Tuesday, September 29, 2015

महाराष्ट्राची पताका उंचाविणारे अजित जोशी



महाराष्ट्र ही नररत्नांची खान आहे. सामाजिक, आर्थिक, राजकीय आणि सांस्कृतिक क्षेत्रातातील महाराष्ट्राच्या नररत्नांनी भारतदेशासाठी दिलेल्या योगदानाची दीर्घ परंपरा आहे. वर्तमानकाळातही ही परंपरा सुरु असल्याची प्रचिती मूळचे सोलापूरचे आणि सध्या हरियाणातील जिंद जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अजित जोशी यांच्या संकल्पनेतून तयार झालेल्या ‘बर्डस ऑफ भिंडवास’ या पुस्तक, ई-बुक, वेबसाईट आणि मोबाईल अॅप्लिकेशन प्रकाशनाच्या वेळी आली. 

विशेष म्हणजे हे प्रकाशनही दिल्लीत मराठी मोहर उमटविणारे केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते आणि केंद्रीय पर्यावरण व वने राज्यमंत्री प्रकाश जावडेकर तसेच हरियाणाचे राज्यपाल कप्तानसिंह सोलंकी यांच्या उपस्थितीत झाले. 

भारतीय प्रशासकीय सेवेच्या २००३ च्या परिक्षेत महाराष्ट्रातून प्रथम आणि देशातून २९ व्या क्रमांकाने उत्तीर्ण होऊन हरियाणा केडरसाठी अजित जोशी यांची निवड झाली. त्यांची पहिली पोस्टींग पानीपत या महाराष्ट्राशी ऐतिहासिक संबंध असणाऱ्या जिल्ह्यात झाली. वर्ष २००६ मधे झझ्झर जिल्ह्याच्या जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी असताना त्यांनी झझ्झर पासून २० किलोमिटर अंतरावरील भिंडवास पक्षी अभियारण्याच्या विकासाकडे लक्ष देण्याचा निर्णय घेतला. त्यांनी पुढाकार घेऊन या अभयारण्यात आंतरराष्ट्रीय स्तरावरील दोन परिषदांचे आयोजन केले. त्याचवेळी देश-विदेशातील पक्षीनिरीक्षकांचे लक्ष या पक्षी अभयारण्याकडे वेधल्या गेले. त्यानंतर पुन्हा सोनीपत, पानीपत आणि सध्या जिंद जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अशी त्यांची पोस्टींग झाली. पण, भिंडवास पक्षी अभयारण्याच्या विकासासाठी त्यांचा ध्यास कायम होता. यातूनच जन्माला आली भिंडवास मधील पक्ष्यांची माहिती देणाऱ्या पुस्तकाची. यात महाराष्ट्रातील पुण्याच्या इला फाउंडेशनची त्यांना मोलाची मदत लाभली. बर्डस ऑफ भिंडास या पुस्तकाचे सहलेखकही महाराष्ट्राचे अर्थात सतीश पांडे, निरंजन संत आणि प्रमोद देशपांडे. आपल्या प्रशासकीय जबाबदारीचे यशस्वी वहन करत त्यांनी पुस्तकासोबतच आधुनिक माध्यमाची जोड देत ई-बुक, वेबसाईट आणि मोबाईल अॅप्लिकेशनही तयार केले. 

‘बर्डस ऑफ भिंडवास’ या पुस्तकातून भिंडवास हे झझ्झर जिल्ह्यात लोकसहभागातून तयार करण्यात आलेले पक्षी अभयारण्य असल्याचे सांगितले आहे. परिसरातील ७ ते ८ गावातील गावकऱ्यांनी आपल्या मालकीची जमीन या अभयारण्यासाठी दिली त्यातून ११०० एकर परिसरात हे पक्षी अभयारण्य उभे राहिले आहे. हिवाळ्यात या अभयारण्यात जवळपास अडीचशे प्रजातींचे दीड लाखाहून अधिक पक्षी येतात. विशेषत: ५० प्रजातींच्या परदेशी पक्ष्यांचाही यात समावेश असतो. भिंडवास पक्षी अभयारण्य व येथील वैशिष्ट्यपूर्ण पक्ष्यांची माहिती जास्तीत-जास्त पक्षीनिरीक्षक व सामान्यांपर्यंत पोहचविण्यासाठीच पुस्तक तयार करण्यात आले आहे. 

पानिपतला पहिली पोस्टींग झाल्यानंतर काही आठवड्यातच सोनिपत जिल्ह्यातील गुहाना येथे हत्याकांड झाले. त्यावेळी अजित जोशी यांनी पुढाकार घेऊन स्थिती आटोक्यात आणली आणि तेव्हाच हरियाणा प्रशासनाला गुणी महाराष्ट्रीय अधिकारी भेटल्याची वर्दी मिळाली. गुहाना हत्याकांडाने निर्माण झालेला तनाव सैल करण्याच्या त्यांच्या योगदानाबाबत तत्कालीन दलीत प्रश्नांबाबतच्या संसदीय समितीचे अध्यक्ष रा.सू. गवई यांनी श्री.जोशी यांचे कौतुक केले. वीट भट्यांवर काम करणाऱ्या मजुरांच्या मुला-मुलींसाठी त्यांनी सुरु केलेल्या भटटा शाळांच्या उपक्रमाची नोंद तत्कालीन राष्ट्रपती ए.पी.जे. अब्दुल कलाम यांनी घेत श्री. जोशी यांचे कौतुक केले. बिहारमधे २०१० साली कोशी नदीला आलेल्या पुरामुळे वाहून गेलेल्या मुसेहारी गावाला दत्तक घेण्याचा निर्णय श्री. जोशींनी घेतला. हरियाणाच्या जनतेने श्री. जोशींच्या हाकेला प्रतिसाद देत मदतीचा ओघ मुसेहारीच्या दिशेने वळवला आणि बघता-बघता मराठी अधिकाऱ्याने हरियाणाच्या जनतेच्या मदतीने बिहारमधे गाव वसविल्याची महान कामगिरी घडली व बिहारचे तत्कालीन मुख्यमंत्री नितीश कुमार आणि हरियाणाचे मुख्यमंत्री भुपेंद्रसिंह हुड्डा यांनी श्री.जोशीसह तमाम महाराष्ट्र वासियांच्या दातृत्वाचे कौतुक केले. आपल्या कामाने महाराष्ट्राच्या नररत्नांची यशस्वी परंपरा जपणाऱ्या व मराठी पताका फडकवत ठेवणाऱ्या या मराठमोळ्या अधिकाऱ्याचे राष्ट्रीय स्तरावर होत असलेले कौतुक महाराष्ट्राचेही कौतुकच ठरले आहे.

-रितेश मोतीरामजी भुयार
उपसंपादक, महाराष्ट्र परिचय केंद्र, नवी दिल्ली.

No comments:

Post a Comment