कंफर्टझोन सोडून जेव्हां
आपण स्वत:ला सिध्द करण्यासाठी बाहेर पडतो आणि तिथे आपल्याला आपलेपणाचा आधार मिळतो तोच
आधार मला दिल्लीत बृह्नमहाराष्ट्र भवनाने दिला. महाराष्ट्रीय स्नेहसंवर्धक समाजाने
नवी दिल्ली रेल्वे स्टेशनच्या परिसरातील अत्यंत मोक्याच्या जागेत ‘बृह्नमहाराष्ट्र भवन’ ही देखनी वास्तू उभारली आहे. महाराष्ट्रातील
कित्येकांसाठी देशाच्या राजधानी दिल्लीत अगदी अल्पदरात राहण्याची उत्तम सोय उपलब्ध
करून देणा-या बृह्नमहाराष्ट्र भवनात व्यवस्थापक म्हणून दिलेली सेवा आणि या दरम्यान
मला लाभलेलं सर्वांच सहकार्य आणि प्रेम यामुळे मी समृध्द झाले आणि ही वास्तू तर जणू
माझी हक्काची आधारवडच झाली.
यजमानांच्या सरकारी नोकरीमुळे
लग्न होऊन थेट माझा संसारच देशाच्या राजधानी
दिल्लीत थाटला. मास्टर ऑफ कॉम्प्युटर अप्लीकेशन
विषयाची पदव्युत्तर असलेली मी लग्नाआधी जॉब करायचे. मात्र, दिल्लीत पाय ठेवताच येथील
लोक, वातावरण आणि कार्यसंस्कृती अशा सर्व गोष्टी समजल्यानंतरच मला पुन्हा लग्नानंतर
जॉबची दुसरी इनिंग सुरु करायची होती . एव्हाना, करोलबागेत बँकींगचे क्लासेस लावून बँकींगच्या परीक्षा देण्याच्या निमित्ताने दिल्ली
व राष्ट्रीय राजधानी क्षेत्राचा (एनसीआर) ब-यापैकी अभ्यास झाला होता. म्हणूनच बँकींगच्या
परीक्षेची तयारी आणि आता सोबतीला जॉब कराव अस मनोमन वाटू लागलं. त्यात आम्ही ज्या पहाडगंज भागात राहत असू तिथेच ही बृह्नमहाराष्ट्र
भवनाची भव्य इमारत बघीतली होती. यातच इथे व्यवस्थापक पदाची जागा रिक्त
असल्याचे मला यजमानांकडून कळाले. आम्हा उभयतांतील चर्चे अंती येथे जॉब करण्याचा निर्णय
झाला. संस्थेच्या पदाधिका-यांसोबत बोलन झाल व रितसर मुलाखतीचे सोपस्कार करून मी भवनात
जॉब करायला लागली. हीच माझी या वास्तूतील आणि एका अर्थाने महाराष्ट्रीय स्नेहसंवर्धक समाजाच्या भल्या मोठया
कुटुंबातील एन्ट्री.
महाराष्ट्र भवनात निवासास
येणारा महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्ती (स्त्री-पुरुष)
हा आमचा क्लायंट. भवनाच्या पहिल्या माळयावरच अगदी दर्शनीभागात स्वागतकक्षातच माझी डयुटी
असल्याने येणा-या प्रत्येक क्लायंटसोबतच अदबीने बोलने आवश्यक माहितीची नोंद करून त्यांची रूम व डॉर्मेट्रीमध्ये व्यवस्था करणे आणि अनुषांगीक कामे असायची. तसेच, टॅली ही माझी
जमेची बाजु बघून व्यवस्थापनाने मला लेखा विभागाचीही काही जबाबदारी दिली होती ती ही
मी चोखपणे पार पाडली. व्यवस्थापन आणि येथील कर्मचारी वर्ग अगदी आस्थेने विचारपूस करतो
त्यामुळे अगदी खेळीमेळीच्या वातावरणात येथील जॉब सुरु होता. यासोबतच व्यवस्थापनाच्या
बैठका आणि स्नेहसंवर्धक समाजाच्या कार्यक्रमांची सतत रेलचेल ही भवनात असायची. त्यामुळे या भल्यामोठया परिवारातील सदस्यांचाही माझा परिचय
झाला. दिल्ली सारख्या शहरात राहून या सर्वांनी मराठी भाषा, संस्कृती किती उत्तमरित्या
जपली व त्याचा वारसा ही मंडळी त्यांच्या पुढच्या पिढीला देत असल्याचे पाहून उर अभिमाने
भरून येतो.
भवनातील गणपती उत्सव, दासनवमी, कोजागीरी, भोंडल्यांचा
कार्यक्रम असे कितीतरी कार्यक्रम सांगता येतील ज्यांची सारखी रेलचेल असते. माझ्या सारख्या
दिल्लीत नवख्या मराठी स्त्रीला आपले सण, उत्सव साजरे करण्यासाठी भवनाने जणू मला मोठे
व्यासपीठच उपलब्ध करून दिले होते. भवनाच्या शेजारीच असलेल्या नूतन मराठी माध्यमिक विद्यालयाच्या
प्रेक्षागृहात व प्रांगणातही विविध कार्यक्रमांचे नियमीत आयोजन करण्यात येते. या कार्यक्रमांनाही कित्येकदा सहकुटुंब आम्ही उपस्थित असतो. एका अर्थाने
राजधानी दिल्लीत आम्हाला व आमच्या मुलांना
मराठी सांस्कृतीसोबत जोडून ठेवण्याचं महनमंगल
कार्य महाराष्ट्रीय स्नेह संवर्धक समाजाने केल आहे. या संस्थेने गेल्या शंभर वर्षांच्या
काळात माझ्या सारख्या कित्येकांना मराठीबाण्याची व प्रेमाची शिकवण दिल्लीत दिली याचा
मला सार्थ अभिमान आहे. स्नेह संवर्धक समाजाच्या महाराष्ट्र भवनाने आधारवडरूपी दिलेल
प्रेम मी सदैव माझ्या आयुष्यात कायम जपेन आणि या संस्थेप्रती कृतज्ञभाव ठेवेन. संस्थेच्या
पुढील वाटचालीसाठी अनंत शुभेच्छा.
सोनाली रितेश भुयार,
टागौरगार्डन, नवी दिल्ली.
No comments:
Post a Comment