Thursday, December 3, 2015

राज्यातील प्रशासकीय अधिकाऱ्यांची दिल्लीत छाप


सरकारचे कायदे, नियम व योजनांची चोख अंमलबजावणी करून कल्याणकारी समाजव्यवस्था निर्माण करण्याची जबाबदारी प्रशासन व्यवस्थेची असते. या व्यवस्थेत राहून उत्तम व इतरांसाठी पथदर्शी काम करणाऱ्या अधिकाऱ्यांचा गौरव दिल्लीतील ‘जी फाईल्स’ ही संस्था करते. संस्थेने 2015 च्या वार्षिक पुरस्कारासाठी देशभरातील १० प्रशासकीय अधिकाऱ्यांची निवड केली, त्यात महाराष्ट्रातील 3 अधिकाऱ्यांचा समावेश असणं ही गौरवाची बाब आहे. पुरस्कार वितरणसमारंभात महाराष्ट्राचा गौरव आणखी वाढविणारा क्षण ठरला तो, या संस्थेने राज्याचे सुपूत्र ज्येष्ठ वैज्ञानिक डॉ.अनिल काकोडकर यांना ‘जीवन गौरव पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्याचा. 

नुकतेच ‘जी फाईल्स’संस्थेच्यावतीने येथील नागरी सेवा अधिकारी संस्थेत केंद्रीय खान व स्टील मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांच्या हस्ते प्रसिद्ध वैज्ञानिक डॉ.अनिल काकोडकर यांना जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. महाराष्ट्र शासनाच्या जालना येथील आंतरराष्ट्रीय उपग्रह देखरेख कक्षाचे प्रभारी अभियंता अजय सिंघल यांना ‘असाधारण योगदान पुरस्कार’, जलसंपदा आणि रोजगार हमी योजना विभागाचे सचिव प्रभाकर देशमुख आणि विधी व तांत्रिक विभागाच्या महासंचालक मीरा बोरवणकर यांना ‘उत्कृष्ट योगदान पुरस्कार’ प्रदान करण्यात आले. रेल्वे मंत्री सुरेश प्रभु, हरियाणा राज्याचे अर्थमंत्री कॅप्टन अभिमन्यू यावेळी उपस्थित होते. प्रशासकीय सेवेत कार्यरत देशातील विविध राज्यात उत्तम कार्य करणाऱ्या प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या कामाचे मूल्यमापन करून त्यांना गौरविण्याचे कार्य ‘जी फाईल्स’ ही संस्था करीत आहे. केंद्र सरकारचे माजी कॅबीनेट सचिव प्रभात कुमार यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीमधे केंद्रीय ऊर्जा विभागाचे सचिव अनील राझदान, हरियाणाचे माजी मुख्य सचिव विष्णू भगवान आणि केंद्र सरकारच्या आंतरिक सुरक्षा विभागाचे माजी सचिव एम.बी.कौशल यांचा समावेश होता. 

डॉ.अनिल काकोडकर यांनी भारतीय विज्ञान क्षेत्रात अतुलनीय कार्य केले आहे. त्यांच्या या योगदानासाठी भारत सरकारने त्यांना पद्मविभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री या महत्वाच्या नागरी पुरस्काराने सन्मानित केले आहे. सध्या केंद्र सरकारच्या अणु उर्जा विभागांतर्गत कार्यरत भूवनेश्वर येथील विज्ञान, शिक्षण आणि संशोधन संस्थेच्या संचालक मंडळाचे अध्यक्ष म्हणून डॉ.काकोडकर कार्य करीत आहेत. डॉ. काकोडकर यांनी भारताच्या वैज्ञानिक क्षेत्रात आणि विशेषत: आण्वीक संशोधन कार्यात दिलेल्या योगदानासाठी त्यांना जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

अजय सिंघल यांनी जालना येथील आंतरराष्ट्रीय उपग्रह देखरेख कक्षाच्या प्रभारी अभियंता पदाची जबाबदारी नेटक्या पद्धतीने सांभाळली. इंडियन रेडिओ रेग्युलेटरी सर्विसेस (आयआरआरएस) च्या १९९८ च्या तुकडीचे अधिकारी असलेल्या अजय सिंघल यांना उत्तम स्पेक्ट्रम नियंत्रण आणि परवान्यांसाठी पारदर्शी पद्धतीचा अवलंब करून नियमांचे उल्लंघन न करता राबविलेल्या उपग्रह स्पेक्ट्रम यंत्रणेसाठी गौरविण्यात आले. 

‘शेती पीक कीटक नियंत्रण’ यंत्रणेचा प्रभावीपणे अवलंब करून ‘शेती व ई- प्रशासन’ व्यवस्थेत दिलेल्या अमुल्य योगदानासाठी प्रभाकर देशमुख यांचा सन्मान करण्यात आला. २०११ साली राज्याचे कृषि आयुक्त असतांना सोयाबीनवरील किडीवर सर्वेक्षण व उपाययोजना (Cropsap) यासाठी देशपातळीवर ई-गव्हर्नन्स मधील सुवर्ण पदक देवून त्यांना यापूर्वी गौरविण्यात आले आहे. एप्रिल, २०१५ साली या प्रकल्पाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ‘पंतप्रधान पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले आहे. 

मुंबई शहरातून अंडरवर्ल्डच्या कारवायांना चाप बसविणे आणि या शहरातील स्कँडल उघड करण्याच्या महत्वपूर्ण योगदानासाठी मीरा बोरवणकर यांना जी फाईल्स पुरस्काराने गौरविण्यात आले. १९८४ मधे नाशिकच्या सहायक पोलिस अधीक्षकपदाची जबाबदारी स्वीकारून त्यांनी महाराष्ट्र पोलिस दलात कामाला सुरुवात केली. राज्याच्या कारागृह विभागाच्या अपर पोलिस महासंचालक आणि आता विधी व तांत्रिक विभागाच्या महासंचालक हा त्यांचा प्रवास थक्क करून सोडणारा आहे. त्यांनी शिक्षणाचा ध्यासही सोडला नाही. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून त्यांनी २००९ मध्ये ‘पीएच.डी.’ पूर्ण केली. 

विज्ञान, उपग्रह सेवा, प्रशासकीय सेवा, पोलीस सेवा अशा वैविध्यपूर्ण क्षेत्रात मोलाचं योगदान देऊन महाराष्ट्राच नाव मोठं करणाऱ्या या दिग्गजांना मानवंदना. 

-रितेश मोतीरामजी भुयार 
उपसंपादक, महाराष्ट्र परिचय केंद्र, नवी दिल्ली.

No comments:

Post a Comment