मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी
केंद्राकडे केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याने राज्यासाठी बरेच प्रकल्प मंजूर
झाले व विविध योजनांसाठी निधी उपलब्ध झाला. सरत्या वर्षा अखेर महाराष्ट्रातील
दुष्काळ निवारणासाठी केंद्राकडून ३ हजार ५० कोटींची मदत जाहीर झाली. हाच सकारात्मक
उत्साह कायम राहत महाराष्ट्रासाठी देशाच्या राजधानीत वर्ष २०१६ ची सुरुवात यशस्वी
ठरली.
तेल व वायू संवर्धनासाठी महाराष्ट्राला
देशातील सर्वोत्तम राज्याच्या पुरस्काराने गौरविण्यात आले. पुण्यातील मुळा-मुठा नदयांच्या
शुध्दीकरणासाठी जपानच्या जायका कंपनीसोबत केंद्र शासनाचा करार झाला. रेल्वे मंत्री
सुरेश प्रभु यांनी ‘मुंबई-काझीपेट’या
वर्षातील पहील्या रेल्वेगाडीचा व्हीडीओ कॉन्फरंसींगच्या माध्यमातून शुभारंभ केला. नागपूर
शहराच्या विकासासाठी फ्रांससोबत महाराष्ट्राचा करार झाला.पंतप्रधानांच्या
हस्ते महाराष्ट्रातील चार बालकांचा ‘राष्ट्रीय बाल शौर्य’ पुरस्काराने सन्मान करण्यात आला. ‘स्वीप’ कार्यक्रमाच्या प्रभावी अमंलबजावणीसाठी राज्याचे उपमुख्य निवडणूक अधिकारी
शिरीष मोहोड आणि मुंबई उपनरचे जिल्हाधिकारी शेखर चन्ने यांचा राष्ट्रपतींच्या
हस्ते सन्मान करण्यात आला, तर राज्यशासनाच्यावतीने दिल्ली हाट येथे आयोजित महाराष्ट्राची
संस्कृती, लघु उद्योग, हस्तकला यांचा अनोखा संगम असणा-या ‘महा-जत्रा’ महोत्सवाला उदंड प्रतिसाद लाभला. वर्षारंभीच महाराष्ट्राचा असा
वैविध्यपूर्ण गौरव राजधानीत दिसून आला.
दुष्काळ निवारणासाठी केंद्राकडून ३ हजार 50 कोटीची मदत
गेल्या
वर्षीच्या शेवटच्या आठवडयात राज्यातील दुष्काळ
निवारणासाठी केंद्रशासनाने 3 हजार 50 कोटींची मदत
जाहीर केली. नैसर्गिक आपत्तीमुळे दुष्काळाला सामोरे जाणा-या राज्यांसाठी
गठीत करण्यात आलेल्या उच्चाधिकार समितीने ही घोषणा केली. केंद्रीय गृह मंत्री राजनाथ सिंग यांच्या अध्यक्षतेत
पारपडलेल्या समितीच्या बैठकीत कृषी मंत्री राधा मोहन सिंग, निती आयोगाचे उपाध्यक्ष अरविंद पांगरिया, केंद्रीय वित्त राज्य मंत्री जयंत सिन्हा, केंद्रीय गृह सचिव राजीव मेहरीश उपस्थित होते.
महाराष्ट्रात गेल्या 3 वर्षांपासून
सतत दुष्काळी परिस्थिती आहे. केंद्रीय पथकाने राज्यातील
दुष्काळ भागाची पाहणी करून
आपला अहवाल केंद्रशासनाला सादर केला. त्यानंतर राज्याला 3 हजार 50 कोटी
रूपयांच्या मदतीची घोषणा करण्यात आली.
आतापर्यंतची सर्वात मोठी मदत :
मुख्यमंत्री
मुख्यमंत्री
देवेंद्रफडणवीस यांनी या मदतीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारचे
जाहीर आभार मानले. केंद्राडून राज्याला मिळालेली ही आतापर्यंतची सर्वातमोठी मदत
आहे. राज्यातील शेतकऱ्यांसाठी ही अतिशय महत्त्वाची घोषणा असून दुष्काळाच्या
सावटाखालील शेतकऱ्यांना यामुळे दिलासा मिळाला असल्याची भावना मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली.
‘तेल व वायू संवर्धनासाठी’ महाराष्ट्राला देशातील सर्वोत्तम
राज्याच्या पुरस्कार
देशात १६ ते ३१ जानेवारी हा ‘तेल व वायू संवर्धन’ पंधरवाडा म्हणून साजरा केला
जातो. केंद्रीय
पेट्रोलीयम व गॅस मंत्रालयाअंतर्गत कार्य करणा-या पेट्रोलियम संवर्धन संशोधन
मंडळाच्यावतीने येथील डिआरडीओ भवनात आयोजित समारंभात पेट्रोलीयम व गॅस मंत्री धर्मेंद्र
प्रधान यांच्या हस्ते या पंधरवाडयाचे उदघाटन झाले. मागील वर्षी ‘तेल व वायू संवर्धन’ पंधरवाडयापासून देशभर सुरु
झालेल्या जनजागृती कार्यक्रमात उल्लेखनीय कार्यकरणा-या महाराष्ट्र राज्याला
देशातील सर्वोत्तम राज्याच्या पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले. राज्याचे मुख्य सचिव स्वाधिन क्षत्रिय आणि
अन्न व नागरी पुरवठा तथा ग्राहक संरक्षण विभागाचे प्रधान सचिव दीपक कपूर
यांनी पेट्रोलीयम व गॅस मंत्री धर्मेंद्र
प्रधान यांच्या हस्ते हा पुरस्कार स्वीकारला.
गेल्या वर्षभरात तेल व वायू संवर्धनासाठी उत्तम प्रकारे
कार्यकरणा-या राज्यांचा अभ्यास करून हा पुरस्कार महाराष्ट्राला प्रदान करण्यात
आला. केंद्र सरकराच्या मार्गदर्शनाखाली जानेवारी २०१५ मधे तेल व वायू संवर्धन
पंधरवाडयापासून महाराष्ट्रातील विविध जिल्हयांमधे तेल व वायू संवर्धन जनजागृतीच्या
दिशेने कामास सुरुवात झाली. वर्षभरात मंत्रालय आणि जिल्हा स्तरावरील कार्यालयांनी
राज्यातील उद्योग, कृषी, वाहतूक, जैव इंधन, घरगुती वापर आदी क्षेत्रात
जनजागृतीसाठी विविध शिबीरांचे आयोजन केले.
तेल व वायू संवर्धनाबाबत राज्यातील सर्वसामान्य नागरीकांमधे
जनजागृती करण्यासाठी १,०२२ शिबीरांचे आयोजन करण्यात आले. राज्यातील शेतक-यांमधे
इंधन वापर व तेल तसेच वायू संवर्धनाबाबत
जागृती करण्यासाठी ४२० शिबीर आयोजित करण्यात आले. घरगुती गॅस वापरताना इंधन बचतीबाबत
जागृती करण्यासाठी राज्यांतील महिलांकरिता १२,५६१ शिबीरांचे आयोजन करण्यात आले.
उद्योग क्षेत्रात प्रदूषण कमी करून इंधन संवर्धनाबाबत जागृती करण्यासाठी २६१
शिबीरांचे आयोजन करण्यात आले. राज्यातील शासकीय व खाजगी वाहनांद्वारे होणारे
प्रदूषण कमी करणे व इंधन संवर्धनाबाबत जागृतीसाठी ६,१५३ शिबीरांचे यशस्वीपणे आयोजन
करण्यात आले. अशा प्रकारे एका वर्षात राज्यात एकूण २०,४१७ संवर्धन कार्यक्रम
यशस्वीपणे राबविले म्हणून मोठया राज्यांच्या गटात महाराष्ट्राची सर्वोत्तम राज्य
म्हणून निवड झाली.
मुळा-मुठा नदी शुध्दीकरणासाठी जपान
सोबत सामंजस्य करार
पुण्यातील मुळा व मुठा
नदीच्या शुद्धीकरणासाठी केंद्र सरकारने जपानमधील जपान इंटरनॅशनल कोऑपरेशन एजन्सी
(जायका) या कंपनीशी सांमजस्य करार केला. नुकत्याच पार पडलेल्या केंद्रीय
मंत्रीमंडळाच्या बैठकीत या कराराला मंजुरीही देण्यात आलीयेथील इंदिरा पर्यावरण
भवनात केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर व जपानचे भारतातील राजदूत केंजी
हिरामत्सु यांनी या करारावर सह्या केल्या. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने जारी
केलेल्या देशातील प्रदूषित 302 नद्यांमधे पुण्यातून वाहणा-या मुळा-मुठा या दोन्ही नद्यांचा समावेश आहे.
शहराच्या मध्य भागातून वाहणाऱ्या या नद्यांच्या शुद्धीकरणाची पुण्यातील
नागरिकांकडून अनेक वर्षांपासून मागणी होत होती. तसेच महाराष्ट्र सरकाकरने राष्ट्रीय
नदी संरक्षण योजनेअंतर्गत (एनआरसीपी) या नद्यांच्या शुद्धीकरणासाठी प्रस्ताव पाठविला
होता.
या
करारानुसार मुळा आणि मुठेच्या शुद्धीकरणासाठी जपानची जायका कंपनी एक हजार कोटींचे
कर्ज देणार आहे. हे कर्ज फेडण्यासाठी 40 वर्षांची मुदत ठेवण्यात आली आहे. या करारांतर्गत 11
नवीन मल-जल शोधन यंत्राचे निर्माण केले जाणार आहे. यामुळे नदीचे प्रदूषण
रोखण्यास मोठी मदत होईल. या नद्यांच्या शुद्धीकरणावर 990.26 कोटी
रुपये खर्च करण्यात येणार आहे. पैकी
केंद्र सरकारचा वाटा 841.72 कोटी आणि पुणे
महानगरपालिकेचा वाटा 148.54 कोटींचा असणार आहे. ही
शुद्धीकरणाची योजना जानेवारी 2022 पर्यंत पूर्ण करण्यात येईल
असे या करारात म्हणण्यात आले आहे.
नागपूर शहराच्या विकासासाठी फ्रांससोबत
महाराष्ट्राचा करार
केंद्र सरकारच्या महत्वाकांक्षी स्मार्ट सिटी योजने अंतर्गत नागपूर शहराचा विकास करण्यासाठी फ्रांसीसी विकास संस्था (एएफडी) आणि महाराष्ट्र सरकार यांच्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रांसचे राष्ट्राध्यक्ष फ्रान्सीस्को ओलांद यांच्या उपस्थितीत चंदीगढ येथे आयोजित भारत-फ्रांस व्यापार परिषदेत महत्वपूर्ण करार झाला.
या
परिषदेत महाराष्ट्रासोबतच पॉण्डेचेरी आणि चंदीगढ शहराच्या विकासासाठीही असा करार करण्यात आला.
या करारानुसार नागपूर शहरातील वाहतूक व्यवस्था,
पाणीपुरवठा,
सांडपाणी व्यवस्थापन, कचरा व्यवस्थापन, वास्तू शिल्प व वारसा क्षेत्राचा विकास, नवीन व नवीकरणीय उर्जाक्षेत्र विकास आदी क्षेत्रांमधे फ्रांस तांत्रिक मदत देणार आहे.
फ्रांसमधून याकामासाठी येणा-या तंत्रज्ञ व तज्ज्ञांचा सर्व खर्च फ्रांसीसी विकास संस्था उचलणार आहे.
पंतप्रधानांनी
मानले आभार
भारत-फ्रांस व्यापार परिषदेला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात आधुनिक शहर निर्माण करण्याच्या दिशेने उचलण्यात आलेल्या पावलांची माहिती दिली.
तसेच,
नागपूरसह देशातील तीन शहरांमधे स्मार्टसिटी निर्माण करण्यासाठी फ्रांसने घेतलेल्या पुढाकाराबाबत आणि आज उभय देशांमधे याबाबत झालेल्या द्वीपक्षीय कराराबाबत फ्रांसच्या राष्ट्राध्यक्षांचे आभार मानले.
या
परिषदेत भारत व फ्रांसच्या कंपन्यांमधे एकूण १६ करार झाले.
‘मुंबई-काझीपेट आनंदवन
एक्सप्रेसचा’ शुभारंभ
रेल्वेमंत्री
सुरेश प्रभु यांनी रेल्वे भवनात व्हिडीयोकॉन्फरसींगच्या माध्यमातून ‘मुंबई-काझीपेट आनंदवन एक्सप्रेस’
या साप्ताहिक एक्सप्रेस
रेल्वे गाडीला हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ
केला. विदर्भ वासियांची ब-याच दिवसांपासून मागणी असलेल्या, मुंबईतील लोकमान्य टर्मीनल्स
ते तेलंगानातील कोझीकोट रेल्वे स्थानका दरम्यान धावणा-या या रेल्वे गाडीचा शुभारंभ
रेल्वे भवनात पार पडला. रेल्वे राज्यमंत्री मनोज सिन्हा, रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष
ए.के मित्तल आणि मुंबईचे माजी पोलीस आयुक्त तथा खासदार सत्यपाल सिंह उपस्थित होते.
याचवेळी रेल्वे भवनात लावण्यात आलेल्या स्क्रिनवर मुंबईच्या लोकमान्य टर्मीनल्सवर
उपस्थित मुंबईच्या महापौर स्नेहल अंबेकर, खासदार गोपाल शेट्टी आणि आमदार मंगेश
कोडाळकर उपस्थित असल्याचे दिसत होते.
अशी धावणार ‘मुंबई-काझीपेट आनंदवन एक्सप्रेस’
मुंबई लोकमान्य टिळक
टर्मिनल्सहून आठवडयाच्या प्रत्येक सोमवारी सकाळी ११.३० वाजता ही रेल्वे गाडी तेलंगनातील
कोझीकोट रेल्वे स्थानकासाठी सुटेल. लोकमान्य टर्मिनल्सहून सुटल्यानंतर ठाणे,
कल्याण, नाशिकरोड, भुसावळ, मलकापूर, अकोला, बडनेरा, धामनगांव, वर्धा, हिंगणघाट,
वरोरा, चंद्रपूर, बल्लरशा या रेल्वे स्थानकांवर थांबेल.
महाराष्ट्रातील चौघांना राष्ट्रीय बाल
शौर्य पुरस्कार
पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांच्या हस्ते महाराष्ट्रातील ४ बालकांना राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्काराने
सन्मानीत करण्यात आले. आपल्या चार मित्रांना वाचवताना प्राण गमवावे लागलेल्या नागपूरच्या
गौरव सहस्त्रबुध्देला जाहीर झालेला “भारत
पुरस्कार” गौरवचे आई वडील रेखा व कवळू सहस्त्रबुध्दे यांनी स्वीकारला.
जळगाव जिल्हयातील कोथळीच्या निलेश भील, वर्धा जिल्हयातील सिंदी रेल्वेच्या वैभव घंगारे
आणि मुंबईतील वाळकेश्वरच्या मोहीत दळवी ला हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
नागपूरच्या
गौरव सहस्त्रबुध्दे याने अंबाझरी तलावात बुडणा-या ४ मुलांचा प्राण वाचविला,त्यात गौरवला
आपले प्राण गमवावे लागले. गौरवच्या या साहसी कर्तृत्वासाठी त्याला ‘भारत पुरस्कार’ जाहीर झाला.
जळगाव जिल्हयातील मुक्ताईनगर
तालुक्यातील कोथळी गावातील मुक्ताई मंदीरात मामा सोबत गेलेल्या निलेश भिलने
मंदीराच्या घाटावर एक मुलगा बुडत असल्याचे दिसताच. क्षणाचाही विलंब न करता पाण्यात
उडी घेत मुलाचे प्राण वाचविले. कोथळी गावात राहणारा निलेश रेवाराम भिल हा गावातील
जिल्हा परिषद शाळेत ५ वीत शिकत आहे.
वर्धा
जिल्हयातील सेलू तालुक्यातील सिंदी रेल्वे येथील सहावीत शिकणा-या वैभव रामेश्वर घंगारे हा गावातील नंदी नदी
किनारी मित्रांसोबत खेळत असताना अचानक नदीला पूर आला. नदीतील पाण्याच्या
प्रवाहासोबत वैभवचा मित्र सुहास बोरकर वाहून गेला. वैभवने जीवाची पर्वा न करता
नदीत उडी घेतली व मित्राचे प्राण वाचविले.
आई वडीलांचे छत्र हरवलेल्या मुंबईतील वाळकेश्वर भागात
आत्याकडे राहणा-या मोहीत दळवीने परिसरातील तलावात स्नान करताना बुडत असलेल्या मुलीचे प्राण वाचवले. मुलगी
तलावात आंघोळीसाठी गेली असता तलावात डुबत होती तीने आपल्या मैत्रीनीला हात दिला पण
तीला पोहता येत नसल्याने मैत्रीनेही हात न दिल्याचे चित्र मोहीत ने पाहिले. तोच
त्याने २५ फुट खोल तलावात उडी घेऊन मुलीचे
प्राण वाचविले व तिला नजीकच्या इस्पितळात भरती केले. मोहीत वाळकेश्वर येथील महानगर पालीकेच्या बालगंगा
कवळेमठ शाळेत आठवीत शिकत आहे.
शिरीष मोहोड
आणि शेखर चन्ने यांना केंद्रीय निवडणूक आयोगाचा पुरस्कार
मतदान
व्यवस्थापनाअंतर्गत राबविण्यात आलेल्या ‘स्वीप’ कार्यक्रमासाठी राज्याचे उपमुख्य निवडणूक अधिकारी शिरीष मोहोड आणि मुंबई
उपनगरचे जिल्हाधिकारी शेखर चन्ने यांना यांना राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांच्या
हस्ते गौरविण्यात आले. केंद्रीय निवडणूक आयोगाच्यावतीने येथील मानेकशा सेंटरच्या
झोरवार सभागृहात आयोजित ‘६ व्या राष्ट्रीय निवडणूक
मतदातादिनाच्या’ कार्यक्रमात निवडणूक पध्दतीच्या उत्तम
अंमलबाजवणीसाठी विविध राज्यांच्या प्रतिनिधींना राष्ट्रपतींच्या हस्ते गौरविण्यात
आले. यावेळी मुख्य केंद्रीय निवडणूक आयुक्त डॉ. नसीम झैदी, निवडणूक आयुक्त द्वय
ए.के.जोती आणि ओमप्रकाश रावत मंचावर उपस्थित होते.
केंद्रीय निवडणूक
आयोगाच्यावतीने २००९ पासून देशातील विविध राज्यात ‘मतदारांना
साक्षरकरून त्यांना मतदान प्रक्रियेत सहभागी करण्याचा कार्यक्रम’(स्वीप) राबविण्यात येत आहे. श्री. मोहोड आणि श्री.
चन्ने यांनी या कार्यक्रमाच्या तिस-या
टप्प्यात वर्ष २०१५ मधे महाराष्ट्रात उत्तम प्रकारे अमंलबजावणी केली आहे. त्यांनी ‘स्वीप’ कार्यक्रमांतर्गत महाराष्ट्रात तृतीयपंथी आणि
वेश्या व्यवसायातील व्यक्तींचा मतदान प्रक्रियेत सहभाग वाढविला आहे.
दिल्लीत
गरजला महाराष्ट्र ; ‘महा-जत्रा’ महोत्सवास देश
विदेशातील
पर्यटकांचा
उदंड प्रतिसाद
महाराष्ट्राच्या मराठ मोळया संस्कृतिचे दर्शन घडवित १७ जानेवारी रोजी दिल्ली हाट येथे महाराष्ट्र
शासनाच्या ‘महा-जत्रा’ या कला-संस्कृति व
हस्तकला प्रदर्शनाला थाटात सुरुवात झाली. ‘छत्रपती शिवाजी
महाराज की जय’ या घोषणांनी दिल्ली हाटचा परिसर दणाणून गेला. महाराष्ट्राच्या
संस्कृतिची ओळख व्हावी व राज्यातील लघु उद्योजक, हस्तकला कारागीर व कलाकरांना
व्यासपीठ मिळावे या उद्देशाने राजधानी दिल्लीत राज्य शासनाच्या वतीने ‘महा-जत्रा’ या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. दि.
17 ते 31 जानेवारी 2016 पर्यंत चालणा-या या महाजत्रेत महाराष्ट्रातील लघुउद्योजक,
हस्तकाला कारगीर, कलाकार यांनी 120 स्टॉल्स उभारले आहेत. राज्य शासनाचा पर्यटन
विभाग, सांस्कृतिक संचालनालय, लघु उद्योग
विकास महामंडळ, सांस्कृतिक कार्य संचालनालय यांच्या संयुक्त विद्यमाने या प्रदर्शनाचे
आयोजन करण्यात आले.
पर्यटन व
सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या सचिव श्रीमती वल्सा आर. नायर सिंह यांच्या हस्ते ‘महा-जत्रा’ या प्रदर्शनाचे उदघाटन झाले. सांस्कृतिक
कार्य संचालक अजय अंबेकर यावेळी उपस्थित होते. प्रख्यात कला दिग्दर्शक नितीन देसाई
यांनी या परिसराची सजावट केली आहे.या महोत्सवात महाराष्ट्राच्या सांस्कृतिक
जीवनाची ओळख करून देणारी कार्यशाळा प्रथमच पहायला मिळाली. महाराष्ट्राची पांरपारिक
ओळख वारली चित्रकला, रांगोळी, आदीवासी मुखवटे तयार करणे, मातीचे किल्ले तयार करणे
याबरोबरच नऊवारी साडी नेसणे आदी विषयांवर पर्यटकांसाठी कार्यशाळा घेण्यात आल्या.
तसेच मराठी भाषेतील गाजलेले चित्रपटही याठिकाणी प्रदर्शीत करण्यात आले. या
महाजत्रेत दिवसभर महाराष्ट्राच्या लोककलांचे सादरीकरण करण्यात आले. राष्ट्रीय
स्तरावरिल महत्वाच्या ऐतिहासिक आणि सामाजिक घडामोडीतील महाराष्ट्राच्या सहभागाची
दुर्मिळ कागदपत्रांचे प्रदर्शन व राज्य शासनाची प्रकाशने या प्रदर्शनात मांडण्यात
आली.
|
महाराष्ट्र परिचय केंद्राचे प्रदर्शन
महाराष्ट्र परिचय
केंद्राच्यावतीने ‘महा-जत्रा’ च्या निमित्ताने
राज्य शासनाच्या विकासकामांची माहिती देणारे प्रदर्शन मांडण्यात आले. मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस यांच्या सक्षम नेतृत्वात राज्याने विविध क्षेत्रात केलेल्या
प्रगतीची माहिती या प्रदर्शनास भेट
देणा-या प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहचविण्यासाठी मराठी व इंग्रजी भाषेत आकर्षकपणे
ही प्रदर्शनी लावण्यात आली. महाजत्रेत मोक्याच्या ठिकाणी आकर्षक पध्दतीने
मांडण्यात आलेल्या या प्रदर्शनीस भेट देणा-या प्रत्येकांची पावल येथे स्थिरावत
होती. राज्याच्या प्रगतीचा आलेख एकाच ठिकाणी बघायला मिळत असल्याने प्रदर्शनीस
भेट देणारा प्रत्येक व्यक्ती भरपूर माहितीचा ठेवा मिळविल्याच्या भावनेने कृतार्थ होत होता. जवळपास
दोन आठवडे लावण्यात आलेल्या या प्रदर्शनीच्या माध्यमातून महा जत्रेस भेट देणारे
देश-विदेशातील पर्यटक, ग्राहक व सर्वसामान्य जनतेपर्यंत राज्य शासनाच्या
महत्वाकांक्षी निर्णयाची व योजनांची माहिती पोहचविण्यात आली. लोकराज्य या
शासनाच्या मुखपत्राचा स्टॉलही या ठिकाणी उभारण्यात आला होता. या स्टॉलवर
पर्यटकांची गर्दी बघायला मिळाली. लोकराज्य आणि महाराष्ट्र अहेड या
राज्यशासनाच्या मुखपत्रांची आकर्षक मांडणी आणि दर्जेदार मजकुराला लोकांची पसंती
मिळत होती.
|