Saturday, May 20, 2017

अनिल माधव दवे शिवभक्त व मृदू व्यक्तीमत्व (काळाच्या पडदयाआड)



केंद्र शासनात पर्यावरण व वने मंत्री म्हणून कार्यभार सांभाळणारे अनिल माधव दवे यांच्या निधनाची वार्ता आज (दि.१८ में २०१७) सकाळी कळली, तोच मनात सर्व प्रथम त्यांच्याविषयी माझ्या स्वत:च्या निरीक्षणातील दोन बाबी प्रकर्षाने पुढे आल्या. एक म्हणजे त्यांचे छत्रपती शिवाजी महाराजांच्या व्यक्तीमत्वावरील निस्सीम प्रेम आणि दुसरी म्हणजे त्यांचा मृदू स्वभाव.
                                                                          असाही योगायोग
श्री. दवे यांच्याशी संपर्कात येण्याची घटना म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांवरील पुस्तक त्यांनी लिखानासाठी घेतलं होत त्यांच कच्च टीपण त्यांनी केलं होत त्याचे संपादन आणि विस्तार करण्याच्या प्रकल्पातील काही भाग माझ्या वाटयाला आला होता ते पुस्तक हिंदीत होत(कदाचित वर्ष२०११). आज त्यांच्या निधनानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शोक संदेशाचा हिंदी अनुवाद करून बातमी करण्याची जबाबदारी कार्यालय प्रमुखांनी माझ्यावर सोपवली. म्हणजे हिंदीतील अनुवादाने श्री. दवे यांच्याशी सर्वप्रथम आलेला संपर्क आणि आज त्यांच्या निधानाबाबत मुख्यमंत्री महोदयांचा शोकसंदेश हिंदीत अनुवाद करण्याचा प्रसंग माझ्यासाठी दु:खद योगायोग ठरला.
            श्री. दवे हे मध्यप्रदेशातील खासदार असून ते छत्रपती महाराजांच्या व्यक्तीमत्वापासून खूपच प्रभावित झाल्याची मला स्वानुभवातून सर्वप्रथम वर्ष २०११ मध्ये ओळख पटली. यानंतर केंद्रात २०१४ मध्ये सत्तांतर होऊन भाजप प्रणीत लोकशाही आघाडीचे सरकार सत्तेवर आले. पुढे २०१६ च्या जुलै महिन्यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदिंच्या नेतृत्वाखालील  केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होऊन पर्यावरण व वने मंत्री पदाची जबाबदारी मराठमोळे मंत्री प्रकाश जावडेकर यांच्याकडून जन्माने मध्यप्रदेशचे पण महाराष्ट्राविषयी प्रगाढ प्रेम असणा-या अनिल माधव दवे यांच्याकडे आले. तेव्हा मला पुन्हा व देशाला या व्यक्तीमत्वाची ओळख झाली.   
                           मंत्रालयातील काही निवडक आठवणी
दिल्लीतील आएनए मार्केट भागातील इंदिरा पर्यावरण भवन ही ८ मजली वास्तु  आणि त्या भोवतीचा भला मोठा सुंदर व निटनेटका परिसर म्हणजे पर्यावरण व वने मंत्रालय. महाराष्ट्राच्या पर्यावरण व वने संदर्भातील विविध विषयांवरील परवानग्या , मंजुरीसाठी मा. मुख्यमंत्री महोदय व वरिष्ठा अधिका-यांच्या केंद्रीय पर्यावरण व वने मंत्र्यांसोबतच्या बैठका या इमारतीच्या ५ व्या माळयावरील मंत्रीमहोदयांच्या दालनासमोरील सभागृहात होतात. या बैठकींना उपस्थित राहून वार्तांकन करण्याचे प्रसंग आले. याठिकाणी शेवटचे १७ फेब्रुवारी २०१७ रोजी जाण्याचा योग आला आणि श्री. दवे यांना जवळून बघण्याची माझ्यासाठी ही शेवटची घटना ठरली .
 या बैठकीत मुंबई सागरी मार्ग, मुंबईतील सांडपाणी प्रक्रिया केंद्र , नागपूर येथील गोरेवाडा अभयारण्याचा प्रश्न आदींवर चर्चा झाली मात्र यावेळी मी प्रथमच श्री. दवे हे भरपूर थकले असल्याचे पाहीले. त्यांची प्रकृती फारच खालवली असल्याचे दिसत होते. राज्यातील या महत्वाच्या प्रश्नांवर त्यांनी सकारात्मक पुढाकार घेतला आणि हे तीनही मुद्दे आता मार्गी लागले आहे. मात्र, ज्यांच्या पुढाकाराने हे निर्णय झाले त्या श्री. दवे  यांच्या निधनाची बातमी  १८ में २०१७ रोजी  ऐकावी लागन हे फारच दु:खद आहे.
            प्रकाश जावडेकर हे महाराष्ट्राचे सुपूत्र असल्याने त्यांना राज्याच्या पर्यावरण व वने विषयक  प्रश्नांची जाण होती त्यामुळे राज्याचे प्रश्न सोडविण्यास मदत होत असे. श्री. दवे यांनी पर्यावरण व वने मंत्री पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर श्री. जावडेकरांच्याच कामाला उत्तम प्रकारे पुढे नेले. मुंबई येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्याना शेजारील परिसरावरील बंदी उठवण्याचा निर्णय माध्यमांसमोर मांडण्यासाठी श्री. दवे यांनी घेतलेली पत्रकार परिषद आणि आयत्या वेळी हा संदेश आल्याने स्वत: मलाच या पत्रकार परिषदेचे छायाचित्र आणि छायाचित्रीकरण करावे लागले होते ही आठवणही आता इतिहास बनून राहीली आहे.
          श्री. दवे यांचे मी बघितलेले व्यक्तीमत्व म्हणजे निस्सिम शिवभक्त आणि मृदू स्वभावाचे धनी असेच आहे. श्री. दवे हे आज काळाच्या पडदया आड गेले असले तरी त्यांच्या कतृत्वातून घडलेली समाज व देशसेवा माझ्यासह सर्व देशवासीय सदैव स्मरणात ठेवतील. श्री . दवे यांना भावपूर्ण आदरांजली.
                                                                         ******



No comments:

Post a Comment