Monday, September 20, 2021
कोरोना विरुध्द महाराष्ट्राचा भक्कम लढा ; लसीकरणातही देशात अग्रेसर
विविध क्षेत्रात देशात अग्रेसर असणाऱ्या महाराष्ट्र राज्याने कोविड१९ या वैश्विक संसर्गाला धैर्याने तोंड देत या संकटकाळात आरोग्य यंत्रणा बळकट केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रराज्य या संकटाचा निकराने सामना करीत आहे. कोविड१९ विरूध्दच्या लढाईत वेळोवेळी जनतेसोबत थेट संवाद साधत मुख्यमंत्री राज्यातील जनतेच्या पालकत्वाची भूमिका वठवत असून त्यांना आधार देत आले आहेत. राज्याने आरोग्य यंत्रणा बळकट करून हा लढा अधिक भक्कम केला परिणामी रुग्ण संख्येत घट झाली व रुग्ण बरे होण्याची संख्याही वाढली आहे. लसीकरणातही राज्याने देशात आघाडी घेतली असून तज्ज्ञ डॉक्टरांचा टास्क फोर्स नेमून कोरानाची संभाव्य तिसरी लाट परतवून लावण्याची तयारी केली आहे. राज्याने कोविड१९ च्या व्यवस्थापनासाठी केलेल्या यशस्वी कार्यवाहीवर प्रकाश टाकणारा हा लेख.
गेल्यावर्षी कोरोना संसर्ग सुरु झाला तेव्हा राज्याच्या हातात योग्यती साधने नव्हती, सोयी नव्हत्या, उपकरणे नव्हती. मात्र, सव्वावर्षांत बऱ्याच साधनसामग्रीची उपलब्धता करण्यात आली. कोविड केअर सेंटर्स ,बेड्स,आयसीयू सुविधा,व्हेंटिलेटर्स,औषधी,मास्क,ऑक्सिजन उपकरणे अशा अनेक बाबी राज्याने उभारल्या. या सुविधा वाढविताना टाळेबंदीसह काही निर्बंधही लावले, याचाच सुपरिणाम म्हणून रुग्ण संख्या आटोक्यात येवू लागली आहे. यावर्षी मार्च महिन्यात राज्यात आलेल्या कोरानाच्या दुसऱ्या लाटेने आव्हान वाढवले. विशेषत: ऑक्सिजन मिळविण्यासाठी धडपड झाली. मात्र, राज्याने तातडीने ‘मिशन ऑक्सिजन’ सुरु करून दररोज १३०० मेट्रिक टन ऑक्सिजन निर्मितीसह ३ हजार मेट्रिक टन ऑक्सिजन निर्मितीचे लक्ष ठेवले. लसीकरणामध्ये महाराष्ट्राने दोन्ही डोस देण्यात देशात पहिले तर एकूण डोस देण्यात दुसरे स्थान मिळवून ६ कोटी ४० लाख लस मात्रांचा टप्पा ओलांडला आहे.
राज्यात यावर्षी कोराना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेच्या प्रादुर्भावाच्या सुरुवातीला दिवसाकाठी ६० हजार रुग्ण संख्या झाली. याचा सामना करण्याकरिता उपचाराच्या सुविधा,ऑक्सिजनची उपलब्धता,संसंर्ग टाळण्यासाठी कठोर निर्बंध लावण्यात आले परिणामी जून महिन्यापासून राज्यातील कोरानाच्या दैनंदिन रुग्ण संख्येत घट होवू लागली व आज हा आकडा ३ ते ४ हजारांच्या घरात आला आहे. राज्य शासनाने पहिली लाट थोपवताना उभारलेल्या सुविधांच्या जोडीला यावेळी उपचाराच्या नव्याने सुविधा उभारण्यात आल्या आहेत.
राज्यात उपलब्ध सुविधांवर एक नजर
राज्यात ६०९ चाचणी प्रयोग शाळा आणि ५ हजारांहून अधिक कोविड केअर सेंटर्स आहेत. आजपर्यंत कोराना उपचाराच्या ६ हजार ९५९ सुविधा असून यात ४ लाख ९७ हजार ९७ आयसोलेशन खाटांचा (आयसीयू खाटा वगळून) समावेश आहे. त्यामध्ये १ लाख २१ हजार ऑक्सिजन खाटा आहेत. राज्यात ३६ हजार ७०२ आसीयू खाटा असून १४ हजार २४५ व्हेंटिलेटर्स आहेत. कोविड रुग्णांसाठी ३ लाख ५१ हजार ३३० खाटा उपलब्ध आहेत. कोविड संशयित रुग्णांसाठी १ लाख २७ हजार ७२१ आयसोलेशन खाटा, १५ लाख ८६ हजार ९६ पीपीई कीट आणि २६ लाख १८ हजार ८६० एन९५ मास्क उपलब्ध आहेत.
मिशन ऑक्सिजनची घौडदौड
कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी ऑक्सिजनची आवश्यकता लक्षात घेता राज्यात ‘मिशन ऑक्सिजन’ राबविण्यात येत आहे. दररोज १३०० मेट्रीक टन ऑक्सिजन उत्पादित होत असून ही क्षमता ३ हजार मेट्रीक टन नेण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. आवश्यक ऑक्सिजनची निर्मिती करण्यासाठी राज्यात जिल्हा रुग्णालये, वैद्यकीय महाविद्यालये, खासगी रुग्णालये या ठिकाणी हवेतून ऑक्सिजन शोषून तो रुग्णांना देणारी प्रणाली (पीएसए) बसवण्यात येत आहे. जून अखेर पर्यंत सुमारे ३८ पीएसए प्लान्ट कार्यान्वित झाले असून त्याद्वारे दिवसाला सुमारे ५३ मेट्रीक टन ऑक्सिजन निर्मिती झाली. राज्यातील साखर कारखाने, पेपर, पोलाद, पेट्रोलियम, फर्टिलायझर, रिफायनरी उद्योगांच्या माध्यमातून ऑक्सिजन निर्मिती वाढविण्यात येत आहेत. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ऑक्सिजनची वाढती मागणी पाहता राज्याने अन्य राज्यांमधून ३५० मेट्रीक टन ऑक्सिजन घेतला.
आर्थिक पाठबळ
कोरोना संसर्गाच्या संकटांचा निकराने सामना करण्याकरिता राज्यशासनाने आर्थिक पाठबळ दिले. कोरोना प्रतिबंधक उपाय योजनांसाठी जिल्हा नियोजन समित्यांच्या माध्यमातून ३ हजार ३०० कोटी रूपये उपलब्ध करून दिले. राज्यातील ३५० आमदारांना त्यांच्या स्थानिक विकास निधीतून कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांसाठी प्रत्येक १ कोटी प्रमाणे ३५० कोटी रुपये खर्च करण्यास मंजुरी दिली. कोरोना संकटाचा सामना करण्यासाठी राज्याच्या अर्थसंकल्पात आरोग्य विभागासाठी ८ हजार ९५५ कोटी २९ लाखांची तर वैद्यकीय शिक्षण विभागासाठी १ हजार ९४१ कोटी ६४ लाख रूपयांची तरतूद करण्यात आली आहे .
रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.०८ टक्के
सप्टेंबर महिन्यांच्या पहिल्या आठवडयापर्यंत राज्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.०८ टक्के झाले आहे, देशाचा हा दर ९७.४८ टक्के तर जगाचा ८९.४८ टक्के आहे. राज्यात आतापर्यंत तपासण्यात आलेल्या ५ कोटी ६० लाख ८८ हजार ११४ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६५ लाख ६१७ नमुने पॉझिटीव्ह आले आहेत . तुलनेने ६३ लाख ९ हजार २१ रुग्ण या आजारातून बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यात कोरोना रुग्णांचा मृत्यू दर २.१२ एवढा आहे व आतापर्यंत १ लाख ३७ हजार ८९७ लोकांचा या आजाराने मृत्यू झाला आहे.
लसीकरणात अव्वल
राज्यात कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाला वेग आला आहे. सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवडयापर्यंत राज्यातील १ कोटी ७६ लाख ४५ हजार ८५५ नागरिकांना दोन्ही डोस देत, देशात अव्वल ठरले आहे. केंद्र शासनाकडून लसी उपलब्ध होताच एका दिवसात ११ लाखांहून अधिक नागरिकांचे लसीकरण करण्याचा विक्रमही राज्याच्या नावावर नोंदला गेला आहे. पहिला व दुसरा डोस मिळून राज्यातील ६ कोटी ४० लाख ७८ हजार ९१९ जनतेला लस मात्रा देत महाराष्ट्र देशात दुस-या क्रमांकावर आहे.
केंद्र शासनाकडून प्राप्त लसीनुसार राज्यात दररोज सुमारे ३ ते ४ लाख नागरिकांचे लसीकरण केले जात आहे.राज्यातील १८ पेक्षा अधिक वयाच्या लोकसंख्येपैकी ४८.६४ टक्के नागरिकांना एक डोस दिला गेला आहे. १८ ते ४४ वर्षे वयोगटातील लोकसंख्येपैकी ३७.८८ टक्के नागरिकांना पहिला लसीचा डोस देण्यात आला आहे तर ४५ पेक्षा अधिक वयाच्या कमीत कमी एक डोस दिला गेलेल्या नागरिकांचे प्रमाण ५५.२४ टक्के एवढे आहे. आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाईन कर्मचारी, ४५ पेक्षा जास्त वयोगटातील आणि १८ ते ४४ वयोगटातील नागरिक अशा एकूण ६ कोटी ४० लाख ७८ हजार ९१९ जनतेला आतापर्यंत लस मात्रा देण्यात आल्या आहेत.
कोविड कृतीदलाची स्थापना ; ‘माझा डॉक्टर’ वैद्यकीय परिषदेचे आयोजन
महाराष्ट्रात कोराना संसंर्गाची लाट आली तसे या संकटाचा सामना करण्याकरिता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री राजेश टापे यांच्यासह संबंधित विभागांनी कंबर कसून कामाला सुरुवात केली. कोरोना संसर्गाची लाट थोपवून धरण्यासाठी व परतवून लावण्याकरिता मुख्यमंत्री ठाकरे यांच्या संकल्पनेतून तज्ज्ञ डॉक्टरांचा समावेश असणाऱ्या राज्य कोविड कृतीदलाची स्थापना करण्यात आली. या कृतीदलाचे अध्यक्ष डॉ. संजय ओक असून सदस्य सर्वश्री डॉ. शशांक जोशी, डॉ. राहुल पंडित, डॉ. अजित देसाई आदींचा यात समावेश आहे. कोरानाची तिसरी लाट ही लहान मुलांसाठी घातक असणार असल्याचा वैद्यकीय तज्ज्ञांनी अंदाज वर्तवला आहे. या अनुषंगाने राज्यात बालरोग तज्ज्ञांचे कृती दल तयार केले असून या १४ सदस्यीय कृती दलाचे अध्यक्ष डॉ. सुहास प्रभु आहेत. मुख्यमंत्री महोदय कायम या कृतीदलांच्या संपर्कात असून त्यांनी या कृतीदलांच्यावतीने वेळोवेळी आयोजित परिषदांमध्ये सहभाग घेवून मार्गदर्शन केले आहे.
संभाव्य तिस-या लाटेची तयारी
कोविडच्या संभाव्य तिसऱ्या लाटेला रोखण्याच्या उपाययोजनांबाबत कोविड राज्य कृतीदलाने नुकतेच ‘माझा डॉक्टर’ या ऑनलाईन वैद्यकीय परिषदेचे आयोजन केले होते. या परिषदेला संबोधन करताना मुख्यमंत्री ठाकरे यांनी कोरोना संसर्गाविरूध्दच्या युध्दात डॉक्टर, नर्सेस, पोलीस, अग्निशमनदल कर्मचारी आदी कोरोना योद्धे हे शस्त्र असल्याचे सांगितले. राज्यातील रुग्णालय व्यवस्था, यंत्रसामग्री,औषध उपलब्धतेबाबतही लक्ष देण्यात येणार असल्याचे अधोरेखित केले. राज्यात दुसरी लाट कायम आहे आणि संभाव्य तिसऱ्या लाटेचा बंदोबस्त करण्यासाठी जनतेसह सर्व यंत्रणांनी सज्ज राहण्याचे आवाहनही मुख्यमंत्री ठाकरे यांनी केले आहे.
मुख्यमंत्र्यांची पालकत्वाची भूमिका
राज्यात सुरु झालेल्या कोरोना संसर्गापासूनच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पालकत्वाच्या भूमिकेतून वेळोवेळी जनतेशी संवाद साधत आहेत व त्यांना धीर देत आहेत. त्यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून कोरोनाकाळात वेळोवेळी जनतेशी संवाद साधला. राज्यातील वृत्त वाहिन्यांद्वारेही घराघरात पोहचलेल्या या संवादातून त्यांनी राज्यशासन करीत असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. प्रसंगी राज्यातील जनतेने कोरोना संसर्गापासून सुरक्षित राहण्यासाठी दैनंदिन जीवनात स्वच्छतेच्या सवयी अंगीकारण्यासह नियम पाळण्याविषयीही ते मार्गदर्शन करीत आहेत.
जनतेसोबतच्या संवादातच ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ आणि ‘मी जबाबदार’ या महत्वाच्या घोषणा देत मुख्यमंत्र्यांनी राज्यात कोरोनाविरुध्दच्या लढाईसाठी हे दोन उपक्रम सुरु केले. कोरोनास्थितीत डळमळीत झालेली स्थिती सावरून राज्याला पुन्हा उभेकरण्यासाठी त्यांनी याच मंचावून ‘मिशन बिगिन अगेन’ आणि ‘ब्रेक दि चेन’ या कार्यक्रमांची घोषणा केली. ‘ब्रेक दि चेन’ निर्बंधकाळात नागरिकांना दिलासा देण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी ५ हजार ४७६ कोटींचे मदत पॅकेज जाहीर केले. राज्यात या कार्यक्रमांची प्रभावी अंमलबाजवणी सुरु आहे.
इतिहासकाळापासून विविध संकटांवर समर्थपणे मात करणाऱ्या महाराष्ट्र राज्याच्या थोर पंरपरेला साजेशे कार्य करत राज्यशासन कोरोना संसर्गाचा नेटाने मुकाबला करत या संकटावर मात करण्याच्या दिशेने समर्थपणे मार्गक्रमण करीत आहे. राज्यात मोठया प्रमाणात उभारण्यात येत असलेल्या सुविधा व गतीमान पध्दतीने सुरु असलेले लसीकरण तसेच कोरोना प्रतिबंधात्मक अन्य महत्चाच्या उपाययोजना व कार्यक्रमांच्या प्रभावी अंमलबजावणीच्या माध्यमातून महाराष्ट्र हे संभाव्य तिसऱ्या लाटेलाही परतवून लावण्यासाठी सज्ज होत आहे.
आम्हाला ट्विटर वर फॉलो करा http://twitter.com/MahaGovtMic
00000
रितेश मोतीरामजी भुयार,
उपसंपादक, महाराष्ट्र परिचय केंद्र, नवी दिल्ली.
Wednesday, July 28, 2021
जगाच्या पाठीवर मराठी माणसांची चमकदार कामगिरी- खासदार संजय राऊत
https://m.dailyhunt.in/news/india/marathi/sthairya-epaper-sthairya/jagachya+pathivar+marathi+manasanchi+chamakadar+kamagiri+khasadar+sanjay+raut-newsid-n272631724
https://mahasamvad.in/?p=36978
नवी दिल्ली, १९ : प्रतिभा व प्रतिमेच्या जोरावर जगात मराठी माणसाने व्यापार-उद्योगात नाव कमाविले आहे. तसेच, काही देशांमध्ये राजकारणातही उत्तम कामगिरी केली आहे, ही महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब आहे, असे मत खासदार तथा दैनिक सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी आज व्यक्त केले.
“जगाच्या पाठीवरील मराठी” या विषयावर महाराष्ट्र परिचय केंद्राच्यावतीने आयोजित महाराष्ट्र हीरक महोत्सव व्याख्यानमालेचे ३१ वे पुष्प गुंफताना श्री. राऊत बोलत होते.
महाराष्ट्र व मराठीचा जागतिक राजकारण आणि समाजकारणावर प्रभाव पडला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या युध्द कौशल्यास जागतिक इतिहासात मानाचे स्थान आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात मराठी माणसाने जागतिक स्तरावर अन्यायाविरोधात आवाज उठवत समर्थपणे भूमिका मांडल्या आहेत. जगाच्या स्पर्धेत पुरेपूर उतरणाऱ्या मराठी माणसाने आज जगात सर्वत्र आपले अस्तित्व निर्माण केले असून व्यापार, उद्योग आणि राजकारणातही त्यांनी प्रवेश केला आहे,ही महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब असल्याचे श्री. राऊत म्हणाले.
कौशल्य व ज्ञानाच्या जोरावर आज जगभरात मराठी माणसांचा वावर आहे. स्पर्धेत पूरेपूर उतरून मराठी माणसाने विविध क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटवला आहे ,उत्तुंग झेप घेतली आहे व आपले अस्तित्व टिकवून ठेवले आहे. अमेरीकेपासून,इस्त्रायल,आयर्लंड,जपान,मॉरीशस,अफगाणीस्तान आदी देशांमध्ये मराठी माणसांनी कर्तबगारी दाखविल्याचे आश्वासक चित्र आहे.
आयर्लंडचे पंतप्रधानपद भूषविणारे लिओ वराडकर हे कोकणातील मालवणचे आहेत. त्यांच्या रूपाने मराठी माणसाने एका देशाच्या प्रमुखपदाचे सर्वोच्च स्थान मिळवीले आहे. ही महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब आहे. अमेरिकेच्या असेंब्लीमध्ये श्री. ठाणेदार हे मराठी गृहस्थ मोठया मतांनी निवडून आले आहेत, अनेक वर्ष तेथील राजकारणात त्यांनी महत्वपूर्ण कामगिरी केली आहे. इंग्लडमधील राजकारणात मराठी माणूस आहे. मॉरीशस मधील राजकारणात, संसदेत व मंत्रिमंडळात मराठी माणस आहेत. जगाच्यापाठीवरील या मराठी माणसांकडे आपण मोठया अपेक्षेने पाहिले पाहिजे असे श्री राऊत म्हणाले.
मराठी माणूस हे कलाप्रेमी आहेत. परदेशातही मराठी नाटक, चित्रपट, संगीत मैफिली आदींच्या आयोजनांतून त्यांनी मराठीची जोपसना केली आहे. बृह्नमहाराष्ट्र मंडळ, मराठी परिषदा आदींच्या माध्यमातून मराठी संस्कृतीची जोपासना केली आहे.मॉरीशस आणि अमेरिकेत मराठी मंडळांच्यावतीने गणेशोत्सव साजरे होतात. शिकागो, न्युयॉर्क आणि कॅनडामध्ये भरणारे बृह्ममहाराष्ट्र परिषदांचे अधिवेशन यावरही श्री. राऊत यांनी प्रकाश टाकला. इस्त्रायलमध्ये ‘मायबोली’ हे मराठी नियकालीक चालवले जाते,त्यास मोठा मराठी वाचक लाभला आहे. तेथे मराठी कार्यक्रम, उत्सव मोठया प्रमाणात साजरे केले जातात. मराठी भाषेचे उत्सव साजरे होतात.माजी केंद्रीय मंत्री व ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली व कुसुमाग्रजांच्या उपस्थितीत इस्त्रायलमध्ये जागतिक मराठी परिषदेचे पहिले संमेलन भरविण्यात आले होते. जगभरातील मराठी माणसांनी व्यापाराच्या संधी शोधण्यासाठी जागतिक मराठी चेंबर ऑफ कॉमर्सची स्थापना केल्याचेही त्यांनी सांगितले.
मराठी माणसांनी जागतिकस्तरावर सक्षमपणे भूमिका मांडल्या
भारतात ब्रिटीशांच्या राजवटीत लंडन हे मराठी माणसाचे लक्ष्य होते. लोकमान्य टिळक हे लंडनला जावून आपली बाजू मांडून आले होते. राघोबादादांना पेशवाईचे वस्त्र मिळाले नव्हते तेव्हा त्यांनी आपला वकील लंडनला संपर्कासाठी पाठविला होता. ब्रिटीशांनी अन्यायपणे साताऱ्याची गादी खालसा केल्याच्या विरोधात छत्रपती प्रतापसिंह राजे यांचे वकील रंगो बापुजी हे लंडनला संपर्कासाठी गेले होते. त्यावेळी रंगो बापुंनी लंडनच्या हैलपार्कमध्ये ‘राजा मेला, तरी न्याय मेला नाही’ अशी गर्जना करून वैचारीक लढा दिला. डॉ. एम. के. पारधी हे मराठी गृहस्थ 1910 मध्ये लंडन येथे स्थायीक झाले. साहित्य सम्राट न. चि. केळकर यांनी 1932 च्या सुमारास गोलमेज परिषदेत गर्जना केली होती. स्वातंत्र्याच्या क्रांतिची ठिणगी देशात टाकणाऱ्या स्वातंत्र्यवीर सावरकरांनी याची सुरुवात लंडनपासून केली, येथील वास्तव्यात त्यांनी मराठी क्रांतिकारकांना एकत्र करण्याचे काम केले, असे श्री राऊत म्हणाले.
परदेशात नोकरदारीत अग्रणी असलेल्या मराठी माणसांनी आता प्रशासनातही आपला दबदबा निर्माण करण्याची गरज आहे. जगात मराठीची अस्मिता जपावी व प्रशासनात सहभागी होऊन मराठी माणसांनी संकटसमयी महाराष्ट्राला सहकार्य करावे तसेच राज्याच्या विकासात योगदान दयावे, अशी अपेक्षाही श्री राऊत यांनी व्यक्त केली.
महाराष्ट्र परिचय केंद्राच्या अधिकृत व्टिटर हॅण्डलला फॉलो करा:
http://twitter.com/micnewdelhi
०००००
रितेश भुयार /वृत्त.वि. क्र.114/दिनांक 19.04.2021
Friday, July 9, 2021
सोनोपंत उर्फ मामासाहेब दांडेकर
सोनोपंत उर्फ मामासाहेब दांडेकर.
वारकरी संप्रदायाचे विख्यात भगवद्भक्त,श्री ज्ञानेश्वरीचे संशोधक,संपादक आणि संतवाड्.मयाचे अभ्यासक.
२० एप्रिल १८९६ रोजी ठाणे जिल्हयातील केळवे येथे जन्म.
प्राथमिक शिक्षण केळवे येथे तर माध्यमिक शिक्षण पुण्याच्या नूतन मराठी विद्यालयातून झाले. फर्ग्युसन महाविद्यालयातून त्यांनी बी.ए. पदवी घेतली
वारकरी संप्रदायाचे एक अध्वर्यू विष्णुबुवा जोग यांच्या संपर्कात आले आणि त्यांना हरिभक्ती व देशभक्तीबरोबरच ज्ञानेश्वरीची गोडी लागली.
तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक गुरुदेव रानडे यांच्या सांगण्यावरून ‘पाश्चात्त्य तत्त्वज्ञानातील ग्रीक तत्त्वज्ञ प्लेटो’ हा विषय घेऊन त्यांनी एम.ए. पदवी मिळविली
पुण्यातील नूतन मराठी विद्यालयाचे मुख्याध्यापक,मुंबईतील रुईया महाविद्यालयाचे उपप्राचार्य आणि पुण्यातील स. प. महाविद्यालयाचे प्राचार्य म्हणून त्यांनी कार्य केले.
१९२१ मध्ये त्यांनी तत्त्वज्ञान मंडळाची स्थापना केली.
१९४७ मध्ये त्यांनी ‘प्रसाद’ मासिकाचे संपादक म्हणून काम पाहिले.
१९५१ मध्ये त्यांनी ‘अखिल भारतीय तत्त्वज्ञान परिषदे’चे अध्यक्षपद भूषविले.
अध्यापन करीत असतांनाही त्यांनी ‘पंढरीची वारी’ कधीच चुकविली नाही.वारीच्या माध्यमातून त्यांनी वारकऱ्यांचे प्रबोधन, अंधश्रद्धा निर्मूलन, कीर्तनसंस्थेचे पुनरुज्जीवन केले.
१९५३ मध्ये त्यांनी नेवासे येथील ‘ज्ञानेश्वर मंदिरा’चा जीर्णोद्धार केला. पिंपळनेर येथील ‘संत निळोबाराय मंदिर’, पुण्यातील ‘निवडुंग्या विठोबा मंदिर’ आदी मंदिरांचाही जीर्णोद्धार केला.
१९५६ महाराष्ट्र शासनाने सोनोपंतांच्या अध्यक्षतेखाली ज्ञानेश्वरी ग्रंथाची अर्थासह संशोधित आवृत्ती काढण्यासाठी एक समिती नेमली होती.
महाराष्ट्र शासनाने प्रकाशित केलेल्या ज्ञानेश्वरी च्या राजवाडे संशोधित प्रतीच्या संपादनातही त्यांचा महत्त्वाचा वाटा होता. या संशोधित आवृत्तीला त्यांची १५० पानांची प्रस्तावना असून ‘सोनोपंतांची ज्ञानेश्वरी’ म्हणून प्रसिद्ध आहे.
त्यांनी गावोगावी कीर्तने-प्रवचने करून सर्वसामान्य लोकांना नीतिधर्माचा उपदेश करून त्यांना सन्मार्ग दाखविला.
‘ज्ञानेश्वरी’, ‘नामदेव गाथा’, ‘भावार्थ रामायण’ इत्यादी संत-साहित्य त्यांनी संशोधित केले.
‘ज्ञानदेव आणि प्लेटो’, ‘ईश्वरवाद’, ‘अध्यात्मवादाची मूलतत्त्वे’, अभंग-संकीर्तनभाग-१,२,३, ज्ञानदेव चरित्र, वारकरी पंथाचा इतिहास, गीतेच्या श्लोकावर प्रवचने, जोग महाराजांचे चरित्र इ. मौलिक ग्रंथ लिहिले.
श्रीक्षेत्र आळंदी येथे गुरुवर्य जोग महाराजांनी भूषविलेल्या वारकरी शिक्षण संस्थेच्या अध्यक्षपदाची धुरा सोनोपंत दांडेकर यांनी बराच काळ सांभाळली होती .
व्यंकटेश माडगूळकर
व्यंकटेश माडगूळकर.
श्रेष्ठ मराठी कथाकार आणि कादंबरीकार .
६ जुलै १९२७ रोजी सांगली जिल्हयातील माडगूळ येथे त्यांचा जन्म झाला .
माडगूळकर यांचे औपचारिक शिक्षण फारसे झाले नसले तरी त्यांनी स्वप्रयत्नाने वाङ्मयाचा व्यासंग केला .
आरंभीच्या काळात पत्रकारिता केल्यानंतर १९५० च्या सुमारास ते मुंबईस आले आणि मराठी चित्रसृष्टीत पटकथालेखन करू लागले.
१९४९ मध्ये ‘माणदेशी माणसं’ हा त्यांचा कथासंग्रह प्रसिध्द झाला .
‘गावाकडच्या गोष्टी’, ‘हस्ताचा पाऊस’, ‘सीताराम एकनाथ’, ‘काळी आई’, ‘जांभळाचे दिवस’ आदी त्यांचे ग्रामीण कथासंग्रह प्रसिध्द आहेत
त्यांच्या कथांचे अनुवाद डॅनिश, जर्मन, जपानी आणि रशियन अशा विविध जगातिक भाषांत झालेले आहेत .
‘बनगरवाडी’, ‘वावटळ’, ‘पुढचं पाऊल’, ‘कोवळे दिवस’, ‘करूणाष्टक’ आणि ‘सत्तांतर’ या त्यांच्या ग्रामीण कादंबऱ्याही उल्लेखनीय ठरल्या
‘करूणाष्टक’, ‘वावटळ’ आणि ‘कोवळे दिवस’ या त्यांच्या आत्मचरित्रपर कादंबऱ्या प्रसिध्द आहेत.
‘तू वेडा कुंभार’, ‘सती’, ‘पति गेले गं काठेवाडी’ आदी त्यांनी लिहिलेली उल्लेखनीय नाटके होत.
‘सांगत्ये ऐका’, ‘पुढचं पाऊल’, ‘वंशाचा दिवा’, ‘जशास तसे’, ‘रंगपंचमी’ आदी मराठी चित्रपटांच्या कथा व पटकथा त्यांनी लिहिल्या
‘बिनबियांचे झाड’ आणि ‘कुनाचा कुनाला मेळ न्हाई’ ही त्यांनी लिहीलेली लोकनाटयेही गाजली.
‘चित्रे आणि चरित्रे’ ,‘नागझिरा’, ‘पांढरी मेंढरे हिरवी कुरणे’, ‘पांढऱ्यावर काळे’, ‘रानमेवा’ ही त्यांची ललित गद्य पर पुस्तके प्रसिध्द आहेत
१९५५ ते १९८५ अशा दीर्घ कालावधिसाठी त्यांनी आकाशवाणीत नोकरी केली.
चित्रकार म्हणूनही त्यांची ख्याती होती ,त्यांची अनेक सुंदर रेखाटने प्रसिध्द आहेत.
‘गावाकडील गोष्टी’, ‘काळी आई’ या कथासंग्रहास, ‘बनगरवाडी’ या कादंबरीस आणि ‘सती’ ही नाट्यकृती आदींना महाराष्ट्र राज्य पुरस्कार लाभले .
‘सत्तांतर’ या त्यांच्या कादंबरीस १९८३ मध्ये साहित्य आकदमी पुरस्कार प्राप्त झाला .
१९८३ मध्ये अंबेजोगाई येथे भरलेल्या ‘मराठी साहित्य संमेलना’चे अध्यक्षपद त्यांनी भूषविले .
गुरुदेव रानडे
रामचंद्र दत्तात्रेय रानडे तथा गुरुदेव रानडे .
आधुनिक विद्याविभूषित तत्वज्ञ .
३ जुलै १८८६ रोजी कर्नाटकातील जमखंडी येथे त्यांचा जन्म झाला.
पुण्याच्या डेक्कन कॉलेजमधून त्यांनी गणित विषय घेऊन बी.ए. आणि तत्वज्ञान विषय घेऊन एम.ए. ची पदवी संपादन केली.
१९१३ मध्ये फर्ग्युसन कॉलेजात इंग्रजीचे शिक्षक म्हणून त्यांची नेमणूक झाली .
‘ॲकॅडमी ऑफ फिलॉसॉफी ॲड रिलिजन’ ही संस्था स्थापन करून त्यांनी भारतीय तत्वज्ञानाच्या इतिहास खंडांची योजना आखली .
१९२८ ते १९४३ दरम्यान ते अलाहबाद विद्यापिठाच्या तत्वज्ञान विभागाचे प्रमुख प्राध्यापक होते .
‘इव्हलूशन ऑफ ओल थॉट’ या त्यांच्या लेखावरून त्यांच्या तत्वज्ञान विषयक विचारांचा झालेला विकास लक्षात येताे .
मराठी ,हिंदी व कन्नड संतवाड्:मयातील साक्षात्कारवादाचे सर्वेक्षण करून त्यांनी एक नवीन तत्वज्ञान मांडले .
गुरुदेव रानडे यांचे बहुतांश लेखन इंग्रजीत असून ते मराठीत अनुवादितही झाले आहे .
‘अ कन्स्ट्रक्टिव्ह सर्व्हे ऑफ उपनिषदिक फिलॉसॉफी’, ‘मिस्टिसिझम इन महाराष्ट्र’,‘पाथ वे टू गॉड इन मराठी लिटरेचर’ आदी इंग्रजी ग्रंथ त्यांने लिहीले आहेत.
‘ज्ञानेश्वरवचनामृत’, ‘संतरचनामृत’, ‘तुकारामवचनामृत’, ‘रामदासवचनामृत’ आदी त्यांची मराठी ग्रंथ रचना आहे.
गणपतराव बोडस
गणपतराव बोडस .
मराठी रंगभूमीवरील एक श्रेष्ठ गायक नट .
२ जुलै १८८० रोजी अहमदनगर जिल्हयातील शेवगाव येथे त्यांचा जन्म झाला.
पुणे येथे त्यांचे शिक्षण झाले, शाळेत शिकत असतापासूनच ते हौशी नाटयमंडळातून अभिनय करू लागले.
१८९५ मध्ये त्यांनी ‘किर्लोस्कर संगीत मंडळी’त प्रवेश केला. सुरुवातीला त्यांनी स्त्रीभूमिका वठविल्या त्यानंतर ‘सौभद्र’ नाटकात कृष्ण, ‘शारदा’ नाटकात कांचनभट, ‘मूकनायक’ मध्ये विक्रांत व ‘मानापमान’ मध्ये लक्ष्मीधर अशा महत्वाच्या भूमिका मिळत गेल्या.
१९९३ मध्ये ‘किर्लोस्कर मंडळी’ सोडून बालगंधर्व आणि गोविंद टेंबे यांच्या सहकार्याने ‘गंधर्व नाटक मंडळी’ची स्थापना केली.
‘एकच प्याला’ नाटकातील सुधाकर, ‘मृच्छकटिक’ नाटकातील शकार, ‘विद्याहरण’ नाटकातील शिष्यवर या गणपतरावांच्या भूमिका विशेष गाजल्या.
१९३० नंतर ते नाटयव्यवसायातून निवृत्त झाले यानंतर त्यांनी एक-दोन चित्रपटात भूमिका केल्या पण येथे त्यांचे मन रमले नाही. नंतरच्या काळात त्यांनी होतकरु नटांना मार्गदर्शन करण्याचे कार्य केले.
१९४० मध्ये नाशिक येथे भरलेल्या ३१व्या नाटयसंमेलनाच्या अध्यक्षपदाचा मान त्यांना मिळाला.
त्यांनी १९५६ मध्ये नांदेड येथे भरलेल्या मराठवाडा नाटयसंमेलनाचे अध्यक्षपदही भूषविले.
१९५६ मध्ये त्यांना नाटयक्षेत्रातील योगदानासाठी संगीत नाटक अकादमी पुरस्काराने गौरविण्यात आल.
गणपतराव बोडसांनी ४० वर्षे मराठी रंगभूमी गाजविली व नाटयसृष्टीतील अनेक बहुमान मिळविले .
‘माझी भूमिका’ हे त्यांचे आत्मचरि९ १९४० मध्ये प्रकाशित झाले .
हरितक्रांती व रोजगार हमी योजनेचे प्रणेते महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक.
हरितक्रांती व रोजगार हमी योजनेचे प्रणेते.
१ जुलै १९१३ रोजी यवतमाळ जिल्हयातील गहुली येथे त्यांचा जन्म झाला.
त्यांचे प्राथमिक शिक्षण विविध खेडयांमध्ये झाले तर विठोली आणि अमरावती येथे त्यांनी माध्यमिक शिक्षण पूर्ण केले. नागपूरच्या मॉरीस कॉलेजमधून बीएची पदवी व नंतर एलएलबी पदवी मिळविली.
विद्यार्थी दशेत त्यांच्यावर ‘महात्मा ज्योतिबा फुले’ आणि ‘डेल कार्नेगी’ यांच्या विचारांचा प्रभाव पडला.
कायद्याची पदवी घेवून पुसद येथे त्यांनी वकिलीस सुरुवात केली .
१९४३ -४७ कालावधित त्यांची पुसद कृषिमंडळाच्या अध्यक्षपदी निवड झाली याशिवाय हरिजन वसतीगृह आणि राष्ट्रीय वसतीगृहाचे अध्यक्ष म्हणून त्यांनी कार्य पाहिले .
१९५१-५२ मध्ये त्यांची मध्यप्रदेश राज्याच्या मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकपदी नियुक्ती झाली .
१९४६ ते १९५२ दरम्यान ते पुसद नगरपालिकेचे अध्यक्ष म्हणून निवडून आले .
१९५२ ते १९५६ दरम्यान पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीत ते मध्य प्रदेश राज्यात महसूल खात्याचे उपमंत्री झाले .
१९५७ राज्य पुनर्रचनेनंतर ते यशवंतराव चव्हाण यांच्या मंत्रिमंडळात कृषी मंत्री झाले .
१९६० मध्ये वसंतराव नाईक हे स्वतंत्र महाराष्ट्र राज्याचे पहिले महसूल मंत्री झाले .
१९६३ मध्ये वसंतराव नाईक हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले व त्यांनी या पदावर तब्बल १२ वर्षे काम केले .
त्यांनी कृषी विषयक समस्या हाताळून महाराष्ट्राला धान्याच्या दृष्टीने स्वयंपूर्ण करण्याच्या दिशेने महत्वपूर्ण कार्य केले .
गोरगरिबांच्या व गरजुंच्या हाताला काम देणारी ‘रोजगार हमी योजना’ वसंतराव नाईक यांच्याच काळात सुरु झाली. त्यांच्या काळात या योजनेतून असंख्य विहिरी , तलाव खोदले गेले.
महाराष्ट्राला त्यांनी दुग्ध उत्पादनात अग्रेसर केले. शिक्षण आणि शेती विषयात विशेष लक्ष घालून त्यांनी महाराष्ट्रात मोठया सुधारणा घडवून आणल्या .
‘पाझर तलाव’ आणि ‘वसंत बंधाऱ्या’चे श्रेय वसंतराव नाईक यांना जाते. शेती,महसूल, राज्यभाषा, सरकारी यंत्रणेला कार्यप्रवण करणे यासोबतच अवर्षण-दुष्काळ या नैसर्गिक आपत्तींवर मात करण्यासाठी त्यांनी कठोर प्ररिश्रम केले.
माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांचा जन्म दिन महाराष्ट्रशासनाच्यावतीने ‘कृषी दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो .
Subscribe to:
Posts (Atom)






