Tuesday, March 15, 2016

खासदार संजय जाधव; संवेदनशील लोकप्रतिनिधी



मंगळवार, १५ मार्च, २०१६ 

महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालया अंतर्गत दिल्लीत कार्यरत महाराष्ट्र परिचय केंद्राला लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी, साहित्यिक, विद्यार्थी आदींचा सतत राबता असतो. पण, आज परभणीचे खासदार संजय जाधव यांनी कार्यालयाला दिलेली भेट म्हणजे संवेदनशील लोकप्रतिनिधींचा परिचय देणारी आणि म्हणूनच स्मरणीय ठरली. ‘मराठवाड्यासह राज्यात दुष्काळाची परिस्थिती असताना मी हार-पुष्पगुच्छ कसे स्वीकारणार?’ हा भावूक स्वर ऐकून महाराष्ट्र परिचय केंद्रातील अधिकारी-कर्मचारी आणि उपस्थित पत्रकार यांना खासदार जाधव यांच्या संवेदनशील स्वभावाची प्रचिती आली.

सध्या संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. त्या निमित्ताने बहुतांश खासदार मंडळी दिल्लीत आहे. आपल्या व्यस्ततेतही खासदार संजय जाधव यांनी वेळ काढून महाराष्ट्र परिचय केंद्राला भेट दिली. कार्यालयाच्या शिरस्त्या प्रमाणे येथे येणाऱ्‍या पाहुण्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्याची परंपरा आहे. त्यानुसार परिचय केंद्राचे उपसंचालक दयानंद कांबळे यांनी श्री. जाधव यांच्या स्वागतासाठी पुष्पगुच्छ देऊ केले तेव्हा, श्री. जाधव यांनी त्यास नकार दिला. ते म्हणाले, मराठवाड्यासह राज्यात दुष्काळाची परिस्थिती असल्याने मी स्वागताचा बडेजाव स्वीकारने बंद केले आहे, हे ऐकूण माझ्यासह तिथे उपस्थित मराठी दैनिकांच्या दिल्ली प्रतिनिधींना श्री. जाधव यांच्या संवेदनशील स्वभावाचा परिचय आला. परभणी जिल्ह्यातील दुष्काळाची दाहकता पाहून श्री. जाधव यांनी आपल्या भागातील गरजुंना मदत करण्याचे कार्य जोमाने सुरू केले. याचाच एक भाग म्हणून त्यांनी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या ३०० हून अधिक मुला-मुलींची लग्ने लावून दिले. एवढ्यावरच ते थांबले नाहीत तर या मुला-मुलींचे संसार उभे करण्याचे काम त्यांनी केले आहे. दुष्काळी भागातील जनतेसाठी असणाऱ्या राज्य व केंद्र सरकारच्या योजनांच्या अंमलबजावणीतही ते विशेष लक्ष देत आहेत. दुष्काळग्रस्तांना खासदार निधीतून मदत देण्याचेही कार्यही ते करताहेत.

हे महत कार्य करतानाच श्री. जाधव यांनी दुष्काळग्रस्तांच्या दु:खाची जाणीव पदोपदी जपली आहे. लोकप्रतिनिधी म्हणून त्यांना अनेक ठिकाणी निमंत्रण असते. त्यानिमित्ताने ज्या-ज्या ठिकाणी ते जातात तिथे स्वागत म्हणून देण्यात येणारे पुष्पगुच्छ, भेट वस्तू, मिठाई आदी स्वीकारण्यास ते सक्त नकार देतात. आज महाराष्ट्र परिचय केंद्रात त्यांच्या स्वागताप्रसंगी त्यांनी नाकारलेले पुष्पगुच्छ म्हणजे माझ्यासह उपस्थित महाराष्ट्र परिचय केंद्राच्या अधिकारी-कर्मचारी व पत्रकारांनी अनुभवलेल्या संवेदनशील लोकप्रतिनिधींचे व्यक्तीमत्वच होय. खासदार संजय जाधव यांच्या या संवेदनशील स्वभावाचे वर्णन ‘आधी केले, मग सांगितले’ या उक्तीचा परिचय करून देणारीच ठरली.
-रितेश मोतीरामजी भुयार,
उपसंपादक,
महाराष्ट्र परिचय केंद्र, नवी दिल्ली.

'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.

No comments:

Post a Comment