Tuesday, December 19, 2017

देवाच्या लाडक्या भक्ताचा अकस्माक निरोप

पंचपोथी असो, पंचक्रोशीतील कुठल्या गावी किंवा कुणाच्या घरी भजन असायचे तेव्हा तिथे आवर्जून उपस्थित राहून तल्लीनतेने हरिभजनात रमणारा देवाचा लाडका भक्त आयुष्याच्या अंतिम समयी भगवंताच्या नामस्मरणाने सर्वांचा निरोप घेतो. हा प्रसंग लिहीतानाही डोळे अश्रुंनी डबडबताहेत पण, नियतीने मांडलेला हा डाव स्वीकारण्यापलीकडे काहीच नसलेले आपण पामर असल्याची जाणीव सारखी होत असल्याचे शल्य मनाला बोचते. सर्वात मिसळणा-या व मनाने अत्यंत निर्मळ, स्पष्ट, वडील बंधुंप्रमाणेच सतत चेह-यावर हास्य असणारे सच्चे भाविक प्रिय नंदकिशोर काकांचे निधन झाल्याची वार्ता आली. मन पिळवटून टाकणारी ही दु:खद वार्ता स्वीकारण्याचा डाव नियतीने माझ्या प्रमाणेच आम्हा भुयार कुटुंबियांसमोर मांडला.




काही वर्षांपूर्वी आदरणीय नामदेव काकांचे अचानक आमच्यातून जाण्याची जखम ताजी असतानाच त्यांचे धाकटे बंधु आदरणीय नंदकिशोर काकांचे अकाली आमच्यातून जाने क्लेषदायी व आम्हा कुटुंबियांची मोठी हानीच ठरली. नौकरी व शिक्षणासाठी घरापासून लांब असणारे आम्ही (चि. अनुप्रित, कु. रेणु, सौ. सोनाली, चि. स्वरित आणि मी) तर त्यांचे अंतिम दर्शनही घेऊ शकलो नाही एवढा हा नियतीचा क्रुर डाव. यावर्षी आम्ही दिवाळीत काकांसोबत घालवलेला मुल्यवान वेळच त्यांचा व आमच्यातील अंतिम संवाद ठरला. 




मला भेटलेले काका........

आठवतात ते दिवस तिसरी-चौथीत असू आम्ही तेव्हा... बेगमपुरा(अचलपूर) येथे आत्याकडे जायचो आम्ही आई, मोठीआई व आजीसह तेव्हा देवडीवर आम्ही मुद्दाम काकांच्या दुकानाकडून मोर्चा वळवायचो. अन काकाही आम्हा लहानग्यांचा हट्ट पुरवत चॉकलेट दयायचे आम्हाला. आत्याकडे जाण्यापेक्षा काकांकडून चॉकलेट मिळविण्यात जास्त आनंद होत असे आम्हाला. काकांनीही आम्हाला कधीच निराष केले नाही, चॉकलेट देऊन आम्हाला खुश करण्याची त्यांची त-हा सदैव स्मरणात राहील आम्हा भावंडांना.


म्हणता म्हणता मोठा झालो. शिक्षणासाठी घरापासून लांब असल्याने जेव्हा-जेव्हा गावी यायचो तेव्हा काकांकडून हाली खुशाली घेण्याची त्यांची स्टाइल भारी आवडायची आपल्याला. सुटयांमध्येही घरी फारस राहायला मिळालच नाही त्यामुळे कमी कालावधीतील वेळेच्या सदुपयोगात काकांचा मोठा हातभार लागायचा तो म्हणजे, चला मग रितेश भाऊ आज  भजनालाया वाक्याने मग मी ही नकारघंटा न वाजवता निघायचो काकांसोबत. काकांना भजनाचा लडा  फार. घरातही भजन,अभंग,हरिपाठाच्या कॅसेटचा संग्रह, भजन-अभंगाची स्वतंत्र वही असा सर्व लवाजमा त्यांच्याकडे होता, कधी-मधी मलाही याचा लाभ मिळत असे. काकांचे हे भजनाचे वेड आदरणीय सुनिता काकुंनीही आपलेसे करून घेतले होते ही त्यात आणखी जमेची बाब.




काकांनी निरोप घेण्याआधी लाभलेला त्यांचा स्मरणीय सहवास....

तब्बल १० वर्षांनी मी किर्तन सादरीकरणाचा चंग मनाशी बांधला आणि यावर्षी (२०१७) आषाढी एकादशी निमित्त आमच्या घरा शेजारील विठ्ठल रुख्मीनी मंदिरात हे स्वप्न पूर्णत्वास आणताही आल. किर्तनाकरिता टाळकरी म्हणून काकांची समर्थ साथ ही या वर्षातील ठळक आठवण. किर्तनाचे  चित्रीकरण केले असल्याने  त्यात काका मला भेटतील आणि त्या स्वर्णीम आठवणीचा ठेवा ठरतील.




वैद्यकीय कारणास्तव मी जवळपास १ महिन्यासाठी गावी आलो होतो (याच वर्षी) या काळात काकांचा मोठा सहवास लाभला पण, तो सहवास शेवटचा ठरावा हे दुर्देवी. आमच्याकडे यावर्षी देवीचे घट बसले होते , घटाच्या आरतीसाठी काका नियमीत यायचे. घट विसर्जनासाठी काका सकाळीच उठले आम्ही तो घट विसर्जन करून आलो पण त्यांच्या आवडीची ही घट पुजाही शेवटचीच ठरावी हे दु:खद. याच काळात आम्ही कुळदैवत गनोजा देवी, अमरावतीची अंबादेवी आणि  पिंगळादेवी असे दर्शनाला गेलो यावेळी काका आणि काकुंचा सहवास अन धम्माल आम्हा उभयतांसह, आशिष दादा –मंजु वहिनी, उमेश व आदरणीय सुमन मोठे आई  आणि कु. निता यांच्यासाठी स्वर्णीम ठरली. या प्रवासातील गाण्यांच्या भेंडया व त्यातील काका-काकुंचा उत्स्फुर्त सहभाग ही स्मरणीयच.





आमच्या विलायतपु-यात यावेळी शारदोत्सवात ह.भ.प. अरबट बुवांच किर्तन होत. टाळकरी नसल्याने काका, गणेश राऊत, दिगंबर पाटील आणि मी असा आम्ही जोड बसवला व किर्तनात टाळकरी म्हणून साथ दिली. इथेच आम्ही काकडाआरती (प्रभात फेरी) करण्याचा संकल्प घेतला. व कार्तिक महिन्यातील ही काकडारतीची धुरा जवळपास १० ते १२ वर्षांनंतर काकांच्या उत्साही सहभागामुळे तळीस नेऊ शकलो. कर्मभूमिच्या हाकेमुळे मी तर हा डाव अर्ध्यावरच सोडून दिल्लीला निघून आलो. मात्र, आदरणीय अनिल मामा आणि काकांनी ही काकडारतीची धुरा समर्थपणे सांभाळली. याच काळात भोनखडे महाराजांकडून विठ्ठल मंदिराकडे येणा-या दिंडीतही काका सहभागी होत  मी ही काकांसोबत जायचो. याकाळातच माकनेरपंथी भजनात मी काकांसोबत गेलो होतो. पुढे दिवाळी निमित्त आम्हीसर्व काकांच्या दुकानात भेटलो तीच आमची  शेवटची कौटुंबिक भेट ठरली. काका-काकुंनी आमच्या स्वरित ला भेट दिलेला सुंदर असा ड्रेस आमच्या मुलालाही कायम आठवणीत राहणार.  






शेवटचा दिस गोड व्हावा...

           मनुष्याचा जन्म आणि मृत्यू कसा व कोठे होईल याचा अंदाज फास कमी असतो. ब-याच लोकांचा अंतिम क्षण हा अपघात, हॉस्पीटल किंवा अन्य असू शकतो मात्र, आपल्या आवडत्या कार्यातच आपला अंतिम श्वास घेतला जावा असा दुर्लभ योग क्वचित लोकांच्या वाटयाला येतो. नंदकिशोर काका याबाबतीत फार भाग्यवान ठरले. ज्यादिवशी त्यांनी अंतिम श्वास घेतला ते ठिकाण होते त्यांचे आवडते दत्त मंदिर आणि कार्यही होते पंचपथीचे भजन. त्यांनी यावेळी २ भजनेही सादर केली आणि आरतीसाठी उभे राहताच त्यांना त्रास झाला. आणि तेथून केवळ दीड तासात त्यांच निधन झाल. एका अर्थाने त्यांच्या आयुष्याचा तो क्षण म्हणजे याजसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिस गोड व्हावा या संत उक्ती प्रमाणेच ठरला.  





 आज जेव्हा सकाळी काकांच्या निधनाची वार्ता मनिष दादाने दिली तेव्हा यावर विश्वासच बसेना, मी आणि सोनाली अख्खा दिवस ही वार्ता पचवूच शकलो नाही. तिथे प्रत्यक्ष त्यांच्या खांद्याला खांदा लावून साथ देणारी आदरणीय सुनिता काकु, चि. सौरभ आणि आमच्या आदरणीय प्रतिभा काकु यांच्यासह भुयार कुटुंबियांची स्थिती वादळात सापडलेल्या नौके प्रमाणेच असेल. हा प्रसंग आपल्या हातचा नव्हता नियतीने मांडून ठेवलेला हा डाव समर्थपणे स्वीकारण्याशिवाय आपल्याकडे काही नाही. या प्रसंगात सर्वांना बाहेर पडण्याची शक्ती मिळो ही निसर्गशक्तीकडे प्रार्थना.  

                                                                 आदरणीय काकांस भावपूर्ण श्रध्दांजली 
                                                      



 

Monday, November 6, 2017

अन्न प्रक्रिया उद्योगाच्या महाकुंभात महाराष्ट्राची झळाळी : एक अनुपम्य अनुभव




                                                                                                    सोमवार, ०६ नोव्हेंबर, २०१७ 

देशाच्या राजधानीत केंद्र शासनाच्या महत्वांच्या आयोजनांना उपस्थित राहून महाराष्ट्राच्या वैविद्यपूर्ण कामगिरीविषयी वार्तांकन सतत करीत असतो. वर्ष २०१७ चा समारोप होत असताना अशाच मोठ्या आयोजनाला हजेरी लावण्याचा व त्यात महाराष्ट्राच्या वैविद्यपूर्ण कामगिरीबाबत वार्तांकनाचा महत्त्वपूर्ण अनुभव. आयोजन होते अन्न प्रक्रिया उद्योगाविषयीचा देशातील सर्वात मोठा मेळा अर्थात “वर्ल्ड फुड इंडिया २०१७”.

केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग विभागाच्या वतीने देशात प्रथमच अशा प्रकारचे भव्य आयोजन करण्यात आले. ६० देश आणि देश-विदेशातील २ हजार कंपन्या यात सहभागी झाल्या. ऐतिहासिक इंडिया गेट आणि विज्ञान भवनात हे आयोजन करण्यात आल्याने आयोजनास विशेष महत्व प्राप्त झाले. देशातील प्रत्येक राज्यांनाही आपापल्या राज्यात अन्न प्रक्रिया उद्योगात गुंतवणूक आकर्षित करण्याची नामी संधी या आयोजनामुळे चालून आली. ही महत्त्वाची घटना लक्षात घेता महाराष्ट्र शासनानेही या आयोजनात राज्याचे ‘अन्न प्रक्रिया धोरण २०१७’ जाहीर करून राज्यात अन्न प्रक्रिया उद्योगासाठी उपलब्ध करून दिलेल्या विविध सुविधांबाबत देश व जगाला संदेश दिला.

३ ते ५ नोव्हेंबर पर्यंत चाललेल्या भव्य प्रदर्शनाचे उद्घाटन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केले तर समारोपाच्या कार्यक्रमाला राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी संबोधित केले. महाराष्ट्राच्यावतीने कृषी व फलोत्पादन मंत्री पांडुरंग फुंडकर तिनही दिवस या कार्यक्रमात उपस्थित होते. श्री.फुंडकर आणि पशुसंवर्धन, दुग्ध व मत्स्य विकासमंत्री महादेव जानकर आणि कृषी व फलोत्पादन राज्यमंत्री सदाशिव खोत यांनी याठिकाणी उभारण्यात आलेल्या महाराष्ट्र दालनात देश–विदेशातील कंपन्यांच्या शिष्टमंडळांशी चर्चा केली. महाराष्ट्र सदनात राज्यातील उद्योजकांना केलेल्या संबोधनात श्री.फुंडकर यांनी राज्यातील अन्न प्रक्रिया उद्योगाला गती देण्यासाठी लवकरच केंद्रीय मंत्र्यांसोबत दिल्लीत बैठक घेणार असल्याचे आश्वासन दिले. याशिवाय राज्यातून सहभागी झालेल्या उद्योजकांनीही या महाकुंभाचा भरपूर लाभ घेतला.

या आयोजनाच्या दुसऱ्‍या दिवशी राज्याचे ‘अन्न प्रक्रिया उद्योग धोरण २०१७’ जाहीर करणे ही महत्त्वपूर्ण घटना ठरली, याचे कौतुक दस्तुरखुद्द केंद्रीय अन्न प्रकिया उद्योग मंत्री हरसिमरत बादल कौर यांनी या आयोजनाच्या समारोपीय कार्यक्रमात देश विदेशातील उद्योजकांसमोर केले. राज्याचे कृषी मंत्री पांडुरंग फुंडकर आणि उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी शेती क्षेत्रात विक्रमी गुंतवणूक वाढविण्यासाठी तसेच शेतकऱ्‍यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या उद्देशाने तयार करण्यात आलेले ‘अन्न प्रकिया धोरण २०१७’ जाहीर केले. राज्याला अन्न प्रक्रिया उद्योगाचे गंतव्य स्थान बनविणे, प्रतिवर्षी या उद्योगाचा दुहेरी आकड्यात विकास करणे, या उद्योगात शेतकऱ्‍यांचा सहभाग वाढवून येत्या ५ वर्षात शेतकऱ्‍यांचे उत्पन्न वाढविणे, या क्षेत्रात जवळपास ५ लाख कौशल्याधारीत मनुष्यबळ निर्माण करणे, सकस आहारातून कुपोषणाच्या समस्येवर मात करणे आदी महत्त्वाचे उद्दिष्ट या धोरणात ठेवण्यात आले आहे.

२०१०-११ मध्ये देशात महाराष्ट्र अन्न प्रक्रिया उद्योगाच्या नोंदणीत तिसऱ्‍या क्रमांकावर होता. तसेच, १९९१ ते मार्च २०१२ पर्यंत राज्यात अन्न प्रक्रिया उद्योगात १,०३९ कोटींची परकीय गुंतवणूक झाली. या उद्योगाच्या विकासासाठी राज्यात औद्योगिक विकास महामंडळाच्यावतीने फुड पार्क, वाईन पार्क, फ्लोरीकल्चर पार्क उभारण्यात आले आहेत. अन्न प्रक्रिया उद्योगात गुंतवणुकीसाठी राज्याने विविध परवान्यांचे सुलभीकरण केले आहे तसेच पायाभूत सुविधाही उपलब्ध करून दिल्या आहेत. राज्यात उद्योगासाठी असलेल्या गुंतवणूकपूरक वातावरणाची माहिती स्वत: मंत्र्यांनी देऊन उद्योजकांना गुंतवणुकीसाठी आवाहन केल्याचा परिणाम या महाकुंभात दिसून आला.

केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयासोबत वर्ल्ड फुड इंडिया-२०१७ मध्ये विविध आंतरराष्ट्रीय कंपन्यांशी करार झाले. याअंतर्गत 65 हजार कोटींपेक्षा अधिक गुंतवणूक भारतात होणार आहे. विशेष म्हणजे कोकाकोला, पेपस्किो, ऍमेझोन, ब्रिटानिया आणि पतंजली या नामांकित कंपन्यांनी महाराष्ट्रात गुंतवणुकीसाठी पसंती दिली आहे. २०१६-१७ या आर्थिक वर्षात थेट परकीय गुंतवणुकीमध्ये ५० टक्केपेक्षा अधिक गुंतवणूक महाराष्ट्रात झाली आहे. जागतिक बँकेने नुकतेच जाहीर केल्यानुसार उद्योग क्षेत्रात भारताने १३० व्या स्थानाहून १०० व्या स्थानावर झेप घेतली आहे. यामध्ये सर्वाधिक गुंतवणूक महाराष्ट्रामध्येच झाली असल्याचे विवरण आहे. या सर्व बाबी महाराष्ट्रातील अन्न प्रक्रिया उद्योगासाठी अत्यंत महत्वाच्या व अभिमानास्पद आहेत.

‘वर्ल्ड फुड इंडिया’ मधील महाराष्ट्र दालनास देश-विदेशातील गुंतवणुकदारांच्या शिष्टमंडळाने भेट देऊन राज्याच्या मंत्री महोदयांसोबत राज्यात अन्न प्रक्रिया उद्योग उभारणीबाबत चर्चा केली ही चर्चा सकारात्मक झाली. सिल्ड एअर आणि रिचग्रॅवीस या अमेरिकन कंपन्या, स्पेनमधील काँगल्डस नवारा याशिवाय ओएसआय विस्टा ग्रुप, युम ब्रांड, शरफ ग्रुप या विदेशी कंपन्यांच्या. तसेच, भारतातील ट्रांस इंजिनीअर इंडिया प्रा. लि. च्या कृषी विभागाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक सितिकांथा चौधरी, कारगील इंडिया कंपनीचे अध्यक्ष सिराज चौधरी, श्रीनी फुड पार्क प्रा.लि. चे मुख्य कार्यकारी अधिकारी अनील कुमार श्रीवास्तव, एल.एल. लॉजिस्टीक प्रा.ली. च्या कृषी विभागाचे व्यवस्थापकीय संचालक अनुप अग्रवाल आणि एजीटी फुड इंडिया प्रा. लि. च्या वरिष्ठ अधिका-यांनीही मंत्रिमहोदयांशी राज्यात उद्योग उभारणीबाबत विविध विषयांवर चर्चा केली.

‘महाराष्ट्र दालनात’ राज्यातील अन्न प्रक्रिया उद्योजकांनी सहभाग घेतला. या प्रदर्शानामुळे त्यांना खूप लाभ झाल्याच्या भावना त्यांनी बोलून दाखविल्या.

राज्य शासनाच्या ग्रामीण विकास मंत्रालयाच्यावतीने ‘महाराष्ट्र राज्य ग्रामीण उपजिवीका कार्यक्रमांतर्गत’ राबविण्यात येणाऱ्‍या ‘उमेद’ प्रकल्पामुळे ग्रामीण भागातील अन्न प्रक्रिया उद्योगात महिलांना मोठे व्यासपीठ उपलब्ध झाले आहे. ४ वर्षांपूर्वी नंदुरबार जिल्ह्यातील शहादा येथील सिमा पाटील या प्रकल्पाशी जुळल्या. गहू, ज्वारी, बाजरी आणि मुग रोस्टकरून त्या बाजारात विकतात. ‘उमेद’ प्रकल्प सुरु झाला तेव्हा १० महिला या कार्यक्रमाशी जुळल्या होत्या आता हा आकडा १ हजाराच्याही पुढे गेल्याचे त्यांनी सांगितले. वर्ल्ड फुड इंडियातील महाराष्ट्र दालनात त्यांना स्टॉल लावण्याची संधी मिळाली आणि या संधीचे सोने झाल्याचे समाधानच त्या व्यक्त करतात. या स्टॉलला देश-विदेशातील उद्योजक व ग्राहकांनी भेट दिली व आमच्या उद्योगाबाबत विचारणा केली. आमच्या कार्याचे कौतुकही त्यांनी केले.आम्ही याठिकाणी रोस्टेड गहू, ज्वारी, बाजरी आणि मुग प्रदर्शन व विक्रीसाठी ठेवले असून आमचा बराच माल विकला गेला आहे. राज्यशासनाच्या माध्यमातून देशाच्या राजधानीत जागतिक प्रदर्शनात सहभागी होण्याची संधी मिळाल्याने आपला उद्योग कुठे आहे आणि त्याला आपण कशा पद्धतीने आणखी पुढे घेऊन जाऊ शकणार याबाबतचा दृष्टीकोन तयार झाला असून माझ्यासाठी हा अनुभव खूप महत्वाचा असल्याच्या भावना बोलक्या होत्या.

केंद्र शासनाच्या अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयाच्या योजनेअंतर्गत ‘वर्धा मेगा फुड पार्क’ हा शेतमालासाठी शीतगृह उपलब्ध करून देणारा वर्धा जिल्ह्यातील कारंजा (घाडगे) तालुक्यातील शिंदी-विहीरी गावातील स्टॉलही या ठिकाणी होता. माहिती देताना फुड पार्कचे आशिष अग्रवाल म्हणाले, महाराष्ट्र दालनातील आमच्या स्टॉलला देश-विदेशातील उद्योजक व ग्राहकांनी भेट दिली हा अनुभव आमच्यासाठी खूप महत्वाचा ठरला. फुड पार्कविषयी माहिती देताना त्यांनी सांगितले, शिंदी-विहीरी या वर्धा जिल्ह्यातील दुर्गम भागात आम्ही वर्ष २०१२-१३ पासून शेतकऱ्‍यांच्या शेतमालासाठी शीतगृह उपलब्ध करून देत आहोत. या प्रकल्पासोबत परिसरातील जवळपास १ हजार शेतकरी आणि शेतमाल उत्पादित करणाऱ्‍या १२ कंपन्या जुळल्या आहेत. या प्रकल्पात ३०० कामगार आणि ५० कर्मचारी कार्यरत असून हे सर्व स्थानिक आहेत म्हणजेच स्थानिकांना रोजगार उपलब्ध झाला आहे. प्रकल्पाच्या परिसरातील शेतकरी या प्रकल्पाचा लाभ घेत असून मोठ्या प्रमाणात शेतमाल परदेशात पाठविण्यात येतो. आतापर्यंत जवळपास अडीच हजार शेतकऱ्‍यांनी या प्रकल्पाचा लाभ घेतल्याचे त्यांनी सांगितले.

सांगलीचे विठ्ठल चव्हाण यांनी २ महिन्याआधीच घाण्याच्या तेलाचा उद्योग सुरु केला आहे. वर्ल्ड फुड इंडिया या जागतिक प्रदर्शनाला भेट देऊन येथून नवनवीन संकल्पना समजून घेण्यासाठी ते खास दिल्लीत आले. महाराष्ट्र दालनातील भेटीत आपल्याला खूप नवनवीन गोष्टी समजल्याचे समाधान त्यांनी व्यक्त केले. या दालनात उद्योजक व शासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्‍यांशी चर्चा करून आपल्या उद्योगाच्या पुढील वाटचालीसाठी महत्त्वपूर्ण माहिती जाणून घेतली त्याचा आपणास भविष्यात खूप फायदा होणार असल्याच्या श्री.चव्हाण यांच्या भावना सूचक व प्रेरक होत्या.

महाराष्ट्र दालनामध्ये राज्य शासनाची व खाजगी अन्न प्रक्रिया उद्योजकांची एकूण 21 दालने उभारण्यात आली. खाद्य प्रक्रिया, जास्तकाळ टिकविण्यासाठी वापरण्यात येणाऱ्‍या उपाययोजना, नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून तयार करण्यात आलेली फळे, रस, अन्य पदार्थांचे प्रदर्शन याठिकाणी मांडण्यात आले. या दालनाचे सुरेख व सुंदर असे संकल्पनाचित्र तसेच आतील सजावटही जे.जे स्कुल ऑफ ऑर्ट या नामांकित संस्थेच्या चमुने केली.

‘वर्ल्ड फुड इंडिया’ प्रदर्शनात जगभरातील अन्न प्रक्रिया उद्योग, गुंवतवणूकदार, तज्ञ सहभागी झाले. अन्न प्रक्रिया उद्योगात गुंतवणूक व व्यापार वाढविण्याच्या उद्देशाने केंद्र शासनाने केलेले हे भव्य आयोजन आणि त्यात महाराष्ट्र शासनाचा दमदार सहभाग हा अनुभव अभिमानास्पद आणि अविस्मरणीय ठरला.

- रितेश मोतीरामजी भुयार, 
उपसंपादक, महाराष्ट्र परिचय केंद्र नवी दिल्ली.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.

Monday, July 17, 2017

अनुपम्य आणि हृदय सोहळा : महाराष्ट्र भूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचा सत्कार व गप्पा











आज आमच्या कार्यालयाला महाराष्ट्र भूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी भेट दिली, त्यांचा सत्कार आणि अनौपचारीक गप्पा असा कार्यक्रम होता. यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन, प्रख्यात शाहीरासमोर पोवाडा गाण्याची , प्रश्न विचारण्याची मिळालेली संधी आणि माझ्या गावी अचलपूरला आल्याची बाबासाहेबांनी सांगितलेली आठवण सदैव स्मरणात राहून गेली. हा अनुपम्य आणि हृदय सोहळाच म्हणेन मी.


                      बाबासाहेबांच्या स्वागतासाठी वरूण राजाने जोरदार हजेरी लावली. वृध्दापकाळामुळे(वय वर्षे ९६) बाबासाहेब दमले मात्र उत्साह तरूणांना लाजवेल असाच आहे. कार्यालयात त्यांचे आगमन झाले आणि आम्ही वेळेवरच बाबासाहेंबांना पोवाडयाने मानवंदना देण्याचा वेळेवर प्लॅन आखला. मंचावर बाबासाहेबांचे आगमन झाले माझ्याकडेच सूत्रसंचालनाची धुरा असल्याने , कार्यक्रमाची अल्प प्रस्तावणा तयार करून मी म्हणालो छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र घरा-घरांमध्ये पोचविणा-या शिवशाहिरांना महाराजांच्या पोवाडयानेच मानवंदना देण्याची आमचा मनोदय आहे, बाबासाहेबांनी परवाणगी दिली. आणि वाघच होता.. कापत सुटला मोगलाना तरी औरंग्या नुसता बघत होता..... हा पोवाडा गायला मी सुरुवात केली. माहिती अधिकारी अंजू निमसरकर कांबळे आणि ग्रंथालय लिपीक निलेश देशमुख यांनी जीर जी ... साठी साथ दिली. लोकवाड:मय त्यातही पोवाडयाचा विशेष अभ्यास असणा-या शाहीरासमोर पोवाडा सादर करण्याचं धाडस पूर्ण झाल होत.बाबासाहेबांचा सत्कार झाला व त्यांच्या संबोधनास सुरूवात झाली. त्यानंतर प्रश्नोत्तराला सुरुवात झाली. मी पहिलाच प्रश्न विचारला, बाबासाहेब आपणास छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र घरोघरी पोचविण्याची प्रेरणा आणि उर्जा कुठून मिळाली, त्यावर त्यांचे उत्तर होते या प्रश्नाने माझी अवस्था बंद पाण्याची बाटली उलटी केल्यानंतर पाणी खाली पडण्यास लागणारा वेळा आणि स्थिती जशी होते तशीच झालीय मग त्यांनी या प्रश्नाचे सवीस्तर उत्तरही दिले.


                       कार्यक्रम आटोपला, बाबासाहेबांना परत न्यायला येणारी गाडी यायची होती , तेवढया वेळात ते आमच्या कार्यालय प्रमुखांच्या कॅबीन मध्ये बसले. तिथे त्यांच्याशी आम्ही अनौपचारीक गप्पा मारताना आप-आपल्या गावाचे नाव व ओळख दिली. मी सांगितले, आदरणीय बाबासाहेब मी, इलीचपूर अर्थात अचलपूरचा. आमच्या गावला भले मोठे परकोट आहेत, चार मोठाले दरवाजे आहेत अस सर्व मी वर्णन करित असताना, बाबासाहेबांना काही आठवल. ते म्हणाले, वर्ष १९५५ मध्ये मी अचलपूरला व्याख्यानासाठी गेलो होतो कुठले तरी विठ्ठल मंदीर होते, मी एकटाच. ज्यांनी माझ व्याख्यान आयोजित केल ते आयोजकही नाहीत आणि श्रोतेही नाहित.  तरीही, व्याख्यान सुरु केल. हा प्रसंग कसा अजूनही चटकन आठवला त्यांना वयाच्या ९६ व्या वर्षी एवढी स्मरणशक्ती पाहून शिवशाहीरापुढे नत झालो. याच महीन्यात बाबासाहेब २९ जुलैला ९६ वर्ष पूर्ण करतात आहेत त्याआधी त्यांची ही भेट अविस्मरणीय तर आहेच तसेच हा सोहळा अनुपम्य व हृदय असाच ठरला.
                                                                          


या  कार्यक्रमाची  मी  लिहीलेली  व कार्यालयाच्यावतीने प्रसिध्द करण्यात आलेली बातमी दैनिक प्रभात मध्ये प्रकाशित झाली लिंक वर उपलब्ध
 
      


 

Tuesday, July 4, 2017

गरिबांना घरकुल देण्यात सातारा जिल्ह्याचा देशात मान मिळवून देणारे डॉ. राजेश देशमुख


मंगळवार, २० जून, २०१७


अन्न, वस्त्र, निवारा या माणसाच्या मुलभूत गरजा. गरिबीमुळे आपल्या देशातील ग्रामीण भागात अजूनही लोकांना राहायला हक्काचे घर नाही. म्हणूनच, मागील वर्षापासून केंद्र शासनाच्या ग्रामीण विकास मंत्रालयाच्यावतीने ‘प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण)' राबविण्याचा निर्णय झाला. महाराष्ट्रात या योजनेच्या अंमलबजवाणीस सुरुवात झाली. सातारा जिल्ह्याने आघाडी घेत अवघ्या ६ महिन्याच्या कालावधीत केंद्राच्या सर्व निकषांचे पालन करून प्रत्यक्षात १,९१३ घरकुले बांधून पूर्ण केली. जिल्ह्यात या योजनेचे १५१४५ लाभार्थी असून ११,८२५ पात्र लाभार्थ्यांची नोंद आवास प्रणालीत करण्यात आली आहे. प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) च्या अंमलबजावणीत सातारा जिल्हा महाराष्ट्रात अव्वल ठरला आहे. देशातही आपल्या कामाची छाप सोडणाऱ्या सातारा जिल्ह्याला नुकतेच केंद्रीय ग्रामीण विकास, पंचायतीराज व पेयजल मंत्रालयाच्या वार्षीक कार्यक्रमात या विभागाचे मंत्री नरेंद्रसिंह तोमर आणि राज्यमंत्री रामकृपाल यादव यांच्या हस्ते सुवर्ण व रजत पदकाने सन्मानित करण्यात आले. या यशाचे शिल्पकार तथा सातारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्याशी साधलेला हा संवाद महान्यूज नेटभेटसाठी.
राष्ट्रीय पातळीवर सातारा जिल्ह्याच्या सन्मानासाठी सर्वप्रथम आपले अभिनंदन. हा पुरस्कार स्वीकारताना काय भावना आहेत ?
धन्यवाद, आम्ही पूर्ण क्षमतेने जिल्ह्यात ‘प्रधानमंत्री आवास योजना(ग्रा.)’ राबविली. परिणामी, आमचा राष्ट्रीय पातळीवर गौरव झाला, याचा अत्यानंद आहे. पुरस्काराने जबाबदारी वाढली आहे. या योजनेअंतर्गत जिल्ह्यातील गोर-गरिबांना हक्काची घरे मिळवून देण्याकामी आणखी जोमाने कार्य करण्याची ऊर्जा या पुरस्कारामुळे मिळाल्याचे मी मानतो.

योजनेच्या अंमलबजावणीला कशी सुरुवात झाली. लाभार्थ्यांचे निकष कसे पूर्ण झाले?

साधारणत: मागील वर्षी ऑगस्ट महिन्यात केंद्र शासनाने ही योजना देशभर राबविण्याची घोषणा केली. घोषणा होताच आम्ही कामाला लागलो. या योजनेसाठी ठरवून देण्यात आलेल्या १३ निकषांचा आम्ही अभ्यास केला. सोप्या भाषेत हे निकष सर्वसामान्यांना समजेल अशा पद्धतीने संबंधित अधिकारी कर्मचाऱ्यांनी सांगितले. आम्ही त्या पद्धतीने सर्व ग्रामपंचायतींमध्ये तशी माहिती दिली. तसेच त्या-त्या गावातील गरीब व गरजवंत लोकांची नावे ठरवून ग्रामसभेने एकमताने ठराव केले. पात्र झालेल्या लाभार्थींना जिल्हा समितीमार्फत अंतिम मान्यता दिली. लाभार्थ्यांसाठी ठरविण्यात आलेले निकष पूर्ण करून त्यांना हक्काचे घर मिळवून देण्यासाठी अशी सकारात्मक सुरुवात झाली. 

केंद्र शासनाच्या अन्य योजनांचा मेळ घालून अर्थात कृती संगमातून ही योजना राबविण्यात येते त्याबद्दल काय सांगाल ?

केंद्र शासनाच्या तीन योजनांच्या निधीतून या योजनेच्या लाभार्थ्यांना निधी उपलब्ध करून दिला जातो. यानुसार प्रधानमंत्री आवास योजनेच्या (ग्रामीण) माध्यमातून प्रती लाभार्थ्याला रूपये १,२०,०००, स्वच्छ भारत मिशनच्या माध्यमातून रूपये १२,००० आणि महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार योजनेच्या माध्यमातून रूपये १७,२८० उपलब्ध करून दिले जातात. रोजगार हमी योजनेतून लाभार्थीला स्वतः च्या घरकुलावर काम करण्याची संधी तर मिळालीच आणि या कामाच्या मोबदल्यात मजुरी सुद्धा उपलब्ध करून दिली.

सातारा जिल्ह्याची राष्ट्रीय स्तरावर दखल घेण्यात आली. त्याचे गमक काय सांगाल?

प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंमलबजावणीला तत्काळ सुरुवात करून ऑगस्ट ते नोव्हेंबर महिन्यादरम्यान आम्ही जिल्ह्यातील ११ ब्लॉकमध्ये पात्र कुटुंबातील महिलांच्या नावे प्रस्ताव करून त्याची नोंदणी आवास प्रणालीत सुरु केली. लाभार्थींच्या योजनेच्या माहितीविषयी कार्यशाळा घेतल्या. अवघ्या सहा महिन्यात प्रत्यक्षात १९१३ घरे बांधून पूर्ण केली. निकषानुसार १५,१४५ पात्र लाभार्थ्यांची यादी करण्यात आली. त्यातील ११,८२५ पात्र लाभार्थीची आवास प्रणालीत आजअखेर नोंदणी केली. जिल्ह्याने नरेगामध्ये १,६३,२८५ मनुष्य दिन निर्मिती (रोजगार) केली आहे. या कामात आम्ही लाभार्थ्यांची ऑनलाईन नोंदणी, उपग्रहाद्वारे निरीक्षण (जिओ टॅगिंग), लाभार्थ्यांच्या खात्यात थेट निधी उपलब्ध करून देणे, घरकुलांना मंजुरी देणे या कामात सातारा जिल्हा राज्यात प्रथम ठरला. देश पातळीवर दोन श्रेणीत सुवर्ण व रजत पुरस्काराने सन्मान झाला. वर उल्लेख केलेले आमचे काम यासाठी लाभार्थी - ग्रामपंचायत - तालुका - जिल्हा या प्रत्येक टप्प्यावर एकमेकात असलेला सातत्यपूर्ण समन्वय (PMAY-G TEAM SATARA) हेच मी आमच्या यशाचे गमक मानतो.
सातारा जिल्ह्याच्या दुर्गम भागातही आपण ही योजना प्रभावीपणे राबविली आहे. दस्तुरखुद्द मुख्यमंत्री महोदयांनीही या गावांना भेट दिली आहे. याबद्दल काय सांगाल?

मुख्यमंत्री महोदयांनी कोरेगाव तालुक्यातील धामनेर या आदिवासी पाड्यास प्रत्यक्ष भेट देऊन याठिकाणी प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरे बांधकामास भेट दिली. तेथील आदिवासी महिला लाभार्थींशी चर्चा केली. ही घटना आमच्यासाठी प्रेरणादायी ठरली. त्यानंतर कोयना धरणाच्या परिक्षेत्रातील जावळी, महाबळेश्वर आणि पाटण या तालुक्यांतर्गत येणाऱ्या दुर्गम भागात जवळपास ४५ घरे आम्ही या योजनेअंतर्गत बांधली आहेत. या ठिकाणी वाहतुकीची साधने उपलब्ध नसल्याने लाभार्थींना बोटीच्या माध्यमातून बांधकाम साहित्याचा पुरवठा करून कामे पूर्ण केली आहेत.

प्रधानमंत्री आवास योजनेत (ग्रा.) सातारा जिल्ह्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव झाला. आपल्या कुशल मार्गदर्शनाने हे कार्य घडून आले. पुढेही या योजनेच्या माध्यमातून राज्यात व देशात एक आदर्श निर्माण व्हावा त्यासाठी आपणास मनापासून शुभेच्छा.

-रितेश मोतीरामजी भुयार,
उपसंपादक, महाराष्ट्र परिचय केंद्र, नवी दिल्ली.
bhuyar.ritesh@gmail.com

Saturday, May 20, 2017

मै तो बाप बन गया














दिल्लीहून निघालेली तामीळनाडू एक्सप्रेसट्रेन भोपाल स्टेशनला पोचली वेळ सकाळी ११ ची (दिनांक २५ एप्रिल २०१७). याच दिवशी सकाळी माझी अर्धांगिनी सोनाली हीला प्रसुती वेदना सुरु झाल्याने रूग्णालयात दाखल केले होते. त्यामुळे तेथील स्थिती जाणून घेण्यासाठी आणि बहुदा भोपाल स्टेशनला नेटवर्क मिळते म्हणून मी माझा थोरला भाऊ मनीषदादा यांस फोन लावला. तोच, तिकडून उत्तर आलं, नुकतीच प्रसुती झाली आणि बाळाला ऑपरेशन थियेटर मधून बाहेर आणल तू फोनवरच रहा मी सांगतो काय ते’ ‘ अरे मुलगा झालारे हे दादाचे शब्द ऐकून मला जीवनातला अतीव आनंद झाला.  

ही बातमी कळविण्यासाठी मी सर्वप्रथम फोन लावला तो माझी जिवच्छकंठच्छ मैत्रिण आरती शर्मा हीला. याकाळात ती सतत मला धिर देत होती. आणि दिल्लीत कामाच्या ठिकाणी झालेली मैत्री तिने उत्तम प्रकारे निभवल्याने मी ही वार्ता सर्वप्रथम तीला ऐकवली. हे आटोपत नाही तर चक्क परिक्षा हॉलमधून बाहेर पडत मला फोन करून तुम्हाला मुलगा झाला ही वार्ता देणारी आमची सर्वांची प्रेमळ , लाडकी अनुताई (बाळाची मोठी आई-मावशी), हा क्षणही सुखावून गेला

















यानंतर माझे मामा, श्रीमान टाके साहेब (वहिनी, तन्मय आणि आमची दिदी), श्रीमान झाडे साहेब-झाडे वहीनी, कार्यालय प्रमुख कांबळे साहेब, माझी मैत्रीण प्रियंका यांना फोन करून वार्ता कळवली. हे सर्व करीत असताना ट्रेनमधील  निर्वान शांततेचा भंग करून माझे सर्वांना फोन करने कदाचित ऐव्हाना माझ्या आजुबाजूच्या सह प्रवाशांना कळण्याचे काही बाकी राहीले नव्हते, माझा हा आनंद बघण्याचा पहिला मान या सहप्रवाशांनाच जातो. सायंकाळी ७ वाजेपर्यंत रुग्णालयात पोचलो(डॉ. झाकीर यांचे लाईफ केअर हॉस्पीटल, अचलपूर) सर्वप्रथम बाळाला बघितल हाच आम्हा बाप लेकांचा पहिला मुक संवाद ठरला. अर्धांगिनी ला पुष्पगुच्छ देऊन तीचं मनापासून अभिनंदन केलं ती ही आता आई झाली होती. आमच्या संसार रुपी वेलावर ख-या अर्थाने फुल उमललं होता याचा अत्यानंद आम्हा दोघांसह आमच्या परमप्रिय कुटुंबियांनाही होताच. सोबत आणलेले पेढे मोठे बाबा, दादा, सासूबाई  माझे साळे मंगेश भाऊ, सारिका ताई यांना दिले. नवागत बाळासाठी खास दिल्लीहून आणलेले काही लंगोट, उपयुक्त सामान दिल आणि तसाच घरी निघून गेलो . आई आणि बाबांना भेटलो. आमच्या आनंदी कुटुंबात  नातवाच्या येण्याने झालेला आनंद या दोघांसह माझी वहीनी निकीता यांच्या चेह-यावर ठळकपणे दिसत होता.
घरी पोचलो तोच माझे वडील रुग्णालयात जाऊन आपल्या नातवाला बघण्याच्या लगबगीत असल्याच मी पाहील. माझे वडील म्हणजे एक दिलखुलास , भावूक अन तितक मृदू व्यक्तीमत्व. पण, त्यांना पॅरालीससचा अटॅक आल्याने ते आता आजारी असतात. अशा स्थितीतही आपल्या नातवाला बघण्याची त्यांची ओढ मला आणखी सुखाहून गेली. नातवाचा चेहरा बघितल्यानंतर त्यांची पहिली प्रतिक्रिया होती, हा तर रितेशचीच कॉपी वाटतो’. त्यांनी माझ्या अर्धांगिनीचीही हाली खुशाली घेतली व नातवाला खूप आशिर्वाद दिले. बाळ व बाळंतिनीला रूग्णालयातून सुटी मिळाली त्या दिवशीही माझे बाबा नातवाच्या भेटीसाठी आले त्यांनी नाताला जवळ घेऊन त्याला गोंजारले हा क्षण मी आपल्या हृदयात आणि कॅमेरामध्येही टिपला. अर्धांगिनीचे वडील अर्थात आमच्या बाळाचे आजोळचे आजोबा यांनाही खूप आनंद झाला. बाळ जन्माला आले तेव्हा त्यांनी आपल्या अनुभवी शब्दांनी सांगितले बाळाची सर्व अवयव नीट आहेत का? ती बघा सर्वांना फोन करण्या आधी.शुभ मुहुर्तावरच नातवाचा चेहरा बघेल असा स्वत:च ठरवून दिलेला दंडक पाळत त्यांनी नवागत बाळाला बघितले वा त्याला मनोमन आशिर्वाद दिले. या दोनही आजोबांच्या मोलाच्या आशिर्वादाने आमचा मुलगा  आणि आम्हीही  धन्य जाहलो.  

















या सर्व महत्चाच्या कालावधीत माझ्या घरच्यांनी आणि सासरच्या मंडळीनी (मुख्यत्वे मंगेश भाऊ आणि मनीष दादा) एवढया उत्तम प्रकारे ही स्थिती सांभाळली. आणि आई,सासूबाई, सारिकाताई, स्वाती ताई प्रसुतीपूर्व काळात अर्धांगिनीची सतत काळजी घेणारी आणि नेमकी याच काळात परिक्षा आल्याने परिक्षेत अडकूनही आमच्या सोबत असणारी अनु ताई यांनी कर्तव्यदक्षपणे याकाळात भूमिका पार पाडल्या की ज्यामुळे मला ही सर्व परिस्थिती अत्यंत आनंदाने जगता आली. ही सर्वमंडळी आमच्या बाळाच्या या जगातील सुरक्षीत आगमनासाठी झटली त्यांना मानाचा मुजरा. याशिवाय पोटदुखे, मसने आणि उमक परिवार यांच्यासह यावेळी तनाने नसले तरी मनाने माझ्यासोबत असलेले देश-विदेशातील माझे स्नेही त्यांनाही सलाम. ही वार्ता सोशल मिडीयावर देण्याचंही मी कसा विसरेन? माझी फेसबुकची पोस्ट We Bless with Baby Boy # Happiest moment of the life(माझी मैत्रीण प्रियंकाने दुरूस्ती सुचविली होती Bless by नाही तर Bless with), वॉटसअपला मुलाचा डिपी आणि टॅग लाईन ‘Our Little Champ’ इंस्टाग्रामवर मुलाचा फोटो अपलोड करून ‘Our little champ’ हा दिलेला संदेश सर्वदूर वार्ता पोहचविण्यासाठी प्रभावी माध्यम ठरले. परिणामी समाज माध्यमातून (Social Media) शुभेच्छांचा पाऊस पडला हा ही एक उत्तम आनंद होता. आधुनिक जगात माध्यमांनी जग किती जवळ आणून ठेवल याची प्रचिती आली. आमची आणि आमच्या कुटुंबियांचीही ऑष्ट्रेलियन मैत्रीण जो ब्लांड हीने फेसबुक आणि वॉटसपहून दिलेल्या शुभेच्छा आणि ब्राझीलचे सेक्सॉलॉजीस्ट ॲण्डर्स हेगास यांच्या शुभेच्छांहून विदेशातील स्नेहींच प्रेमही ठळकपणे दिसून आलं. अर्धांगिनीचे अमरावती येथील श्रीमान मासोदकर काकाजी यांची करजगाव येथे झालेली भेट (दि.५ में २०१७) आमच्या बाळाला मिळालेला त्यांचा आशीर्वादही मोलाचा(दि.१५ मे २०१७ ला त्यांच अकाली निधन झाल.)      





                                                               My Genius Mom
अत्यंत शोषीक, त्यातही कणखर तेवढीच मृदू अन प्रचंड हळवी माझी आई, मी बाप झाल्याचा तिला अत्यानंद झाला. बाप होण्या आधिच्या प्रक्रियेतील तिचे धिरोदात्त विचार मला थक्क करणारे आणि तितकेच प्रेरक होते. या काळात ती मला सांगायची, मुलगी होवो की मुलगा ! जन्माला  येणारं अपत्य कुठल्याही व्यंगाविना उत्तम जन्माला याव. बाकी जी परिस्थिती ओढवेल ती स्वीकारण्यासाठी आपण तयार राहू. कधी-कधी मला अस वाटतं एवढ सर्व आईला कुठून कळतं. किती योग्य मार्गदर्शन करते ती मला. अनुभवाच्या शाळेत तवून सलाखूल निघालेले तिचे विचार नेमके आणि नेटके असल्याच गुढही मला उमजत आणि  माझी आई माझ्यासाठी ग्रेट असल्याच्या भावना आणखी घटट होतात. माझी आई खूप दुरदर्शी, उत्तम नियोजक आणि नाते सांभाळणारी आहे. तीने माझ्या चांदूरच्या शिनकर आत्याला फोन करून नातू झाल्याची वार्ता कळवली. गावातील अंबांडकर आत्याच्या भेट आणि करजगावातील मेहरे आत्याची भेट घेऊन त्यांनाही वार्ता कळवली व मोठयांचा मान राखत आपला आनंद त्यांच्या सोबत वाटला अर्थातच यासर्व ठिकाणी आई व मी सोबत होतो. मी गावी असतानाच तिने टूर प्लॅन आखला त्यात माझे परम प्रिय आजोळ विहीगाव व अंजनगावचे मामा ज्यांनी मला घडविण्यात मोलाचे योगदान दिले या सर्वमंडळींना प्रत्यक्ष भेटून वार्ता देने, आईची चिंचोली येथील  आत्या  जावरकर व त्यांचे यजमान, आईची टाकरखेड येथील पवार मावशी, काकडयाची सोनटक्के मावशी, कुष्टयातील तिच्या दोनही मावश्या यांची भेट घेऊन हालीखुशाली विचारपूस करत आपण आजी झाल्याचा व माझा मुलगा बाप झाल्याची वार्ता तिने आपल्या ज्येष्ठ नातेवाईकांना देत नात्यातील जपलेला गोडवा अत्यंत प्रेरक व मार्गदर्शक असाच म्हणावा लागेल.  











                                                 
                                                        


                                              आयुष्यातील या नव्या टप्या विषयी 

शिक्षण, करिअर, लग्न आणि आता पितृत्वाची जबाबदारी. पितृत्वाआधी आयुष्याच्या या विविध टप्यांतील असंख्य आठवणी, अनुभव, निर्णय गाठीशी घेत वाटचाल सुरु आहे. समाजाचा घटक या नात्याने समाज व देशाला एक नागरीक देण्यासह बाप म्हणून जबाबदारी स्वीकारण्यासाठी मी आणि आई म्हणून माझी अर्धांगिनी सोनाली आम्ही तन आणि मनाने पूर्णपणे तयार झाल्यावरच बाळाला जन्म देण्याचा निर्णय घेतला. ठरल्यानुसार आम्ही लग्नानंतर एकमेंकाना समजून घेण्यासाठी आणि quality time of life देण्यासाठी एक वर्षाचा अवधी घेतला. एक वर्षानंतर आम्ही आई-बाप बनण्याचा निर्णय घेतला. आम्हाला पहिल्याच प्रयत्नात यश आल, अर्धांगिनी गरोदर राहीली. ही वार्ता आम्ही कुटुंबियांना आप्त स्वकीयांना कळवली. याकाळात आवश्यक सर्व काळजी औषधोपचार नीट घेतले. यात अर्धांगिनी ने खूप साथ दिली नवरा नोकरी वर जातो तेव्हा आपण स्वत: रूग्णालयात जावणे, आवश्यक चाचण्या करून घेणे या सर्व कामात ती आघाडीवर होती, म्हणूनच मला तिचा अभिमान आणि खूप कौतुक वाटतं. याकाळात तिच्यातील हळव पण, समजूतदारपणा, दूरदर्शीपणा मला खूप सुखावून गेला. आमचे फॅमेली डॉक्टर डॉ. गौरव शर्मा आणि डॉ. दिपीका शर्मा दिल्लीतील लेडी हार्डींग रूग्णालयातील डॉ. अभिलाषा आणि प्रत्यक्ष प्रसुतीकाळात काळजी घेणा-या डॉ. बद्रुनिसा झाकीर यांचं वेळोवेळी व उपयुक्त मार्गदर्शनही आमच्यासाठी मोलाच ठरल. एव्हाना आम्ही युटयूबवरून व्हिडीओज डाऊनलोड करून घेत गरोदर काळात घ्यावयाची काळजी, आहार विहार याबाबत माहिती घेतली , अनुभवी नोतवाईक, जानकर मित्र यांच्याशीही चर्चा करायचो आणि आई-बाप पण जगण्याच्या पूर्व तयारीसाठी स्वत:ला तयार करीत होतो.

मुल जन्माला घालन म्हणजे माय बापाच्या मनाची पूर्ण तयारी असावी लागते. शेवटी या माध्यमातून ते कुटुंब समाज आणि देशाच रूणही फेडत असतात. एक जबाबदार व कर्तव्यदक्ष नागरीक या समाजाला देत असतात. आमच्या कुटुंबातही एक गोंडस मुलाने जन्म घेतला. त्याच्यावर उत्तम संस्कार करणे, एक जबाबदार व कर्तव्यपरायण माणूस म्हणून त्याला घडविणे यासाठी आम्हा दोघांचा अनुभव आणि आम्हाला आमच्या कुटुंबाकडून मिळालेला वारसा याचा  निश्चितच उपयोग होईल याची आम्हाला पूर्ण खात्री आहे. बदलत्या काळानुसार त्यानेही बदल स्वीकारावे हे करत असताना संस्कार, नितीमत्ता आदिंच्या घट्ट रूतलेल्या मुळांचाही तेवढाच आदर करावा याकडे पालक म्हणून आम्ही पूर्ण लक्ष्य देण्याचा कसोसिने प्रयत्न करू. आमच्या मुलामध्ये सामाजिक जाणीवा निर्माण करण्याचाही आमचा प्रयत्न राहील. बाकी तर प्रत्यक्ष आई-बाप पण जगताना कळेलच. हो त्याने आपल बालपण खूप इन्जॉय कराव  आभासी जगा पेक्षा वास्तव जगाची ओळख त्याला व्हावी हा प्रयत्न एक सजग पालक म्हणून आम्ही नक्की करू. 






स्वरित नावाची अशीही कहाणी
 मुलगा झाला आता त्याच नामकरण हा विषय होता. बाळ जन्माला येण्याआधी मी काही मुलींच्या नावाची ८-९ पानं इंटरनेटहून डाऊन लोड करून घेतली होती, अर्धांगिनीला विचारल मुलगा किंवा मुलीचे नावे शोधले का तर तिच उत्तर होत बाळाच्या जन्मानंतर शोधेन मी नाव आताशी काही घाई नाही. मात्र, आम्हाला मुलगा झाल्यानंतर त्याच्या नावाबाबत मीच पुढाकार घेतला. अर्थपूर्ण नाव असाव आणि आम्हा दोघांच्याही नावाच्या आध्याक्षराचा त्यात समावेश असावा हाच तो काय नावाचा क्रायटेरिया. मग काय सर्व जवळच्या आप्त स्वकीयांना फोन करून नाव शोधण्याची विनंती केली. यात एक गोष्ट लक्षात आली की शाळकरी मुल विशेषत: केजीत जाणा-या मुलांकडे नावांची जंत्री असते तर त्यांना विचारावी नाव तोही प्रयोग करून झाला. लग्न पत्रिकांवर असणा-या लहान मुलांची नावे शोधण्याचाही प्रयोग झाला. नातेवाईकांकडून प्रत्यक्ष फोन करून ,व्हॉटसअपवरूनही नावे घेऊन झाली पण इच्छित किंवा मनासारख नाव काही मिळत नव्हत. अशात माझी आई आणि मी दिनांक ५ में २०१७ रोजी करजगाव(सासरीवाडी)ला माझ्या मुलाला बघण्यासाठी गेलो असता माझ्या मेहरे आत्याकडे आम्ही भेटीसाठी गेलो. आत्याची नात आणि माझी पुतणी मिरा हीने काही नाव सूचविले त्यात स्वरित हे तीने सूचविलेले नाव मला खूप आवडले. जो स्वरात आहे असा, ज्याच्या  भोवती स्वर आहे असाम्हणजे स्वरितएक अर्थपूर्ण व कलेशी साधर्म्य असणार नाव आणि आमच्या दोघांच्या नावाच्या आध्याक्षरांचाही त्यात अंतर्भाव असल्याने स्वरित या नावावर अखेर शिक्का मोर्तब झाला. स्वरित रितेश सोनाली भुयार.
              गंमतीचा भाग असा, की आता शाळांमधील मुलांची वैविध्यपूर्ण नावे आणि टीव्ही मालिकांमधील कलाकारांची नावे यातून मुलांची नावे शोधण्याचा ट्रेंड आम्ही आई-बाप असताना सुरु आहे. पुढे यात काय बदल होतो ते बघूया तुर्तास इथे  लिखानास पूर्ण विराम देतो.     
                                                                            *****

  

अनिल माधव दवे शिवभक्त व मृदू व्यक्तीमत्व (काळाच्या पडदयाआड)



केंद्र शासनात पर्यावरण व वने मंत्री म्हणून कार्यभार सांभाळणारे अनिल माधव दवे यांच्या निधनाची वार्ता आज (दि.१८ में २०१७) सकाळी कळली, तोच मनात सर्व प्रथम त्यांच्याविषयी माझ्या स्वत:च्या निरीक्षणातील दोन बाबी प्रकर्षाने पुढे आल्या. एक म्हणजे त्यांचे छत्रपती शिवाजी महाराजांच्या व्यक्तीमत्वावरील निस्सीम प्रेम आणि दुसरी म्हणजे त्यांचा मृदू स्वभाव.
                                                                          असाही योगायोग
श्री. दवे यांच्याशी संपर्कात येण्याची घटना म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांवरील पुस्तक त्यांनी लिखानासाठी घेतलं होत त्यांच कच्च टीपण त्यांनी केलं होत त्याचे संपादन आणि विस्तार करण्याच्या प्रकल्पातील काही भाग माझ्या वाटयाला आला होता ते पुस्तक हिंदीत होत(कदाचित वर्ष२०११). आज त्यांच्या निधनानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शोक संदेशाचा हिंदी अनुवाद करून बातमी करण्याची जबाबदारी कार्यालय प्रमुखांनी माझ्यावर सोपवली. म्हणजे हिंदीतील अनुवादाने श्री. दवे यांच्याशी सर्वप्रथम आलेला संपर्क आणि आज त्यांच्या निधानाबाबत मुख्यमंत्री महोदयांचा शोकसंदेश हिंदीत अनुवाद करण्याचा प्रसंग माझ्यासाठी दु:खद योगायोग ठरला.
            श्री. दवे हे मध्यप्रदेशातील खासदार असून ते छत्रपती महाराजांच्या व्यक्तीमत्वापासून खूपच प्रभावित झाल्याची मला स्वानुभवातून सर्वप्रथम वर्ष २०११ मध्ये ओळख पटली. यानंतर केंद्रात २०१४ मध्ये सत्तांतर होऊन भाजप प्रणीत लोकशाही आघाडीचे सरकार सत्तेवर आले. पुढे २०१६ च्या जुलै महिन्यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदिंच्या नेतृत्वाखालील  केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होऊन पर्यावरण व वने मंत्री पदाची जबाबदारी मराठमोळे मंत्री प्रकाश जावडेकर यांच्याकडून जन्माने मध्यप्रदेशचे पण महाराष्ट्राविषयी प्रगाढ प्रेम असणा-या अनिल माधव दवे यांच्याकडे आले. तेव्हा मला पुन्हा व देशाला या व्यक्तीमत्वाची ओळख झाली.   
                           मंत्रालयातील काही निवडक आठवणी
दिल्लीतील आएनए मार्केट भागातील इंदिरा पर्यावरण भवन ही ८ मजली वास्तु  आणि त्या भोवतीचा भला मोठा सुंदर व निटनेटका परिसर म्हणजे पर्यावरण व वने मंत्रालय. महाराष्ट्राच्या पर्यावरण व वने संदर्भातील विविध विषयांवरील परवानग्या , मंजुरीसाठी मा. मुख्यमंत्री महोदय व वरिष्ठा अधिका-यांच्या केंद्रीय पर्यावरण व वने मंत्र्यांसोबतच्या बैठका या इमारतीच्या ५ व्या माळयावरील मंत्रीमहोदयांच्या दालनासमोरील सभागृहात होतात. या बैठकींना उपस्थित राहून वार्तांकन करण्याचे प्रसंग आले. याठिकाणी शेवटचे १७ फेब्रुवारी २०१७ रोजी जाण्याचा योग आला आणि श्री. दवे यांना जवळून बघण्याची माझ्यासाठी ही शेवटची घटना ठरली .
 या बैठकीत मुंबई सागरी मार्ग, मुंबईतील सांडपाणी प्रक्रिया केंद्र , नागपूर येथील गोरेवाडा अभयारण्याचा प्रश्न आदींवर चर्चा झाली मात्र यावेळी मी प्रथमच श्री. दवे हे भरपूर थकले असल्याचे पाहीले. त्यांची प्रकृती फारच खालवली असल्याचे दिसत होते. राज्यातील या महत्वाच्या प्रश्नांवर त्यांनी सकारात्मक पुढाकार घेतला आणि हे तीनही मुद्दे आता मार्गी लागले आहे. मात्र, ज्यांच्या पुढाकाराने हे निर्णय झाले त्या श्री. दवे  यांच्या निधनाची बातमी  १८ में २०१७ रोजी  ऐकावी लागन हे फारच दु:खद आहे.
            प्रकाश जावडेकर हे महाराष्ट्राचे सुपूत्र असल्याने त्यांना राज्याच्या पर्यावरण व वने विषयक  प्रश्नांची जाण होती त्यामुळे राज्याचे प्रश्न सोडविण्यास मदत होत असे. श्री. दवे यांनी पर्यावरण व वने मंत्री पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर श्री. जावडेकरांच्याच कामाला उत्तम प्रकारे पुढे नेले. मुंबई येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्याना शेजारील परिसरावरील बंदी उठवण्याचा निर्णय माध्यमांसमोर मांडण्यासाठी श्री. दवे यांनी घेतलेली पत्रकार परिषद आणि आयत्या वेळी हा संदेश आल्याने स्वत: मलाच या पत्रकार परिषदेचे छायाचित्र आणि छायाचित्रीकरण करावे लागले होते ही आठवणही आता इतिहास बनून राहीली आहे.
          श्री. दवे यांचे मी बघितलेले व्यक्तीमत्व म्हणजे निस्सिम शिवभक्त आणि मृदू स्वभावाचे धनी असेच आहे. श्री. दवे हे आज काळाच्या पडदया आड गेले असले तरी त्यांच्या कतृत्वातून घडलेली समाज व देशसेवा माझ्यासह सर्व देशवासीय सदैव स्मरणात ठेवतील. श्री . दवे यांना भावपूर्ण आदरांजली.
                                                                         ******