशाच्या इशान्येकडील राज्यात. १० जुलै २०१४ च्या रात्री मनीपूर राज्यातील बैमन कॅम्पू मयई भागात आर्म्ड फोर्सेस स्पेशल पावर्स ॲक्ट (ASPA) नुसार रात्री एका घराला १७,असम रायफलच्या तुकडीने घेराव घातला.यानंतरचा घडलेला प्रकार हा मानवतेला काळीमा फासणारा आहे. थंगजम मनोरमा ही या घटनेतील पिडीता.एका घरात आसम रायफल तुकडीचे जवान गेले व छोटया मुलाला त्याच्या बहिणीविषयी चौकशी करु लागले.घरात पुढे शिरून मुलीच्या आईला विचारणा सुरु असतानाच थंगजम मनोरमा आली अशात  जवान तिला फरफटत घराच्या एका भागात घेवून गेले.चाकुने तिचे कपडे फाडले व तिला स्थानिक नक्षलीगटाला सहकार्य करणारी सदस्य म्हणून कबुली देण्यास भाग पाडू लागले. थंगजमच्या  मांडीवर चाकुचे वार करण्यात आले कहर तर तेव्हा झाला जेव्हा तिच्या गुप्तांगामध्ये बंदुकीच्या गोळया घालण्यात आल्या. थंगजम साठी या राज्यातील जनता रस्त्यावर आली  रक्षकच भक्षक होतानाचा अनुभव येथील महिलांनी घेतला.

 जाताजाता आणखी इतिहासातील दोन संदर्भ. हा संदर्भ आहे दोन विदुषींचा.  कर्नाटकातील अक्क महादेवी आणि जम्मू आणि काश्मिर  मधील लाल डेड. ११३० मध्ये कर्नाटकाच्या शिमोगा जिल्ह्यातील उडुतरी गावात अक्क महादेवी या मुलीचा जन्म झाला. चेन्नमल्लिकार्जुन अर्थात शंकराची ती भक्त होती . अक्क महादेवीच्या रुपावर भाडून स्थानिक जैन राजा कौशीकने तिच्या वडीलांकडे अक्कला विवाहासाठी मागणी केली व लहान वयातच तिचा विवाह झाला. शंकरालाच मनोमन पती माननाऱ्या अक्क महादेवीचे संसारात मन रमत नव्हते राजाने भरवलेल्या दरबारात तिने शंकरालाच आपण पती मानत असल्याची कबुली दिली. क्रोध अनवार होवून राजाने दिलेले आभुषणे व वस्त्रही अक्क महादेवीकडून काढून घेतले. दरबारातून विवस्त्रावस्थेतच अक्क महादेवी शंकराच्या शोधात निघाली. याच अवस्थेत जंगलात तपश्चर्येनंतर तिला आत्मानुभव झाला व लिंगैक्य होवून  चेन्नमल्लिकार्जुनासोबत ती एकाकार झाल्याची घटना सांगितली जाते. ही घटना श्री शैल येथे घडल्याने तिथे  चेन्नमल्लिकार्जुनाचे मंदिर बांधण्यात आले. या घटनेतूनही महिलेला वस्तू समजण्याचा समाजाचा दृष्टीकोण अधोरेखित होतो.

लाल डेड यांचा कार्यकाळ १३२० ते १३५५ दरम्यानचा आहे.काश्मीरातील पंडेरेथन गावात एका काश्मीरी पंडीत कुटुंबात लाल डेड उर्फ लल्लेश्वरीचा जन्म झाला. 12 व्या वर्षीचा तिचा विवाह झाला व सासरी खूप छळ सुरु झाला. सासरचा सततचा छळाला कंटाळून आणि आत्मीक शांतीच्या शोधातच  ती शंकराच्या भक्तीत लीन झाली. पुढे २६ व्या वर्षी संसाराचा व वस्त्रत्याग करून  ती जंगलांमध्ये भटकू लागली. कविता ,छंद रचू लागली. लाल डेड ने मोठया प्रमाणात साहित्य रचना केली. बुद्धीमान स्त्री म्हणून आणि काश्मीरची  शेक्सपियर म्हणून तिची ओळख निर्माण झाली.

अक्क महादेवी आणि लाल डेड या दोन्ही विदुषींचा घरच्या मंडळींनीच छळ केला मात्र, त्यांनी परिस्थितीशी निकराचा लढा देवून आपले अस्तित्व निर्माण केले. आज आमच्या तथाकथित आधुनिक समाजात महिलांनी काय परिधान करावे, कसे वर्तन करावे असे विचार थोपवले जातात, या दोन विदुषींनी तर ११ व्या आणि १३व्या शतकात अंगावरील वस्त्रांचा  त्याग केला व अदभूत कार्य करून दाखविले. हाच समाज त्यांना आता देवत्वाचे रुप प्रदान करतो. एवढच काय तर समाजात दुर्गा,शारदा म्हणून महिलेचे उत्सव मोठया प्रमाणात साजरे होतात. मात्र,माणूस म्हणून तिला वागणूक नाकारतो. अशा समाजाचा भाग असल्याचा अभिमान बाळगून आम्हीही भिड का हिस्सा होतो या पेक्षा दुर्देव ते काय असणार !     

                                         00000