स्थळ,नागपुरातील दाभा परिसरातील सुरेश लाँड्री. दुकानाच्या काऊंटरवर उभा झालो आणि आत डोकावतो तर इस्त्रीच्या कपडयांचा भला मोठा ढीग दिसून आला. अशात मी इस्त्रीसाठी कपडयांची पिशवी सोपवताच या लाँड्रीचे मालक सांगते झाले, साहेब कपडे नाही मिळणार तुम्हाला उद्या इस्त्रीचे !, दोन तीन दिवस लागतील. हवं तर दुसऱ्या लाँड्रीत टाका कपडे. आता नियमीत ग्राहक असल्याने मी त्यांना विनवनीच्या स्वरात निदान उद्या एक तर ड्रेस इस्त्री करून द्या, अशी विनंती केली तेव्हा हो नाही करत ते राजी झाले. मग स्वत:हूनच आपली असर्मथता सांगते झाले, बघा साहेब दुकानात कपडयांचा ढीग लागला आहे आणि माझ्याकडील कारागीर कामावर येतनाहीये.थोडया विस्मयाने व आपसूकच मी विचारलं, का नाही येत कारागीर? त्यावर ते प्रश्नार्थक स्वरूपात उत्तर देताना म्हणाले, ‘साहेब, आता या लोकांना घरबसल्या अन्न धान्य, यांच्या बायकांना पैसे यांच्या मुलांना स्टायफेंड मिळते मग नियमित कष्टाच्या कामाला कसे बरे येणार हे कारागीर!’.
मग
त्यांनी एक एक कॅलक्युलेशन सांगायला सुरुवात केली. बघा एका कपडयाच्या इस्त्रीपोटी
( एक शर्ट किंवा पँट इस्त्री करण्यासाठी) ८ रुपये मिळतात. त्यातील ४ रुपये कारागिराला
जातात. उर्वरित ४ रुपयांमध्ये दुकानच भाड आणि वीज बिल असा प्रत्येकी १ रुपया आणि एका
कपडयामागे माझी मिळकत होते फक्त दोन रुपये. लाँड्री मालकाचं आर्थिक गणित समजून घेताना
हे लक्षात आल की, हा प्रकार जणू 'मेहनत करे
मुर्गी ओर अंडा खाये फकीर' या उक्तीला चपखल बसणारा आहे. म्हणूनच काकांना ग्राहक परत
गेला तरी काही फरक पडत नसावा, असं मला वाटलं. त्यात भरीस भर म्हणजे काका सेवानिवृत्त
कर्मचारी आहेत व त्यांना २० हजारांचे मासिक निवृत्तीवेतनही मिळते. मात्र, आयुष्यभर
प्रामाणिकपणे नोकरी करणारे काका घरी बसून राहतील ते काका कसले !.या बद्दल लाँड्री मालकाचे
कौतुकचं. प्रश्न आणि विषयाची मेख इथेच तर दिसून येते की, कारागिरासाठी नोकरी ही ऐच्छिक
झाली आहे आणि हिच बाब मालकाची चिंता वाढवणारी ठरली आहे. हे चित्र शेतीतही दिसून येते.
शेतकऱ्यांना मजूर मिळत नसल्याचे, शेतावर राखनदार मिळत नसल्याचे चित्र आहे. याही पुढेजात
आस्थापणांवर कौशल्यपूर्ण मनुष्यबळ उपलब्ध होत नसल्याचे पदोपदी दिसून येते.
किस्सा क्र. २ : स्थानिक सार्वजनिक वाहनाने
कार्यालय गाठायचा माझा सिरस्ता आजही तसाच होता (त्याच्या मागचं लॉजिक असं की सर्व सामान्यांच्या
आयुष्यात काय घडत आहे. पर्यायाने समाजात काय घडतं हे कळतं.).
सिटीबसच्या चालक व वाहकांचा संप सुरु
असल्याने ऑटो घेतला. बसताच कानावर ऑटोचालक व प्रवासी महिलेचा संवाद ऐकू आला. आमच्याकडे
तर कामगार किट वाटत आहे एक आमदार अन ते घ्यायला तर लोकांची भली मोठी रांग आहे. लोक
रांगेतील आपला नंबर जावू नये म्हणून रात्रभर मुक्काम करतात. त्यात भर घालत ऑटोचालक
म्हणाला, ताई आमच्या भागातही काही चित्र वेगळ नाही अन् या कामगार सुरक्षा व संसार किटसाठी
कागदपत्र लागतात म्हणून झेरॉक्सचे दुकान लावलेत तिथे लोकांनी आणि चक्क एका पानाच्या
झेरॉक्ससाठी २० रूपये आकारतायेत. एवढच काय लोकांनी अल्पोपहाराची दुकानही थाटली आहेत या रांगांच्या आजुबाजुला. एवढयात ऑटोचालकाला घरून
फोन आला तो त्याने ऑटोतील प्रवाशांच्या जीवावर उदार होवून रिसिव्ह केला अन् फोन झाल्यानंतर
त्या महिला प्रवाशा सांगता झाला आमच्या हिचा फोन होता की, किटसाठी नंबर लागला अन आपल्याला
बी किट मिळून रायली.
दोन वेगवेळे प्रसंग आहेत मात्र,यात माणसांना काही गोष्टी/वस्तू/ निधी मिळत असल्याचे आणि यामुळे याच समाजातील अन्य व्यक्ती असमर्थ झाल्याचे चित्र आहे. राज्यात निवडणुकांचे वारे वाहत आहेत या पार्श्वभूमीवर समाजात घडत असणाऱ्या या बदलाचे निरीक्षण येथे चिंतन करायला लावणारे आहे (पण तेही ऐच्छिक आहे म्हणजे ज्यांना करायचे असेल त्यांना अन्यथा दररोज दिवस उगवतो व मावळतोच आहे).
०००००







