Thursday, July 23, 2020

भेळीने दिली यशाची किल्ली; रघुने घडवली यशाची दिल्ली


(स्पुट  आणि सहज लेखन मला आवडत. आदल्या दिवशी आमच्या कार्यालयाचे लेखापाल श्री. रघुनाथ सोनवणे यांचा फोन आला म्हटले,परवा माझा वाढदिवस माझ्या गावाकडच्या लोकांना माझा दिल्लीचा प्रवास कळावा अशी इच्छा आहे आपण लेखनी चालवा . मग या स्पुटाचा जन्म झाला.)





म्हणाल तर एक कागदाचा तुकडा पण त्याच्याकडे पाहण्याची दृष्टी मिळाली की आयुष्य कस बदलून जाते याचं जीवंत उदाहरण म्हणजे रघु अर्थात रघुनाथ सोनवणे. आठवडी बाजारात भेळ खाताना हाती आलेली वृत्तपत्रातील जाहिरात बघून दिल्ली पादाक्रांत करणारा रघु  आज स्वमेहनतीने व अपार कष्टाने देशाच्या राजधानीत राज्य शासनाच्या माहिती विभागात लेखापाल आहे.

             घरची परिस्थिती बेताचीच, दोन वेळच्या जेवणाची ही भ्रांत. अहमदनगर जिल्ह्याच्या अकोले येथील बुवासाहेब नवले पतसंस्थेत कमी पगारावर नोकरी करणारा रघु असाच एका संध्याकाळी आठवडी बाजारात 'हरी ओम भेळी'च्या हातगाडीवर गेला व त्याने भेळ घेतली .पण त्याला काय माहीत होते की ही भेळ त्याला थेट देशाच्या राजधानीत घेवून जाईल. म्हणजे ते घडले असे की ,  वृत्तपत्राच्या कागदावर भेळ खात असताना रघुच्या नजरेस एक सरकारी जाहिरात पडली. महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या दिल्ली स्थित महाराष्ट्र परिचय केंद्र या कार्यालयात नोकर भरतीची ती जाहिरात बघून रघु खूश झाला 'उजडले भाग्य आता' अशीच काही अवस्था त्याची झाली. त्याने पात्रतेनुसार लिपिक टंकलेखक पदासाठी अर्ज केला. लेखी परीक्षा व मुलाखतीत उत्तम यश मिळवत त्याने या कार्यालयात आपले स्थान निश्चित केले व हाच  शासकीय नोकरीतील त्याचा प्रवेश ठरला.

            तसे दिल्ली हे शहर भल्या भल्यांना मानवत नाही.त्याला कारणे ही बरीच आहेत ठळक कारणांमध्ये येथील विषम हवामान म्हणजे हिवाळ्यात टोकाची थंडी व उन्हाळ्यात टोकाचा उकाडा. बोल-चालीची भाषा हिंदी व देशाच्या राजकारणाची सुत्रच या शहरातून हलतात म्हटल्याने या शहरातील लोकांमध्येही राजकारणाचे रंग भिनलेले अशा एकानेक प्रतिकुल परिस्थतीला तोंड देत रघुने आपलं प्रेमळ मन व माणुसकी साबुत ठेवत नोकरीतही यशस्वी प्रवास केला. लिपिक टंक लेखक पदावरून , वरिष्ठ लिपिक व आता थेट याच कार्यालयातील तिजोरीच्या चाव्या ज्याच्या हातात आहेत असा लेखापाल म्हणून रघु जबाबदारी सांभाळत आहे.

 आपल्या कामा व्यतिरीक्त ज्या जनसंपर्क विभागात तो कामाला आहे त्यातील प्रभावी जनसंपर्काचे गुण त्याने आत्मसात केले आहे . म्हणूनच नगरसह महाराष्ट्रातून दिल्लीत कामा निमित्त रघुच्या संपर्कात येणारा प्रत्येक व्यक्ती कायम त्याच्याशी जोडला जातो.
भेळीच्या कागदातही भविष्याची वाट शेधून रघुने आज रघुनाथ सोनवणे साहेब म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली. हा प्रसंग सांगताना आजही रघु गहिवरतो सांगतो की, एखाद्या गोष्टीकडे बघण्याचा दृष्टिकोन व त्यातून मिळालेल्या संधीचे सोने करता आले तर या जगात अशक्य ते काहीच नाही.
माय भूमिपासून कोसोदूर असले तरी आजही अकोलेकरांशी त्यांची नाळ जोडलेली आहे. दिल्लीत कामानिमित्त गेलेल्या अकोलेकरावर ते खूप प्रेम करतात आस्थेवाईकपणे चौकशी करतात व त्यांना मोलाचे सहकार्य करतात.
 भेळीच्या वृत्तपत्र रद्दीने आज महाराष्ट्र परिचय केंद्रात काम करण्याची संधी मिळाली त्याबद्दल रघु सोनवणे स्वतःला धन्य समजतात.
                              000000
शब्दांकन  :  रितेश मो . भुयार, नवी दिल्ली.






No comments:

Post a Comment