Wednesday, October 23, 2024

बृह्ममहाराष्ट्राने निर्माण केली महाराष्ट्राची सशक्त प्रतिमा – ज्येष्ठ पत्रकार प्रभाकर ढगे

 







बृह्ममहाराष्ट्राने निर्माण केली महाराष्ट्राची सशक्त प्रतिमा – ज्येष्ठ पत्रकार प्रभाकर ढगे

 

नवी दिल्लीदि. २४ : महाराष्ट्राचे सामाजिक, सांस्कृतिक नैतृत्व करत राज्याच्या साहित्य, संस्कृती  व्यवहाराला पुढे आणण्याचे कार्य करणा-या बृह्नमहाराष्ट्राच्या चळवळीने राज्याची सशक्त प्रतिमा निर्माण करण्याचे  मोलाचे कार्य केले आहे, असे प्रतिपादन पणजी (गोवा) येथील ज्येष्ठ पत्रकार तथा लेखक प्रभाकर ढगे यांनी आज केले.  

     महाराष्ट्र परिचय केंद्राच्यावतीने आयोजित महाराष्ट्र हीरक महोत्सव व्याख्यानमालेचे सहावे पुष्प गुंफताना बृह्नमहाराष्ट्रातील महाराष्ट्र या विषयावर श्री ढगे बोलत होते.

 

             बृह्नमहाराष्ट्रातील महाराष्ट्र मंडळ, महाराष्ट्र परिचय केंद्र यांनी महाराष्ट्राचे सामाजिक, सांस्कृतिक नैतृत्व करत साहित्य, सांस्कृतिक  व्यवहाराला पुढे आणण्याचे महत्वपूर्ण कार्य केले आहे म्हणूनच  देश व परदेशात ही  महाराष्ट्राची शक्तीस्थळे  ठरली असल्याचे श्री ढगे म्हणाले. अन्य राज्यात मराठी माणसांची  विविध क्षेत्रातील घौड-दौड महाराष्ट्राला पुरक आहे.अखिल भारतीय साहित्य महामंडळ,विश्व साहित्य संमेलन यामाध्यमातूनही बृह्नमहाराष्ट्रात सुरु असलेल्या कार्याला जोडण्याचे व महाराष्ट्र संस्कृतीचे विश्वव्यापी काम झाल्याचे त्यांनी सांगीलते. तसेच या कार्यास  महाराष्ट्रातील जनतेकडून कसा प्रतिसाद मिळतो याची अपेक्षा व प्रतिक्षाही बृह्ममहाराष्ट्रातील जनतेला असते असे ते म्हणाले. देशाच्या विविध प्रांतात व परदेशात आपले स्वत:चे स्थान निर्माण करत असताना आपल्या संस्कृतीला सतत जपणा-या बृहन्महाराष्ट्रातील जनतेसाठी महाराष्ट्रातील जनतेकडूनही काही सहकार्य मिळण्याची वा त्‍यांच्या सादाला प्रतिसाद मिळण्याची अपेक्षा असल्याचेही त्यांनी सांगितले.

 

            मराठी संस्कृती व मराठी भाषेचा प्रसार व संवर्धन करण्यासाठी मराठी नियत कालीके, मराठी शाळा-विद्यालये, ग्रंथालये, संशोधनकार्य आदींच्या माध्यमातून बृह्नमहाराष्ट्रात सुरु असलेल्या उपक्रमांवरही श्री ढगे यांनी प्रकाश टाकला. विचार आणि स्नेहाचे आदान-प्रदान अधिक वृध्दींगत होण्यासाठी बृह्ममहाराष्ट्र आणि महाराष्ट्र यामध्ये दुवा सांधणारी  एक चळवळ राज्यात निर्माण होण्याची गरज असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.बृह्ममहाराष्ट्रात साहित्य निर्मिती प्रमाणेच अनुवादाचेही काम होत असे. मात्र, मराठी भाषेत होणारी साहित्य निर्मिती ही देशातील अन्य भाषांमध्ये हव्या त्या प्रमाणात जात नसल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली. राज्या-राज्यांतील अशा सांस्कृतिक व्यवहारांना गती देण्यासाठी पुढाकार घेतला जावा अशी अपेक्षा श्री ढगे यांनी व्यक्त केली.

 

                       महाराष्ट्र परिचय केंद्र ठरले बृह्नमहाराष्ट्राला जोडणारे दुवे        

‍ि गोवा आणि दिल्ली  येथील  महाराष्ट्र परिच केंद्र आपल्या राज्याचा त्या-त्या राज्यांतील लोकांना परिचय करून देण्याबरोबरच दोन राज्यांचे सांस्कृतिक आणि सामाजिक अनुबंध व संवाद सेतु सांधण्याचे कार्य करीत आहेत. या परिचय केंद्रानी बृह्नमहाराष्ट्राला जोडणा-या दुव्यांप्रमाणे कामगिरी निभवली आहे. हे कार्य प्रत्येक राज्यात वाढत गेले तर महाराष्ट्राचा प्रभाव वाढण्यासाठी पूरक भूमिका साध्य केली जाईल. महाराष्ट्र मंडळ व परिचय केंद्र ही  चाकोरीत काम करणारी  नसून महाराष्ट्राची भूमिका प्रभावीपणे मांडणारी शक्तीस्थळ आहेत. त्यामुळे  यांची व्यापकता वाढवणे गरजेचे ठरेल यांना सोबत घेवून भविष्यात काम करावे लागेल ,असे श्री ढगे म्हणाले.

महाराष्ट्राने इतिहासात गौरवास्पद कामगिरी केली आहे व वर्तमानात उल्लेखनी कामगिरी करीत आहे आणि भविष्यातही या राज्याला वैचारीक नैतृत्व करण्याची संधी लाभणार आहे. या वैचारीक वारशाचा व औद्योगितकतेचा वसा पुढे नेत असताना एक प्रगल्भ विकास पूरक व पुरोगामी राज्य म्हणून महाराष्ट्राने बृह्ममहाराष्ट्रातील ही  आपली जनसंपर्काची  साधने अधिक सशक्त करण्याची गरज आहे. भविष्यात ही साधने सशक्त झाल्यास महाराष्ट्र हे केवळ राज्याच नाही तर महाराष्ट्र हा एक विचार असेल, एक चळवळ असेल महाराष्ट्र ही देशाला जोडणारी व्यापक अर्थाने सशक्त भूमिका असेल असा विश्वास श्री. ढगे यांनी व्यक्त केला.

                        

 आमच्या ट्विटर हँडलला फॉलो करा :  https://twitter.com/MahaGovtMic

                                                         ००००

रितेश भुयार  /वृत्त वि. क्र.६० /दिनांक  २३.०३.२०२१

मराठी पत्रकारितेला दिल्लीत मोलाचे स्थान - ज्येष्ठ पत्रकार अनंत बागाईतकर

 





मराठी पत्रकारितेला दिल्लीत मोलाचे स्थान - ज्येष्ठ पत्रकार अनंत बागाईतकर

नवी दिल्ली,३० : देशाची राजधानी असलेली दिल्ली हा पत्रकारिता क्षेत्रासाठी समुद्र आहे. यात मराठी पत्रकारितेला अनन्यसाधारण महत्व असून मराठी पत्रकारांनी उत्तम कार्यातून दिल्लीत आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे,असे मत ज्येष्ठ पत्रकार तथा दैनिक सकाळ नवी दिल्लीच्या वृत्त विभागाचे प्रमुख अनंत बागाईतकर यांनी आज व्यक्त केले.  

            महाराष्ट्र परिचय केंद्राच्यावतीने आयोजित महाराष्ट्र हीरक महोत्सव व्याख्यानमालेचे बारावे पुष्प गुंफताना दिल्लीतील मराठी पत्रकारिता या विषयावर श्री बागाईतकर बोलत होते.

            दिल्लीतील मराठी पत्रकारिता, तिचे स्वरूप व या पत्रकारितेचा होत गेलेला विकास हा पट श्री बागाईतकर यांनी विविध घटनांचा उल्लेख करत व दाखले देत उलगडला. दिल्लीतील  महाराष्ट्र परिचय केंद्राची येथील मराठी पत्रकारितेच्या विकासातील महत्वाच्या भूमिकेवरही त्यांनी प्रकाश टाकला.

            सुरुवातीच्या काळात मराठी वृत्तपत्रांची दिल्लीत प्रतिनिधी नेमण्याबाबत असलेली उदासिनता आणि याचकाळात लेखक तथा पत्रकार जयंतराव टिळक यांनी दैनिक केसरीचे विशेष प्रतिनिधी म्हणून चमकदार कार्य करून मराठी वृत्तपत्रांची दूर केलेली उदासिनता यावर श्री बागाईतकर यांनी भाष्य केले. जयंतराव टिळकांनी मराठी  वाचकांना दिल्लीतील घडामोडी पुरविल्या. त्यांच्या अशी ही दिल्ली या साप्ताहिक सदरातून मराठी वाचकांना नियमीत माहिती मिळत असे .पुढे या सदारावर पुस्तक स्वरूपात दोन खंड प्रकाशित झाले ते वाचनीय आहेत, असे श्री. बागाईतकर म्हणाले. त्यानंतर दैनिक केसरीचे प्रतिनिधी म्हणून राजाभाऊ कुलकर्णी आले त्यांचीही वार्तापत्र खूप गाजली.

                                           बापुसाहेब लेले ; मराठी पत्रकारांसाठी आधारवड

        महाराष्ट्रातून दिल्ली या परमुलुखात आल्यावर येथील भाषा, संस्कृती, वातावरण या विपरीत परिस्थितीत काम करताना सुरुवातीला पत्रकारांना अडचणी येतात. मात्र, ज्येष्ठ पत्रकार बापुसाहेब लेले हे दिल्लीत येणा-या मराठी पत्रकारांसाठी आधारवडच होते. दिल्लीतील पत्रकारितेत आपली वेगळी छाप सोडणारे श्री. लेले यांचा उत्साह विलक्षण दांडगा होता तसेच ते मृदू स्‍वभावाचे होते.महाराष्ट्रातून दिल्लीत आलेल्या नवीन पत्रकारांना त्यांचा आधार वाटत असे. ते या पत्रकारांची आस्थेने चौकशी करत व त्यांना आवश्यक मदत करीत. मो .ग. तपस्वी हे मराठी पत्रकार मात्र, शिस्तीचे भोक्ते होते. दिल्लीत आलेल्या नवीन मराठी पत्रकारांच्या लिखाणातील त्रृटी दाखवून ते आस्थेने  समजावून सांगत व  मार्गदर्शन करत. हा काळ संपल्यानंतर वि.ना.देवधर हे महाराष्ट्र टाईम्सचे प्रतिनिधी  म्हणून दिल्लीत आले त्यांच्याकात दिल्लीत महत्वाच्या घडामोडी घडल्या.

            गंगाधर इंदूरकर यांनी दिल्लीत हिंदी वृत्तपत्रामध्ये आपली वगेळी ओळख निर्माण केली होती.  यानंतर ब-याच मराठी पत्रकारांनी  दिल्लीतील अमराठी माध्यमांमध्ये उत्तम कार्य केल्याचे सांगून सुभाष किरपेकर, मधु साठे, सुनिल गाताळे ,व्यंकटेश केसरी  यांच्या कार्याचा उल्लेख श्री बागाईतकर यांनी यावेळी केला.

                                          मराठी वृत्तपत्रांना पटले दिल्लीचे महत्व

            पत्रकाराच्या अंगभूत वैशिष्टयांसह त्यांच्याकडून मराठीतून विश्लेषण, भाष्य हे वाचकांपर्यंत पोहचावे यासाठी महाराष्ट्रातील वृत्तपत्रांना आपला दिल्लीत प्रतिनिधी असावा अशी निकड वाटू लागली. मराठी लेखणीतून दिल्लीतील घडामोडी येणे गरजेचे वाटू लागले व पुढे आघाडीच्या वृत्तपत्रांनी दिल्लीत आपले प्रतिनिधी पाठवायला सुरुवात केली. गोविंदराव तळवलकर महाराष्ट्र टाईम्सचे संपादक असताना त्यांनी अशोक जैन यांना महाराष्ट्र टाईम्सचे प्रतिनिधी म्हणून पाठविले तर माधवराव गडकरी दैनिक सकाळच्या मुंबई आवृत्तीचे संपादक असताना त्यांनी विजय नाईक यांना दिल्लीत पाठविले. लोकसत्ताने श्री पेंडसे यांना प्रतिनिधी म्हणून नियुक्त केले असा संदर्भही श्री बागाईतकर यांनी  दिला.

            दिल्लीतील आर्थिक, राजकीय, सामाजिक आदी घडमोडींमध्ये महाराष्ट्राचे स्थान राष्ट्रीय वृत्तपत्रातून आवश्यक तेवढे प्रदर्शित होत नाही. हे स्थान विस्ताराने व तपशीलाने व ठळकपणे देण्याचे काम मराठी पत्रकारांनी केले. महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींच्या मागे असलेले दिल्लीतील धागे-दोरे तसेच आतली माहिती देण्याचे काम या पत्रकारांनी केल्याचे त्यांनी सांगितले.

            पत्रकारितेचा विकास व विस्तार होत गेला त्यानुसार मराठीतील अग्रगण्य वृत्तपत्रांनी दिल्लीत प्रतिनिधींची संख्या वाढवली. आधी वृत्तपत्रीय पत्रकारितेचा काळ होता आता इलेक्ट्रॉनीक माध्यमांचे युग आले आहे, आता त्यांनीही आपले प्रतिनिधी नेमले आहे. दिल्लीत वृत्तपत्र  व वृत्त वाहिन्यांचे ब्युरो कार्यालय स्थापन झाले व त्यात प्रतिनिधींची संख्याही वाढली. आणि हळू हळू दिल्लीतील मराठी पत्रकारिता बहरत गेली ही स्वागतार्ह बाब असल्याचे  मत श्री बागाईतकर यांनी मांडले.

                           प्रेस क्लब ऑफ इंडियांच्या स्थापनेत मराठी पत्रकाराचे योगदान

       प्रेस क्लब ऑफ इंडिया या पत्रकारितेतील महत्वाच्या संस्थेच्या स्थापनेतही मराठी पत्रकाराचे योगदान असल्याचे त्यांनी सांगितले. टाईम्स ऑफ इंडियामध्ये कार्यरत दि.रा.मकनेकर हे प्रेसक्लबचे संस्थापक सरचिटणीस हाते. पुढे या संस्थेत दिल्लीतील मराठी पत्रकारांनी विविध भूमिका सक्षमपणे वठविल्या.  दिल्लीतील मराठी पत्रकारितेला अनन्यसाधारण महत्व आहे. हा वारसा यापुढे आणखी विकसीत होण्यासाठी प्रयत्न व्हावेत,असे आवाहन श्री बागाईतक यांनी केले .       

 महाराष्ट्र परिचय केंद्राच्या अधिकृत व्टिटर हॅण्डलला फॉलो करा :

        http://twitter.com/micnewdelhi

                                                   ०००००

रितेश भुयार /वृत्त.विक्र.७१ /दिनांक ३०.०३.२०२ 

 

Thursday, October 10, 2024

असमर्थतेची कुजबुज


                                          

         स्थळ,नागपुरातील दाभा परिसरातील सुरेश लाँड्री.  दुकानाच्या काऊंटरवर उभा झालो आणि आत डोकावतो तर इस्त्रीच्या कपडयांचा भला मोठा ढीग दिसून आला. अशात मी इस्त्रीसाठी कपडयांची पिशवी सोपवताच या लाँड्रीचे मालक सांगते झाले, साहेब कपडे नाही मिळणार तुम्हाला उद्या इस्त्रीचे !, दोन तीन दिवस लागतील. हवं तर दुसऱ्या लाँड्रीत टाका कपडे. आता नियमीत ग्राहक असल्याने मी त्यांना विनवनीच्या स्वरात निदान उद्या एक तर ड्रेस इस्त्री करून द्या, अशी विनंती केली तेव्हा हो नाही करत ते राजी झाले. मग स्वत:हूनच आपली असर्मथता सांगते झाले, बघा साहेब दुकानात कपडयांचा ढीग लागला आहे आणि माझ्याकडील कारागीर कामावर येतनाहीये.थोडया विस्मयाने व आपसूकच  मी विचारलं, का नाही येत कारागीर? त्यावर ते  प्रश्नार्थक स्वरूपात उत्तर देताना म्हणाले, ‘साहेब, आता या लोकांना घरबसल्या अन्न धान्य, यांच्या बायकांना पैसे यांच्या मुलांना स्टायफेंड मिळते मग नियमित कष्टाच्या कामाला कसे बरे येणार हे कारागीर!’.

 

        मग त्यांनी एक एक कॅलक्युलेशन सांगायला सुरुवात केली. बघा एका कपडयाच्या इस्त्रीपोटी ( एक शर्ट किंवा पँट इस्त्री करण्यासाठी) ८ रुपये मिळतात. त्यातील ४ रुपये कारागिराला जातात. उर्वरित ४ रुपयांमध्ये दुकानच भाड आणि वीज बिल असा प्रत्येकी १ रुपया आणि एका कपडयामागे माझी मिळकत होते फक्त दोन रुपये. लाँड्री मालकाचं आर्थिक गणित समजून घेताना हे लक्षात आल की, हा प्रकार जणू  'मेहनत करे मुर्गी ओर अंडा खाये फकीर' या उक्तीला चपखल बसणारा आहे. म्हणूनच काकांना ग्राहक परत गेला तरी काही फरक पडत नसावा, असं मला वाटलं. त्यात भरीस भर म्हणजे काका सेवानिवृत्त कर्मचारी आहेत व त्यांना २० हजारांचे मासिक निवृत्तीवेतनही मिळते. मात्र, आयुष्यभर प्रामाणिकपणे नोकरी करणारे काका घरी बसून राहतील ते काका कसले !.या बद्दल लाँड्री मालकाचे कौतुकचं. प्रश्न आणि विषयाची मेख इथेच तर दिसून येते की, कारागिरासाठी नोकरी ही ऐच्छिक झाली आहे आणि हिच बाब मालकाची चिंता वाढवणारी ठरली आहे. हे चित्र शेतीतही दिसून येते. शेतकऱ्यांना मजूर मिळत नसल्याचे, शेतावर राखनदार मिळत नसल्याचे चित्र आहे. याही पुढेजात आस्थापणांवर कौशल्यपूर्ण मनुष्यबळ उपलब्ध होत नसल्याचे पदोपदी दिसून येते.

      किस्सा क्र. २ : स्थानिक सार्वजनिक वाहनाने कार्यालय गाठायचा माझा सिरस्ता आजही तसाच होता (त्याच्या मागचं लॉजिक असं की सर्व सामान्यांच्या आयुष्यात काय घडत आहे. पर्यायाने समाजात काय घडतं हे कळतं.).

सिटीबसच्या चालक व वाहकांचा संप सुरु असल्याने ऑटो घेतला. बसताच कानावर ऑटोचालक व प्रवासी महिलेचा संवाद ऐकू आला. आमच्याकडे तर कामगार किट वाटत आहे एक आमदार अन ते घ्यायला तर लोकांची भली मोठी रांग आहे. लोक रांगेतील आपला नंबर जावू नये म्हणून रात्रभर मुक्काम करतात. त्यात भर घालत ऑटोचालक म्हणाला, ताई आमच्या भागातही काही चित्र वेगळ नाही अन् या कामगार सुरक्षा व संसार किटसाठी कागदपत्र लागतात म्हणून झेरॉक्सचे दुकान लावलेत तिथे लोकांनी आणि चक्क एका पानाच्या झेरॉक्ससाठी २० रूपये आकारतायेत. एवढच काय लोकांनी अल्पोपहाराची दुकानही थाटली आहेत  या रांगांच्या आजुबाजुला. एवढयात ऑटोचालकाला घरून फोन आला तो त्याने ऑटोतील प्रवाशांच्या जीवावर उदार होवून रिसिव्ह केला अन् फोन झाल्यानंतर त्या महिला प्रवाशा सांगता झाला आमच्या हिचा फोन होता की, किटसाठी नंबर लागला अन आपल्याला बी किट मिळून रायली.

       दोन वेगवेळे प्रसंग आहेत मात्र,यात माणसांना काही गोष्टी/वस्तू/ निधी मिळत असल्याचे आणि यामुळे याच समाजातील अन्य व्यक्ती असमर्थ झाल्याचे चित्र आहे. राज्यात निवडणुकांचे वारे वाहत आहेत या पार्श्वभूमीवर समाजात घडत असणाऱ्या या बदलाचे निरीक्षण येथे चिंतन करायला लावणारे आहे (पण तेही ऐच्छिक आहे म्हणजे ज्यांना करायचे असेल त्यांना अन्यथा दररोज दिवस उगवतो व मावळतोच आहे).                                          

                                   ०००००


 

Friday, August 23, 2024

‘उन्हाळे-पावसाळे पाहिलेला जनसेवक’

 





‘उन्हाळे-पावसाळे पाहिलेला जनसेवक’

 मी, तसा खरा खुरा २४ तास जनसेवक. दररोज अगणीत वेगवेगळे चेहरे असलेले व चेहऱ्यावर मुखवटे म्हणजे हेलमेट पांघरलेले वाटसरू सतत मला भेटतात.आज यात आणखी भर पडली ती बॅनर,पोस्टर्स अन् झेंड्यांची. एका नेत्याच्या नागपुरातील आगमनासाठी हे शहर सज्ज असल्याचे लिहिलेले संदेश सर्वत्र झडकत आहेत. फ्लॅशबॅकमध्ये जाताना मला मागच्या वर्षी याच शहरात आयोजित सी-२० (जी -२०अंतर्गत) परिषदेसाठी माझ्या आजुबाजूला करण्यात आलेले सुशोभिकरण ठळकपणे आठवते.परदेशी पाहुण्यांना हे शहर आणि विशेषकरून आमचा परिसर सुंदर नेटका दिसावा म्हणून बऱ्याच गोष्टींची रेलचेल होती. महागडे सिंथेटिक पट्टे, हिरव्या लुसलुसीत गवताच्या चादरी पसरविण्यात आल्या, झाडांवरील खास रोषणाई , परबोला असे कितीतरी प्रकार मी नव्यानेच बघितले. शहरातील तरुणाई हे सुशोभिकरण आप-आपल्या मोबाईलमध्ये टिपून सोशल मिडीयाच्या माध्यमातून जगभर पोचवित होते आणि माझ्या अवतीभोवती माणसांचा पूर त्याकाळात मी बघितला.

यानंतर शहरात पार पडणारा हिवाळी अधिवेशनाचा वार्षिक उत्सव तर मला फारच प्रिय. या काळात माझ्या आजुबाजुला प्रशासकीय गाडयांचा ताफा,मंत्र्यांच्या गाडयांचे हॉर्न , शासकीय नस्त्यांनी लोडेड  वाहन असा हा काळ.त्याच काळात आपआपल्या नेत्यांचे होर्डिंग्ज,बॅनर ,झेंडे लावणारे सर्व राजकीय पक्ष याकाळात माझी जास्तच दखल घेतात. मग जत्रा उठल्यावर जसे पाल पांगतात. तसे सर्व आल्यामार्गी आपआपल्या गंतव्यस्थळी परतल्यानंतर मी आपला तोच पाढे पंधरा करत नित्यक्रमात गुंतून  जातो. निवडणुका,नेत्यांचे वाढदिवस,वेगवेगळे आयोजन असली की तेच रेलचेल मी अनुभवतो. आणि आता ते नित्याचेच झाले.

एरवी काही महनिय व्यक्तीमत्वांच्या धुळखात पडलेल्या व जयंतीच्या दिवशी तेवढे स्वच्छ होणाऱ्या पुतळयांखेरीज, राजा राणी आणि नागपूरचा स्थानिय पक्षी एवढाचा माझा गोतावळा आमच्यातच आम्ही मशगुल असतो. माझ्या जन्माचा शोध घेता एक गोष्ट लक्षात आली की, मी एक साधा जमिनीचा तुकडा. मग कुण्या नेत्या, अधिकाऱ्याच सुपिक डोक्यात आलेल्या कल्पनेतून कोण्या अभियंत्याने मला आकार देण्याचा प्रयत्न केला . आणि त्यावर रेती, माती, डांबर असे तत्सम जिन्नस वापरून मला तयार केला आणि असे तसे माझे बाडसे घातले, होय मी सिव्हील लाईन्स परिसरातील रस्ता बोलतोय.(बोले पेट्रोलपंप चौक ते उच्च न्यायालय चौक हा रस्ता).

                                          00000000

  

 

आपुले मरण पाहिले म्या डोळा……..

 




आपुले मरण पाहिले म्या डोळा……..

प्रसंग आहे नागपूर-अमरावती रोडवरील दाभा परिसरातील मारुती शो रुम अर्थात सेवा येथील. दाभ्यातून आलो व येथील टी पॉईंटवर सिटी बस किंवा ऑटो घेवून कार्यालय जवळ करण्याचा दररोजच्या शिरस्ता आजही काही वेगळा नव्हता. ऑटोला हात दिला तसा तो थांबलाही. ऑटोत आधिच डबल डेकरच्या व्यवस्थेमुळे सहा लोक कोंबली असल्याने माझ्या वाटयाला चालकाजवळ बसण्याचाच पर्याय होता. हे पाहून मी ही त्याच्या डाव्या बाजुने जावून बसण्याच्या बेतात होतो. पण चालक महाशय म्हणाले, त्या बाजुला या अर्थात त्यांच्या उजव्या बाजुला जावून बसायच होत. ऑटोला समोरुन वळसा घालून बसण्याच्या बेतात निघालो तोच  ऑटोमागून भरधाव वेगाने एक कार आली, थोडा टाईमींग जर का चुकला असता तर अनर्थ टळला नसताच. असा हा बाका प्रसंग स्वत:वर गुदरल्याने ‘आपुले मरण पाहिले म्या डोळा..’ असाच  हा काहीसा अनुभव आला. ऑटोत बसताना चालकाला ओरडलो तर तोच माझ्यावर डाफरत म्हणाला, तुम्हाला बघून बसता नाही येत का!

सहप्रवासी हेच या घटनेचे मुकदर्शक.ऑटोत बसलो आणि बर्डीकडे प्रवास सुरु झाला. या प्रवासात घडलेल्या प्रसंगाचे चिंतन करत राहिलो. त्यातून निष्कर्ष हाती आला की, ‘दुर्घटना घडली असती आणि याचे कारण ठरले असते तिघांचा बेजबाबदारपणा.’ त्याचे विश्लेषण करू जाता पहिली बेजबाबदार व्यक्ती ठरते ऑटोचालक. चरितार्थासाठी ऑटो चालविण्याचे कर्तव्य हे प्रवाशांची सुरक्षा आपल्यावर असल्याच्या जबाबदारीतूनच पूर्णत्वास जाते याचा बहुतांशवेळी विसर पडलेला जाणवतो. मग चालक कोणत्याही वाहनाचा असो नियम सारखाच. म्‍हणजे वाहतुकीच्या नियमानुसार ऑटो चालकाने प्रवाशाला आपल्या शेजारील जागा देताना सर्वप्रथम डाव्या बाजुच्या जागेवर प्रवाशास बसायला सांगावे. (कारण रस्त्याने येणारी वाहणेही उजव्याबाजुने येवून पुढे जात असतात आणि अशात काही अनुचीत घडल्यास प्रवाशाचे रक्षण होईल.)

मग तुम्हाला वाटेल की मुळात ऑटोचालकाने आपल्या सिटवर अन्य प्रवाशांना बसविणे हेच प्रथमत: वाहतूक नियमाचे उल्लंघन ठरते. मान्य. पण, वाढून ठेवलेल्या गरजा पूर्ण करण्यासाठी या पृथ्वीतलावर सर्वचजण अधिक मिळविण्याच्या शर्यतीत आपल्याला पुढे ठेवण्यात धन्यता मानतात, त्यामुळे चार-दोन प्रवासी जास्त बसवून त्याने आपली दिवसाची आमदनी वाढवणेही त्या अर्थाने गैर नसावी. पण अर्थारजनात जबाबदारीही  तर महत्वाची आहेच ना ! त्याच काय ? प्रवाशांची ने-आण करणे एवढेच काम नसून त्यांना सुरक्षित गंतव्यस्थळी पोचविणे या जबाबादारीतून आलेले ते कर्तव्य आहे. याचा बहुतेकांना विसर पडतो, तो मात्र पडालयला नको. तो जसा आज या ऑटो चालकाला पडला आणि त्यातून अनर्थ होताहोता टळला.  त्याची जाणीव मी त्याला ऑटोतून उतरताना सर्व सह प्रवशांसमोर करून देताना म्हटलेले वाक्य असे, ‘भाऊ पुढच्यावेळी प्रवाशाला उजव्या बाजुने बसण्याचा हट्ट टाळा आणि दुसऱ्यासह स्वत:चा जीव वाचवा, जबाबदार चालक व्हा.’ यावर तो काही उत्तरतो का याची वाट पाहत मी प्रवास भाडं दिलं मात्र, त्यावर चकार शद्ब न काढता त्याने मान डोलवली अन मी मार्गस्थ झालो.

दुसरा बेजबाबदार ,मी. ऑटोत बसण्यासाठी निघताना मागच्या बाजुने कोणते वाहन येत आहे किंवा नाही याची शाहनिशा करूनच मी ऑटोत बसायला हवे होते. अशात अनर्थ झाला असता तर मी एक जबाबदार नागरीक ,मुलगा, नवरा, बाप, भाऊ खचितच ठरलो असतो. आपणही कोणाचे कोणीतरी आहोत त्यामुळे आपल्या अशा बेजबाबदार वागण्याने आपण त्यांच्यापासून कायमचे दुरावू शकतो याची प्रकर्षाने जाणीव झाली. यापुढे काळजी घेण्याचा मनोमन निश्चय केला.

   तिसरी बेजबाबदार व्यक्ती म्हणजे, मागून भरधाव वेगाने येणारा कार चालक. आपण ज्या रस्त्याने जात आहोत. तिथे प्रत्येक चौक, टी पॉईंट व तत्सम थांबे लक्षात घेता गाडीचा वेग कमी ठेवणे ही प्रत्येक वाहन चालकाची जबाबदारी आहे. त्याचा विसर पडला की इतरांचा घात करून संबंधित व्यक्तींसह सर्वांच्या आयुष्यात कायम जिव्हारी बसणारा शद्ब ‘अपघात’ उच्चारणे व स्वीकारण्याची अपरिहार्यताच तेवढी उरते.

सरते शेवटी, आयुष्य सुंदर आहे तसेच ते पाण्याच्या बुडबुड्यासम आहे. याची प्रचिती आपल्याला कधिही येवू शकते . ते टाळण्यासाठी मात्र सर्वांनाच जबाबदार बणावे लागेल हा या प्रसंगातील धडा तेवढा शिल्लक राहतो.

                                             ००००००

Wednesday, August 21, 2024

हॅलो ब्रेव्ह गर्ल ………

 





हॅलो ब्रेव्ह गर्ल ………

            ऑफिसला पोचायची लगबग, अशात जीपीओ चौकात(नागपुरातील सिव्हील लाईन परिसर) आलो सिग्नल लागल्याने एकामागोमाग पाच स्कुल बस उभ्या होत्या. रसत्याच्याकडेला शिस्तीत पायी जाणारा मी एव्हाना कानावर पडलेल्या एका हाकेने स्तिमीत झालो , सांदिपनी शाळेच्या बसमधील जेमतेम पहिल्या दुसरीतील शाळकऱ्यांमधील निर्वाकार ,निरागस मुलींनी हात उंचावून ‘हाय अंकल,हाय अंकल…’ म्हणत साद दिली. त्याला हलके स्मीत करून प्रतिसाद देत ‘हॅलो ब्रेव्ह गर्ल्स’ म्हणत मी पुढे जात होतो. आता पाचही स्कुलबसमधून तीच हाक तोच उत्साह आणि त्याला माझा सारखा प्रतिसाद देण सुरु होतं. चिमुरडया मुलींना दिलेला आजचा प्रतिसाद हा माझ्यासाठी खास होता कारण, नुकतेच एक लेक्चर देवून आलो आणि त्यात मुली महिलांवरील अत्याचाराच्या घटना थांबवायच्या असतील तर आपल्याला त्यांच्यासोबत वागण्यात जाणीवपूर्वक बदल करावा लागेल असं मी म्हणालो. मुलींसाठी  इंटेलिजंट,ब्रेव्ह आदी शद्ब उच्चारणे हा माझ्या लेक्चरमधील एक भाग होता त्या स्कुलबस मधील मुलींच्या हाकेला ओ देतांना हॅलो ब्रेव्ह गर्ल म्हणून मी स्वत: पासून त्याची सुरुवात केल्याचं समाधान मला लाभलं.

            आपल्या दैनंदिन जीवनात मुली किंवा महिलांप्रतीच्या भावना वा वागणुकीतून बराच परिणाम घडतो असे मला वाटते. म्हणजे घरात अमक्या गोष्टी मुलींनीच करायच्या तमक्या गोष्टी फक्त मुलांनीच करायच्या असतात तो मुलींचा प्रांत नाही असे दंडक आपणच निर्माण करून माणूस म्हणून त्यांचं अस्तीत्व नाकारल असतं. आणि मुलगी म्हणून तिच्याकडून वागण्याच्या अपेक्षांचा डोंगर उभा करून ठेवलेला असतो. मग ती तशी वागली नाही तर मग ती वाईट किंवा उरमट असे सोयीचे शेरेही आपण चिटकवून मोकळे होतो. माझा तर एका गोष्टीवर ठाम विश्वास आहे की, ‘मुलगा- मुलगी ही निसर्गाने किंवा शरीर विज्ञानाने घडणारी गोष्ट आहे जी एक सुदृढ समाज निर्माण करण्यासाठीची व्यवस्था आहे.त्याचा जसा आदर होतो तसा तिचाही आदर व्हायला हवा आणि त्याची सुरुवातही स्वत:च्या घरातून व्हावी लागेल. सजग पालक म्हणून मुलगा मुलगी भेद न करता सर्व संधी सेवा समान उपलब्ध करून द्याव्या लागतील.’

 या सोबतच एक महत्वाची बाब निरीक्षणातून पुढे आली की, मुलींना सुंदर,सालस,निरागस आणि टोकाचं सागांयच झाल तर सेक्सी असे बिरुद लावली जातात. आणि ती ही त्या बिरुदाला साजेशी सुंदर,सालस,निरागस व सेक्सी दिसण्याकडे वागण्याकडे कसोसीने लक्ष देते.

            आता मुलींना मुलांच्या खांद्याला खांदा लावून चालण्यासाठी आपल्यालाही ही बिरुद बदलावी लागतील इंटेलिंजंट, ब्रेव्ह, शार्प, टॅलेंटेड असे बुरुद लावावी लागतील जेणे करून या बिरुदावल्या त्यांच्या जगण्याचा भाग होतील व त्या प्रत्यक्षात आणण्यासाठी त्याही धडपडतील. नाही तर देवत्व बहाल करून  तिची आराधना, पुजा करणारा समाज मंदिरातून आल्यावर तिलाच काय वागणूक देतो हेही सांगणे नलगे.

            माणूस म्हणून स्त्रिचा स्वीकार आणि तिच्या प्रती आदरातूनच हा प्रवास एका सकारात्मक दिशेने पुढे जाऊ शकतो. त्यासाठी स्वत:पासून व सजगतेने सुरुवात व्हावी लागेल. आजच्या ‘हॅलो ब्रेव्ह गर्ल’ या संबोंधनाने का होईना एक नवी सुरुवात झाली आहे. हा संदेश आता सर्वदूर पोचवून त्याला व्यापक स्वरुप द्यायचे आहे.

                                                         ००००००   

   


Friday, March 8, 2024

विदर्भाच्या गुणी कलाकारांनी 'तेरवं' चित्रपटातून मांडली एकल महिलांची संघर्ष गाथा






               कुटुंब,समाज आणि शासकीय यंत्रणा यांच्याशी निकराचा लढा देत कायमचा संघर्ष अनुभवणाऱ्या
आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या एकल महिलांचा यशस्वी संघर्ष  दिग्दर्शक हरिष इथापे यांनी 'तेरवं' या चित्रपटाद्वारे मांडला आहे. चित्रपटाच्या एकूण निर्मिती प्रक्रियेमध्ये प्रत्यक्ष एकल महिलांसह विदर्भातील जवळपास ९० टक्के कलाकारांचा सहभाग, चित्रपटातील लोकेशन्स, चित्रीकरण आणि खास वैदर्भीय भाषेतील श्याम पेठकर यांची पटकथा ही या चित्रपटाची बलस्थानं ठरली आहेत.

      विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यामध्ये शेतकरी आत्महत्यांचा प्रश्न उभा राहिला आणि हा सामाजिक प्रश्न कसा आहे, हे अधोरेखित करण्यासाठी मोठ्या प्रमाणात साहित्य,नाट्य निर्मिती आदी माध्यमातून भाष्य झाले आहे. मुळात ‘तेरवं’ या मूळ नाटकातून निर्माण झालेला ‘तेरवं’ हा चित्रपट एकल महिलांच्या प्रश्नांची महत्वाची व दुर्लक्षित बाजू अधोरेखित करतो. परिस्थितीला शरणांगती पत्करून शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यानंतर त्यांच्या विधवांना कुटुंबात मिळणारी कष्टप्रद वागणूक, समाजाचा त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टीकोन आणि सरकारी यंत्रणांमध्ये तिला हक्क मिळविण्यासाठी करावा लागणारा संघर्ष आजपर्यंत चित्रपटाच्या माध्यमातून पुढे आला नव्हता. हे शिव धनुष्य लिलया पेलण्याचं काम निर्माते  नरेंद्र जिचकार यांच्या पुढाकाराने उभ राहिलं.

       नाटक आणि चित्रपट या दोन्ही माध्यमांचे तंत्र वेग-वेगळे असल्याने बऱ्याच ठिकाणी या फॉरमॅटमध्ये येणाऱ्या अडचणी व काही ठिकाणी दिग्दर्शकाला घ्यावं लागलेलं स्वातंत्र्य अशी उत्तम सरमिसळ करत हा चित्रपट प्रेक्षकांना सुरुवातीपासून ते अगदी शेवटपर्यंत खिळवून ठेवतो.

    चित्रपटाची सुरुवातच गावाच्या वेशीवरील रोहित्रावर ( ट्रान्सफॉर्मर) चढून आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या दृष्याने होते.गावातील लोक त्या शेतकऱ्याला खाली काढतात आणि ही शेतकरी आत्महत्या नोंदवून घेण्यासाठी तथाकथित दलालाची व शेतकऱ्याच्या भावाची उठाठेव सुरू असते. पतीच्या आत्महत्येची बातमी शेतकऱ्याच्या पत्निला कळताच तिने फोडलेला हंबरडा असं कथानक पुढे सरकत जातं. दलालाने उसकवल्यामुळे तहसिल कार्यालयासमोर प्रेत ठेवून आंदोलन करणारे लोक अस दृष्य असताना चित्रपटाची नायिका जनाचा प्रवेश होतो आणि तहसिलदाराला भेटून ही मागणी चुकीची आहे आणि यासाठी शेतकऱ्याच्या भावाने दलाला किती पैसे दिले हे वास्तव ती पुढे आणते आणि हे प्रेत उचलून त्यावर अंत्यसंस्कार करण्याचे सांगते. इकडे विधवा झालेल्या महिलेला तेरव मंडळ तेरवीचं आमंत्रण देतात . 

                  तेरवीच्या दिवशी या विधवेला आपल्या तेरव मंडळात आणून  तिच्या आयुष्यात फार मोठे आभाळ कोसळल्याची तिच्या मनाची घालमेल दूर करून  साडी-चोळी देत तिच्या मनावरील ओझं कमी करण्याचं काम जनाच्या तेरव मंडळातील सर्व महिला करतात आणि त्या विधवेला बळ देतात.मात्र, नवऱ्याच्या  तेरवीचा कार्यक्रम आटोपल्यानंतर दीर आणि सासू शेतीच्या कागदपत्रावर बळजबरीने स्वाक्षरी घेऊन तिला घराबाहेर काढतात.हा विषय दाखवताना जनाचं पूर्व आयुष्यही या चित्रपटात डोकावत.जनाला मुळात दोन भावंड. एक बहीण एक भाऊ. आई सर्पदंशाने गेलेली. जनाला शिकायचं होतं, बिएड करायचं होतं.मात्र, शेतकरी व वयोवृध्द वडिलांची हलाखीची परिस्थिती असल्याने ते जनाला शिकवू शकत नाहीत आणि तिचं लग्न लावून देतात.

        सासरी जाऊन जनाच्या व्यक्तिमत्वातील करारी बाणा, तिचा संघर्ष यास पतीची साथ मिळते आणि ती व्यवस्थेसोबत संघर्ष करते. हे सर्व कथानक पुढ सरकत जातं.कथानकामध्ये दिग्दर्शकाने भुलाबाईची (भोंडल) गाणी, पाऊस पडवा  म्हणून  'धोंडी धोंडी पाणी दे' असं म्हणत गावोगावी निघणाऱ्या धोंड्या, अशा ग्रामीण परंपरा चित्रपटांमध्ये उत्तमरित्या पेरल्या आहेत.

     वडिलांची परिस्थिती बेताची असल्यामुळे बहिणीला शिक्षण न करता लग्न करावं लागल म्हणून 'ज्या घरात मला शिक्षण मिळत नाही, अशा गरीब शेतकऱ्याच्या घरात मला जन्माला घालू नको,देवा.' असं म्हणत आत्महत्या करणारी जनाची बहीण. आणि आपल्या नणंद  सोबत हा प्रकार घडू नये म्हणून तिला शिक्षणासाठी आपल्या सासू-सासऱ्याचा विरोध पत्करून बाहेरगावी पाठविणाऱ्या जनाचा करारी बाणा पटकथेतून आणि नायिकेच्या तोंडी आलेल्या समर्पक संवादातून अधिक प्रभावीपणे मांडण्यात आला आहे.

        स्व.राजा बढे ,श्याम पेठकर आणि ज्ञानेश वाकुडकर यांची गीते या चित्रपटातील आणखी एक बलस्थान असून ती समयोचितपणे मांडण्यात आली आहेत.आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांच्या विधवांना एकजुट करून बचतगट, दारूबंदी सारखे उपक्रम राबवत या एकल महिलांची पॉवर बॅंक म्हणून जना या चित्रपटात प्रेक्षकांच्या समोर येते. यवतमाळ येथे भरलेल्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या मंचाहून शेतकऱ्यांच्या प्रश्नावर शासन, प्रशासन आणि राजकारणी  यांच्याकडून अपेक्षित असलेली भूमिका परखडपणे मांडणारी जना या चित्रपटाच्या केंद्राभोवती आहे. या सर्व संघर्षात तिची  गांधीवादी विचारांवरील श्रद्धा या चित्रपटाच्या समारोपात दिसून येते.

     जनाची भूमिका वठवणाऱ्या किरण खोजे आणि तिच्या पतिच्या भूमिकेत संदीप पाठक व  भासऱ्याच्या भूमिकेत किरण माने या मराठी चित्रपट सृष्टीतील आघाडीचे कलाकार या चित्रपटात तेवढ्याच दमदारपणे अभिनय करताना दिसून येतात. संगीतकार वीरेंद्र लाटणकर यांनी सबंध चित्रपटात केलेले संगीत संयोजनही या चित्रपटाला साजेसं आहे.
     
    विदर्भात घडणाऱ्या शेतकरी आत्महत्येच्या बातम्या ,प्रत्यक्ष प्रसंग अशा घटना बघणारे, निरीक्षण करणारे आणि यातून अस्वस्थ होणारी अशी सर्व मंडळी चित्रपटाच्या पठकथेपासून तर निर्मिती प्रक्रियेमध्ये सहभागी असल्याने हा चित्रपट व यातील विषय आणखी जोरकसपणे व प्रभावीपणे मांडल्या गेल्याचेही निरीक्षण आपसूक नोंदवले जाते.

    एक सामाजिक प्रश्न समजून घेण्यासाठी प्रेक्षकांनी हा चित्रपट नक्की बघितला पाहिजे. नागपूरच्या बर्डी परिसरातील इंटरनेटि मॉलमध्ये 'तेरवं' चित्रपटाचा 6 मार्च रोजी प्रीमियर शो आयोजित करण्यात आला त्याला हजेरी लावली. यानिमित्ताने या चित्रपटाचे रसग्रहण केले आहे. 8 मार्च या जागतिक महिलादिनी हा चित्रपट राज्यातील संपूर्ण चित्रपटगृहांमध्ये रसिक प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

रितेश मो.भुयार
            ००००