Saturday, April 2, 2016

महाराष्ट्राच्यादृष्टीने दिल्लीत महत्वाचे निर्णय



                      साखर कारखानदारांकडून रास्त आणि किफारयशीर भाव (एफआरपी) देण्यासंदर्भात केंद्रसरकारकडून सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने पदरात पाडून घेतले. त्यामुळे राज्यातील ऊस उत्पादक शेतक-यांना मोठा दिलासा मिळाला. तर राज्यातील दुष्काळग्रस्त भागाला केंद्राकडून जास्तीत-जास्त मदत देण्याचे केंद्रीय गृहमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेले आश्वासन.तसेच मुंबई मेट्रोच्या दरवाढी संबंधात योग्य निर्णय घेण्यासाठी मुख्यमंत्री महोदयांची नगर विकास मंत्र्यांशी झालेली बैठक, त्याचा परिपाक म्हणून मेट्रो दरासंदर्भात निवृत्त न्यायमूर्ती पद्यनाभ यांच्या अध्यक्षतेखाली समितीची करण्यात आलेली स्थापना.आणि मुंबईतील सागरी मार्ग प्रकल्पास पर्यावरण मंत्र्याकडून लवकरच मंजुरी मिळण्याचे मुख्यमंत्र्यांनी मिळवून घेतलेले आश्वासन या महाराष्ट्राच्यादृष्टीने दिल्लीत महत्वाच्या घडामोडी ठरल्या. विद्यापीठ अनुदान आयोगातर्फे आयोजित देशातील विविध राज्यांच्या शिक्षणमंत्र्यांच्या बैठकीत सहभागी होत शिक्षमंत्री विनोद तावडे यांनी राज्यात श्रेणी आधारित शिक्षण पध्दती लागू करण्याची केलेली घोषणा व मराठी भाषेला अभिजात भाषा घोषित करण्यासाठी केंद्रीय सांस्कृतिक कार्यमंत्र्यांची घेतलेली भेटही राज्याच्यादृष्टीने महत्वाची ठरली.         
महाराष्ट्रातील साखर कारखान्यांच्या प्रश्नासंदर्भात मुख्यमंत्री फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सर्वपक्षीय शिष्टमंडळ केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली आणि केंद्रीय अन्न व सार्वजनिक वितरण, ग्राहक संरक्षण मंत्री रामविलास पासवान यांना भेटले. एफआरपी देण्यासंदर्भात 21 जानेवारी 2015 पूर्वी आपण निर्णय घेऊ तसेच महाराष्ट्रातील साखर कारखानदारीचे प्रश्न सोडविण्यासंदर्भात योग्य निर्णय घेण्यात येईल असे आश्वासन अरूण जेटली यांनी शिष्टमंडळास दिले
 या शिष्टमंडळात केंद्रीय ग्राहक संरक्षण राज्यमंत्री रावसाहेब दानवे, राज्याचे सहकार मंत्री चंद्रकांत पाटील, सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, साखर संघाचे अध्यक्ष व खासदार विजयसिंह माहिते पाटील, विधानसभेतील विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे-पाटील, विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे, खासदार राजू शेट्टी, संजय काका पाटील, श्रीकांत शिंदे आदींचा समावेश होता.
श्री. जेटली यांना सर्वपक्षीय शिष्टमंडळाने आपल्या मागण्यांचे निवेदन सादर केले. या निवेदनात साखर निर्यातीला सबसीडी देण्यात यावी, 20 लाख मेट्रीक टन साखर निर्यात करून प्रति मेट्रीक टन 5 हजार रूपये सबसीडी देण्यात यावी, या मागण्यांबरोबरच साखर विकास निधीतून देण्यात आलेले 3 वर्षांसाठीची  कर्ज मर्यादा दोन वर्षांनी वाढवून मिळावी, केंद्राने 50 लाख मेट्रीक टनाचा बफर स्टॉक करावा, यातून येणारे व्याज कारखान्यांना देण्यात यावे, भाव व उत्पादन खर्चात तफावत आहे. त्यामुळे कारखान्यांच्या कर्जाची पुनर्रचना करावी आदी मागण्यांचा समावेश होता.

 राज्यातील दुष्काळग्रस्त भागाला केंद्रकडून मिळणार अधिकाधिक निधी
        केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांची भेट घेवून मुख्यमंत्र्यांनी राज्यातील ज्यातील विदर्भ, मराठवाडा आदी भागातील दुष्काळाची तीव्रता, पाणी टंचाई, शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती आदींची माहिती देत एक निवेदन सादर केले. मुख्यमंत्री फडणवीस यांनी दुष्काळासंदर्भात सादर केलेल्या निवदेनावर आपल्या अध्यक्षतेखालील समिती अभ्यास करेल व दुष्काळग्रस्त भागाला अधिकाधिक निधी देण्यात येईल अशी ग्वाही राजनाथ सिंग यांनी दिली.
मुंबई मेट्रो दरासंदर्भात पद्यनाभ समिती

मुंबई मेट्रो दरासंर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची केंद्रीय नगरविकास मंत्री वैंकय्या नायडू यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर मेट्रो दरासंदर्भात निवृत्त न्यायमूर्ती पद्यनाभ यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली.समितीचा निर्णय येईपर्यंत मुंबई उच्च न्यायालयाने यापूर्वी दिलेल्या आदेशास स्थगिती देण्याची विंनती राज्य शासनाच्या वतीने करण्यात येणार असल्याचेही फडणवीस यांनी या चर्चे नंतर सांगितले.
                            मुंबईतील सागरी रस्ते प्रकल्पास लवकरच  मंजुरी
मुंबईतील सागरी रस्त्यास केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाकडून मंजुरी मिळण्याबाबत  मुख्यमंत्र्यांनी केंद्रीय वन व पर्यावरण राज्यमंत्री प्रकाश जावडेकर यांची भेट घेतली. मुंबई शहरातील सागरी मार्गावरील पर्यावरण विषयक मंजुरी तसेच सीआरझेड मधील नियमांत सुधारणा करण्यासाठी या बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली. सागरी रस्ते ही मुंबईची आता गरज बनली असून या रस्त्यांमुळे पर्यावरणाची हानी होणार नाही याची काळजी राज्य शासन घेईल. तसेच या मार्गावर इमारत बांधकामांना परवानगी नाकरण्यासाठी राज्य शासन कायदा करणार असल्याती तयारी मुख्यमंत्र्यांनी राज्यशासनाच्यावतीने दर्शविली. मुंबईतील सागरी रस्ते प्रकल्प अस्तित्वात यावा यासाठी केंद्र शासन सकारात्मक असल्याचे या बैठकीत जावडेकर यांनी सांगितले. या प्रकल्पात अडसर ठरणाऱ्या नियमांत सुधारणा करण्याचा केंद्र शासन जरूर विचार करेल. पर्यावरणाच्या हानी विरहित विकास साध्य करण्याचे केंद्रशासनाचे धोरण असल्याने मुंबईतील सागरी रस्ते तयार करताना पर्यावरणाचे रक्षण होईल यादृष्टीने राज्यशासनाने कामाला लागावे असे आश्वस्तही त्यांनी केले. नरीमन पॉईंट ते मालाड-कांदिवली या 36 कि.मी. सागरी रस्ते प्रकल्पाचा अंदाजित खर्च 10 हजार कोटी रूपये असून राज्य शासनाने या प्रकल्पासाठी सल्लागाराचीही नेमणूक केली आहे. 
                                  राज्यात निवड आधारीत श्रेणी पध्दत                          
उच्च शिक्षणाचा दर्जा सुधारावा तसेच विद्यार्थ्यांना आपल्या आवडीचे इतर विषयही शिकता यावेत यासाठी महाराष्ट्रातील विद्यापीठांमधे निवड आधारित श्रेणी पध्दत येत्या शैक्षणिक वर्षापासून लागू करण्यात येणार असल्याची थेट घोषणा शालेय, उच्च व तंत्र शिक्षण तसेच मराठी भाषा, सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी थेट दिल्लीत केली. विद्यापीठ अनुदान आयोगाच्यावतीने येथील विज्ञान भवनात आयोजित निवड आधारीत श्रेणी पध्दत कौशल्य व श्रेणी आधारित आरखडा याबात मंगळवारी सर्व राज्यांच्या शिक्षणमंत्र्याच्या बैठकीत श्री. तावडे सहभागी झाले होते. तसेच शास्त्री भवन येथे केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणी यांची भेट घेवून श्री. तावडे यांनी राज्यातील विविध शैक्षणीक विषयांवर चर्चा केली.
नागपूर येथे भारतीय व्यवस्थापन संस्था (आयआयएम) सुरु करण्यात येणार असून या संस्थेचे पालकत्व अहमदाबाद आयआयएम संस्थेकडे असणार आहे. राज्यात 27 फेब्रुवारी रोजी मराठी भाषा दिन साजरा होणार आहे, त्याआधी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळवून देण्यात येणार असल्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. याकार्यास गती प्राप्त होण्यासाठी श्री. तावडे यांनी केंद्रीय सांस्कृतिक कार्य मंत्री डॉ. महेश शर्मा यांची भेट घेतली.
                        प्रजासत्ताक दिनी राजपथावरील पथसंचलनासाठी महाराष्ट्राची सज्जता
महाराष्ट्र राज्यातर्फे `पंढरीची वारी` दर्शविणाऱ्या चित्ररथाची संकल्पना यावर्षी राजपथावरील गणतंत्रदिनी साकारली जाणार आहे. महाराष्ट्राचे दैवत अन् तमाम वारकऱ्यांचे श्रद्धास्थान असलेल्या पंढरपूरच्या पांडुरंगाच्या भेटीला राज्यातील व राज्याबाहेरील विविध भागातून पायी येणारे वारकरी आणि त्यातून होणारे सामाजिक व सांस्कृतिक दर्शन या चित्ररथाच्या माध्यमातून घडणार. दरवर्षी राजपथावर २६ जानेवारी या गणतंत्रदिनी राष्ट्रपती, पंतप्रधान आणि परदेशी पाहुण्यांच्या उपस्थितीत आयोजित कार्यक्रमात देशाच्या विविध राज्यांची संस्कृती व वैशिष्ट्य दर्शविणारे चित्ररथ प्रदर्शित केले जातात. महाराष्ट्र राज्याच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे राज्याचे वैशिष्ट्य दर्शविणारे दर्जेदार चित्ररथ प्रदर्शित करण्याची परंपरा आहे. १९९३ ते १९९५ असा सलग ३ वर्षे प्रथम क्रमांकाच्या मानासह बहुतांशवेळा महाराष्ट्राच्या चित्ररथाला गौरविण्यात आले आहे.
           अहमदनगरच्या अश्विनी उघडेने उमटवली राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कारावर मुद्रा
प्रसंगावधान आणि असिम धाडस दाखवत आपल्या धाकटया बहिणीला बिबटयाच्या तावडीतून वाचविणा-या अहमदनगर जिल्हयातील अकोले तालुक्यातील मेंहदुरी गावच्या अश्विनी उघडेची निवड यावर्षीच्या राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कारासाठी झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 24 जानेवारी 2015 रोजी तिचा सन्मान करण्यात आला. इयत्ता ६ व्या वर्गात शिकणारी आश्विनी राष्ट्रीय बाल शोर्य पुरस्कार सोहळयात आणि प्रजासत्ताक दिनी राजपथावर होणा-या पथ संचलनात सहभागी होण्यासाठी दिल्लीत आली होती.
                          प्रजासत्ताक दिनी राजपथावरील पथसंचलन शिबीरासाठी
     राज्यातील विद्यार्थी विद्यार्थीनी दिल्लीत दाखल
प्रजासत्ताक दिनी राजपथावर होणाऱ्या पथसंचलनात सहभागी होण्यासाठी महाराष्ट्रातील 37 विद्यार्थीनी आणि 76 विद्यार्थ्यांसह 113 कॅडेटस. तसेच राज्यातून राष्ट्रीय सेवा योजनेचे (एनएसएस) 14 आणि गोव्यातील 2 असे एकूण 16 विद्यार्थी-विद्यार्थिनी सराव शिबीरात सहभागी झाले आहेत. सराव शिबीरा दरम्यान होणा-या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमधे व राजपथावरील पथसंचलनात दरवर्षी महाराष्ट्राची सरशी असते.
                                                             00000000      

Tuesday, March 15, 2016

खासदार संजय जाधव; संवेदनशील लोकप्रतिनिधी



मंगळवार, १५ मार्च, २०१६ 

महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालया अंतर्गत दिल्लीत कार्यरत महाराष्ट्र परिचय केंद्राला लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी, साहित्यिक, विद्यार्थी आदींचा सतत राबता असतो. पण, आज परभणीचे खासदार संजय जाधव यांनी कार्यालयाला दिलेली भेट म्हणजे संवेदनशील लोकप्रतिनिधींचा परिचय देणारी आणि म्हणूनच स्मरणीय ठरली. ‘मराठवाड्यासह राज्यात दुष्काळाची परिस्थिती असताना मी हार-पुष्पगुच्छ कसे स्वीकारणार?’ हा भावूक स्वर ऐकून महाराष्ट्र परिचय केंद्रातील अधिकारी-कर्मचारी आणि उपस्थित पत्रकार यांना खासदार जाधव यांच्या संवेदनशील स्वभावाची प्रचिती आली.

सध्या संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. त्या निमित्ताने बहुतांश खासदार मंडळी दिल्लीत आहे. आपल्या व्यस्ततेतही खासदार संजय जाधव यांनी वेळ काढून महाराष्ट्र परिचय केंद्राला भेट दिली. कार्यालयाच्या शिरस्त्या प्रमाणे येथे येणाऱ्‍या पाहुण्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्याची परंपरा आहे. त्यानुसार परिचय केंद्राचे उपसंचालक दयानंद कांबळे यांनी श्री. जाधव यांच्या स्वागतासाठी पुष्पगुच्छ देऊ केले तेव्हा, श्री. जाधव यांनी त्यास नकार दिला. ते म्हणाले, मराठवाड्यासह राज्यात दुष्काळाची परिस्थिती असल्याने मी स्वागताचा बडेजाव स्वीकारने बंद केले आहे, हे ऐकूण माझ्यासह तिथे उपस्थित मराठी दैनिकांच्या दिल्ली प्रतिनिधींना श्री. जाधव यांच्या संवेदनशील स्वभावाचा परिचय आला. परभणी जिल्ह्यातील दुष्काळाची दाहकता पाहून श्री. जाधव यांनी आपल्या भागातील गरजुंना मदत करण्याचे कार्य जोमाने सुरू केले. याचाच एक भाग म्हणून त्यांनी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या ३०० हून अधिक मुला-मुलींची लग्ने लावून दिले. एवढ्यावरच ते थांबले नाहीत तर या मुला-मुलींचे संसार उभे करण्याचे काम त्यांनी केले आहे. दुष्काळी भागातील जनतेसाठी असणाऱ्या राज्य व केंद्र सरकारच्या योजनांच्या अंमलबजावणीतही ते विशेष लक्ष देत आहेत. दुष्काळग्रस्तांना खासदार निधीतून मदत देण्याचेही कार्यही ते करताहेत.

हे महत कार्य करतानाच श्री. जाधव यांनी दुष्काळग्रस्तांच्या दु:खाची जाणीव पदोपदी जपली आहे. लोकप्रतिनिधी म्हणून त्यांना अनेक ठिकाणी निमंत्रण असते. त्यानिमित्ताने ज्या-ज्या ठिकाणी ते जातात तिथे स्वागत म्हणून देण्यात येणारे पुष्पगुच्छ, भेट वस्तू, मिठाई आदी स्वीकारण्यास ते सक्त नकार देतात. आज महाराष्ट्र परिचय केंद्रात त्यांच्या स्वागताप्रसंगी त्यांनी नाकारलेले पुष्पगुच्छ म्हणजे माझ्यासह उपस्थित महाराष्ट्र परिचय केंद्राच्या अधिकारी-कर्मचारी व पत्रकारांनी अनुभवलेल्या संवेदनशील लोकप्रतिनिधींचे व्यक्तीमत्वच होय. खासदार संजय जाधव यांच्या या संवेदनशील स्वभावाचे वर्णन ‘आधी केले, मग सांगितले’ या उक्तीचा परिचय करून देणारीच ठरली.
-रितेश मोतीरामजी भुयार,
उपसंपादक,
महाराष्ट्र परिचय केंद्र, नवी दिल्ली.

'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.

Friday, January 29, 2016

महाराष्ट्र एनसीसीला देशातील तिस-या सर्वोत्तम संचालनालयाचा मान



नवी दिल्ली, 28 : महाराष्ट्र नॅशनल कॅडेट कोर्प्स(एनसीसी)ला देशातील सर्वोत्तम संचालनालयाचा तिस-या क्रमांचा मान मिळाला आहे. पंतप्रधान बॅनरचा मान पंजाब,चंदीगढ, हरियाणा व हिमाचल प्रदेश या संयुक्त संचालनालयाला  तर उपविजेतेपदाचा मान कर्नाटक व गोवा या संयुक्त संचालनालयाला मिळाला आहे.

              येथील छावनीभागातील गॅरीसन परेड ग्राउंडवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत आज पंतप्रधान रॅलीचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात पुरस्कारांची घोषणा व पुरस्कार वितरण करण्यात आले. यावेळी संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर, संरक्षण राज्यमंत्री राव इंद्रजीत सिंह, संरक्षण सचिव जी.मोहन कुमार, लष्कर प्रमुख जनरल दलवीर सिंह, वायुसेना प्रमुख एअरचिफ मार्शल अरूप राह, नौसेना प्रमुख ॲडमीरल आर.के.धवन आणि एनसीसीचे महासंचालक  लेफ्टनंट जनरल अनिरुध्द चतुर्वेदी मंचावर उपस्थित होते.

               पंतप्रधान मोदी यांनी या कार्यक्रमात उपस्थित देशभरातील २१०० एनएसएस कॅडेटसना संबोधित केले.ते म्हणाले, देशात नुकताच प्रजासत्ताक दिन साजरा झाला. स्वतंत्र भारत देशाने राज्यघटना स्वीकारली म्हणून आपण हा दिवस साजरा करतो. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी या देशाला राज्यघटना दिली ज्यामुळे विविध भाषा, संस्कृतीने नटलेला भारत देश एकसंध राहीला आहे. तूम्ही देशाच्या विविध भागातून प्रजासत्ताक दिनाच्या पथसंचलनात सहभागी होण्यासाठी आला.याठिकाणी आयोजित महीनाभराच्या शिबीरात चांगल्या गोष्टी शिकलात.  विविध भागातून आलेल्या देश -विदेशातील मित्रांशी तूमचा संवाद झाला. हा अनुभव तुम्हाला आयुष्याची शिदोरी ठरेल. सर्वजन आपआपल्या गावी जाताना स्वच्छता व देशप्रेमाचा संदेश आपल्या परिसरात विस्तार करा व देशसेवेचे व्रत कायम पाळा असे आवाहनही पंतप्रधानांनी केले.

           तत्पूर्वी, कार्यक्रमाच्या सुरूवातीस पंतप्रधानांना मानवंदना देण्यात आली. मानवंदना देण्या-या देशभरातील १७ एनसीसी संचालनालयाच्या चार दलातील निवडक कॅडेटसमधे महाराष्ट्रातील ९ कॅडेटसचा  सहभाग होता. यावेळी पंतप्रधानांनी मानवंदना देणा-या एनसीसी पथकाची पाहणी केली. यानंतर शिबीरात सहभागी प्रत्येक राज्याच्या निवडक पथकांचे पथ संचलन झाले. ५० एनसीसी कॅडेटसचा सहभाग असणा-या महाराष्ट्राच्या पथकाचे नेतृत्च महेश पांडव ने तर ध्वजवाहन देवयानी पागीरे ने केले. बांग्लादेश, भुटान, कझाकीस्तान, नेपाळ, रशिया,श्रीलंका आणि व्हिएतनाम येथील एनसीसी कॅडेटसनेही या पथसंचालनालयात भाग घेतला. यावेळी पथसंचलनात सहभागी एनसीसीच्या लष्कर, वायूदल, नौदल, क्रीडा आणि स्वच्छ भारत अभियानाचा संदेश देणा-या आकर्षक चित्र रथांना उपस्थितांनी टाळयांच्या गजरात दाद दिली. दिल्ली एनसीसी संचालनालयाच्या कॅडेटसनी यावेळी परॉसेलींगचे तर विविध संचालनालयाच्या ६०० कॅडेटसनी योगासनांचे प्रात्याक्षीक सादर केले. पंतप्रधानांच्या हस्ते  पंतप्रधान बॅनर पुरस्कार वितरण करण्यात आला. त्यानंतर पंतप्रधानांनी उपस्थितांना संबोधित केले. हमसभ भारतीय है या एनसीसीगीतानंतर राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.

             एनसीसी महासंचालनालय आणि दिल्ली संचालनालयाच्यावतीने येथील गॅरीसन परेड ग्राऊंडवर प्रजासत्ताक दिनानिमित्त देशभरातील एनसीसी कॅडेटसाठी शिबिराचे आयोजन केले. १ जानेवारी पासून या शिबिराला सुरुवात झाली. उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांच्या हस्ते या शिबिराचे उदघाटन झाले. तर पंतप्रधान रॅलीने आज या शिबिराची सांगता झाली. देशभरातील १७ एनसीसी संचालनालयाच्या २१०० कॅडेट्स यात सहभागी झाले होते. महाराष्ट्रातील ११४ एनसीसी कॅडेटस या शिबिरात  सहभागी झाले. यातील २५ कॅडेटसची  प्रजासत्ताक दिनी राजपथावरील पथसंचलनासाठी तर 9 कॅडेटसची  पंतप्रधान रॅलीमधे मानवंदना देण्यासाठी  निवड झाली.  

                        या शिबिरात दररोज पथसंचलनाचा सराव आणि विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. ड्रिल कॉम्पीटीशन, राष्ट्रीय एकात्मता जागृकता कार्यक्रम, सांस्कृतिक कार्यक्रम स्पर्धा, राजपथ पथसंचलन निवड स्पर्धा, पंतप्रधान रॅलीसाठी मानवंदना निवड स्पर्धेत महाराष्ट्रातील कॅडेटसनी उत्तम कामगिरी केली. गेल्या 25 वर्षांपैकी 17 वेळा पंतप्रधान बॅनरचा बहुमान मिळवणा-या महाराष्ट्राला यावर्षी तिस-या क्रमांकावर समाधान मानावे लागले.महाराष्ट्राच्या संघाचे प्रमुख कर्नल निखिल कुलकर्णी आणि उपप्रमुख मेजर आर.आर.शिंदे हे आहेत .                 

                                                              ००००००

Thursday, January 28, 2016

राजपथावर महाराष्ट्राचे शानदार प्रदर्शन : 67 वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा



नवी दिल्ली : देशाचे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रांसचे राष्ट्राध्यक्ष फ्रांसिस्को ओलांद यांच्या उपस्थितीत मंगळवारी राजपथावर पार पडलेल्या 67 व्या प्रजासत्ताक दिन सोहळ्यात महाराष्ट्राचे शानदार प्रदर्शन बघायला मिळाले. राजपथावर देशाच्या समृद्ध सांस्कृतिक वारसा व शस्त्रसज्जतेसोबतच महाराष्ट्राच्यावतीने सादर ‘साेंगी मुखवटा’या लोकनृत्याच्या बहारदार सादरीकरणाने उपस्थितांच्या मनाचा ठाव घेतला. राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कार प्राप्त महाराष्ट्रातील 3 बालके, राष्ट्रीय सेवा योजना पथकाचे नेतृत्व करणारा आसीफ शेख हे ही या पथसंचलनाचे खास वैशिष्ट्य ठरले.

प्रजासत्ताक दिनाच्या सकाळी देशाच्या राजधानीत पसरलेले धुके, जोडीला असलेली कडाक्याची थंडी यास न जुमानता दिल्लीकर व देश-विदेशातून राजपथावर अलोट जनसमुदाय जमला. 10 वाजताच्या सुमारास राजपथावर सुर्यकिरणांच्या आगमनाने वातावरण निवळले यातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे राजपथावर आगमन झाले. देशासाठी शहीद झालेल्या वीर सैनिकांच्या स्मरनार्थ सदैव तेवत राहणाऱ्या इंडियागेटस्थित ‘अमर जवान ज्योतीला’ पंतप्रधानांनी देशवासियांच्यावतीने आदरांजली वाहिली. यावर्षीच्या प्रजासत्ताकदिनाचे विशेष पाहुणे फ्रांसचे राष्ट्राध्यक्ष फ्रांसिस्को ओलांद आणि राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांचे राजपथावर आगमन झाले. उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांच्यासह केंद्रीय मंत्रिमंडळातील मंत्री व विविध क्षेत्रातील मान्यवर यावेळी उपस्थित होते.

राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी ध्वजारोहण केले. यानंतर, राष्ट्रगीत व त्यासोबतच 21 तोफांची सलामी देण्यात आली. भारतीय पॅराशुट रेजीमेंटचे लांसनायक मोहननाथ गोस्वामी यांच्या अभुतपूर्व शौर्य व बलिदानासाठी मरणोत्तर जाहीर सर्वोच्च शौर्यपदक अशोक चक्र त्यांच्या पत्नी भावना गोस्वामी यांना राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. 
 राजपथावर प्रथमच विदेशी सैन्याच आणि श्वान पथकाचे पथसंचलन

यानंतर राजपथावर प्रजासत्ताक दिनाच्या पथसंचलनास सुरूवात झाली. राजपथावरील पथसंचलनाच्या इतिहासात प्रथमच विदेशातील सैन्यांनी पथसंचलन केल्याचा अनुभव देशावासियांना आला. ‘सांद्रानील’ ची धून वाजवणाऱ्या फ्रांस सैन्याच्या बँड पथकाचे राजपथावर सर्वप्रथम आगमन झाले व उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात त्यांना दाद दिली. त्यानंतर फ्रांस सैन्याच्या 75 सैनिकांचा समावेश असणाऱ्या शिस्तबद्ध सैन्य पथकाचे पथसंचलन झाले. लष्कराच्या विविध रेजीमेंटच्या पथसंचलनानंतर राजपथावर लष्कराच्या श्वान पथकाचे शानदार पथसंचलन झाले. या दोनही पथसंचलनाने राजपथावर इतिहास रचला.

भारताची शस्त्र सज्जता दर्शविणाऱ्या सेनेच्या तीनही दळांचे आकर्षक चित्ररथ, सेनेच्या सैनिकांचे आणि बॅंड पथकांचे पथसंचलन, सीमा सुरक्षा दळाचे घोडदळ, उंटदळ यांचे पथसंचलन आणि बायकर्सच्या चित्तथरारक कसरती उपस्थितांच्या टाळ्या मिळवत होते.

वैशिष्ट्यपूर्ण व वैविध्यपूर्ण संस्कृती दर्शविणाऱ्या 16 राज्यांचे आणि केंद्रांतील मंत्रालयांनी तयार केलेल्या आकर्षक चित्ररथांच्या पथसंचलनाने उपस्थितांचा उत्साह टिपेला पोचल्याचे चित्र होते.

असामान्य शौर्य दाखविणाऱ्या देशभरातील राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कार प्राप्त 25 मुला-मुलींनी यावेळी उघड्या जिप्सीमधून उपस्थितांना अभिवादन केले. शौर्याचा परिचय देणाऱ्या व मरणोत्तर ‘भारत पुरस्कार’ जाहीर नागपूरच्या गौरव सहस्त्रबुद्धेची आई रेखा सहस्त्रबुद्धे यांच्यासह जळगांव जिल्ह्यातील कोथळी येथील निलेश भील, वर्धा जिल्ह्यातील सिंदी रेल्वेचा वैभव घंगारे आणि मुंबईतील वाळकेश्वरचा मोहीत दळवी या महाराष्ट्रातील शूर बालकांचा यात समावेश होता.

राष्ट्रीय सेवा योजनेच्या (एनएसएस) पथकाच्या राजपथावरील पथसंचलनाचे नेतृत्व करणारा डॉ.बाबासाहेब आंबेडकर औरंगाबाद मराठवाडा विद्यापीठाच्या औरंगाबाद येथील शासकीय कला व विज्ञान महाविद्यालयाचा विद्यार्थी शेख आसीफ ने महाराष्ट्राला नेतृत्वाचा मान मिळवून दिला. महाराष्ट्र व गोव्यातील स्वयंसेवकासह देशातील 160 सदस्यीय एनएसएस पथकाचे आसीफ ने नेतृत्व केले. ही महाराष्ट्राने सलग तिसऱ्यांदा मिळवलेली उपलब्धी आहे. याआधी वर्ष 2014 मधे धनजराज मुंडे याने राजपथावर एनएसएस पथकाचे तर धनराज लहाने याने एनसीसी पथकाचे नेतृत्व केले होते. वर्ष 2015 मधे खुशबू जोशी हिने राजपथावर एनएसएस पथकाचे तर अमन जगताप याने एनसीसी पथकाचे नेतृत्व केले होते.

नागपूर येथील दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्राच्या शालेय मुला-मुलींनी सादर केलेल्या महाराष्ट्राच्या प्रसिद्ध ‘साेंगी मुखवटा’ लोक नृत्याच्या सादरीकरणाला यावेळी उपस्थितांच्या जोरदार टाळ्यांचा प्रतिसाद मिळाला. पांरपरिक वेशभुषेतील या मुलींनी सादर केलेल्या नृत्याला उपस्थितांची भरभरून दाद मिळाली. सीमा सुरक्षा दळाच्या बायकर्स आणि वायुदळाच्या चित्तथरारक कसरतीनंतर राष्‍ट्रगीताने राजपथावरील पथसंचलनाची सांगता झाली.

पद्म पुरस्कार जाहीर : महाराष्ट्राला १ पद्म विभूषण, ५ पद्मभूषण तर १०पद्मश्री ; धिरूभाई अंबानी यांना मरणोत्तर पद्मविभूषण




नवी दिल्ली 
:  केंद्रीय गृहमंत्रालयाच्यावतीने सोमवारी वर्ष २०१६’ च्या पद्मपुरस्कारांची घोषणा करण्यात आली. विविध क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या देशातील ११२ मान्यवरांना हे पुरस्कार जाहीर झाले आहेत. या पुरस्कारांमधे १ पद्म विभूषण, ५ पद्मभूषण तर १० पद्मश्री असे एकूण १६ पद्म पुरस्कार महाराष्ट्रातील मान्यवरांना जाहीर झाले आहेत. देशातील उद्योग व व्यापार क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या धिरूभाई अंबानी यांना मरणोत्तर पद्म विभूषण पुरस्कार जाहीर झाला.

देशातील प्रतिष्ठीत नागरी पुरस्कार म्हणून गणल्या जाणाऱ्या पद्मपुरस्कारांची यादी आज केंद्रीय गृहमंत्रालयाने जाहीर केली. कला, व्यापार, उद्योग, सामाजिक कार्य, सार्वजनिक क्षेत्र, विज्ञान-अभियांत्रिकी, औषध,साहित्य-शिक्षण, क्रीडा, नागरीसेवा इत्यादी क्षेत्रात सर्वोत्तम योगदान देणाऱ्या देशातील ११२ मान्यवरांना पद्म पुरस्कार जाहीर झाले. तीन श्रेणींमध्ये जाहीर झालेल्या या पुरस्कारात १० पद्मविभूषण, १९ पद्मभूषण आणि ८३ पद्मश्री पुरस्कारांचा समावेश आहे. या पुरस्कार विजेत्यांमध्ये १९ महिलांचा तर १० अनिवासी भारतीयांचा समावेश आहे. ४ मान्यवरांना मरणोत्तर पुरस्कार जाहीर झाला आहे.
प्रजासत्ताकदिनाच्या पूर्व संध्येला जाहीर महाराष्ट्रातील पद्मपुरस्कार विजेत्यांची यादी पुढील प्रमाणे.

पुरस्काराचे नाव
पुरस्कार प्राप्त मान्यवरांची नावे
कार्यक्षेत्र



पद्मविभूषण
धिरूभाई अंबानी (मरणोत्तर)
व्यापार आणि उद्योग



पद्मभूषण
अनुपम खैर
कला  चित्रपट

उदित नारायण झा
कला- पार्श्व गायन

प्रा.एन.एस.रामानुज टाटाचार्य
साहित्य - शिक्षण

स्वामी तेजोमयानंद
अध्यात्म

हाफिज कॉन्ट्रक्टर
वास्तूशास्त्र



द्मश्री
अजय देवगण
कला  चित्रपट

प्रियंका चोपडा
कला  चित्रपट

मधुर भांडारकर
कला  चित्रपट दिग्दर्शन व निर्मिती

पियुष पांडे
जाहिरात व संवाद

सुभाष पालेकर
शेती

ॲड.उज्वल निकम
सार्वजनिक क्षेत्र

प्रा.(डॉ.) गणपती दादासाहेब यादव
विज्ञान व अभियांत्रिकी

सुधाकर ओलवे
समाजसेवा

दिलीप संघवी
व्यापार आणि उद्योग

डॉ.केकी होरमुसजी घरडा
व्यापार आणि उद्योग

Friday, January 22, 2016

महाराष्ट्राच्या शूर वीर बालकांची देशाने घेतली दखल



शूरविरांचा महाराष्ट्र म्हणून देशाला ओळख आहे. या मातीत मुलांवर होणारे साहस व सामाजिक भान जपण्याचे संस्कार देशवासियांना नुकतेच बघायला मिळाले. प्रसंग, राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्काराच्या घोषणा आणि यात महाराष्ट्रातील चार बालकांच्या समावेशाचा. केंद्रीय महिला व बालकल्याण मंत्रालयाअंतर्गत कार्य करणाऱ्या भारतीय बालकल्याण परिषदेने वर्ष २०१५ च्या राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्काराची घोषणा केली त्यात देशातील ३ मुली व २२ मुलांसह २५ बालकांचा समावेश आहे. यात महाराष्ट्रातील चौघांचा समावेश आहे. त्यांचा थोडक्यात परिचय...
शौर्य पुरस्कारामधील सर्वोच्च गणला जाणारा ‘भारत पुरस्कार’ नागपूरच्या गौरव सहस्त्रबुद्धे याला मरणोत्तर जाहीर झाला. जळगाव जिल्ह्यातील कोथळीच्या निलेश भिल, वर्धा जिल्ह्यातील सिंदी रेल्वेच्या वैभव घंगारे आणि मुंबईतील वाळकेश्वरच्या मोहीत दळवी ला राष्ट्रीय शौर्य पुरस्कार जाहीर झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते त्यांना २४ जानेवारी रोजी या पुरस्कारांनी गौरविण्यात येणार आहे. तसेच, २६ जानेवारी या प्रजासत्ताक दिनी राजपथावर होणाऱ्या पथसंचालनात सहभाग घेऊन देश-विदेशातील दिग्गज मान्यवरांना हे बालक अभिवादन करणार आहेत.

भारत देशाच्या विविध भागातील अतुल्य शौर्य दाखविणाऱ्या ६ ते १८ वर्ष वयोगटातील मुला-मुलींना केंद्रीय महिला व बालकल्याण मंत्रालयाअंतर्गत कार्यरत राष्ट्रीय बालकल्याण परिषदेच्यावतीने दरवर्षी प्रजासत्ताक दिनाच्या दोन दिवस आधी पंप्रधानांच्या हस्ते राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते. तसेच राजपथावरील पथसंचालनात हे बालक सहभागी होतात. महाराष्ट्रातील ३ शूर बालकांसह गौरव सहस्त्रबुध्देची आई पुरस्कार वितरण व प्रजासत्ताक दिन सोहळयात सहभागी होण्यासाठी दिल्लीत दाखल झाले आहेत. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, राज्यपाल नजीब जंग आणि भारताचे उपराष्‍ट्रपती महंमद हमीद अन्सारी यांनी या बालकांना बोलवून त्यांच्याशी संवाद साधला आहे. राष्ट्रपती प्रणब मुखर्जी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सोबतही हे शूर बालक संवाद साधणार आहेत.

राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कार प्राप्त महाराष्ट्रातील बालकांच्या शौर्याबद्दल

नागपूरच्या गौरव सहस्त्रबुध्दे याने अंबाझरी तलावात बुडणाऱ्या ४ मुलांचा प्राण वाचविला, त्यात गौरवला आपले प्राण गमवावे लागले. दहावीत शिकणारा गौरव ३ जून २०१४ ला आपल्या ४ मित्रांसह अंबाझरी तलावजवळ खेळत असताना अचानक त्याचे मित्र पाण्यात बुडत असल्याचे त्याने पाहीले. प्राणाची पर्वा न करता त्याने आपल्या तीन मित्रांना पाण्यातून सुखरूप बाहेर काढले आणि चौथ्या मित्राला सुखरूप बाहेर काढत असतानाच गौरव पाण्यात बुडाला व त्यातच त्याचा मृत्यू झाला. गौरवच्या या साहसी कर्तृत्वासाठी त्याला ‘भारत पुरस्कार’ प्राप्त झाला आहे. गौरवची आई रेखा कवडूजी सहस्त्रबुध्दे हा पुरस्कार स्वीकारणार आहे.

जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यातील कोथळी गावात राहणाऱ्या निलेश रेवाराम भिल याला शौर्य पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. ३० ऑगस्ट २०१४ ला ऋषिपंचमीच्या दिवशी आपल्या कुटुंबियांसोबत दर्शनासाठी आलेला मुलगा मंदिरा समोरच्या घाटावर पाय धुण्यासाठी गेला असता पाण्यात पडला. हे चित्र मंदिरात दर्शनासाठी आलेल्या निलेश भिलच्या लक्षात येताच त्याने प्रसंगावधान राखत क्षणाचाही विलंब न करता पाण्यात उडी घेऊन त्याने मुलाचे प्राण वाचविले. निलेश भील हा कोथळी येथील जिल्हा परिषद शाळेत ५ वीत शिकत आहे.

वर्धा जिल्ह्यातील सेलू तालुक्यातील सिंदी रेल्वे येथील सहावीत शिकणाऱ्या वैभव रामेश्वर घंगारे ला शौर्य पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. वैभव हा २६ जुलै २०१४ ला गावातील नंदी नदी किनारी मित्रांसोबत खेळत असताना अचानक नदीला पूर आला. नदीतील पाण्याच्या प्रवाहासोबत वैभवचा मित्र सुहास बोरकर वाहून गेला. तो पुढे एका पुलाखालील सिमेंटच्या पाईपजवळ अडकला. तिथे उभ्या असणाऱ्या लोकांपैकी सुहासच्या मदतीला कोणीच धजावले नाही मात्र वैभवने जीवाची पर्वा न करता नदीत उडी घेतली व मित्राचे प्राण वाचविले.

मुंबईतील वाळकेश्वर भागात आत्याकडे राहणाऱ्या मोहीत ने परिसरातील तलावात स्नान करताना बुडत असलेल्या मुलीचे प्राण वाचवले. २५ एप्रिल २०१५ ला आपल्या मामाकडे दिवाळीच्या सुटीत आलेल्या कृष्णा पाष्टे ही मुलगी तलावात आंघोळीसाठी गेली असता बुडत होती. तिने आपल्या मैत्रीणीला हात मागितला, पण तिला पोहता येत नसल्याने मैत्रीणीनेही हात न दिल्याचे चित्र मोहीत ने पाहिले. तोच त्याने २५ फुट खोल तलावात उडी घेऊन कृष्णाचे प्राण वाचविले व तिला नजिकच्या इस्पितळात भरती केले. मोहीतच्या आई वडीलांचे निधन झाले असून आत्याकडे राहणारा मोहीत वाळकेश्वर येथील महानगर पालिकेच्या बालगंगा कवळेमठ शाळेत आठवीत शिकत आहे.

३ मुली आणि २२ मुलं अशा एकूण २५ बालकांना वर्ष २०१५ च्या राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. पदक, प्रमाणपत्र आणि रोख रक्कम असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. पुरस्कार प्राप्त बालकांना भारतीय बालकल्याण परिषदेच्यावतीने शालेय शिक्षण पूर्ण होईपर्यंत आर्थिक मदत करण्यात येते. तसेच वैद्यकशास्त्र आणि अभियांत्रीकीचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना इंदिरा गांधी शिष्यवृत्तीअंतर्गत पदवी पूर्ण होईपर्यंत आर्थिक मदत पुरविण्यात येते. महाराष्ट्रातील चार बालकांना मिळणारा हा पुरस्कार म्हणजे महाराष्ट्राच्या शूर वीर बालकांची देशाने घेतली दखलच म्हणावी लागेल.

-रितेश मोतीरामजी भुयार
उपसंपादक, महाराष्ट्र परिचय केंद्र, नवी दिल्ली

Monday, January 18, 2016

राजधानीत महाराष्ट्राचा दुहेरी गौरव



दिल्लीत कडाक्याच्या थंडीने जोर धरलाय. त्यामुळे धुक्याशी सामना करत आम्ही कार्यालयाच्या वाहनाने कार्यक्रमस्थळी पोहचलो ते सकाळी साडेनऊच्या सुमारास. औचित्य, केंद्रीय पेट्रोलीयम व गॅस मंत्रालयाच्यावतीने ‘तेल व वायू संवर्धन’सप्ताहास सुरुवात आणि तेल व वायू संवर्धन क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीसाठी देशातील सर्वोत्तम राज्याचा महाराष्ट्राला मिळालेला बहुमान. तर इयत्ता 9 वीत शिकणाऱ्‍या महाराष्ट्रातील प्रार्थना रानडेला मराठी भाषेतील सर्वोत्तम निबंधासाठी मिळालेला राष्ट्रीय पुरस्कार. वर्षभर विविध क्षेत्रात राजधानीत घडणाऱ्‍या महाराष्ट्राच्या गौरवापेक्षा हा गौरव वेगळाच होता. कारण इथे राज्यातील ‘प्रशासन आणि शिक्षण’ असा दुहेरी सन्मान होता. हा ऐतिहासिक क्षण डोळ्यात टिपताना दिल्लीतील कडाक्याच्या थंडीत महाराष्ट्राचा दुहेरी सन्मान पाहून ऊर गौरवाने भरून आला.

राज्यातील सर्वोच्च प्रशासकीय पद म्हणून संबोधल्या जाणाऱ्‍या मुख्य सचिवांनी अर्थात स्वाधिन क्षत्रिय साहेबांनी हा पुरस्कार स्वीकारला. तर याचवेळी अहमदनगरच्या भाऊसाहेब फिरोदिया शाळेतील इयत्ता 9वीत शिकणाऱ्‍या प्रार्थना रानडेला मराठी भाषेतील सर्वोत्तम निबंधासाठी राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला.

केंद्रीय पेट्रोलियम व गॅस मंत्रालयाअंतर्गत कार्य करणाऱ्या पेट्रोलियम संवर्धन संशोधन मंडळाच्यावतीने ‘तेल व वायू संवर्धन सप्ताह १६ -३१ जानेवरी २०१६” या देशव्यापी कार्यक्रमाचे केंद्रीय पेट्रोलीयम व गॅस मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या हस्ते उद्घाटन झाले. मागील वर्षी तेल व वायू संवर्धन सप्ताहापासून देशात वर्षभरात अमंलबजावणी झालेल्या उत्तम कामासाठी मोठ्या राज्यांपैकी फक्त एका राज्याचा सन्मान करण्यात आला. मागील वर्षात महाराष्ट्रात एकूण २०,४१७ संवर्धन कार्यक्रम यशस्वीपणे राबविले म्हणून मोठ्या राज्यांच्या गटात महाराष्ट्राचा सर्वोत्तम राज्य म्हणून बहुमान झाला. केंद्रीय पेट्रोलीयम व गॅस मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या हस्ते राज्याचे मुख्य सचिव स्वाधिन क्षत्रिय आणि अन्न व नागरी पुरवठा तथा ग्राहक संरक्षण विभागाचे प्रधान सचिव दीपक कपूर यांनी स्वीकारला.

गेल्या वर्षभरात तेल व वायू संवर्धनासाठी उत्तम प्रकारे कार्य करणाऱ्या राज्यांचा अभ्यास करून हा पुरस्कार महाराष्ट्राला प्रदान करण्यात आला. केंद्र सरकारच्या मार्गदर्शनाखाली जानेवारी २०१५ मध्ये तेल व वायू संवर्धन पंधरवड्यापासून महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये तेल व वायू संवर्धनाच्या दिशेने कामास सुरुवात झाली. वर्षभरात मंत्रालय आणि जिल्हास्तरावरील कार्यालयांनी राज्यातील उद्योग, कृषी, वाहतूक, जैव इंधन, घरगुती वापर आदी क्षेत्रात जनजागृतीसाठी विविध शिबीरांचे आयोजन केले.

तेल व वायू संवर्धनाबाबत राज्यातील सर्वसामान्य नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी १हजार २२ शिबीरांचे आयोजन करण्यात आले. राज्यातील शेतकऱ्यांमधे इंधन वापर व तेल तसेच वायू संवर्धनाबाबत जागृती करण्यासाठी ४२० शिबिरे आयोजित करण्यात आली. घरगुती गॅस वापरताना इंधन बचतीबाबत जागृती करण्यासाठी राज्यांतील महिलांकरिता १२ हजार ५६१ शिबीरांचे आयोजन करण्यात आले. उद्योग क्षेत्रात प्रदूषण कमी करून इंधन संवर्धनाबाबत जागृती करण्यासाठी २६१ शिबीरांचे आयोजन करण्यात आले. राज्यातील शासकीय व खाजगी वाहनांद्वारे होणारे प्रदूषण कमी करणे व इंधन संवर्धनाबाबत जागृतीसाठी ६ हजार १५३ शिबीरांचे यशस्वीपणे आयोजन करण्यात आले. अशाप्रकारे गेल्या वर्षात राज्यात एकूण २० हजार ४१७ संवर्धन कार्यक्रम यशस्वीपणे राबविण्याची किमया महाराष्ट्राने केली परिणामी मोठ्या राज्यांच्या गटात महाराष्ट्राची सर्वोत्तम राज्य म्हणून बहुमान झाला.

पेट्रोलियम संवर्धन संशोधन मंडळाच्यावतीने राज्य सरकारांच्या कामांप्रमाणेच देशातील विविध राज्यांमधे विद्यार्थ्यांमधे तेल व वायू संवर्धनाबाबत जनजागृती घडवून आणण्यासाठी निबंध स्पर्धांचे आयोजन केले. सप्टेंबर २०१५ मधे पार पडलेल्या या स्पर्धेच्या अंतिम निकालातून प्रत्येक राज्यातून एका विद्यार्थी विद्यार्थीनीची निवड करण्यात आली. मराठी भाषेतील सर्वोत्तम निबंधासाठी अहमदनगर येथील भाऊसाहेब फिरोदीया शाळेच्या इयत्ता 9वीत शिकणाऱ्या प्रार्थना रानडेला हा पुरस्कार केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. पुरस्कार स्वरूपात प्रार्थनाला ३० हजार रूपये रोख, एक लॅपटॉप प्रदान करण्यात आला. तसेच, प्रार्थनाला केंद्रीय पेट्रोलीयम व गॅस मंत्रालयाच्यावतीने यावर्षी जून महिन्यात जपानमध्ये अभ्यास सहलीसाठी पाठविण्यात येणार आहे.

प्रार्थना या यशाबद्दल सांगते, ‘ मी हा निबंध लिहिला तेव्हा मला वाटलंही नव्हतं की माझी निवड होऊन मला राष्ट्रीय सन्मान मिळेल. मी ५वी पासूनच निबंध लेखन स्पर्धेत भाग घेत आली त्यातील हे सर्वोच्च यश आहे. मला मंत्रालय जपानच्या अभ्यास सहलीसाठी पाठवित आहे. या सहलीमधे तेल व वायू संवर्धनासाठी जपानमधे सुरु असलेल्या विविध उपक्रमांचा अभ्यास करून आपल्या राज्यात व देशात त्याचा कसा फायदा होऊ शकेल यावर अभ्यास करेन. मी माझ्या घरापासून त्याच्या अमंलबजावणीसाठी प्रयत्न करेन. माझं शहर, माझा जिल्हा, राज्य व देश सुंदर बनविण्यासाठी मला या पुरस्कार स्वरुप मिळालेल्या सोयींचा उपयोग करेन.’ प्रार्थनाचे विचार ऐकत असताना डिआरडीओच्या सभागृहात उपस्थित तिचे डॉक्टर वडील प्रवीण रानडे व निवृत्त शासकीय कर्मचारी आई प्रतिक्षा रानडे, शाळेच्या शिक्षिका शोभा पालवे यांच्यासह माझा ऊर स्वाभीमानाने भरून आला. महाराष्ट्राचा हा असा दुहेरी सन्मान सदैव आठवणींच्या कप्प्यात जपावा असाच होता.

रितेश मोतीरामजी भुयार, 
उपसंपादक,
महाराष्ट्र परिचय केंद्र, नवी दिल्ली.