Wednesday, May 30, 2018

व्हर्च्युअल होतोय आम्ही


माणसाच्या विकासाप्रमाणे त्याच्या संपर्क साधणांचा विकास झाला. राजा’ आपला संदेश दुसऱ्या राज्यात लखोटयावर लिहून दुताच्या माध्यमातून वा कबुत्तराच्या माध्यमातून पोचवत असे. हा काळनंतर पत्र व्यवहाराचा काळ, पुढे तंत्रज्ञानाचा विकास होत आज मोबाईल व अन्य डिजीटल गॅजेट्सच्या माध्यमातून क्षणात होणारा ये हृदयी चे ते हृदयी हा संवाद. काळानुसार तंत्रज्ञान बदललं वास्तव जीवन सोडून व्हर्च्युअल अर्थात आभासी जगात वावरणा-या प्रत्येकाला माणसासाठी तंत्रज्ञान की तंत्रज्ञानासाठी माणूस हे समजून घ्यायची आता वेळ आली आहे .
             
         प्रियकर आपल्या प्रेयसीला लपून -छपून पत्र लिहायचा,मग हे पत्र लपूनच मिळवायच ते वाचत आपल्या वेगळया भावविश्वात रमायचा असा तो काळ. त्यामुळे एकमेकांमध्ये प्रेमाचा ओलावा कायम असायचा आप-आपसात संयम राखून सर्व व्यवहार व्हायचे.आता मात्र, पहिल्याच भेटीत मोबाईलनंबर एक्सचेंज होतात भेटी नंतर मुलगा -मुलगी घरी जाईस्तोवर व्हाटसॲप किंवा फेसबुक मॅसेंजरच्या माध्यमातून त्यांच्यात हाय-हॅलो होत व मग संवादाला सुरुवात. घरापासून दूर राहणारा मुलगा -मुलगीही  व्हीडीओ कॉलच्या माध्यमातून आपल्या आई-वडिलांशी थेट लाईव्ह संवाद साधू शकतो. या प्रातिनिधीक उदाहरणांतून एक बाब तर लक्षात आली की तंत्रज्ञानाने आपण वास्तव जीवनापेक्षा व्हर्च्युअल अर्थात आभासी जगात जास्त रमायला लागलो आणि माणसां-माणसांतील भावनिक नात्यातील ओलावा तर कोरडा ठाक होत नाहीये ना?  याबाबत अंतर्मुख होण्याची वेळ आली आहे.



                   भारतात ८० च्या दशकात संगणक युगाची हाक देऊन तंत्रज्ञान सुलभ वातावरण निर्माण करण्यास सुरुवात झाली. या प्रवासात आज २०१८ मध्ये मोबाईल कंपन्यांचा देशभर सुळसुळाट झाला, त्यांच्यातील परस्पर स्पर्धेमुळे मोबाईल स्वस्त झाला व प्रत्येकाच्या हातात मोबाईल आला, पर्यायाने प्रत्येकाच्या हातात जग आल. तंत्रज्ञानाने जग जवळ आल पण माणूस- माणसापासून लांब गेला हे वास्तवही जड अंत:करणाने सहन कराव लागत. जगाच्या पाठीवर घडणारी घटना क्षणात व्हॉटसपच्या माध्यमातून आपल्याला माहिती होते, हा झाला फायदा. आता यातील तोटा असा की, ती माहिती खरी असेलच याची शाश्वती नसते अन व्हाटसअपवर ही माहिती नियंत्रीत करणारी यंत्रणाही नाही त्यामुळे माहितीचा एकतर्फी मारा होत राहतो ज्यातील ९० टक्के माहिती चुकीची असते हा निष्कर्षही तज्ज्ञांकडून काढण्यात आला आहे. आता एका व्यक्तीकडे आलेली माहिती सहज चार जणांना फॉरवर्ड होते मग हे चार जण प्रत्येकी चार अशा सोळा जणांना पुढे पाठवतात. चुकीची माहिती वाचण्यात येवढे सर्व डोके विणाकारण एंगेज होतात. काही वेळा हेतुपुरस्सर माथे भडकविणारी व समाजात तेढ निमार्ण करणारी माहिती ही प्रसुत होते. हे अगदीच पायाभूत निरीक्षण आहे याशिवाय मोठया प्रमाणात बनावट कागदपत्रे तयार करणे, नौकरीचे आमीश दाखवून पैसा ट्रान्सफर करून घेणे असे सायबर गुन्हे मोठया प्रमाणात घडायला लागले.

घरातच आपल एकमेकांशी बोलण कमी झाल आणि तंत्रज्ञानाने आपल्या हातात आणून ठेवलेला मोबाईल वेळोवेळी बघत राहण हा आपल्या जगण्याचा अविभाज्य घटक होऊन बसला. नुकतेच सरकारची चार वर्ष पूर्तीतील उपलब्धी वर्णन करताना केंद्रीय माहिती व तंत्रज्ञान मंत्र्यांनी माहिती दिलह त्यानुसार १३० कोटी भारतीय जनतेपैकी १२० कोटी जनतेजवळ मोबाईल पोचला आहे हे ही येथे नमुद केले पाहिजे.  



                   


                              ‘डीजीटल डिटॉक्स कँप माहितीये तुम्हाला ?
                 जगतिक महासत्ता अर्थात अमेरिकेत या व्हर्च्युअल जगाच्या दुष्परीणामाची लागन झालीय. अमेरिकेतील २५ टक्के लोक हे दिवसांतून ५० वेळा मोबाईल बघतात तर ५० टक्के लोक १०० वेळा मोबाईल बघतात असा निष्कर्ष एका शोधात काढण्यात आला आहे. म्हणूनच मोबाईल सदृष्य डिजीटल साधणांमुळे या देशात माणसा-माणसांत निर्माण झालेला दुरावा कमी करण्यासाठी व त्यांच्यात परस्पर संवाद घडवून आणण्यासाठी, त्याला पूर्ववत आपल्या आनंदी जगण्याची अनुभूती करून देण्यासाठी येथे डीजीटल डिटॉक्स कँप आयोजित करण्यात येतात. या कँप मध्ये सहभागी होणा-या प्रत्येकाने सुरुवातीलाच आपल्याकडील मोबाईल व अन्य डिजीटल गॅजेटस जमा करावे लागतात. मग कँप सुरु झाला की एकमेकांचे नावही सांगायचे नाहीत हा दंडक पाळून प्रत्येकजण टोपण नावाने वागतो हे टोपण नावही नदी, ऋतू आदिंचे असते. वेगवेगळे खेळ, योगा, निसर्गाच्या सानिध्यात राहून माणसांनी माणसांसोबत बोलाव गप्पा माराव्या व डिजीटल युगात हरवलेला माणूस पुन्हा परत आणण्याचा खटाटोप म्हणजे हा कँप . अन्य देशांप्रमाणे भारतातही अशा कँपच्या आयोजनाची शक्यता नाकारता येणार नाही.

देशांचे प्रमुख व त्यांच्याकडील मोबाईल

            देश दुनीयेत आपल्या कर्तृत्वाचा डंका वाजविणारे विविध देशांचे नेते आता या व्हर्च्युअल जगाचा भाग झाले आहेत, त्यांचेही विविध सोशल मीडिया अकाऊंट आले आहेत. सुरुवात करूया भारताच्या प्रधानमंत्र्यापासून श्री मोदी हे खूप मीडिया शॅवी आहेत विविध प्रसंगी त्यांनी घेतलेले सेल्फी आपण पाहिले आहेत. श्री. मोदी यांच्याकडे सुरुवातीला सॅमसंग कंपनीचा अँड्राइड मोबाईल होता आता आयफोन हा महागडा फोन ते वापरतात. इंग्लडच्या पंतप्रधान तेरेसा मे यांच्याकडे २०१७ पर्यंत अँड्राईड मोबाईल होता आता त्याही आयफोन वापरतात. मात्र, सुरक्षेच्या कारणास्तव त्यांच्या मोबाईलवर कोणतेही अप्लीकेशन डाऊनलोड करण्यात आलेले नाही. श्रीमंत म्हणून गणला जाणा-या अरबचे सुल्तान मात्र, एक बेसिक नोकिया फोन आणि एक अँड्राईड फोन वापरतात. सतत अणुचाचण्या घेऊन जगाला धडकी भरविणारा उत्तर कोरियाचा प्रमुख किम जोंग याला २०११ मध्ये शेवटचे मोबाईल वापरताना बघितले होते. जगातील दुसरी महासत्ता रशीया व या देशाचे सलग ४ थ्यांदा  राष्ट्रपती बनून विक्रम करणारे  राष्ट्राध्यक्ष ब्लादिमीर पुतीन हे कोणताही मोबाईल वापरत नाहीत व त्यांचे कोणतेही  सोशल मीडीया अकाउंट नाही.
            एकंदरीत मोबाईल व अन्य डिजीटल तंत्रज्ञानाने आपल्या जीवनात गती आली ,बरेच सकारात्मक बदल झाले. मात्र,तंत्रज्ञानाच्या या व्हर्च्युअल अर्थात आभासी जगात माणूस-माणसांपासून दूर होणार नाही व अमेरीकेतील डीटॉक्स कँप भरविण्याची वेळ भारतात येणार नाही हीच अपेक्षा बाळगूण लेखनीला पूर्ण विराम.
                                                                         *****


No comments:

Post a Comment