Tuesday, October 15, 2013

शासकीय नोकरितील पहिल्याच दिवशी पहिलीच मुलाखत




 शासकीय नोकरितील पहिल्याच दिवशीचं पहिलंच काम :
         माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या(DGIPR) उपसंपादक पदाच्या निवड प्रक्रियेतील अंतिम यादी 14 फेब्रूवारी अर्थात 'व्हालेंटाईन डे' ला जाहीर झाली. तेव्हा मी इलेक्ट्रानीक मॉनिटरींग सेंटर(EMMC) या दिल्लीस्थित, माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या अधिनस्थ काम करणार्‍या विभागात डयुटीवर होतो. त्यावेळेस मी 'IBN लोकमत' या वृत्त वाहिनी वरील एका डिबेटबाबत आलेल्या तक्रारीवर काम करीत होतो. माझं नाव DGIPR च्या अंतीम यादीत असल्याचं कळताचं खूप आनंद झाला. तसेच, आई-बाबांना फोन करून बातमी कळवली. आणि EMMC च्या उपस्थित सर्व मित्रांनाही बातमी कळवली. अन पहिल्यांदा या ऑफिस मध्ये आनंदाच्या भरात मी चक्क कामच केलं नाही.
   त्याचवेळी सेटच्या(State Eligibility Test) परिक्षेचा फॉर्म भरला असल्याने गावाकडे जाण्याचा प्लॅन होताच. 17 फेब्रूवारीला ही परिक्षा होणार होती, त्यामुळे सर्व आवरून आणि EMMC राजीनामा देण्यासाठी 15 दिवस आधी दयावयाची नोटीस देवून गावाकडे निघालो. आज अख्या आयुष्याची मेहनत फळाला आल्याचा आनंद घरी परतताना होता.आजचा ट्रेनचा प्रवास अर्थात दिनांक 15 फेब्रूचा प्रवास त्याअर्थानेच माझ्यासाठी थोडा स्पेशल होता. अन 16 ला घरी पोचलो. आंघोड, जेवन आटोपून थोडं निवांत बसलो. तोच, पोस्टमन आला त्याच्याहातात 'माझी ऑर्डर' होती. अन 'पोस्टींग' होत. My Always Loving Delhi. मग काय! एक-दोन जाणकारांना फोन लावला अन सेटची परिक्षा न देताच दिल्लीला परत जावून कामावर रूजू होण्याचा निर्णय घेतला. ट्रेनचं तिकीटही बूक केल.आयुष्यात पहिल्यांदाच अस घडल की घरी गेलो अन लगेच परतलो नुसता प्रवास अन प्रवास. पातालकोट या मला नव्यानेच शोध लागलेल्या ट्रेनने बैतूल व्हाया दिल्लीच्या प्रवासाठी निघालो. ट्रेन लेट होती म्हणून पोचलीही दिल्लीत लेट. तेव्हा रूमवर न जाता थेट महाराष्ट्र परिचय केंद्र या माझ्या जीवनातील पहिल्या सरकारी कार्यालयात पोचलो सकाळी 9 वाजता, 18 फेब्रूवारी2013 ला. अन सर्वात आधी रूजू अहवाल दिला. येथील बॉसला मॅसेज करून तसं कळवलं. मग शेजारील कटींगच्या दुकानात कटींग व दाडी आटोपून थोडा फ्रेश झालो.  सोबत असलेल्या बॅगमध्ये कपडे होतेच ते परिधान करून आज पहिल्याच दिवशी काय खास न्यूज करता येईल ते बघितल. कळल की उद्या 19 फेब्रूवारीला साहित्य अकादमीचे पुरस्कार वितरीत होणार आहेत. तेव्हा महाराष्ट्रातून ज्यांना हा पुरस्कार मिळणारं ते महाराष्ट्र टाईम्सचे ज्येष्ठ पत्रकार तसेच प्रसिध्द कथाकार जयंत पवार यांची मुलाखात केली तीही साहित्य अकादमीच्या सभागृहात जावून. 
 हाच माझ्या शासकीय नोकरीतील पहिला आनंदमय दिन. ती मुलाखात येथे देत आहे.
  ...................................................................
 सोमवार, 18 फेब्रुवारी, २०१३


लिखाण अधिक सकस आणि दर्जेदार होण्यासाठी प्रयत्न करावेत -- जयंत पवार
                                                 




देशभरातील विविध प्रादेशिक भाषांतील साहित्यिक योगदानासाठी देण्यात येणा-या 2012 च्या साहित्य अकादमी पुरस्कारावर मराठी भाषेची पताका उंचवणारे साहित्यिक जयंत पवारांना " फिनीक्सच्या राखेतून उठला मोर " या लघुकथासंग्रहासाठी सन्मानीत करण्यात आले. हा पुरस्कार म्हणजे आनंदापेक्षाही आश्चर्य, संकोच व भिती यांचा त्रिवेणी संगम वाटतो अशा भावना व्यक्त करणारे मुळचे नाटय लेखनाच्या प्रांतात मुशाफिरी करणारे जयंत पवार कथेसारख्या लिखाणाच्या वेगळया पठडीला आपलेसे करतात. आणि तीच कलाकृती देशातील साहित्य क्षेत्रात सर्वोच्च मानल्या जाणा-या साहित्य अकादमी पुरस्कारासाठी निवडली जाते हेच त्यांच्या लिखाणाचे वेगळेपण. कथा संग्रहासाठी साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त एकूण मराठी साहित्यिकांमध्ये 1973 साली नामवंत लेखक व कथाकार जी.ए.कुलकर्णी नंतर दुसरा मान मिळवणारे जयंत पवार यांच्याशी प्रश्नोत्तराच्या माध्यमातून साधलेला हा संवाद.

प्रश्न : साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाल्यानंतर काय भावना आहेत ?
उत्तर :
पुरस्कार मिळाल्याबद्दल मनात आनंद आहे. पण त्याहीपेक्षा आश्चर्य या गोष्टीचं वाटत की, मी मुळात नाटय लेखन करतो. आणि कथा लेखनाच्या प्रारंभीच मला हा पुरस्कार मिळत आहे. संकोच या गोष्टीचा वाटतो की माझ्यापेक्षा ताकदीचे कथा लेखक मराठी भाषेत आहेत आणि अशा स्थितीत मला कामाची पावती मिळते.या पुरस्कारामुळे वाचकांकडून माझ्या बद्दल अपेक्षा वाढल्यामुळे त्या पूर्ण करु शकेल का, याचे दडपण येऊन थोडी भीती सुध्दा वाटते.

प्रश्न : मूळ नाटय लिखानाचा पिंड सोडून कथेकडे कसे वळलात आणि कथा लेखनाचा प्रांत कसा वाटतो ?
उत्तर
: मी जरी आजपर्यंत नाटय लिखाण केले असले आणि अधांतर’, ‘काय डेंजर वार सुटलय’, ‘टेंशनच्या स्वप्नात ट्रेनया माझ्या नाटकांना वाचक-प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले असले तरी मला कथा लेखनाचा प्रांत तेवढाच प्रिय आहे. माझ्यामते तुम्ही एकदा नाटक लिहीले की, ते प्रेक्षकांसमोर येईपर्यंत मूळ संहितेत बराच बदल झालेला असतो. पण, कथा लेखनात तुम्ही एकदा कथा लिहिल्या की, त्या थेट वाचकांपर्यंत पोहचतात व इथे लेखक आणि वाचक यांचा थेट संवाद घडून येतो. माझ्या कथा लेखनामध्ये माणसांचे गुंतागुंत होत चाललेले आयुष्य मांडण्याचा प्रयत्न आहे. नामवंत कथाकार भाऊ पाद्ये यांनी कथा लेखनात घालून दिलेल्या काही मर्यादा व साच्यांना समोर ठेऊन मी कथा लेखन करतो. आणि ही पध्दती आता इतर लेखकही स्वीकारत आहेत.

प्रश्न : पुरस्कार प्राप्त " फिनीक्सच्या राखेतून उठला मोर " लघुकथा संग्रहाविषयी काय सांगाल ?
उत्तर :
या कथा संग्रहात मुंबई महानगारातील कामगार, कष्टकरी, अधिकारी आदीच्या जगण्यातील गुंतागुंतीचे वास्तव मांडण्याचा प्रयत्न केला आहे. प्रत्येक कथेत निवेदन शैलीचा वेग-वेगळा प्रयोग करण्याचा प्रयत्नही या कथा संग्रहात केला आहे.

प्रश्न : या कथा संग्रहातील तुम्हाला आवडलेल्या कथा कोणत्या ?
उत्तर :
मुंबईतील फिनीक्स टेक्सटाईल मिलच्या ठिकाणी उभा असलेला आजचा मॉल हे कथासूत्र घेऊन या मिलमध्ये काम करणा-या कामगारांच्या चार पिढयांच्या जीवनाचे स्थित्यंतर असणारी " फिनीक्सच्या राखेतून उठला मोर " आणि " एका रोमहर्षक लढयाचा गाढीव इतिहास " या दोन कथा मला फारच भावतात.

प्रश्न : सध्या काय लिखाण सुरु आहे ?
उत्तर :
सध्या मी एक नाटक लिहायला घेतले आहे.

प्रश्न : पत्रकारितेच्या व्यस्ततेत नाटय व अन्य लेखनाला न्याय देण्याच्या आपल्या सूत्राला कसे मांडाल ?
उत्तर :
एक नाटक लिहायला मला साधारण पाच ते सहा वर्षांचा कालावधी लागतो. एक लेखक म्हणून समाजाचे चित्र उघडया डोळयाने बघणेही तेवढेच महत्वाचे असते आणि त्यासाठी बातम्यांव्यतिरिक्त टीव्ही न पाहणे, फेसबुक, ब्लॉग न लिहिणे यातून वेळ वाचवून मी, तो वेळ लिखानाचे संदर्भ गोळा करणे आणि निरीक्षणासाठी देतो.

प्रश्न: भारतातील रंगभूमीच्या स्थितीबाबत काय सांगाल?
उत्तर:
भारतात मराठी रंगभूमीनंतर पश्चिम बंगालची रंगभूमी श्रेष्ठ आहे. पण या बंगाली रंगभूमीला मध्यंतरी मरगळ आली.सद्य:स्थितीत केरळ आणि तामिळनाडूतील रंगभूमीसुध्दा ताकदीने पुढे येत आहेत.

प्रश्न: देशात सध्या कोणत्या भाषेत चांगले व मोठया प्रमाणात साहित्य लिखाण होत आहे?
उत्तर:
माझ्यामते सध्या आपल्या देशात हिंदी भाषेत विपुल प्रमाणात व दर्जेदार साहित्य निर्मिती होत आहे.

प्रश्न: मराठी भाषेत तरुण लेखकांची फळी उभी राहत आहे का आणि त्यांच्या लिखाणाबद्दल काय वाटते?
उत्तर:
हो, मराठी भाषेत मोठया प्रमाणात तरुण लेखकांची फळी उभी राहत आहे. मला येथे अधोरेखित करायला पाहिजे की खलिस्तान चळवळ, बाबरी मस्जीद, जागतिकीकरण या चालू शतकाच्या 80-90 च्या दशकात घडलेल्या घटनांनंतर मराठी भाषेत तरुण लेखकांची एक मोठी फळी निर्माण झाली. आणि समाजातील विविध घटना व प्रश्नांना त्यांच्या लिखानातून वाचा फुटली.

प्रश्न : नव्या लेखकांना काय संदेश आहे !
उत्तर :
मेहनतीला पर्याय नाही. आपले लिखाण आपणच निरखून वाचनं व ते आणखी सकस होण्यासाठी प्रयत्नरत राहावे लागेल. यातच काय तो संदेश आला.

प्रश्न : पुरस्कारानंतर आता पुढे काय ?
उत्तर :
पुरस्काराने मी मुळीच हुरळून गेलेलो नाही. यापुढेही माझ्या लेखनावर प्रेम करणा-या वाचक प्रेक्षकांना उत्तमोत्तम साहित्य सादर करणे व त्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न करणे यावर माझा भर राहील.

प्रश्न : दिल्लीत पुरस्कार स्वीकारतांना काय भावना आहेत ?
उत्तर :
देशभरातील साहित्यिकांचा सन्मान देशाच्या राजधानीत होत आहे. देशभरातील विविध भाषेतील दर्जेदार साहित्यात मराठी साहित्याचे प्रतिनिधीत्व करायला मिळत आहे हा ख-या अर्थाने मराठी लेखन, वाचन करणा-या व बोलणा-या तमाम मराठी जणांचा सन्मानच राजधानी दिल्ली दरबारी होत आहे. याचा मनस्वी अभिमान वाटतो.


No comments:

Post a Comment